व्हीएस न्युज - यूथ आयकॉन या ग्रुपने दिघी परिसरातील विश्वशांती सामाजिक प्रतिष्ठाण संचलित ज्ञानदीप बालकाश्रमातील अनाथ व गरीब विद्यार्थ्यांसोबत नवीन वर्षाचे स्वागत केले.
विद्यार्थ्यांना वही ,पेन ,पेन्सील इ. शैक्षणिक साहित्याचे तसेच खाऊचे वाटप करून व केक कापून नववर्ष वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आले.
नवीन वर्षाचे स्वागत कसे करायचे, काय-काय धमाल करायची याचे नियोजन एक महिना पूर्वीच करण्यात येते. हॉटेल, कॅफे, पब, डिस्को आणि अशा ब-याच ठिकाणी नवीन वर्ष साजरा करण्याचे वेड आजच्या तरुणाईला आहे. पण चकाकत्या दुनियेत अनाथ बांधवांसोबत नवीन वर्ष साजरा करणारे क्वचितच मिळतात.
अनाथ मुलांच्या मनात अनाथाची भावना न राहता आपलेपणाची भावना निर्माण व्हावी, या उद्देशातून अशा अनोख्या पद्धतीने नवीन वर्षाचे स्वागत करण्यात आले . डॉल्बी , फटाके, हॉटेल, पार्टी आणि इतर आरास करत नवीन वर्षाचे स्वागत करण्याचा ट्रेंड सुरु असताना अनाथ मुलांसोबत नव वर्ष साजरा करणे खरचं कौतुकास्पद कामगिरी आहे. या स्तुत्य उपक्रमाचे सर्वच स्तरातुन कौतुक होत आहे.
यूथ आयकॉन ग्रुप चे प्रसाद माने , विकास सुर्यवंशी, सुनिल कुरंदळे, छाया सुपेकर, रामकृष्ण जोशी , शुभम पिंगळे , मुकेश वाघमारे ,अक्षय कदम, शुभम लांडगे, पुजा दामले , मनिषा आघाव , निखिल जामदार , अंजली पोटे , सिद्धांत डोळस, देवयानी यादव, ओंकार शिंदे, श्रवण पाटील आदी सर्वांनी या उपक्रमात सहभागी होऊन आजच्या महाविदयालयीन विदयार्थ्यांसमोर नवीन आदर्श घालून दिला आहे.
सहभागी झालेले सर्व राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाचे , कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत.
व्हीएस न्युज – 31 डिसेंबर म्हणजेच न्यू इयर पार्टी करण्यासाठी आलेल्या तरुणीशी हॉटेल मालकाने आणि त्याच्या मित्रांनी असभ्य वर्तन केले. याचा जाब विचारण्यास गेलेल्या तरुणाला तिघांनी मिळून मारहाण केली. हा प्रकार मंगळवारी (दि. 1) पहाटे बाराच्या सुमारास सुसगाव येथे घडली.
वैभव मधुकर प्रभाकर (वय 23, रा. औंधरोड, स्नेहल अपार्ट, खडकी) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार कबीला हॉटेल चा मालक चांदेरे, त्याचा मित्र पप्पू व सौरभ (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वैभव त्यांच्या मित्र मैत्रिणींसोबत 31 डिसेंबरला रात्री पार्टी करण्यासाठी सुसगाव येथील कबीला हॉटेलमध्ये आले होते. मध्यरात्री 12 च्या सुमारास काही अनोळखी इसमांनी वैभव यांचा मित्र इमाद यांच्या मैत्रिणीला जाणीवपूर्वक धक्का मारला. त्याचा जाब विचारण्यासाठी वैभव गेले. त्यावेळी हॉटेल मालक चांदेरे आणि त्याच्या दोन साथीदारांनी मिळून वैभव यांना बांबूने, कमरेच्या पट्ट्याने व लोखंडी पंचने मारले. यामध्ये वैभव जखमी झाले. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.
