व्हिएस न्युज - रेकी करून ज्वेलर्स शॉप आणि बँका फोडणाऱ्या नेपाळी टोळीच्या पाच सदस्यांना पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने अटक केली आहे. या आरोपींकडून 12 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ज्या दुकानात चोरी करायची आहे, त्याच्या बाजूचे दुकान भाड्याने घ्यायचे आणि वेळ गाठून भिंत फोडून चोरी करण्याची या टोळीची पद्धत होती. बावधन येथे 18 जून रोजी एका ज्वेलर्सच्या दुकानात अशा प्रकारची चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर या प्रकरणाचा तपास करत पोलिसांनी पाच जणांना बेड्या ठोकल्या आहेत.
जगत बम शाही वय 28, रा. क्रिस्टल पैलेस, क्रिष्णा कॉलनी, मारुंजी पुणे. मुळ रा. गाव गटाडा, विनायक नगरपालिका, जि. अच्छम, नेपाळ), गणेश विष्णु शाही (वय 33, मूळ रा. गाव भुरुआ, लम्की टिकापुर रोड, जि. कैलासी, नेपाळ), खगेंद्र दोदी कामी (वय 27, मूळ रा. घाटगाऊ चौगुने गाव पालिका जि. सुरखेत नेपाळ), प्रेम रामसिंग टमाटा (वय 42, सध्या रा. पद्मालय पार्क, लंडन ब्रिज जवळ, पुनावळे, पुणे. मुळ रा. कालकांडा, विनायक नगरपालिका, जि. अच्छम, नेपाळ), रईस कादर खान वय 52, रा. तीन डोंगरी, प्रेम नगर, उन्नत नगर रोड क्र.2 साईबाबा मंदीर समोर, गोरेगाव (पश्चिम) मुंबई) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
बावधन मध्ये ज्वेलर्स शॉप फोडले
जगदंबा ज्वेलर्स, शॉप नं. 2, गीतांजली अपार्टमेंट, हुतात्मा चौक, बावधन बु. या शॉपच्या बाजूचे दुकान आरोपींनी 15 जून रोजी चायनीज व्यवसायासाठी भाड्याने घेतले. 18 जून रोजी सकाळी नेहमीप्रमाणे ज्वेलर्स दुकानदाराने दुकान उघडले असता चोरीचा प्रकार उघडकीस आला. चोरट्यांनी शेजारील चायनिज दुकानातून पोटमाळ्यावरील भिंतीला भगदाड पाडून आत प्रवेश करून गॅस कटरने तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला. परंतु तिजोरी न फुटल्याने दुकानातील वर ठेवलेले चांदीचे दागिने, लॅपटॉप, मोबाईल फोन व सीसीटीही डीव्हीआर असा एकूण तीन लाख 55 हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग
सदरचा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने तसेच गुन्ह्याची पद्धत वेगळी असल्याने पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी हा गुन्हा गुन्हे शाखा युनिट चारकडे वर्ग केला. पोलिसांनी घटनास्थळावरील, आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासत तांत्रिक सुरू केले.
नेपाळी व्यक्तीवर संशयाची सुई आली अन तपास पुढे सरकला
या गुन्ह्यात आजूबाजूच्या परिसरात काम करणारे नेपाळी वॉचमन सामिल असण्याची दाट शक्यता पोलिसांना वाटली. पोलिसांनी केलेल्या तांत्रिक विश्लेषणात मारुंजी परिसरात वॉचमन म्हणून काम करणारा एक इसम सदर गुन्ह्यात सामिल असल्याबाबत संशय आल्याने तसेच तो घटना झाल्यापासून काम सोडून गेल्याचे कळाल्याने त्याच्यावरील संशय बळावला. त्याच्याबाबत माहिती काढून पोलिसांनी जगत बम शाही याला अंबरनाथ येथून 12 जुलै रोजी अटक केली. त्याने त्याच्या तीन साथीदारांची नावे सांगितली. त्यानुसार पोलिसांनी गणेश, खगेंद्र, प्रेम या तिघांना ठाणे शहरातील वेगवेगळ्या ठिकाणावरून अटक केली. वरील आरोपींनी कार चालक अटक आरोपी रईस आणि फरार आरोपी शंकर चंद्र उर्फ कांचा लामा (रा. धनगढी नेपाळ), अर्जुन उर्फ ओम रावल रा. धनगढी, नेपाळ), बादल लामा (रा. धनगढी, नेपाळ), तसेच शंकर चंद्र उर्फ कांचा लामा याचे झारखंड येथून बोलावलेले तीन साथीदार यांनी केल्याचे पोलीस तपासात समोर आले.
