व्हीएस न्युज - पुण्यातील ‘दादा मी प्रेग्नंट आहे’ या बॅनरचे गूढ उकलले असतानाच आता हडपसरमध्ये ‘जा तू स्वप्नली, मी तुला राहू देणारच नाही’ असे पत्रक ठिकठिकाणी लावण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी ही भित्तीपत्रके काढली असून या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. हडपसर येथे बुधवारी सकाळी भिंतीवर आणि विजेच्या खांबावर पत्रके लावण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
या पत्रकांमध्ये एका तरुणीविषयी आक्षेपार्ह मजकूर असल्याने पोलिसांनी ही पत्रके काढून टाकली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आता तपासाला सुरुवात केली आहे. पत्रकावरुन आकाश, स्वप्नली आणि शैलेश या तीन नावांचा उल्लेख असून प्रेमभंगातून ही पत्रकबाजी करण्यात आल्याचे दिसते.
काय म्हटलंय पत्रकात ?
‘स्वप्नली आणि मी कॉलेजमध्ये असल्यापासून रिलेशनशिपमध्ये होतो. घरच्यांच्याविरोधात जाऊन आम्ही लग्न देखील केले. पण ती मला काही महिन्यांपूर्वी सोडून गेली. तिचं माझ्या आईशी पटत नव्हते. तिला माझ्या घरच्यांसोबत राहायचे नव्हते. आता ती शैलेश नामक तरुणाशी लग्न करत आहे. ती पैशांसाठी त्याच्याशी लग्न करत असून नवरा- बायकोचं नाते सोडून कोणी जातं का?. जी मला सोडून जातेय ती दुसऱ्याची काय होणार? तू कुठेही जा स्वप्नली मी तुला राहूच देणार नाही’, असे या पत्रकात म्हटले आहे.
व्हीएस न्युज - चिखली येथील घरकुल प्रकल्पातील सदनिका बांधून तयार असूनही, लाभार्थ्यांना वाटप करण्यास दिरंगाई करणाऱ्या पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाला सामाजिक कार्यकर्ते अजिज शेख व रिपब्लिकन युवा मार्चाच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी (दि. ४) ताळ्यावर आणले. या आंदोलकांनी सदनिका वाटपाला विलंब का होतोय? याचा जाब विचारला. त्यामुळे घाबरलेल्या अधिकाऱ्यांनी ९ इमारतीतील ३७८ सदनिका लाभार्थ्यांना हस्तांतरासाठी त्वरित कार्यवाही सुरू करण्याचे लेखी आश्वासन आंदोलकांना दिले. दहा वर्षांपासून या प्रकल्पाचे काम पूर्ण करत नसलेल्या ठेकेदाराला ब्लॅक लिस्ट करण्याची मागणी अजिज शेख यांनी केली. परंतु, सहशहर अभियंता राजन पाटील यांनी कार्यकारी अभियंता प्रदीप पुजारी यांच्यामार्फत आंदोलकांना घरकुल प्रकल्पाच्या कामाला ३१ मार्च २०१९ पर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याचे लेखी उत्तर देऊन पळवाट शोधली.