व्हीएस न्युज - महावितरणचे प्रादेशिक संचालक संजय ताकसांडे हे भ्रष्टाचारी यंत्रणांना पाठीशी घालीत असून, या भ्रष्टाचारी यंत्रणांचे मूळ हे संजय ताकसांडे आहेत. ताकसांडे यांनी सूडबुद्धीने शिवसेना नियुक्त विद्युत सनियंत्रण समिती सदस्य संतोष सौंदणकर यांचे ‘न्यू सिमरन इंटरप्रायझेस’ या फर्मचा परवाना रद्द केलेला आहे.
तो त्वरित सौंदणकर यांना परत करावा, अन्यथा महावितरणाच्या प्रशासनास काळे फासण्यात येईल, असा इशारा तिरोडा-गोरेगाव विधानसभेचे संपर्कप्रमुख युवराज दाखले यांनी पुणे परिमंडळाचे मुख्य अभियंता यांना दिला होता.
याची दखल घेत गुरुवार (दि. २७) रोजी महावितरणाचे मुख्य अभियंता सचिन तालेवार, अधिक्षक अभियंता राजेश पवार व प्रशासकीय अधिकारी यांनी उपोषनस्थळी संतोष सौंदणकर यांची भेट घेतली. यावेळी मुख्य अभियंता सचिन तालेवार यांनी आपल्या मागण्यांची दखल घेत संबंधितांवर कारवाई करण्यात येईल व न्यू सिमरन इंटरप्रायझेस’ या फर्मचा परवाना परत करण्याचे आश्वासन सौंदणकर यांना दिले आहे. आश्वासनाची दखल घेत सौंदणकर यांनी उपोषण सोडले आहे.
महावितरणाने तात्काळ सौंदणकर यांना परवाना परत करावा व यामागे खरे सूत्रधार यांना उजेडात आणून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी. अन्यथा शिवसेना त्यांना योग्य तो धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा शिवसेनेचे युवराज दाखले यांनी महावितरण प्रशासनास दिला आहे.
व्हिएस न्युज – गुन्हे शाखेचा पोलीस अधिकारी असल्याचे सांगून व्यावसायिकांकडून पैसे उकळणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने अटक केली. ही घटना भोसरी येथे बुधवारी (दि. 26) घडली.
राजेंद्र मोहन पाटेकर (वय 55, रा. वैजयंती निवास, संत तुकाराम नगर, भोसरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
राजेंद्र ने सोपा आणि भरमसाठ पैसा कमावण्यासाठी पोलीस निरीक्षक बनण्याची शक्कल का लढवली असेल? नेमकं काय आले असेल राजेंद्र च्या मनात आणि त्याने का मारली असेल तोत्या पोलीस निरीक्षक बनून वसुली करण्याची मजल? हॉटेल व्यावसायिक का आणि कशासाठी पोलिसांना फुकट जेवण देतात?पान टपरी वाला बेकायदेशीर गुटखा विक्री तर नसेल ना? खरेखुरे पोलीस तर अश्या प्रकारे वसुली तर करत नसतील ना? अनेक प्रश्नांना वाचा फोडणारी हि घटना आहे.
नागरिकांच्या मनातला पोलिस हा कसा आहे हे या घटनेतून निदर्शनात येते आणि पोलिसांची नागरिकांच्या मनात असलेल्या छावीचा गैरफायदा घेऊन राजेंद्र तोत्या पोलीस निरीक्षक झाला? .
वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत हॉटेल व्यावसायिक, किराणा दुकानदार, पान टपरी यांना आपण गुन्हे शाखेचे अधिकारी असल्याचे सांगून त्यांच्याकडून पैसे उकळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून त्याला भोसरी मधील कै. अंकुशराव लांडगे सभागृहाजवळून ताब्यात घेतले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने गुन्ह्यांची कबुली दिली. हॉटेलमध्ये फुकट खाणे, किराणा दुकानदार, पान टपरी चालक व इतर व्यावसायिकांकडून पैसे उकळत होता. आरोपीवर यापूर्वीही अशा प्रकारच्या गुन्ह्यांची नोंद आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन, अपर आयुक्त मकरंद रानडे, सहायक आयुक्त सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे, उपनिरीक्षक काळुराम लांडगे, पोलिस कर्मचारी दीपक खरात, प्रमोद लांडे, सचिन उगले, गणेश सावंत, प्रविण पाटील, विशाल भोईर, गणेश मालुसरे यांच्या पथकाने केली.