अटक केलेल्या आरोपींकडून एक किलो 719 ग्रॅम चांदीचे दागिने, 11 ग्रॅम सोन्याचे दागिने, इनोव्हा कार, दुचाकी, मोबाईल फोन असा एकूण 12 लाख तीन हजार 940 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
चोरी करण्यापूर्वी आरोपी अशी करायचे रेकी
या प्रकरणात अटक आरोपी गणेश शाही व पाहिजे असलेला आरोपी शंकर चंद्र उर्फ कांचा लामा हे मुख्य सूत्रधार आहेत. त्यांनी चोरी करण्यासाठी सोनारा दुकानाशेजारील दुकान भाड्याने घेता येईल अशा बऱ्याच ठिकाणांची पाहणी केली. त्यापैकी सांगवी पोलीस स्टेशन हद्दीत एक आणि बावधन येथील एका सोनाराचे दुकान पाहून ठेवले होते. त्यानंतर आरोपींना 15 जून रोजी बावधन येथील ज्वेलर्सच्या दुकानाच्या बाजूचे दुकान भाड्याने मिळाले. लगेच आरोपींनी त्यांच्या साथीदारांना बोलावून घेतले आणि 17 जून रोजी रात्री भिंत फोडून चोरी केली.
हे प्रकरण शांत झाल्यावर ते काही दिवसांनी परत येवून सांगवी परिसरातील पाहून ठेवलेल्या दुकानात याच प्रकारे चोरी करण्याच्या विचारात होते. तसेच आरोपीकडे केलेल्या तपासात गणेश शाही व शंकरचंद्र लामा या दोघांनी त्यांच्या इतर साथीदारांसोबत 30 मे रोजी ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथे स्थानिक वॉचमनच्या मदतीने एका बँकेचे शटर कापून चोरी केल्याचे उघड झाले आहे.
सराईत अन चलाख आरोपी
या आरोपिंची मोठी टोळी आहे. या टोळीने यापूर्वी अशाच पद्धतीने अनेक गुन्हे केलेले आहेत. गणेश शाही याच्यावर घरफोडीचे व दरोड्याच्या प्रयत्नाचे एकूण 12 गुन्हे, प्रेम टमाटा याच्या विरुद्ध चार गुन्हे दाखल आहेत. पाहिजे आरोपी शंकरचंद्र लामा ऊर्फ कांचा याच्यावर एकूण पाच गुन्हे दाखल आहेत. तसेच सदर आरोपी हे अत्यंत चलाख असून ते आपसात बोलण्यासाठी नेहमी फेसबुक मॅसेंजरचा वापर करत होते. त्याद्वारे आरोपी एकमेकांना ऑडिओ व व्हिडिओ कॉल करत.
ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट चारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रसाद गोकुळे, सहायक पोलीस निरीक्षक अंबरिष देशमुख, सिद्धनाथ बाबर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक धर्मराज आवटे, दादा पवार, नारायण जाधव, पोलीस अंमलदार प्रविण दळे, संजय गवारे, अदिनाथ मिसाळ, राहिदास आडे, संतोष असवले, तुषार शेटे, लक्ष्मण आढारी, मो. गौस नदाफ, वासुदेव मुंडे, सुनिल गुट्टे, सुरेश जायभाये, प्रशांत सैद, तुषार काळे, अजिनाथ ओबासे, धनाजी शिंदे, सुखदेव गावंडे, गोविंद चव्हाण, आणि तांत्रिक विश्लेषन विभाग (गुन्हे शाखा) चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय तुंगार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पानमंद, राजेंद्र शेटे, नागेश माळी, विकास आवटे, पोपट हुलगे यांनी केली आहे.
व्हिएस न्युज - स्पाईन रोड, संतनगर, मोशी प्राधिकरण सेक्टर ४, ६,९, ११ व १३ मधील ३० हजार नागरिकांच्या जीवितास धोका असणा-या ५०० पथारी, हातगाडी, टपारी धारक व रिक्षा, टेम्पो चालकांचे तातडीने कोरोना लसीकरण करावे, यासाठी पिंपरी चिंचवड मानगरपालिकेचे आयुक्त, आमदार, नगरसेवक यांना भारतीय जनता पार्टी (का. आ.) महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष हनुमंत लांडगे यांनी पत्राद्वारे मागणी केली आहे.
सदर पत्राची गंभीरपणे दखल घेऊन परिसरातील पथारी, हातगाडी, टपारी धारक व रिक्षा, टेम्पो चालक हे कोरोना विषाणूचे सुपर स्प्रडर ठरू शकतात व तशी सुरुवात देखील झाली आहे ही गंभीर बाब लक्षात घेता तीन दिवसीय कारोना लसीकरण शिबिर आयोजित करून तातडीने लसीकरण करावे अशी विनंती निवेदनाद्वारे पिंपरी चिंचवड मानगरपालिकेचे आयुक्त, आमदार व नगरसेवक यांना हनुमंत लांडगे यांनी केली आहे.
