व्हीएस न्यूज - बालशिक्षणाचे तंत्र समजून घेण्यासाठी तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर केल्यास बाल शिक्षण सर्वदूर पोहचेल. यासाठी शिक्षकांचे व्यावसायिक प्रबोधन व विकास होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन मुंबईतील एसएनडीटी विद्यापीठाच्या माजी कुलगुरु वसुधा कामत यांनी केले.
महाराष्ट्र बालशिक्षण परिषदेच्या वतीने बालशिक्षणाचे तंत्र आणि तंत्रज्ञान या विषयावर नवी सांगवी येथे तीन दिवसीय राज्य अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. शुक्रवारी (दि. 27) उद्घाटनाच्या पहिल्या सत्रात कामत यांनी मार्गदर्शन केले. यावेळी ज्येष्ठ बालशिक्षण तज्ज्ञ प्रा. रमेश पानसे, कार्यक्रमाच्या अध्यक्षा अलका बियाणी, अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष प्रशांत शितोळे, डॉ. दिनेश नेहेते, मेघना बाक्रे, नझीर जमादार, विशाखा देशपांडे, नीता सणस आदी उपस्थित होते.
वसुधा कामत म्हणाल्या की, केंद्र सरकारने स्थापन केलेल्या भारतीय शिक्षण धोरणानुसार मुलांना निर्णय प्रक्रियेत सहभागी करुन घ्यावे. यासाठी अध्ययन योग्य वातावरण शाळेत तयार केले पाहिजे. मुलं ही सर्वांगाणे शिकत असतात. स्पर्श करणे, वास घेणे, हालचाली करुन, खेळून समजून घेणे यातून 6 वर्षांपर्यंत मुलांच्या 75 टक्के मेंदूचा विकास होतो. मोबाईल तंत्रज्ञान वाईट नाही त्याचा योग्य वापर अपेक्षित आहे. या वयोगटातील मुलांना “इको फ्रेन्डली’ आणि“युजर फ्रेन्डली’ विकसित केले पाहिजे. त्याचे प्रशिक्षण पालकांना व शिक्षकांना देणे गरजेचे आहे, असे मार्गदर्शन कामत यांनी केले.
अलका बियाणी म्हणाल्या की, विज्ञानाच्या संकल्पना तंत्रज्ञानातून समजून घेता येतील. चित्रातून, रंगातून आणि कृतीतून नवीन तंत्रज्ञानाने रचनावादी शिक्षण पध्दती अवलंबिली पाहिजे. शेणखत कसं तयार होतं. हे संगणकातून समजून घेता येईल. परंतु, ते बनविण्यासाठी प्रत्यक्ष कृतीची गरज आहे. येणाऱ्या काळात मानवी बुद्धिमत्तेच्या पलिकडील कामे संगणक करु लागेल. याचा उपयोग करुन घेता आला पाहिजे. शिक्षकांचे प्रयत्न, पालकांची मानसिकता, शिक्षण संस्था संचालकांची इच्छा शक्ती, शासनाचे पूरक धोरण यांची एकत्रित सांगड घालून विद्यार्थी केंद्रबिंदू मानून धोरण आखले पाहिजे. यातून विद्यार्थ्यांची शारीरीक, मानसिक जडणघडण उत्तमरित्या होईल. फक्त नोकरी देणारे शिक्षण न राहता मुल्याधिष्ठित शिक्षण व आर्थिक स्वावलंबन यातून साध्य करता येईल, असे मतही बियाणी यांनी व्यक्त केले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते बालशिक्षणाचे तंत्र आणि तंत्रज्ञान ही अधिवेशनाची स्मरणिका प्रकाशित करण्यात आली. स्वागत प्रशांत शितोळे, सूत्रसंचालन सुप्रिया अत्रे यांनी केले. आभार मेघना बाक्रे यांनी मानले.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002