व्हीएस न्युज - बावधान येथे पुणॆ मुंबई महामार्गावर बुधवारी सकाळी एक अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. या व्यक्तीच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आला आहे.
मृतदेहांची ओळख पटली नाही. खून झालेल्या व्यक्ति व्यक्तीचे अंदाजे वय ४५-५० वर्षे आहे. चॉकलेटी रेघा असलेला पांढरा शर्ट आणि निळ्या रंगाची हाफ पँन्ट असा पोषाख आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बावधान येथे पुणॆ मुंबई महामार्गाच्या सर्विस रस्त्यावर बुधवारी सकाळी एक व्यक्ति मृत अवस्थेत आढळून आला. स्थानिक नागरिकांकडून माहीत मिळताच पोलीस पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. मृतावस्थेत आढळून आलेल्या व्यक्तीच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आला आहे.
मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. खून झालेली व्यक्ति कामगार असल्याची शक्यता वार्तावलि जात आहे.
व्हीएस न्युज - दूचाकीवरून जाणा-या एका महिलेच्या गळ्यातील तब्बल पावणे दोन लाखांचे मंगळसुत्र दोन चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना काल मंगळवारी (दि.25) आठच्या सुमारास बाणेर रोड वरील युनियन बॅंकेपुढे घडली.याप्रकरणी एका 39 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला त्यांच्या मुलीसह बाणेर येथून त्यांच्या दुचाकीवर धनुकडे वस्तीच्या मार्गाने त्यांच्या घरी जात होत्या.दरम्यान पाठीमागून दूचाकीवर दोघेजण आले आणि त्यांनी फिर्यादी यांच्या गळ्यातील सोन्याचे पावणे 2 लाखांचे मंगळसुत्र जोरदार हिसका मारून चोरून नेले.याप्रकरणी दोन अज्ञात दूचाकीस्वारांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास चतु:श्रुंगी पोलीस करत आहेत.
व्हीएस न्युज - पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीचे सुशोभिकरण केले जाणार आहे. याअंतर्गत रंगीत एलईडी दिव्यांचा वापर करून रंगीबेरंगी प्रकाशयोजना केली जाणार आहे. त्याकरिता 33 लाख 40 हजार 135 रुपये खर्च येणार आहे. या खर्चाचा प्रस्ताव स्थायीच्या मान्यतेकरिता ठेवण्यात आला आहे.
महापालिकेच्या वतीने शहरातील विकास कामे करताना उभारले जाणारे पूल, इमारती व उद्याने सर्वसामान्यांचे आकर्षण ठरू शकेल, यासाठी स्थापत्य व विद्युत विभागाच्या वतीने त्याची सजावट केली जाते. महापालिकेच्या वतीने नाशिक फाटा येथे उभारण्यात आलेला भारतरत्न जे. आर. डी. टाटा हा दुमजली उड्डाणपूल शहराच्या सौंदर्यात भर घालतो. हा उड्डाणपूल आणखी आकर्षक व्हावा, यासाठी या पुलाला रंगीबेरंगी दिव्यांच्या माध्यमातून आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. रंग बदलत्या दिव्यांचे प्रकाशझोत शहरवासियांबरोबरच याठिकाणाहून ये-जा करणाऱ्या प्रवाशांचे लक्ष वेधून घेतात. याशिवाय रावेत येथील बास्केट ब्रीज खास तरुणाईच्या पसंतीस उतरला आहे. पिंपरी महापालिकेची मुख्य प्रशासकीय इमारत जुन्या पुणे-मुंबई महामार्गालगत असून, दररोज लाखो प्रवाशांची या महामार्गावरून ये-जा होत असते. या इमारतीचे काही वर्षांपूर्वी विस्तारीकरण करण्यात आले आहे. राष्ट्रीय सण, महापालिका वर्धापन दिन अशा विविध प्रसंगी या इमारतीला केलेली आकर्षक विद्युत रोषणाई नागरिकांचे लक्ष वेधून घेते. त्यामुळे ही इमारत कायम नागरिकांचे आकर्षण ठरावे, याकरिता इमारतीला एलईडी दिव्यांची आकर्षक विद्युत रोषणाई केली जाणार आहे. त्याकरिता सुमारे 34 लाख रुपये खर्च येणार आहे.
