व्हीएस न्यूज - ‘रिझर्व्ह बँकेने रेपो दर कमी केल्यानंतर देशातील व्यावसायिक बँकांनी आपले व्याजदर कमी करणे आवश्यक आहे,’ अशी अपेक्षा रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी शुक्रवारी व्यक्त केली.
‘पुणे इंटरनॅशनल सेंटर’ आणि ‘इंडिया डेव्हलपमेंट फाउंडेशन’च्या वतीने ‘वेगवान आर्थिक विकास’ या विषयावर आयोजित चर्चासत्राचे उद्घाटन पटेल यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते.
ते म्हणाले, ‘अर्थपुरवठा सुरळीत रहावा आणि महागाईही नियंत्रणात रहावी, ही प्रमुख उद्दिष्टे डोळ्यांसमोर ठेवून पतधोरण निश्चित करण्यात येते. त्या दृष्टिने रेपो दरांमध्ये बदल झाल्यानंतर त्याचे परिणाम योग्य पद्धतीने जाणवण्यासाठी व्यावसायिक बँकांनी सहकार्य करणे आवश्यक आहे. रेपो दर कमी झाल्यानंतर व्यावसायिक बँकांनी त्याच प्रमाणात व्याजदर घटविणे आवश्यक आहे. त्यातूनच कर्जे कमी दरात उपलब्ध होतील आणि अर्थव्यवस्थेला चालना मिळू शकेल.’
‘बँकांनी व्याजदर कमी केल्यावर राष्ट्रीय उत्पन्नात सुधारण होईल; तसेच गुंतवणुकीस चालना मिळून रोजगारातही वाढ होईल. सर्वसामान्यांची क्रयशक्ती वाढून विकासाचा दर वाढेल,’ अशी मांडणी पटेल यांनी केली. महागाई नियंत्रण आणि अर्थव्यवस्थेतील स्थैर्य यांचा विचार करून रिझर्व्ह बँक काळजीपूर्वक निर्णय घेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002