व्हिएस न्यूज – अश्लील हावभाव करून वेश्यागमनासाठी उत्तेजित करणाऱ्या सात महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई विकासनगर, देहूरोड येथे सोमवारी (दि. 21) दुपारी करण्यात आली.
याप्रकरणी महिला पोलीस कर्मचारी वैशाली कपिल आशिवाल यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सात महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास देहूरोड- कात्रज बायपास मार्गावर विकासनगर, देहूरोड येथील द्वारका लॉजच्या समोर सात महिला उभ्या होत्या. त्या येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना हातावरे करून थांबवत होत्या. तसेच अंगविक्षेप करून त्यांच्याशी लगट करून असभ्य वर्तन करीत होत्या. तसेच छेड काढून शब्दाने बोलून त्यांना वेश्यागमनासाठी उत्तेजित करीत होत्या. त्यामुळे त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
व्हीएस न्युज - पिंपरी-चिंचवडच्या वाकड परिसरात 13 रिक्षांची तोडफोड करणाऱ्या आरोपींची पोलिसांनी धिंड काढली आहे. यातील मुख्य आरोपी सुरक्षा रक्षक किरण घाडगेला त्याच दिवशी वाकड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. कॉम्प्लेक्सच्या समोर रिक्षा उभी करत असल्याने तो हे कृत्य केल्याच समोर आलं होतं. याप्रकरणी एकूण पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
मुख्य आरोपी सुरक्षा रक्षक किरण घाडगे, सागर घाडगे, चंद्रकांत गायकवाड, मयूर अडागळे, अविनाश नलावडे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, म्हातोबा नगर वाकड येथे 13 रिक्षांची तोडफोड करणाऱ्या किरण घाडगेसह पाच जणांची वाकड पोलिसांनी त्याच परिसरात धिंड काढली आहे. संबंधित आरोपींना धडा शिकवण्यासाठी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या मनातील भीती कमी करण्यासाठी धिंड काढली असल्याचं वाकड पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.
वाकड परिसरातील म्हातोबा नगर येथे नवीन कॉम्प्लेक्स उभारण्यात आले असून त्याच्या समोर तेथील काही रिक्षा चालक रिक्षा उभी करत असत. तसेच, ते तिथे लघुशंका करायचे असं आरोपी सुरक्षा रक्षक घाडगे याचं म्हणणं असून त्यांना वारंवार सांगून ही ते तिथे रिक्षा पार्क करायचे. याचाच राग मनात धरून तीन दिवसांपूर्वी मध्यरात्री इतर मित्रांच्या मदतीने पार्क केलेल्या रिक्षा दगडाने फोडून नुकसान केले होते.
व्हीएस न्यूज - ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’चा नारा दिला जातो, पण मुलींना बारावीपर्यंत शिक्षण मोफत असतानाही प्रत्यक्षात अनेक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालये शुल्क घेत असल्याची वस्तुस्थिती आहे. इमारत निधी, शाळा परिसर विकास निधी, वार्षिक संमेलन, स्नेहसंमेलन या नावाखाली विद्यार्थ्यांची लूट होते. शहरात ६२० शाळा व कनिष्ठ महाविद्यालये आहेत. अनुदानित-विनाअनुदानित शाळांमध्येही मुलींकडून कुठलेही शुल्क आकारायचे नाही, असे स्पष्ट आदेशच आहेत. याबाबत माध्यमिक शिक्षण विभागाकडून दरवर्षी नवे शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वीच माहिती नियमित दिली जाते. पण, या संस्थांकडून सर्रासपणे शुल्काची वसुली केली जाते.
अनुदानित शाळांना वेतन तसेच, वेतनेतर अनुदान सरकारकडून मिळते. त्यासाठी दर महिन्याची बिले सरकारकडे सादर करावी लागतात. १९८६ च्या शासन निर्णयानुसार विद्यार्थ्यांकडून घेतलेले शुल्क त्यांच्या संख्येसह बँकेत सादर करावे, असे स्पष्ट केले आहे. गेल्या वर्षीच्या एकूण वसूल शुल्काच्या (१/१२) इतकी रक्कम शाळांनी सहकारी बँकेत भरायची. त्याचे प्रमाणपत्र दर महिन्याच्या पगार बिलासोबत जोडायचे आहे. मुलीने प्रवेश घेतल्यापासून एक महिन्याच्या आत प्रतिपूर्तीचा प्रस्ताव शिक्षणाधिकारी माध्यमिक कार्यालयाकडे सादर करणे गरजेचे आहे.