पिंपरी-चिंचवड ही आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका असून, या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीबद्दल शहरावासियांबरोबरच याठिकाणाहून ये-जा करणाऱ्या नागरिकांना कायम कुतूहल असते. त्यामुळे अशाप्रकारची विद्युत रोषणाई केल्यास, ही इमारत शहराच्या सौंदर्यात आणखी भर घालणार आहे.
– राहुल जाधव, महापौर, पिंपरी-चिंचवड.
व्हीएस न्युज - नसीरुद्दीन शाह म्हणतात देशातलं वातावरण पाहून मला मुलांची चिंता वाटते. मागे एका कार्यक्रमात आमिर खान म्हटला होता की त्याच्या पत्नीला हा देश असुरक्षित वाटतो. या दोघांनी खुशाल देश सोडून निघून जावं असा सल्ला विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर यांनी दिला आहे.
पुण्यात भाजपा संस्कृती प्रतिष्ठान आणि संवाद यांच्यातर्फे अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त हिंदी कवितांवर आधारीत एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याच कार्यक्रमात शंकर अभ्यंकर यांनी हे मत मांडलं. याच कार्यक्रमात शंकर अभ्यंकर यांना पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते अटल संस्कृती गौरव पुरस्काने गौरवण्यात आले.
नसीरुद्दीन शाह यांनी देशाच्या सद्यस्थितीवर चिंता व्यक्त केली. देशात माणसाच्या मृत्यूपेक्षा गायीच्या मृत्यूला जास्त महत्त्व आहे असे त्यांनी म्हटले त्यावरून वाद सुरु असतानाच आता शंकर अभ्यंकर यांनी नसीरुद्दीन शाह आणि आमिर खान या दोघांनाही देश सोडून जाण्याचा सल्ला दिला आहे.
ज्यांना हा देश असुरक्षित वाटत असेल त्यांनी या देशाचा इतिहास तपासावा. देशाच्या राष्ट्रपतीपदावरही मुस्लिम व्यक्ती होते हे विसरु नये असेही शंकर अभ्यंकर यांनी सुनावले. यावेळी त्यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्याही आठवणींवर भाष्य केलं. अनेक वर्षे राजकारणापासून दूर राहूनही अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर लक्षात ठेवले गेले. ही बाब महत्त्वाची आहे असेही अभ्यंकर यांनी म्हटले आहे.
अटलबिहारी वाजपेयी यांनी राजकारण करताना कायमच सर्वसामान्य जनतेला केंद्रस्थानी ठेवले. सत्तेच्या उच्च पातळीवर असताना ही निरागस जाणीव ठेवणारे असे ते राजकारणी होते असे मत गिरीश बापट यांनी व्यक्त केले.
व्हीएस न्युज - पिंपरी-चिंचवड शहरात पसार परवाना नसताना सर्रासपणे बेकायदेशीर रित्या सुरक्षारक्षक पुरवणाऱ्या एजन्सींनवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी तिरोडा-गोरेगाव चे शिवसेना विधानसभा संपर्कप्रमुख तथा शिवशाही व्यापारी संघाचे प्रदेशाध्यक्ष युवराज दाखले यांनी पिंपरी चिंचवड शहर पोलिस आयुक्तांना मंगळवारी केली.
निवेदनात दाखले म्हणतात की " सुरक्षारक्षक एजन्सी कडून पोलिस पडताळणी न करता सुरक्षारक्षक पुरवले जातात, कामगारांना पगार वेळेवर दिला जात नाही व काही घरगुती कारणामुळे सुरक्षारक्षक कामावर रुजू नसल्यास त्याला कामावरून कमी करण्यात येते आणि कामगारांनी पगार मागितल्यास त्याला मारहाण करून शास्त्राच्या धाक दाखवने व स्थानिक पोलीस ठाण्याच्या अधिकार्यांना हाताशी धरून खोट्या गुन्ह्यात अडकवण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत.
