व्हीएस न्यूज - शिवरायांनी प्रत्येक वेळी युद्धाचे नवीन तंत्र वापरले. तंत्राला अनुसरुन शिवाजी महाराज व्यक्ती निवड करत होते. म्हणून एकच सैनिक सर्वत्र सारखा सारखा शिवचरित्रात आढळत नाही. आज या रणनीतीचा अभ्यास सर्व क्षेत्रात उपयोगी पडू शकतो, असे प्रतिपादन चिखलीतील कॉन्क्वेस्ट कॉलेजचे प्रा. प्रदीप कदम यांनी केले.
महावीर एज्युकेशन सोसायटी व शाहु शिक्षण संस्था भोसरी आयोजित प्रकाश व्याख्यानमालेत प्रा. प्रदीप कदम यांनी 'शिवरायांची रणनिती' या विषयावर तृतीय पुष्प गुंफले. यावेळी भगवान महावीर संस्थेचे, डॉ. अशोक पगारिया, विजय पारेख, शाहू शिक्षण संस्थेचे अजय साळुंखेे, विश्वस्त कोमल साळुंखेे, प्रा. राहुल खामकर, प्राचार्य सदाशिव कांबळे, प्रा. पांडुरंग भास्कर, विलास पगारिया, प्रा. विभा ब्राम्हणकर, प्रा. पांडुरंग भास्कर आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रा. प्रदीप कदम म्हणाले, आपल्याला अनुकुल असणाऱ्या व प्रतिकूल रणक्षेत्रात आणण्यासाठी शत्रूला भाग पाडले की अर्धा विजय अगोदरच होतो आणि मग हवी तशी चाल टाकून विजय मिळवता येतो. हिच शिवरायाची रणनिती होती. शत्रू बलाढ्य असेल, तर उघड्या मैदानात लढणे शक्य नाही, म्हणून अकस्मात हल्ला करणे, अत्यंत वेगाने आक्रमण करणे, शत्रूचे मानसिक दृष्टीने खच्चीकरण करणे, हातावर तुरी देणे, एकाच वेळी अनेक बाजूंनी आक्रमण करणे, आपले सैन्य संख्येने खुप आहे हे शत्रूला भासवणे, ऐनवेळी तहदेखील करणे व मुख्य म्हणजे गनिमी कावा, अशी शिवरायांची रणनीतीची अनेक तंत्रे प्रा. कदम यांनी श्रोत्यांना आपल्या अस्खलित आणि आक्रमक भाषेत उलगडून दाखवली.
छत्रपती शिवाजी महाराज परिस्थितीचा व भौगोलिक स्थितीचा अभ्यास, मानसशास्त्र, व्यक्ती आणि तंत्रांचा अभ्यास सखोल करत होते. स्वतः युद्धात सहभागी होत असल्याने सैनिकांमध्ये वीरश्री संचारत असायची, उच्च प्रतीचे आरमार, जागरूक व दक्ष हेर खाते, सैन्य दलासाठी अधिक खर्च, वेगवान अश्व निर्मिती, सैन्य व रयत यांची नुकसान तथा हानी टाळणे अशा बारीक सारिक गोष्टींचा रणनीतित समावेश होता, म्हणून किल्ले जिंकून यश मिळाले व हिंदवी स्वराज्य स्थापन झाले, असेही कदम यांनी सांगितले.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002