व्हीएस न्यूज – सांगवी येथील मुळा व पवना नदीपात्रात मैलामिश्रित पाणी थेट सोडण्यात येत आहे. महापालिका प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष केले असून चेंबर दुरुस्त करुन नदीपात्रात येणारे पाणी थांबवावे, अशी मागणी माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.
याबाबत दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, पिंपळे गुरवमधील स्मशानभूमीच्या पाठीमागे ड्रेनेज लाईन फुटली आहे. तेथील मैलापाणी थेट पवना नदीच्या पात्रात जात आहे. या मैला पाण्यामुळे संपूर्ण नदीपात्र दूषित होवून प्रचंड दुर्गंधी सुटली आहे. याशिवाय त्या भागात डासांचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
नदीपात्रातील बहुतांश चेंबर तळाला फुटलेले असून संपुर्ण मैला मिश्रीत पाणी नदीपात्रात मिसळून पाणी दुषित होत आहे. दरम्यान, मैलायुक्त पाणी नदीपात्रात येऊनही स्थानिक नगरसेवक गप्प का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. निकृष्ट कामामुळे ही लाईन फुटली असून त्यांचा फटका पिंपळे गुरव, सांगवीकरांना मोठ्या प्रमाणात बसत आहे. त्यामुळे नदीपात्रात मिसळणारे मैलापाणी थांबवावे, अशी मागणी जगताप यांनी केली आहे.