प्रविण फॅसिलिटी मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड (निगडी पुणे) या सुरक्षारक्षक पुरवणाऱ्या कंपनीकडे पसारा परवाना नसल्याचा या तक्रार अर्जात उल्लेख केला आहे.
महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती असताना काही दुष्काळी भागातील कामगार जे पोटाची खळगी भरण्यासाठी सुरक्षारक्षकाचे काम करतात अश्यांना न्याय द्यावा आणि बेकायदेशीर सुरक्षारक्षक पुरवणाऱ्या कंपन्यांवर कारवाई येत्या आठ दिवसात करावी व कारवाई केल्याचा अहवाल सादर करावा अन्यथा अन्यायग्रस्त सुरक्षारक्षक घेऊन निदर्शने करू असा इशारा दाखलेंनी दिला.
व्हीएस न्युज -पिंपरी-चिंचवड महापालिका घरोघरचा कचरा गोळा करण्यासाठी दरमहा 60 रुपये शुल्क आकारणार आहे. तर, दुकानदार, हॉटेल व्यावसायिकांकडूनही दरमहा 90 ते 120 रुपये शुल्क आकारले जाणार आहे. तसेच ओला आणि सुका कचरा वेगळा करून न दिल्यास दंड केला जाणार आहे. कचरा जाळल्यास 50 रुपये दंड वसूल केला जाणार आहे. याची अंमलबजावणी लवकरच सुरू केली जाणार आहे.
राज्य सरकारने महाराष्ट्र महापालिका अधिनियमानुसार 19 डिसेंबर रोजी याबाबतचा अध्यादेश जारी केला आहे. भारत सरकारच्या पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयाने 8 एप्रिल 2016 मध्ये घनकचरा व्यवस्थापन नियम 2016 जारी केला आहे. दुकानदारांकडून दरमहा 90 रुपये, शोरूम, गोदामे, उपहारगृह आणि हॉटेल व्यावसायिकांकडूनही दरमहा 120 रुपये, हॉटेलसाठी दरमहा 150 रुपये शुल्क आकारले जाणार आहे. 50 खाठापेक्षा कमी क्षमता असलेल्या रुग्णालयासाठी दरमहा 120 रुपये आणि 50 हून अधिक खाठा असलेल्या रुग्णालयासाठी 150 रुपये शुल्क आकारले जाणार आहे.
शैक्षणिक, धार्मिक संस्था, शासकीय, निमशासकीय कार्यालय यांना दरमहा 90 रुपये, मंगल कार्यालयांना दरमहा 300 रुपये आणि फेरीवाल्यांकडून 180 रुपये शुल्क दरमहा घेतले जाणार आहे. ओला आणि सुका कचरा वेगळा करून न दिल्यास पहिल्यांदा 60 रुपये दंड आकारला जाणार आहे. दुसऱ्यावेळी चूक केल्यास 120 रुपये आणि तिसऱ्यांदा चूक केल्यास 180 रुपये दंड वसूल केला जाणार आहे.
त्यांनतर प्रत्येक चुकीसाठी 180 रुपये दंड आकारण्यात येणार आहे. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण केल्यास पहिल्यांदा पाच हजार रुपये दंड, दुसऱ्यांदा चूक केल्यास दहा हजार आणि तिसऱ्यावेळी चूक केल्यास 15 हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. त्यानंतरच्या प्रत्येक चुकीसाठी 15 हजार रुपये दंड असणार आहे. तसेच कचरा जाळल्यास 50 रुपये दंड वसूल केला जाणार आहे.