पिंपरी चिंचवड महापालिकेमार्फत केंद्र सरकारच्या बीएसयुपी योजनेअंतर्गत चिखली येथे घरकुल योजना राबविली जात आहे. या योजनेअंतर्गत आर्थिक दुर्बल घटकांतील नागरिकांना हक्काची घरे देण्याचा उद्देश आहे. २००८ पासून सुरू असलेली ही योजना अद्यापही पूर्ण करण्यात आलेली नाही. दहा वर्षांत काही लाभार्थ्यांना घरांचे वाटप करण्यात आलेले आहे. परंतु, अनेक लाभार्थी अजूनही हक्काचे घर कधी मिळणार याकडे गेल्या दहा वर्षांपासून टक लावून पाहत आहेत. या योजनेसाठी पात्र ठरलेले लाभार्थींनी महापालिकेच्या झोपडपट्टी निर्मुलन व पुनर्वसन कार्यालयात तसेच कर्ज प्रकरणे मंजुरीसाठी वेगवेगळ्या बँकेत, शासनाचे विविध दाखले मिळवण्यासाठी तलाठी कार्यालयात, नागरी सुविधा केंद्र, तहसिल कार्यालय यांसह इतर अनेक शासकीय कार्यालयात चकरा मारल्या आहेत. या सर्व कार्यालयांची उंबरे झिजवल्यानंतर शेवटी कुठे तरी जाऊन हे लाभार्थी पात्र ठरले आहेत. तरीही या पात्र लाभार्थींना गेल्या दहा वर्षांपासून त्यांच्या स्वप्नाचे घर काही मिळत नाही. पात्र लाभार्थ्यांनी बँकेचे घेतलेले कर्ज महापालिकेला जमाही झाले आहे. मात्र घर नसूनही हे लाभार्थी बँकांचे कर्जाचे हप्ते फेडत आहेत.
या प्रकल्पांतर्गत काही सदनिका बांधून तयार असूनही त्याचे लाभार्थ्यांना वाटप करण्यासाठी प्रशासनाकडून दिरंगाई होत आहे. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते अजिज शेख यांनी लाभार्थ्यांना सदनिकांचे त्वरित वाटप सुरू न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. याबाबत त्यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले होते. त्यानुसार अजिज शेख व रिपब्लिक युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रवेशद्वारासमोर मंगळवारी (दि. ४) दुपारी १२ वाजता आंदोलन केले.
सहशहर अभियंता राजन पाटील यांनी आंदोलकांना दुपारी साडेतीन वाजता चर्चेसाठी बोलावले. आयुक्त हर्डीकर यांच्या कक्षात ही चर्चा झाली. यावेळी नगरसेविका आशा धायगुडे-शेंडगे, झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागाचे सहाय्यक आयुक्त चंद्रकांत इंदलकर, स्थापत्य विभागाचे कार्यकारी अभियंता प्रदीप पुजारी व इतर अधिकारी उपस्थित होते. सदनिका बांधून तयार असताना त्या वाटप का केल्या जात नाहीत?, असा सवाल समाजिक कार्यकर्ते अजिज शेख यांनी केला. सदनिका वाटपासाठी स्थापत्य आणि झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागाचे अधिकारी एकमेकाकडे बोट दाखवत असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच सदनिका वाटपाचे लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा इशारा त्यांनी दिला. त्यामुळे कार्यकारी अभियंता प्रदीप पुजारी यांनी प्रकल्पाच्या ९ इमारतीतील ३७८ सदनिका तयार असून त्या लाभार्थ्यांना हस्तांतर करण्यासाठी त्वरित कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासन आंदोलकांना दिले. त्यानंतर अजिज शेख यांनी घरकुल प्रकल्पाचे दहा वर्षांपासून काम पूर्ण होत नसल्याबद्दल सहशहर अभियंता राजन पाटील यांना फैलावर घेतले. आंदोलकांच्या या प्रश्नाला काय उत्तर द्यावे, हेच त्यांना समजत नव्हते. अजिज शेख यांनी प्रकल्पाचे काम पूर्ण न करणाऱ्या मे. पवार-पाटकर या ठेकेदार कंपनीला ब्लॅक लिस्ट करण्याची मागणी केली. परंतु, राजन पाटील यांनी कार्यकारी अभियंता प्रदीप पुजारी यांच्यामार्फत आंदोलकांना घलकुल प्रकल्पाच्या कामाला ३१ मार्च २०१९ पर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याचे लेखी उत्तर देऊन पळवाट शोधली.
