व्हीएस न्यूज - शिक्षणाची रचना करताना शहरी व ग्रामिण भागाचा स्वतंत्र विचार व्हावा. आगामी शंभर वर्षांनी समाज कसा असेल? त्याला सामोरे जाण्यासाठी आजचे ‘हे’ विद्यार्थी सक्षम असावेत अशी शिक्षण पध्दती असावी. तसेच शिक्षण क्षेत्राबरोबरच भारतात मुलभूत ते अत्याधुनिक अशा सर्वच क्षेत्रात संशोधन होण्याची गरज आहे. तंत्रज्ञान चांगले का वाईट हे वापरणाराच्या बुध्दीवर अवलंबून असते. तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा वेग सतत वाढत आहे. त्याचा प्रभाव देखील माणसांवर वेगाने वाढत आहे. पध्दतीत बदल होण्याचा काळ कमी कमी होत आहे. त्यामुळे शिक्षणाच्या रचनेत म्हणजेच ज्ञानरचनेत दूरगामी टिकेल अशी शिक्षण पध्दती शोधून काढावी लागेल. असे मार्गदर्शन जेष्ठ शास्त्रज्ञ राजीव गांधी विज्ञान तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष अनिल काकोडकर यांनी केले.
महाराष्ट्र बालशिक्षण परिषदेच्या वतीने 'बालशिक्षणाचे तंत्र आणि तंत्रज्ञान' या विषयावर पुणे, नवी सांगवी येथे तीन दिवसीय 24 वे राज्यस्तरीय अधिवेशनाचा समारोप रविवारी (दि. 29 ऑक्टोबर) झाला. यावेळी समारोप सत्राच्या कार्यक्रमात अनिक काकोडकर, एमकेसीएलचे व्यवस्थापकीय संचालक विवेक सावंत, स्वागताध्यक्ष प्रशांत शितोळे, महाराष्ट्र बालशिक्षण परिषदेचे संस्थापक प्रा. रमेश पानसे आदींसह राज्यभरातून सहभागी झालेले शिक्षक उपस्थित होते.
काकोडकर म्हणाले की, सरकारच्या कोणत्याही खात्यात ‘बालशिक्षण’ येत नाही. त्या दुर्लक्षित परंतू अत्यंत आवश्यक असणा-या क्षेत्रात महाराष्ट्र बालशिक्षण परिषद अनेक वर्षांपासून काम करते हे कौतुकास्पद आहे. पाश्चिमात्य देशात शिक्षण, मेंदू, तंत्र, तंत्रज्ञान या विषयी अधिक संशोधन झाले आहे. मात्र भारतात मेंदू या विषयावर संशोधन करणारे विद्यार्थी देखिल मिळत नाही हि चिंतेची बाब आहे. मेंदूचा विकास आजूबाजूच्या वातावरणावर अवलंबून असतो. असेही मागदर्शन अनिल काकोडकर यांनी केले.
एमकेसीएलचे व्यवस्थापकीय संचालक विवेक सावंत मार्गदर्शन करताना म्हणाले की, मानवी बुध्दीमत्ता विचारांची निर्मिती करु शकते, तर तंत्रज्ञान उत्पादनांची निर्मिती करु शकते. प्रज्ञा आणि प्रतिभेची निर्मिती करणे म्हणजे ज्ञान होय. तंत्रज्ञानाने माणसाला यंत्र करता आले. परंतू माणसामध्ये असणारी सर्जनशिलता, विवेक, भावना, निर्णयक्षमता यंत्रामध्ये आणता आली नाही. आपल्याला अजून मानवी मेंदूचे, बुध्दीमत्तेचेच पुर्ण आकलन झालेले नाही. मानवी बुध्दीमत्तेचा कृत्रिम अविष्कार अद्याप शक्य नाही. मानवी बुध्दीमत्ता आणि संगणची न मानवी बुध्दीमत्ता एकमेकाच्या विरुध्द टोकाला आहे. मानवी मेंदू जे करु शकतो ते तंत्रज्ञान, संगणक, गुगल करु शकत नाही. परंतू जे काम अनेक माणसांना, संस्थांना, सरकारला एकत्र येऊन देखिल करणे शक्य नाही ते काम संगणक त्याच्या आज्ञावली, प्रणाली नूसार क्षणार्धात करु शकते. मेंदूचे आकलन आणि संगणकाचे तंत्रज्ञान एकत्र येऊन अनेक नविन अविष्कार आगामी काळात जन्माला येतील. त्यातून पर्यावरण, सार्वजनिक आरोग्य, जागतीक तापमान, शिक्षण संपत्ती, जीवांचे रक्षण, ऊर्जेचा प्रश्न, सोलर, इलेक्ट्रिक कारची निर्मिती असे अनेक जटील प्रश्न सुटण्यास मदत होईल. असा आशावाद विवेक सावंत यांनी व्यक्त केला.