शुल्क आकारण्याचा संबंधच येत नाही
विनाअनुदानित संस्थेत मुलींकडून आकारलेल्या शुल्काबाबत सरकारने नियम ठरविले आहेत. अनुदानित शाळांकडून संबंधित इयत्तेत आकारलेल्या प्रमाणित शुल्काइतकेच शुल्क आकारायचे आहे. सरकारकडून प्रतिपूर्तीने मान्य केलेले शुल्क, उच्च माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा शुल्क सोडून इतर कोणतेही शुल्क आकारूच नये, असे स्पष्ट आदेश आहेत. पण, या शाळाही अनुदानित संस्थांप्रमाणेच मुलींकडून पैसे वसूल करतात. शिवाय सरकारकडूनही पैसे वसूल करताहेत.
मुलींना बारावीपर्यंत शिक्षण मोफत असतानाही शुल्क वसूल करणाऱ्या शाळा-महाविद्यालयांवर कारवाई करण्यात येईल. या संदर्भात पालकांनी शिक्षण विभागाकडे तक्रारी कराव्यात.
- विलास पाटील, तक्रार निवारण अधिकारी, शिक्षण विभाग
व्हीएस न्यूज – सार्वजनिक ठिकाणी नागरिकांना मास्क धारण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. असे असताना देखील काही नागरीक याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात. अशा नागरिकांवर पोलिसांकडून कारवाई केली जाते.
शनिवारी पिंपरी चिंचवड पोलिसांनी अशा बेशिस्त 153 नागरिकांवर कारवाई केली आहे.
पोलिसांनी केलेली कारवाई पुढीलप्रमाणे,
एमआयडीसी भोसरी (30), भोसरी (04), पिंपरी (17), चिंचवड (02), निगडी (01), आळंदी (06), चाकण (00), दिघी (01), सांगवी (05), वाकड (18), हिंजवडी (16), देहूरोड (09), तळेगाव दाभाडे (12), तळेगाव एमआयडीसी (16), चिखली (05), रावेत चौकी (05), शिरगाव चौकी (04), म्हाळुंगे चौकी (02)
व्हीएस न्यूज - इमारतीसमोर टेम्पो पार्क करण्यासाठी भाजी विक्रेत्यांकडे सुरक्षारक्षकाने हप्ता मागितला. मात्र, भाजी विक्रेत्यांनी हप्ता देण्यास नकार दिला. यावरून सुरक्षा रक्षकासह पाच जणांच्या टोळक्याने 13 टेम्पोची तोडफोड केली. तसेच या टोळक्याने एकाच्या खिशातून जबरदस्तीने पैसे काढून घेतले. याबाबत पाच जणांवर दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हा प्रकार शुक्रवारी (दि. 11) सकाळी म्हातोबानगर, वाकड येथे उघडकीस आला.
पोलिसांनी पाचही जणांना अटक केली आहे. सुरक्षारक्षक किरण प्रकाश घाडगे (वय 25), चंद्रकांत सीताराम गायकवाड (वय 22), मयूर संजय अडागळे (वय 26), सागर प्रकाश घाडगे (वय 27, सर्व रा. म्हातोबानगर, वाकड), अविनाश नलावडे (रा. आदर्शनगर, वाकड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी मारुती साहेबराव काळे (वय 30, रा. म्हातोबानगर, वाकड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी किरण घाडगे हा म्हातोबानगर येथील एका व्यावसायिक वापराच्या इमारतीचा सुरक्षारक्षक आहे. या इमारतीसमोर म्हातोबानगर परिसरातील भाजी विक्रेते त्यांचे टेम्पो पार्क करतात. मागील काही दिवसांपासून किरण घाडगे भाजी विक्रेत्यांकडे टेम्पो पार्क करण्यासाठी हप्ता मागत होता. मात्र, भाजी विक्रेत्यांनी किरण याला हप्ता देण्यास नकार दिला होता. त्यामुळे तो चिडून होता.
दरम्यान, गुरुवारी रात्री फिर्यादी काळे टेम्पो पार्क करून रस्त्यावर त्यांच्या मित्रांसोबत गप्पा मारत उभे होते. त्यावेळी घाडगे याने फिर्यादी आणि त्यांच्या मित्रांकडे ‘महिना दोन हजार रूपये हप्ता द्या. नसता तुम्हाला धंदा करू देणार नाही’, अशी मागणी केली. त्यावर काळे यांनी हप्ता देण्यास स्पष्ट नकार दिला. त्यामुळे आरोपी किरण घाडगे याने त्याच्या साथीदारांच्या मदतीने तेरा टेंम्पोची तोडफोड केली.