व्हीएस न्युज - मोबाईल टॉवरच्या बॅटरी चोरण्याच्या संशयावरून एका तरूणाला अटक करून बेदम मारहण करत विजेचा शॉक देऊन त्याच्याकडून ८ लाख रूपये उकळणाऱ्या गुन्हे शाखेच्या पोलीस कॉन्स्टेबल आणि त्याच्या सहकाऱ्यावर आज (शनिवार) पिंपरी पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान, या दोघांवर पोलीस आयुक्तांनी निलंबनाची कारवाई केली आहे. रमेश नाळे आणि हेड कॉन्स्टेबल राजू केदारी असे निलंबित केलेल्या गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस कर्मचारी आहेत. याना लवकरच अटक करण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्त आर.के.पद्मनाभन यांनी सांगितले.
दरम्यान, या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल रमेश नाळे आणि राजू केदारी यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी शुक्रवारी (दि.३०) दिले होते. त्यानुसार पिंपरी पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. आता त्यांना लवकरच अटक होण्याची शक्यता आहे.
व्हीएस न्युज - पिंपरीत अश्लील फोटोच्या आधारे संगणक अभियंता असणाऱ्या तरुणीला ब्लॅकमेल करुन तिच्यावर बलात्कार केल्याची आणि फ्लॅटचा अर्धा हिस्सा बळकावल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी २९ वर्षीय तरुणीने सांगवी पोलिसांकडे तक्रार दिली असून बलात्कार करणाऱ्या नराधमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कृत्यात नराधमाला त्याच्या पत्नीचीही साथ होती, असे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे.
पीडित तरुणी ही गेल्या आठ वर्षांपासून तरुण उर्फ शिबू सिद्दीकी याला ओळखते. शिबूने या ओळखीचा गैरफायदा घेत पीडितेचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ काढले. या आधारे तो तरुणीला ब्लॅकमेल करु लागला. त्याने पीडितेवर बलात्कार केला. तसेच पिंपळे सौदागरमधील तिचे राहते घरही बळकावले. त्याने फ्लॅटचा अर्धा हिस्सा बक्षीस पत्राद्वारे नावावर करून घेतला आहे. या कृत्यात त्याला पत्नी रक्षी शिबु सिद्दीकीचीही साथ होती. या घटनेची बाहेर वाच्यता केल्यास ठार मारु अशी धमकीही त्याने पीडितेला दिली होती. मात्र, हे अत्याचार असह्य झाल्याने पीडितेने शेवटी सांगवी पोलिसांकडे तक्रार दाखल केली.
पीडित तरुणी ही गेल्या काही वर्षांपासून हिंजवडीमधील आयटी कंपनीत संगणक अभियंता म्हणून काम करत आहे. तर आरोपी दाम्पत्य हे मूळचे उत्तर प्रदेशमधील गोविंदपूरचे रहिवासी आहेत. या प्रकरणी महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक अलका सरग या अधिक तपास करत आहेत.
व्हीएस न्युज - पती आणि सासरच्या व्यक्तींना कंटाळून किंवा सासूच्या छळाला कंटाळून सुनेने आत्महत्या केली अशा अनेक घटना आपण वाचल्या असतील. परंतु पिंपरी-चिंचवडमध्ये पत्नीच्या छळाला कंटाळून पतीने आत्महत्या केल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे.
पत्नी तृप्तीला दारू आणि शॉपिंगचे व्यसन होते. त्यामुळे तिला नेहमी पैसे खर्च करावे लागत. मयत पती जयकडे पैशांसाठी ती नेहमी तगादा लावत असे. पैसे दिले नाही तर तृप्ती जयला मारहाण करत होती, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.तृप्तीला चिखली पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अटक केली आहे. जय देविदास तेलवानी (वय -३५) असं आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहे. तर तृप्ती जय तेलवानी असं आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलेल्या पत्नीचे नाव आहे.
तृप्तीला दारू आणि शॉपिंग चे व्यसन होते त्यामुळे तिला नेहमी पैसे खर्च करावे लागत. आरोपी तृप्तीला चिखली पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी जयची आई कांचन देविदास तेलवानी यांनी चिखली पोलिसात फिर्याद दिली आहे.
