व्हीएस न्यूज – यमुनानगर व परिसरात पिण्याच्या पाण्याची कृत्रिम टंचाई जाणवत आहे, अनेक घरांना उंचवटा असल्याने एक तासही पाणी जात नाही, त्यामुळे महापालिकेतर्फे यमुनानगरमध्ये चोविस तास पाणी पुरवठा पुर्ववत करावा, अशी मागणी शिवसेनेच्या महिला शहर संघटिका सुलभा उबाळे यांनी आयुक्तांकडे केली आहे.
त्यांनी निवेदनात म्हटले की, नवनगर विकास प्राधिकरणाने विना टाकीचे गृहप्रकल्प यमुनानगर याठिकाणी बांधलेले आहेत. तसेच अनेक घरे उंचावर आहेत. त्यामुळे परिसरात पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली होती. तत्कालीन आयुक्त आशिष शर्मा यांनी 24 बाय 7 पाण्याचा प्रकल्प राबविण्यासाठी यमुनानगरची प्रायोगिक तत्वावर निवड केली होती. यामुळे यमुनानगरच्या नागरिकांना पाणी मिळू लागले होते. आता तो प्रकल्प बंद केला असून नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. संपुर्ण शहरात 24 बाय 7 पाण्याचा प्रकल्प राबविण्याचे महापालिका नियोजन करित आहे. मात्र, त्यातून यमुनानगरचे प्रकल्प बंद करणे योग्य नाही. त्यामुळे 24 बाय 7 पाण्याचा प्रकल्प यमुनानगरमध्ये तातडीने सुरु करावा, अशीही मागणी उबाळे यांनी केली आहे.