तोडफोड करणाऱ्या टोळक्यावर जबरी चोरीचाही गुन्हा दाखल
आरोपींनी टेम्पोची तोडफोड केल्यानंतर सचिन अशोक शेलार (वय 26, रा. म्हातोबानगर, वाकड) यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. शेलार यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने आरोपींनी मारहाण करीत त्यांच्या खिशातील 600 रुपये जबरदस्ती काढून घेतले. याबाबत शेलार यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
लोणावळा येथील संघटनेच्या शिबिरात घेतला निर्णय.
व्हीएस न्युज - कोरोना लॉकडाऊन मुळे मागील 14 महिने रिक्षा व्यवसाय बंद होता. यामुळे रिक्षाचे हफ्ते थकले आहेत. परंतु आता सरकारने लॉकडाऊन शिथील करताच फायनान्स कंपनीच्या वतीने रिक्षा कर्ज हफ्त्यासाठी तगादा लावण्यात येत आहे व रिक्षा ओढून नेल्या जात आहेत. यामुळे पुणे पिंपरी-चिंचवड सह महाराष्ट्रातील सर्व रिक्षा चालक मालक त्रस्त झाले असून फायनान्स कंपनीच्या या मनमानी कारभारा विरोधात महाराष्ट्र रिक्षा पंचायत वतीने पुणे विभागीय आयुक्त कार्यालयावर शुक्रवार दिनांक 18 जून रोजी सकाळी 11.00 मोर्चा आंदोलन करण्यात येणार असून महाराष्ट्रातले सर्व विभागीय आयुक्त कार्यालयावर व जिल्हाधिकारी कार्यालयावर हे आंदोलन करण्यात यावे असे आवाहन महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे संस्थापक अध्यक्ष व कष्टकऱ्यांचे नेते बाबासाहेब कांबळे यांनी केले आहे.
कष्टकरी पंचायत वतीने लोणावळा येथे संघटना पदाधिकारी यांचे पावसाळी विचार मंथन शिबीर आयोजित केले होते. यावेळी हा निर्णय घेण्यात आला. तसेच पुण्यामधील मोफत रिक्षा रुग्ण वाहिका सेवा उपक्रमातील सहभागी रिक्षा चालक योद्ध्ये यांचा बाबा कांबळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी घर कामगार महिला सभा अध्यक्षा श्रीमती आशाताई कांबळे, कष्टकरी जनता आघाडीच्या महिला अध्यक्ष अनिता साळवे, उपाध्यक्ष जयश्री येडके, मधुरा डांगे, टपरी पथारी हातगाडी पंचायत सचिव प्रल्हाद कांबळे, कार्याध्यक्ष बळीराम काकडे, जिल्हा अध्यक्ष मल्हार काळे, महाराष्ट्र रिक्षा पंचायत पुणे शहर अध्यक्ष शफिक भाई पटेल, उपाध्यक्ष अरशद अन्सारी, कार्याध्यक्ष कुमार शेट्टी, कला आणि सांस्कृतिक आघाडी विभागाचे महाराष्ट्र अध्यक्ष मुराद काजी, रिक्षा ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रमुख बाळासाहेब ढवळे, विजय ढ़गारे, जाफर भाई शेख, संजय दौंडकर, महाराष्ट्र रिक्षा पंचायत पिंपरी चिंचवड उपाध्यक्ष लक्ष्मण शेलार आदी उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना बाबा कांबळे म्हणाले महाराष्ट्र सरकारने रिक्षा चालक फेरीवाले घरकाम महिला बांधकाम मजूर व धारकांसाठी दीड हजार रुपये आर्थिक मदत जाहीर केली सदर रक्कम लाभार्थींना मिळण्यास सुरुवात झाली आहे परंतु नुसती तुटपुंजी आर्थिक मदत करून चालणार नाही कोविड-19 मुळे कष्टकरी जनतेचे जग बदलले आहे आणि हातावर पोट असणाऱ्या या घटकांवर उपासमारीची वेळ आली आहे. यामुळे कष्टकरी जनतेच्या समस्या आणि प्रश्न सोडवण्यासाठी विविध पातळीवर उपायोजना करण्याची नितांत आवश्यकता आहे. यासाठी टास्क फोर्स स्थापन करावे अशी मागणी मी सरकारकडे केली आहे. रिक्षाचालकांचे, टेम्पो, ट्रक आणि सर्व वाहतूकदार यांचे हफ्ते थकल्यामुळे या गाड्या ओढून नेल्या जात आहेत. गुंडगिरी करणाऱ्या फायनान्स कंपन्यांवर कायदेशीर कारवाई करावी.