सविस्तर माहिती अशी की,नोव्हेंबर महिन्यात मयत जय देविदास तेलवानी याने पत्नीच्या छळाला कंटाळून आपले जीवन संपविले होते. त्यानंतर जयच्या कुटुंबाने पत्नीच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली आहे असा आरोप करत चिखली पोलिसात सुनेविरोधात तक्रार नोंदवली होती. त्यानुसार चिखली पोलिसांनी तपास सुरू केला. त्यात सून तृप्ती जय तेलवानी ही दोषी आढळली आहे.
पती-पत्नी हे गेल्या काही वर्षांपासून आई वडीलांपासून स्वतंत्र राहतात. जय हा प्लंबरचे काम करायचा तर तृप्ती गृहिणी होती. त्यांना एक पाच वर्षांचा मुलगा आहे. संसार सुखाचा सुरू असताना पत्नीला दारूचे व्यसन लागले. तसेच ती मोठ्या प्रमाणावर शॉपिंग करत होती. पती जयला पैशांसाठी तगादा लावायची, यासाठी तिने एकदा कर्जाचे पैसे काढायला भाग पाडले होते. पैशांची पूर्तता न केल्यास तृप्ती जयला शिवीगाळ करत मारहाण करायची. पुढे चालून तिने स्वतःआत्महत्या करण्याची धमकी जयला दिली होती.
जय पूर्णतः मानसिक तणावाखाली आला होता. तृप्तीने जयला कँसर असल्याचा व्हिडीओ बनवला आणि तो सगळ्या मित्रांना दाखवून मानसिक आणि शारिरीक छळ सुरू ठेवला. याच तणावातून जयने नोव्हेंबर महिन्यात आत्महत्या करत जीवन संपविले. दरम्यान, आता त्याच्या पाच वर्षीय मुलाला आजीकडे राहावं लागतं आहे. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
व्हीएस न्युज - वडिलांकडून दिड लाख रुपये उकळण्यासाठी एका तरुणाने स्वत:च्याच अपहरणाचा बनाव करुन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आणण्यात भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यातील पोलीस पथक आणि खंडणी विरोधी पथकाला यश आले आहे.
याप्रकरणी विनय राजेंद्र चव्हाण (वय २२, रा. गंधर्वनगरी, तापकीरनगर, मोशी) या तरुणाला ताब्यात घेण्यात आला आहे. त्याचे वडिल राजेंद्र किसन चव्हाण (वय ५३) यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार दाखल केली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (दि.२८ नोव्हेंबर) सायंकाळी पावनेसहाच्या सुमारास विनय चव्हाण या तरुणाने घरातून निघून जाऊन स्वत:च्या अपहरणाचा बनाव केला. त्यानंतर वडिलांच्या मोबाईल नंबरवर हिंदी भाषेत मेसेज करुन अपहरण करता बोलत असल्याचे भासवून दीड लाख रुपयांची खंडणी मागली. तसेच पैसे न दिल्यास आणि पोलिसांना याबाबतची माहिती दिल्यास मुलाला मारुण टाकण्याची धमकी दिली. यावर विनय याचे वडिल राजेंद्र यांनी भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
तक्रार दाखल होताच भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यातील पोलीस पथक आणि खंडणी विरोधी पथकाने एकत्रीतरित्या तपास चक्र फिरवत तांत्रिक माहितीच्या आधारे धमकीचा मेसेज आलेला मोबाईल नंबर ट्रेस केला. मोबाईलचे लोकेशन मुंबईतले दाखवत होते. त्याआधारे पोलीसांचे एक पथक मुंबईत दाखल झाले त्यांनी सीएसटी रेल्वे स्थानकावर शोध घेत असता त्यांना विनय तेथे आढळून आला. पोलीसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांने स्वत:च अपहरणाचा बनाव रचल्याचे कबुल केले. तसेच रेल्वे प्रवासात एकाचा मोबाईल चोरुन त्याव्दारे वडिल राजेंद्र यांना मेसेज करुन धमकावल्याचेही सांगितले. पोलिसांनी विनय याला ताब्यात घेतले आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त आर.के.पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, परिमंडळ एखच्या पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक पोलीस आयुक्त सतिश पाटील, खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत, भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कुंटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त विठ्ठल साळुंखे, पोलीस उपनिरीक्षक रावसाहेब बांबळे, खंडणी विरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल बडे, पोलीस उपनिरीक्षक चाटे, हवालदार रविंद्र तिटकारे, लिंभोरे, दिपक महाजन, स्वप्नील लांडगे, पोलीस कॉन्स्टेबल प्रसाद कलाटे, नवनाथ पोटे, करन विश्वासे, विशाल काळे, तसेच खंडणी विरोधी पथकातील पोलीस हवालदार महेश खांडे, काटकर, सागर शेंडगे, पुलगम यांच्या पथकाने केली.