या अधिवेशनात बालकांच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला. तो खालील प्रमाणे
1) मानवाचा भविष्यकाळ हा बालकात साठवलेला असतो. कल्याणकारी मानवी जीवनाचे संचित बालकाच्या रुपाने मानवाच्या प्रत्येक पिढीत अस्तित्वात असते. मानवाच्या हितासाठी या पुढच्या पिढीचे जतन करणे, तिची जोपासना करणे आणि तिला नवजीवनाला तयार करणे हे प्रत्येक प्रौढ पिढीचे आद्य कर्तव्य असते.
2) संपूर्ण प्राणीविश्वात फक्त मानवाचे बालक दीर्घकाळ परावलंबी असते, ही निसर्गदत्त बाब विचारात घेऊन, या परावलंबित्वाच्या काळात प्रत्येक बालकाचे संरक्षण करणे व त्यास आवश्यक ती मदत देऊन विकासप्रवण करणे, हे प्रत्येक कुटूंबाचे आद्दय कर्तव्य असते.
3) प्रत्येक बालकाला त्याच्या बाल्यावस्थेत, बालकाप्रमाणे जगण्याचा हक्क आहे. बालकाचे बाल्य हरवणार नाही याची काळजी समाजाने घ्यायची आहे. कोणत्याही प्रकारचे आचार, विचार, श्रम, विद्या यांचे प्रौढत्व बालकावर लादून त्याचे दमन व शोषण होणार नाही हे समाजाने व सरकारने पाहिले पाहिजे.
4) जन्मल्यापासून प्रत्येक बालक हे वयाने, शक्तीने, ज्ञानाने व अनुभवाने लहान असले तरी ते म्हणजे एक संपूर्ण मनुष्य आहे, त्याला त्याचे शरीर, मन आहे, त्याला त्याच्या भावना आहेत, त्याची कल्पनाशक्ती आहे, एवढेच नव्हे तर त्याची स्वतंत्र अशी तर्कशक्ती आहे याची दखल,कुटूंबातील व समाजातील सर्वांनी घेतली पाहिजे.
5)प्रत्येक बालकाला उपजत काही लाभ मिळालेला असतो. हे लक्षात घेऊन त्याच्या उपजत बुध्दिमत्तांचा शोध घेण्यासाठी त्याला अनुभवयुक्त शैक्षणिक संधी प्राप्त झाल्या पाहिजेत, त्याच्या बुध्दिमत्तांनुसार वाढण्याचा व विकासाच्या संधी त्याला मिळाल्या पाहिजेत.
6)प्रत्येक बालक म्हणजे एक स्वतंत्र नैसर्गिक घटक आहे. त्यामुळे त्याला स्वत:च्या क्षमतांनुसार, स्वत:चा कल लक्षात घेऊन प्रगती करण्यास वाव मिळाला पाहिजे.
7)प्रत्येक बालकाला त्याच्या कुटूंबात, समाजात व विश्वात समान स्थान व समान मान मिळण्याचा अधिकार आहे. धर्म, वंश, वर्ग, जाती, लिंग व स्थान यांवरून होणा-या भेदांपासून बालकाचे जीवन अलिप्त राहिले पाहिजे. कुटूंबातील व समाजातील सर्व सुख सोयींमध्ये बालकाचा समान वाटा मानला व राखला गेला पाहिजे.
8) समाजातील एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून प्रत्येक बालक आदरास प्राप्त आहे. निसर्गाने त्याला बहाल केलेले स्वातंत्र्य जपण्याचा हक्क आहे आणि हेच त्याच्याप्रती इतरांचे कर्तव्य आहे.
9)बालकाच्या उपजत बुध्दिमत्ता, नैसर्गिक क्षमता व बालसुलभ इतर गरजा विचारात घेऊनच, बालकासाठी शिक्षणव्यवस्था निर्माण झाल्या पाहिजेत. तेथे स्वातंत्र्य जपले गेले पाहिजे, त्याच्या स्वयंप्रेरणेला, स्वयंस्फूर्तीला आणि स्वयंशिस्तीला पूर्णांशाने वाव मिळाला पाहिजे.
10) बालकाच्या बौध्दिक, भावनिक आणि एकूण विकासक स्वातंत्र्यातच बालकात सुप्त असलेल्या प्रौढाचे स्वातंत्र्य अनुस्युत आहे. यातच राष्ट्राचे भवितव्य सुखरुप आहे आणि मानवी जीवनाचे विकासक स्वातंत्र्य अबाधित आहे. याची खूणगाठ प्रत्येक माणसाने आपल्या मनाशी बांधली पाहिजे. बालकाच्या स्वातंत्र्यासाठी प्रत्येक माणसाने झटले पाहिजे.
अहवाल वाचन आणि अधिवेशनाचा आढावा संस्थेच्या माजी सचिव आदिती नातू, स्वागत प्रशांत शितोळे, सुत्रसंचालन मेघना बाक्रे आणि आभार नजीर जमादार यांनी मानले.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002