व्हीएस न्यूज – स्वच्छ भारत अभियान, गांधी जयंती यांसारख्या निमित्ताने संपूर्ण शहरात महापालिकेतर्फे स्वच्छता अभियान राबविण्यात येते. परंतु, शहराचा औद्योगिक परिसर मात्र स्वच्छ भारत अभियानापासून वंचित ठेवण्यात येतो. औद्योगिक परिसराच्या स्वच्छतेकडे महापालिका जाणीवपूर्वक कानाडोळा करत आहे, असा आरोप पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांनी केला आहे.
औद्योगिक परिसरात कचरापेट्यांची संख्या कमी आहे. तसेच ज्या ठिकाणी कचरापेट्या ठेवण्यात आल्या आहेत, तेथील कचरा देखील नियमितपणे उचलला जात नाही. त्यामुळे औद्योगिक परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले असून डेंगू,मलेरिया, स्वाईन फ्लू यांसारखे आजार पसरण्यास पोषक वातावरण तयार झाले आहे.
पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेकडून मागील काही वर्षांपासून कचरापेट्या वाढविण्यासाठी व वेळेवर कचरा उचलण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे पाठपुरावा करीत आहे. तत्कालीन आयुक्त राजीव जाधव यांनी औद्योगिक भागातील कचरा वेळच्यावेळी उचलण्यासाठी घंटागाडी सुरु करण्याचे आदेश आरोग्य विभागाला दिले होते. आरोग्य विभागाकडून हा विषय बारगळला असल्याने संघटनेकडून विद्यमान आयुक्तांसमोर हा विषय मांडला. आयुक्तांनी आरोग्य अधिकाऱ्यांना त्याबाबत सांगितले असता अपुऱ्या मनुष्यबळाचे कारण सांगत याबाबत उदासीनता दाखविण्यात आली आहे.
एमआयडीसी पेठ नंबर 7 आणि 10 पीसीएनटीडीए भोसरी या परिसरात मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग साठले असून पेठ नंबर 10 मधील प्लॉट नं. 30/31 च्या मागील अग्निशमन केंद्रासाठी राखून ठेवलेला भूखंड तर डम्पिंग ग्राउंड झाला आहे. सर्व औद्योगिक परिसरातील कचरा तातडीने उचलून पेठ नंबर 10 मधील डम्पिंग ग्राउंड तातडीने बंद करावे. अन्यथा लघुउद्योग संघटनेतर्फे महापालिकेच्या कार्यालयात कचरा फेको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांनी महापालिकेला दिला आहे.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002