पिंपरी-चिंचवड शहरातील कष्टकऱ्यांना तीन हजार रुपये आर्थिक मदत देण्याची घोषणा झाली आहे, परंतु आयुक्त यात खोडा घालत आहेत या प्रश्नांची दखल घेण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयावर आंदोलन होणार आहे. महाराष्ट्रातील सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांनी विभागीय आयुक्त कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयावर दिनांक अठरा जून 2019 रोजी सकाळी 11 वाजता आंदोलन करण्यात यावे असे आवाहन यावेळी बाबा कांबळे यांनी केली आहे.
कष्टकरी जनता महिला आघाडी राष्ट्रीय अध्यक्ष पदी अनिता साळवे उपाध्यक्षपदी मधुरा डांगे, महाराष्ट्र रिक्षा पंचायत पुणे शहर अध्यक्षपदी शफिक भाई पटेल, कार्याध्यक्षपदी कुमार शेट्टी, उपाध्यक्षपदी अरशद अन्सारी, महाराष्ट्र रिक्षा पंचायत कला व संस्कृती आघाडी महाराष्ट्र प्रमुख पदी मुराद काजी, लोणावळा शहराध्यक्षपदी आनंद सदावर्ते यांची निवड करण्यात आली, कार्यक्रमाच्या संयोजनासाठी महाराष्ट्र रिक्षा पंचायत प्रदेश उपाध्यक्ष बाबू भाई शेख, टपरी हातगाडी पंचायत लोणावळा शहर अध्यक्ष गणेश चव्हाण, आनंद सदावर्ते, हाजी अब्बास खान, विनय बच्चे, भगवान धनवट, रवींद्र ताकतोडे, संजय डेंगळे, विलास केंद्रे, चंद्रकांत बालगुडे,सत्तार शेख यांनी परिश्रम घेतले आहेत.
व्हीएस न्यूज – नियमबाह्य कामे, कामचुकारपणा आणि निकृष्ट दर्जाचे काम आढळून आल्यास संबंधित अधिकारी कर्मचा-यांवर जबाबदारी निश्चित करुन कारवाई केली जाईल, असा इशारा महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी दिला.
प्रत्येक कामाचे ऑडीट केले जाणार असून निर्धारीत वेळेत काम पूर्ण करण्याची दक्षता सर्व अधिका-यांनी घ्यावी असेही ते म्हणाले. महापालिकेच्या निगडी येथील अ क्षेत्रीय कार्यालयास आयुक्त राजेश पाटील यांनी भेट देऊन प्रभाग क्र. 10 आणि 14 मधील कामे तसेच विविध उपाययोजनांबाबत आढावा बैठक घेतली.
बैठकीस अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, नगरसदस्या मंगला कदम, वैशाली काळभोर, अनुराधा गोरखे, मीनल यादव, नगरसदस्य तुषार हिंगे, केशव घोळवे, प्रमोद कुटे, अ क्षेत्रीय अधिकारी सुचिता पानसरे, सहशहर अभियंता प्रविण लडकत, कार्यकारी अभियंता रविंद्र पवार, सुनिल वाघुंडे,रामनाथ टकले, अनिल शिंदे, संदेश चव्हाण, आकुर्डी रुग्णालयाच्या ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनीता साळवे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, सहाय्यक आरोग्य अधिकारी एम. एस. शिंदे आदींसह स्थापत्य, विद्युत, स्थापत्य क्रीडा, पाणीपुरवठा, स्थापत्य उद्यान, झोनिपु स्थापत्य, आरोग्य, जलनि:सारण, अतिक्रमण आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
प्रभाग स्तरावर चाललेली कामे, येथील समस्या, प्रश्न तसेच हाती घेण्यात आलेल्या प्रकल्पांची सद्यस्थिती, पावसाळी कामे, कोरोना विषयक नियोजन, अतिक्रमण अशा विविध विषयांवर बैठकीत चर्चा झाली. जीर्ण वृक्षांची छाटणी, विद्युत तारांवर तसेच धोकादायक ठरणा-या झाडांच्या फांद्यांची छाटणी, हॉकर्सचे अतिक्रमण आणि व्यवस्थापन, ट्रांझिट कॅम्प, पाणी पुरवठा नियोजन याबाबत नगरसदस्यांनी विविध मुद्दे मांडले. नाल्यांची कामे तातडीने करावी, रस्त्यावरील खड्डे बुजवावे, पदपथावरील अतिक्रमण हटवावे, चौकांमध्ये मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण वाढले असून त्यावर तात्काळ कारवाई करावी, शाहूसृष्टी, सायन्स पार्क येथील तारांगण, विविध उद्यानांची कामे, रेंगाळलेली कामे, बर्ड व्हॅलीतील कामे, नालेसफाई, जलनि:सारणची कामे तसेच पुरेशा दाबाने पाणी पुरवठा करण्यात यावा अशा सूचना त्यांनी मांडल्या.
