व्हीएस न्यूज - महापालिका व अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ आणि निळू फुले कला अकादमीच्या संयुक्त विद्यमाने पिंपळे गुरव येथील निळू फुले रंगमंदिर येथे नटसम्राट निळू फुले कला महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी “आठवणी निळूभाऊंच्या’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. निळू फुले यांच्यासोबत काम केलेल्या कलाकारांनी त्यांच्या विविध आठवणी जाग्या केल्या.
कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी, चेतन दळवी, ज्योती सुभाष, शांता तांबे, विलास रकटे, सिंधू काटे, लीला पवार, वसंत इंगळे, तसेच निळू फुलेंचे बंधू अशोक फुले यांनी देखील सहभाग घेतला. या सर्व कलाकारांनी अष्टपैलू निळूभाऊ उलगडून सांगितले. कार्यक्रमासाठी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले, प्रवीण तुपे, राजेंद्र राजापुरे आदी उपस्थित होते.
भालचंद्र कुलकर्णी म्हणाले की, “निळू फुलेंचा ध्यास, श्वास आणि विश्वास हा अभिनय होता. त्यांनी आकाशाला गवसणी घातली तरी देखील ते मातीला कधी विसरले नाहीत. कोल्हापूर शहरातील निळू फुलेंचा पहिला मित्र मी होतो असे म्हणत भालचंद्र कुलकर्णी यांनी जगदीश खेबुडकरांनी एक शिक्षक एक विदूषकसाठी लिहिलेला मुक्तछंद सादर केला.
आठवणी निळूभाऊंच्या या कार्यक्रमात निळू भाऊंचे वाचन प्रेम सर्वांनी उजागरीत केले. त्यांनी आपल्या अगाध वाचनातून माणसे ओळखली. इस्लामपूरमध्ये एका नाटकाच्या प्रयोगावेळी झालेला प्रेक्षकांचा दंगा पन्नास पोलिसांना आवरता आला नाही, तो दंगा निळू फुले यांनी केवळ एका शब्दात शांत केला. आटपाडीसारख्या दुष्काळी तालुक्यात त्यांनी यशस्वी पाणी चळवळ सुरू केली.
कोणत्याही चित्रपटात काम केल्यानंतर पैशांसाठी कधीही त्यांनी तगादा लावला नाही, अशी आठवण वसंत इंगळे यांनी सांगितली. कुठल्याही स्तरात फिट होणारा माणूस म्हणजे निळू फुले. सहकलाकारांसाठी तळमळ वाटणारा माणूस. समाजासाठी समर्पणभाव त्यांच्याकडे होता. ै”मी’पणा त्यांनी कधीच दाखविला नाही, अशा आठवणी अभिनेता चेतन दळवी यांनी सांगितल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राज काझी यांनी केले. कार्यक्रमानंतर नेरुळ, कुडाळ येथील श्री देव कालेश्वर दशावतार नाट्य मंडळाने दशावतार नाटक सादर केले. संपूर्ण दिवसभर प्रेक्षक नाट्यगृहात खिळून राहिला.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002