व्हीएस न्यूज - बारा वर्षापूर्वी अंमलात आलेला माहिती कायदा 2005 अद्यापपर्यंत बारा टक्के लोकांपर्यंत देखील पोहचला नाही. वस्तूतः कलम 26 नुसार हा कायदा सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत. ते मागच्या सरकारने केले नाहीत आणि नवीन पारदर्शक सरकार देखील करत नाही. कोणत्याही सरकारला पारदर्शक कारभार नको असतो, अशी टिका माहिती कायदा अभ्यासक व ज्येष्ठ व्याख्याते विवेक वेलणकर यांनी केली.
माहिती कायदा दिनानिमित्त स्वराज्य बहुउद्देशीय कल्याणकारी संस्थेच्या वतीने भोसरीतील विरंगुळा केंद्र येथे आयोजित कार्यक्रमात वेलणकर बोलत होते. यावेळी प्रशिक्षक सुनील पाटील यांचा माहिती कायदा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. पुरस्काराचे स्वरुप 5 हजार 555 रुपये रोख, स्मृतीचिन्ह, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ असे होते. संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय सायकर, ज्येष्ठ नागरीक महासंघाचे अध्यक्ष पंढरीनाथ कामथे, सूर्यकांत मुथीयान, एस. एन. महाजन, संदीप जाधव आदी उपस्थित होते.
वेलणकर म्हणाले की, 2014 मध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात 110 रुपये प्रती बॅरल प्रमाणे कच्चे तेल मिळत होते. सन 2015 ते 17 दरम्यान हाच दर 40 रुपये प्रती बॅरल झाला. या दोन वर्षांत केंद्र सरकारची 5 लाख कोटी रुपयांची आयातीची बचत झाली. यातून केंद्र सरकारने डिझेल, पेट्रोलचे दर कमी करणे अपेक्षित असताना उलट चौपट करवाढ करुन देशातील नागरीकांना महागाईच्या खाईत लोटले. विजय मल्ल्याने बुडविलेले नऊ हजार कोटी रुपये एसबीआय बॅंकेने सामान्य खातेदारांच्या खात्यातून बेकायदेशीररित्या वसूल केले. बचत खात्यात किमान 5 हजार रुपये शिल्लक ठेवण्याचा बेकायदेशीर नियम आणला. त्यातून एप्रिल ते जून या तीन महिन्यात भारतातील 46 मेट्रो सिटी मधून 3.5 कोटी रुपये अन्यायकारपणे दंड वसूल केला आहे. याचा सर्वांत जास्त आर्थिक फटका ज्येष्ठ नागरिकांना बसला आहे. तसेच पीएमपीएलने जिल्हा वाहतूक समितीच्या परवानगी शिवाय ज्येष्ठ नागरिकांच्या पासमध्ये दुप्पट वाढ केली. ही अन्यायकारक दरवाढ रद्द करण्यासाठी 28 ऑक्टोबर 2017 पासून पुणे आणि पिंपरी मध्ये सह्यांची मोहीम सुरु करण्यात येणार असल्याची माहिती वेलणकर यांनी दिली.
सुनील पाटील सत्काराला उत्तर देताना म्हणाले की, सार्वजनिक शिस्तीचा अभाव, अस्तित्वात असणा-या कायद्यांविषयी जनतेत व अधिकाऱ्यांमध्ये आदर, भिती नसल्यामुळे माहिती कायद्याची गरज निर्माण झाली. हा कायदा खूप प्रबळ व सशक्त आहे. शासकीय अधिकारी या माहितीचे विश्वस्त आहे. परंतु, सामान्य जनतेला माहिती न देण्यासाठी अधिकारी मालकासारखे वागतात. या कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होण्यासाठी जनतेनेच पुढे यावे, असे आवाहन सुनील पाटील यांनी केले.
कार्यक्रमाच्या संयोजनात पंकज खटाणे, सुमित लगस, रोहन सोनाळे, कल्पना थोरात, प्रमोद चोबे, किरण सावंत यांनी सहभाग घेतला. स्वागत दत्तात्रय सायकर, सूत्रसंचालन प्रा. एस.आर. शिंदे यांनी केले. तर आभार रोहन सोनाळे यांनी मानले.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002