बैठकीत आलेल्या सूचना आणि मुद्दयांबाबत तसेच झालेले, चालू असलेले आणि भविष्यात हाती घेण्यात येणा-या प्रकल्पांच्या कामांबाबत आयुक्त पाटील यांनी संबंधित अधिका-यांकडून माहिती घेऊन कामकाजाचा आढावा घेतला. महसुली कामांचे नियोजन करुन ते वेळेत पार पाडावे. नालेसफाईचा साप्ताहिक अहवाल क्षेत्रीय अधिका-यांकडे नियमित सादर करावा, विविध विभागांशी संबंधित असलेल्या कामांबाबत एकत्रितपणे स्थळ पाहणी करुन कामाचे नियोजन करावे. तसेच विभागांतर्गत समन्वय ठेऊन काम करण्याच्या सूचना आयुक्त पाटील यांनी संबंधितांना दिल्या.
शहरातील हॉकर्सचे नियोजन करण्याचे काम सुरु असून प्रत्येक भागाचा विचार करुन याबाबत व्यवस्थापन केले जाईल. पर्यटनाच्या दृष्टीने देखील नियोजन करण्यात येत आहे असे आयुक्त पाटील म्हणाले. अतिक्रमण होत असलेल्या ठिकाणांची पाहणी करुन कारवाई करण्याचे आदेश आयुक्त पाटील यांनी संबंधितांना दिले. रुग्णसंख्या आटोक्यात ठेवण्यासाठी प्रभाग स्तरावर नियोजन सुरु असून कोविड दक्षता समिती स्थापन केली जात आहे. या समितीच्या कामकाजाबद्दल आयुक्त पाटील यांनी बैठकीत माहिती दिली.
कोविडचे संक्रमण रोखण्यासाठी सर्वांनी मास्कचा वापर केला पाहिजे असे ते म्हणाले. अधिकारी कर्मचा-यांनी चांगले काम करावे, नागरिकांनी संपर्क केल्यानंतर त्यांना वेळेत दिलेला सकारात्मक प्रतिसाद महत्वाचा असतो त्यामुळे आपण तात्काळ उपलब्धता दाखविली पाहिजे असे आयुक्त राजेश पाटील म्हणाले. प्रभाग स्तरावरील कोविड केअर सेंटर, फिव्हर क्लिनिक, कोविड चाचणी केंद्र याबद्दल डॉ. साळवे यांनी बैठकीत माहिती दिली.
व्हीएस न्युज - स्पा सेंटरमध्ये अवैधरित्या सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर हिंजवडी पोलिसांनी छापा मारला. यामध्ये पोलिसांनी एकाला अटक केली असून एका महिलेची सुटका केली आहे.
ही कारवाई बुधवारी (दि. 9) दुपारी म्हळुंगे येथे करण्यात आली. सुनास रचन मसी (वय 34, र म्हाळुंगे, ता. मुळशी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पोलीस उपनिरीक्षक यशवंत साळुंखे यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, म्हाळुंगे येथे तीर्थ आयटी पार्कच्या मागील बाजूला स्नेवा स्पा सेंटरमध्ये बेकायदेशीररित्या वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती हिंजवडी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी बुधवारी दुपारी पाच वाजता स्पा सेंटरवर छापा मारला. या मध्ये पोलिसांनी एका महिलेची सुटका केली. या महिलेकडून आरोपी जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करून घेत असल्याचे उघडकीस आले आहे.
पोलिसांनी एकाला अटक केली आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.
व्हीएस न्युज - पिरगुंट येथील रासायनिक कंपनीत लागलेल्या भीषण आगीत हकनाक बळी गेलेल्या १५ कर्त्यां महिलांचे कुटुंबीय सुन्न झाले आहेत. दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या महिला कंपनीच्या पॅकिंग विभागात काम करून कुटुंबाला हातभार लावत होत्या. सोमवारी दुपारी झालेल्या दुर्घटनेची वार्ता कळताच महिलांच्या कुटुंबीयांवर आघात झाला असून या दुर्घटनेने मुळशी तालुक्यातील पिरंगुट-उरवडे परिसरावर शोककळा पसरली आहे.