व्हीएस न्युज - पिंपरी चिंचवड शहरातील विविध भागातून दुचाकी चोरून त्यांची विक्री करणाऱ्या चोरट्याला भोसरी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीला गेलेल्या एकूण ३३ दुचाक्या जप्त करण्यात आल्या आहेत. सुभाष आसाराम तौर (वय २५, रा. माऊली कृपा निवास, वडगाव रोड, आळंदी, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरीची दुचाकी विक्रीसाठी एकजण भोसरीत येणार असल्याची पोलिस हवालदार उत्तम कदम यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा राहून आरोपी सुभाष याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे असलेल्या दुचाकीच्या कागदपत्रांची मागणी केली असता त्याने सुरुवातीला उडवा-उडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी त्याला विश्वासात घेऊन चौकशी केली असता सदरची दुचाकी चोरीची असल्याची कबुली त्याने दिली. त्याच्याकडे आणखी सखोल चौकशी केली असता त्याने पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातून तब्बल ३३ वाहने चोरल्याचे सांगितले.
पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन, अप्पर आयुक्त मकरंद रानडे, उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक पोलीस आयुक्त सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक नरेंद्र जाधव, पोलीस निरीक्षक पांडुरंग गोफणे, उपनिरीक्षक प्रमोद कठोरे, पोलीस कर्मचारी उत्तम कदम, जी. एन. हिंगे, एस. देवकर एस. एल. रासकर, एस. बी. महाडिक, एस. वाय, भोसले, बी. व्ही. विधाते, व्ही. डी. गाडेकर, फुले, ए. एम. गोपी सी.एस. साळवे, यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
व्हीएस न्युज - पिंपळे गुरव येथील मराठवाडा जनविकास संघ संचलित मराठवाडा चॅरीटेबल ट्रस्ट एकसंघ समितीच्या वतीने गरीब मुला-मुलींच्या वस्ती शाळेत महात्मा फुले यांची १२४ वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. वक्ते म्हणून प्रा. संपत गर्जे यांनी आपले विचार व्यक्त केले. ते म्हणाले, महात्मा फुले हे सामाजिक क्रांतीची मशाल पेटवणारे महाराष्ट्रातील एक कृतीशील थोर समाजसुधारक व क्रांतिकारक विचारवंत होते. समाजजीवनातील पारंपरिक जुन्या चालीरीती, वर्णव्यवस्था व गुलामगिरी यांच्याविरुद्ध त्यांनी आयुष्यभर लढा दिला. सत्यशोधक समाजाची स्थापना करुन त्यांनी सार्वजनिक सत्यधर्माची कल्पना समाजाला समजावून सांगितली. ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांचे स्त्री शिक्षणाचे कार्य अनमोल आहे. शेतकरी,शेतमजूर इत्यादींच्या जीर्णोध्दारांच्या कार्यासाठी या उभयतांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. स्त्री शिक्षणाचा पाया त्यांनी रचला.