व्हीएस न्युज - बेकायदेशीर पिस्तुल विक्री करणाऱ्या आणि बाळणाऱ्या तिघांना खंडणी, दरोडा विरोधी पथकाने अटक करून दोन देशी पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसे असा एकूण ६० हजार ४०० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. निगडी पोलीस ठाण्यात तिघांन विरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम ३(२५), मुंबई पोलीस अॅक्ट कलम ३७(१)(३) सह १३५ अन्वये ( दि.२५) मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ओंकार रमेश हिंगे (१९, रा. शिवतेजनगर, बिबेवाडी), मंगेश दामु मांजरे (२०, रा. ओटा स्कीम, निगडी) आणि मनिष माधव निदानिया याना अटक केली आहे. खंडणी दरोडा विरोधी पथकाचे पोलीस निगडी येथली त्रिवेणीनगर परिसरात अॅण्टी चैन स्नॅचिंग, रोड राॅबरी गुन्ह्यास प्रतिबंध व्हावा या अनुषंगाने गस्त घालत असताना पोलिस नाईक शरीफ मुलानी यांना त्यांच्या खास खबऱ्या कडून ओटा स्कीम येथील विवेकानंद शाळेजवळ एक जण संशयीतरित्या उभारला व पिस्तूल सारखे हत्यार तो बाळगत असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उप-निरीक्षक पुरुषोत्तम चाटे, विठ्ठल बढे, पोलीस कर्मचारी गणेश हजारे, अशोक दुधवणे, शरिफ मुलानी, गणेश कोकणे, किरण खेडकर,विक्रांत गायकवाड, शैलेश सुर्वे, आशिष बोटके, प्रवीण माने यांच्या पथकाने सापळा रचला.
संशयित आल्यानंतर त्याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तुल आणि एक जिंवत काडतुस आढळून आले. त्याच्याकडे अधिक तपास केला असता त्याने आणखी एक पिस्टल त्याचा मित्र मंगेश याने घेतल्याचे सांगितले. मंगेश याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तुल आणि एक जिवंत काडतुस जप्त केले. दोघांनी चार महिन्यापूर्वी मनिष निदानिया याच्याकडून त्या विकत घेतल्या होत्या.
व्हीएस न्यूज – मुलाची तक्रार न घेतल्याच्या कारणावरून एका व्यक्तीने पोलीस कर्मचाऱ्यास पोलीस ठाण्यातच मारहाण केली. ही घटना नवी सांगवी पोलीस चौकीत रविवारी (दि. 23) रात्री दहाच्या सुमारास घडली. साहेबगौडा वामदेव पाटील (वय 49, रा. संकल्प सिद्धी अपार्टमेंट, शितोळे नगर, जुनी सांगवी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
याप्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल बाळू गंगाराम सुपे (वय 48, रा. बॉडिगेट पोलीस लाईन, औंध) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बाळू सुपे नवी सांगवी पोलीस चौकीमध्ये पोलीस हेड कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहेत. रविवारी ते कर्तव्यावर असताना आरोपी पाटील चौकीत आला. त्याने त्याच्या मुलाची तक्रार का घेतली नाही म्हणून सुपे यांच्याशी हुज्जत घातली. तसेच छातीवर व तोंडावर मारून सरकारी कामात अडथळा निर्माण केला. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सांगवी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
सविस्तर माहिती अशी की,रविवारी रात्री दहा च्या सुमारास १७ वर्षीय मुलगा आणि त्याचे दोन मित्र भरधाव वेगात ट्रिपल सीट दुचाकी चालवत होते.भरधाव वेगात असलेल्या दुचाकीचा अपघात झाला यात लहान मुलगा थोडक्यात बचावला. संतापलेल्या नागरिकांनी तिघांना चोप दिला. नागरिकांचा रोष पाहून तिघांपैकी एकाने शंभर नंबरला कॉल करत पोलिसांना बोलावून घेतले. तातडीने पोलिसांनी येऊन तिघांना नवी सांगवी पोलीस चौकीत आणले. दुचाकी चालवणार मुलगा हा अल्पवयीन होता त्यामुळे त्याच्या वडिलांना पोलिसांनी बोलावले होते. अल्पवयीन मुलाचे वडील साहेब गौडा पाटील हे पोलीस चौकीत आले. मुलाला किरकोळ जखम दिसली आणि पोलिसांनीच मारहाण केल्याचा गैरसमज करून त्यांनी थेट पोलीस कॉन्स्टेबल बाळू गंगाराम सुपे यांना शिवीगाळ करत मारहाण करायला सुरुवात केली. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी पाटील यांना पोलिसांनी अटक केली आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक निकुंभ तपास करीत आहेत.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002