कौशल्यानुसार टक्केवारीवर गुण, शिक्षण विभागाचा निर्णय
व्हीएस न्यूज – दहावीच्या बोर्ड परीक्षेत कला आणि क्रीडा स्पर्धांच्या निमित्ताने देण्यात येणा-या अतिरिक्त गुणांच्या खैरातीला आता आळा घालण्यात येणार आहे. यामुळे या अतिरिक्त गुणांमुळे निर्माण होणारा गुणांचा फुगवटा अखेर फुटणार आहे. या परीक्षेत बसणा-या विद्यार्थ्यांना सरसकट गुण देण्याऐवजी, त्यांच्या कौशल्यानुसार टक्केवारीच्या आधारावर हे गुण देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. शुक्रवारी जीआरच्या माध्यमातून हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.
शिक्षण विभागातर्फे कला, क्रीडा स्पर्धेत प्रावीण्य मिळविणा-या विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुण दिले जातात. त्यामुळे या निर्णयाच्या मदतीने मुंबईसह राज्यातील अनेक विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण मिळविले होते. दरम्यान निकालाचा टक्का वाढविण्यासाठी या निर्णयाचा उपयोग करून घेतल्याचे निदर्शनास आल्यानंतर, शिक्षण विभागाने या अतिरिक्त देण्यात येणा-या गुणांच्या निकषात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.
शुक्रवारी जाहीर झालेल्या नव्या निर्णयानुसार, शास्त्रीय नृत्य, गायन आणि वादनात तिसरी आणि पाचवी परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुण दिले जातील. सांस्कृतिक कार्यालयाकडे नोंदणीकृत असलेल्या संस्थांमधूनच परीक्षा देणे बंधनकारक आहे. चित्रपटासाठी राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार मिळवणा-या बालकलाकाराला दहा गुण, तर राज्य पातळीवर पुरस्कार मिळवणा-या विद्यार्थ्यांला पाच गुण अतिरिक्त दिले जाणार आहेत. प्रयोगात्मक लोककलेसाठी अभ्यासक्रम तयार करण्याची सूचना शिक्षण विभागाने सांस्कृतिक विभागाला केली आहे. या अभ्यासक्रमानुसार गुणदान ठरवले जाणार आहे.
इंजरमिजिएट चित्रकला परीक्षेत अ श्रेणी मिळाल्यास सात गुण, ब श्रेणीसाठी पाच गुण, क श्रेणीसाठी तीन गुण दिले जातील. लोककलेत प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना त्यांनी केलेल्या प्रयोगांच्या संख्येनुसार गुण दिले जाणार आहेत. त्यानुसार २५ ते ४९ प्रयोग केलेल्या विद्यार्थ्यांना पाच गुण, पन्नासपेक्षा जास्त प्रयोग करणा-या विद्यार्थ्यांना दहा गुण दिले जाणार आहेत.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002