याप्रसंगी मराठवाडा जनविकास संघाचे संस्थापक/अध्यक्ष अरुण पवार, नगरसेवक गोपाळ माळेकर, सामाजिक कार्यकर्ते वामन भरगंडे, सूर्यकांत कुरुलकर, दत्तात्रय धोंडगे, शिवाजी सुतार, नवेश पाटील, बाळासाहेब साळुंके, अभिमन्यु गाडेकर, माधव मनोरे, मारुती बानेवार, विजय देवकर, संपत गर्जे, सखाराम जोशी, दिनेश गाडेकर, कृष्णाजी खडसे, श्री. कुंदे सर, श्रीनिवास पानसरे, सुनील शिंदे, नामदेव गुट्टे, राजेश गाटे, गोटके व्ही.एल, बाळासाहेब चितळकर, नारायण वळसे, शंकर तांबे, चव्हाण पी.एल, पी.जी.तोरवणे आदी उपस्थित होते.
व्हीएस न्युज - पुण्यातील पाटील इस्टेट झोपडपट्टीत भीषण आग भडकली आहे. आतापर्यंत १०० पेक्षा जास्त झोपडया या आगीत जळून खाक झाल्याची माहिती आहे. अग्निशमन दलाच्या ४० गाडया आग विझण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत. झोपडपट्टीतील क्रमांक ३ च्या गल्लीमध्ये दुपारी एकच्या सुमारास ही आग लागली. आगीचे रौद्ररुप पाहता पुणे, पिंपरी-चिंचवड आणि आसपासच्या परिसरातून अग्निशमन दलाच्या गाडया मागवाव्या लागल्या.
दोन दिवसांपूर्वी पाच नंबर गल्लीमध्ये आग लागली होती तेव्हा दोन घरे जळाली होती. झोपडीतील सिलेंडरच्या स्फोटामुळे ही आग लागल्याची शक्यता आहे. सहा वर्षापूर्वी देखील अशीच घटना याच ठिकाणी घडली होती. पाटील इस्टेट झोपडपट्टीत जवळपास ४०० घर आहेत. संपूर्ण झोपडपट्टी रिकामी करण्यात आल्याची माहिती आहे.
पुणे-मुंबई मार्गावर ही पाटील इस्टेट झोपडपट्टी आहे. सहा ते सात सिलेंडरचे स्फोट झाल्यामुळे आग आणखी भडकली. धुराचे मोठ मोठे लोट आकाशाच्या दिशेने उठताना दिसत आहेत. आग अधिक पसरु नये यासाठी अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. जमलेल्या गर्दीमुळे अग्निशमन दलाच्या जवानांना काम करताना अडथळे येत आहेत. अग्निशमन दलाच्या वाहनांना झोपडपट्टीपर्यंत पोहोचण्यात अडथळे येऊ नये यासाठी वाहतूक रोखण्यात आली आहे. अरुंद गल्ल्यांमुळे अग्निशमन दलाला पोहोचण्यासाठी अडथळे येत आहेत. वाहतूक शाखा आणि स्थानिक पोलीस घटनास्थळावरील गर्दीला आवरण्याचा प्रयत्न करत आहेत.
व्हीएस न्युज - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्यावतीने पिंपरी चिंचवड शहरातील हॉकर्सधारकांवर कारवाईचे सत्र चालू आहे. या सर्व पात्र हॉकर्स धारकांचे सुरुवातीस पुनर्वसन करावे, मगच या हॉकर्सधारकांवर कारवाई करण्याची मागणी, शिवशाही व्यापारीसंघाच्यावतीने आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.
पोटाची खळगी भरण्यासाठी महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून पिंपरी चिंचवड शहरात दाखल झालेल्या हॉकर्स धारकांना उपजिवीकेपोटी छोटे छोटे व्यवसाय करावे लागतात. अशा वेळी महापालिकेने त्यांना सहकार्य करणे अपेक्षित असताना, त्यांच्या पोटावर लाथ मारण्याचा उद्योग महानगरपालिका करीत आहे.
