व्हीएस न्यूज - शहरात राष्ट्रीय बॅंका, सहकारी बॅंका, पतसंस्थांनी नागरिकांच्या सोईसाठी विविध भागात एटीएम उघडण्यात आली आहेत. मात्र, बॅंकांच्या वतीने एटीएममध्ये सुरक्षा रक्षकांची नेमणुक केली जात नाही. त्यामुळे दिवसेंदिवस एटीएम फोडण्याचे प्रमाण वाढले आहे. बॅकांनी एटीएमची सुरक्षा वाऱ्यावर सोडल्याचा आरोप ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अरूण बकाल यांनी केला आहे.
याबाबत बकाल यांनी प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात विविध राष्ट्रीय बॅंका, पतसंस्था, सहकारी बॅंकांची सुमारे दोन हजार एटीएम केंद्र आहेत. तर देशभरात विविध बॅंकांची दोन लाख 15 हजार 38 एटीएम केंद्र आहेत. यामध्ये सर्वाधिक एटीएम केंद्र महाराष्ट्रात असून त्याची संख्या 24 हजार 829 आहे. त्याखालोखाल तामिळनाडूत एटीएमची संख्या आहे. महाराष्ट्रातील अनेक एटीएम केंद्रात अग्निशमन प्रतिबंधक यंत्रणा बसविण्यात आली नसल्याचा आरोप बकाल यांनी केला आहे. त्यामुळे आगीच्या घटनांमध्ये एटीएममधील संपूर्ण रक्कम जळून खाक होत आहे. अनेक एटीएम केंद्रामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे असतात. परंतू, सुरक्षारक्षक नसतात. त्यामुळे ज्य़ांना पैसे काढता येत नाही, अशा व्यक्तींची भामट्यांकडून फसवणूक होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढले आहे. तसेच काही ठिकाणी तर एटीएम केंद्रातील मशीन चोरट्यांनी चोरून नेल्याची धक्कादायक घटना घडल्या आहेत. त्यामुळे बॅंकांनी प्रत्येक एटीएम केंद्रात सुरक्षा रक्षकांची नेमणूक करावी, अशी मागणी अरूण बकाल यांनी केली आहे.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002