महानगरपालिकेने हा उद्योग बंद न केल्यास, आगामी काळात हॉकर्सधारकांच्या वतीने शिवशाही व्यापारी संघटना मोठे जनआंदोलन उभे करणार असल्याचे, शिवशाही व्यापारी संघाचे प्रदेश अध्यक्ष युवराज दाखले, प्रदेश सचिव गणेश आहेर यांनी सांगितले आहे.
व्हीएस न्युज - पिंपळे गुरवमधील सृष्टी चौकाकडून भवानी मंदिराकडे जाताना रस्त्यावरील एका पत्र्याच्या शेडमध्ये वस्तीतील गरिब मुलांची भरलेली शाळा नजरेस पडते. हसतमुख मुले-मुली हातात कोरी पाटी घेऊन शिक्षणाचे धडे गिरविताना दिसून येतात. बालकांना शिक्षणाचा हक्क मिळावा, यासाठी विविध योजना राबविण्यात येतात. परंतू त्या योजना हातावर पोट असणाऱ्या गरिबांपर्यंत पोहोचताना दिसून येत नाहीत. म्हणूनच गरिबांच्या मुलांना शिकता यावे, यासाठी पिंपळे गुरव येथील मराठवाडा जनविकास संघाच्यावतीने पिंपळे गुरव येथे वस्ती शाळा सुरू करण्यात आली आहे.
या शाळेत कोणतेही वर्ग नाहीत, बसायला बाक नाहीत, परीक्षा घेणे-उत्तीर्ण करणे-पुढच्या वर्गात प्रमोट करणे असलाही प्रकार नाही; येथे फक्त पैशांअभावी अज्ञानाचा अंधार पसरलेल्या गरिबांच्या घरात ज्ञानाचा दिवा पेटविण्याचे कार्य चालते. तेही कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता. आज प्रत्येकजण उच्च शिक्षण घेऊन आपल्या करियरच्या वाटा निवडून पैसे कमविण्याचे स्वप्न पाहतो. परंतू आपण घेतलेल्या शिक्षणाचा फायदा खर्या अर्थाने समाजासाठी व्हावा, म्हणून गरिबांच्या मुला-मुलींना शिकविण्याचा विचार सहसा कोणी करीत नाही. रस्त्यावरच्या कुटूंबांना रोजच्या दोन वेळच्या जेवणाची भ्रांत, तिथे मुलांचे शिक्षण घेणे तर अवघडच ... म्हणूनच आपण केलेल्या शिक्षणाचा उपयोग योग्य रितीने व्हावा, या कल्पनेतून त्यांचे हे स्वप्न सत्यात उतरविण्याचा विडा मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार यांनी उचलला आहे.
मराठवाडा जनविकास संघाने उभारलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये या चिमुकल्यांना शिक्षणाचे धडे दिले जात आहेत. या शाळेत जवळपास 50 मुले-मुली शिक्षण घेत आहेत. यामध्ये बांधकाम मजुरांची, करचावेचक कामगारांची मुले-मुली शिकत आहेत.
आपण आतापर्यंत छोटी-मोठी मजुरीची कामे करून हातावर पोट भरवित आलो आहोत, त्याचप्रमाणे आपल्या मुलांना शिक्षणासाठी शाळेत पाठवून खर्च करण्यापेक्षा त्यांनीही छोटी-मोठी कामे करून आर्थिक हातभार लावावा, अशी अपेक्षा प्रत्येक पालकांकडून व्यक्त करण्यात येते. परंतू त्यांच्या मुलांनी जर शिक्षण घेतले, तर आणखी चांगल्या ठिकाणी नोकरी करून पैसा कमवू शकतील, हा विचार या वस्तीत राहणार्या पालकांच्या गळी उतरविण्यासाठी आदिती निकम ही तरुणी दारोदारी भटकून शिक्षणाचा प्रसार करीत आहे. या शाळेत मुलांना फक्त अक्षरी धडे दिले जात नाहीत, तर त्यांचे राहणीमान लक्षात घेता आपल्या आरोग्याची काळजी कशा प्रकारे घ्यावी यासोबत त्यांना व्यक्तिमत्व विकासाचे शिक्षणही दिले जाते. मुलांमधील बहुआयामीपणा-कौशल्यबहुलता यांचा विकास समांतरपणे कसा साधता येईल, मुलांना ‘माणसे’ बनण्याचे आणि ‘माणसे’ म्हणून आत्मविश्वासाने जगण्याचे बळ कसे देता येईल, त्यांच्यात सर्वांशी मिळूनमिसळून राहण्याचा संस्कार कसा रुजवता येईल, असे अनेक प्रयोग तेथे चालू आहेत, असे आदिती निकम सांगतात.
या मुलांना शिकविण्यासाठी त्यांच्याकडे शैक्षणिक साहित्यही उपलब्ध असणे गरजेेचे आहे, हे लक्षात अरुण पवार स्वतःच्या खिशातील पैसे खर्च करून प्रत्येक मुलाला शैक्षणिक साहित्य पुरवतात. तसेच कधी कधी तर सर्व मुलांच्या न्याहरीची ही व्यवस्था करीत असतात. या शाळेत शिकणार्या विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे गिरविण्याची उत्सुकता ही आहेच, यातील विद्यार्थी हुशार देखील आहेत. या विद्यार्थ्यांना इतर शाळेतील विद्यार्थ्यांप्रमाणे शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन व सोयसुविधा मिळाल्या, तर ते भविष्यात चांगले करियर घडवतील, असा विश्वास अरुण पवार यांनी व्यक्त केला. या उपक्रमासाठी संजय गांधी निराधार योजनेच्या सदस्य आदिती निकम भरभरून मदत करीत आहेत. वामन भरगंडे, सखाराम वाळकोळी, कृष्णाजी खडसे, कृष्णाजी फिरके, संपत गर्जे आदीनी खारीचा वाटा उचलत अरुण पवार व आदिती निकम यांना मदत करीत आहेत.
व्हिएस न्युज - मुंबई पोलिसांच्या सेवेत असणाऱ्या एका पोलीस उपनिरिक्षकाने पुण्यातील संगम पुलाजवळील धावत्या रेल्वे खाली उडी घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. पुणे लोहमार्ग पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
पोलिसांच्या माहितीनुसार, साजन सानप असे या आत्महत्या केलेल्या पोलीस उपनिरिक्षकाचे नाव आहे. मुंबईतील जोगेश्वरी येथील अंबोली पोलीस ठाण्यात तो कार्यरत होता. एक महिन्यापूर्वीच खात्यातील अंतर्गत परिक्षेद्वारे त्याची हवालदार पदावरुन उपनिरिक्षक पदावर बढती झाली होती.
दरम्यान, सानप दोन दिवसांपूर्वी गावी नाशिकला गेला होता. येथे उपनगर पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात एका महिलेने बलात्कार आणि अॅट्रॉसिटीची तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेत पोलीसांनी त्याला अटक करुन कोठडीत ठेवले होते.
दरम्यान, कोठडीतून तो पळून गेला आणि थेट पुण्यात दाखल झाला. दरम्यान, आज त्याने पुण्यातील संगम पुलाजवळील रेल्वे ट्रॅकवर धावत्या रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली. नाशिकमध्ये सानपविरोधात दाखल केलेल्या तक्रारीत महिलेने म्हटले आहे की, ‘सानप आणि त्याचे मित्र आपल्याला सातत्याने त्रास देत होते. सानपने आपल्यावर अनेकदा बलात्कारही केला आहे. त्याने माझ्या नवऱ्याला ठार मारण्याची धमकीही दिली होती.’ त्यामुळे सानपवर भादंवि कलम ३७६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच अनुसुचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा अर्थात अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गतही त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002