या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या गीता भारत दिवारकर (वय ३८) मूळच्या मुंबईच्या होत्या. पती आणि मुलांसोबत त्या उरवडे परिसरात स्थायिक झाल्या होत्या. गीता यांचा होरपळून मृत्यू झाल्यानंतर त्यांची बहीण जयश्री मोरे यांना अश्रू अनावर झाले. जयश्री मोरे म्हणाल्या, ‘गीता खूप कष्टाळू होती. मुलांचे शिक्षण पूर्ण करून त्यांना मोठे करण्याचे तिचे स्वप्न होते. कष्ट करून तिने उरवडे परिसरात दोन खोल्यांचे घरबांधले. दहा महिन्यांपूर्वी गीता या कंपनीत नोकरीला लागली. तिच्या पतीला गुडघ्यांचा त्रास आहे. गीताने कुटुंबाचा गाडा हाकण्यासाठी स्वत:ला झोकून दिले. मुलं हाताशी येत असताना काळाने तिच्यावर घाला घातला.’
या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या त्रिशला संभाजी जाधव (वय ३३) मूळच्या सोलापूरच्या होत्या. नोकरीच्या शोधात त्या मुळशीत स्थायिक झाल्या होत्या. मनमिळावू स्वभावाच्या असलेले जाधव दाम्पत्याचे सर्वाशी चांगले संबंध होते. त्यांना मुले आहेत. या दुर्घटनेमुळे आम्हाला धक्का बसला असून त्यांचे कुटुंबीय सोलापूरहून पुण्याकडे येत आहेत, असे जाधव दाम्पत्याचे शेजारी राजेंद्र सोनवणे यांनी सांगितले.
येथील रासायनिक कंपनीला लागलेल्या आगीत कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना दुर्दैवी आहे. आग कशामुळे लागली आणि त्याला जबाबदार कोण यासाठी शासनाने नेमलेल्या चौकशी समितीचा प्राथमिक अहवाल प्राप्त होताच आगीचे कारण स्पष्ट होऊ शकेल. त्यानंतर जबाबदारी निश्चित होईल, असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मंगळवारी सांगितले. उरवडे गावाजवळ रासायनिक कंपनीला लागलेल्या आगीची वळसे पाटील यांनी पाहणी केली. मृत्यू झालेल्या कामगारांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. खासदार सुप्रिया सुळे, आमदार संग्राम थोपटे या वेळी उपस्थित होते.
स्वप्नांची राखरांगोळी
रासायनिक कंपनीत लागलेल्या आगीत मृत्युमुखी पडलेले सर्व जण कष्टकरी वर्गातील होते. प्रत्येकाला मुलांना मोठे करायचे होते. नोकरीच्या शोधात त्यांनी मिळेल ते काम केले. एक नोकरी गेल्यानंतर पुन्हा दुसरी मिळवून सर्व जणी संसाराचा गाडा हाकत होत्या. त्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या सर्वच महिलांच्या कुटुंबावर मोठा आघात झाल्याची भावना नातेवाईक व्यक्त करत होते.
सदोष मनुष्यवधाचा गुन्हा
पिरंगुट-उरवडे औद्योगिक वसाहतीतील रासायनिक कंपनीत लागलेल्या भीषण आगीत १७ कामगारांचा मृत्यू झाल्यानंतर पौड पोलिसांकडून एसव्हीएस कंपनीचे मालक निकुंज शहा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. दुर्घटनेस जबाबदार असल्याप्रकरणी निकुंज शहा (रा. सहकारनगर) यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक चौकशीत कंपनीच्या मालकांच्या निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना घडल्याचे निदर्शनास आले आहे.
व्हीएस न्युज - पुणे स्टेशन येथील लोहमार्ग पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेशसिंह गाैड यांच्यासह आठ जणांना अपर पोलिस महासंचालक (लोहमार्ग) प्रज्ञा सरवदे यांनी तडकाफडकी निबंलित केले आहे.
अमली पदार्थ प्रकरणी केलेल्या कारवाईनंतर तपासात अनियमितता केल्याचा ठपका ठेवत त्यांना निलंबीत करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. याबाबतचे आदेश त्यांनी दोन दिवसापुर्वी दिले आहे. एकाचवेळी वरिष्ठ निरीक्षकासह आठ कर्मचाऱ्यांना निलंबीत करण्यात आल्याने खात्यात चर्चेला उधाण आले आहे.
नववर्षाच्या पार्श्वभुमीवर चरस हिमाचल प्रदेशातून रेल्वे मार्गे महाराष्ट्र व इतर राज्यात विक्रीसाठी आलेला दोघांना लोहमार्ग पोलिसांनी मागील वर्षी (२०२०) अटक केली होती. त्यांच्याकडून एक कोटी तीन लाख रूपयांचा ३४ किलो ४०४ ग्रॅम चरस जप्त केला होता. हा चरस मुंबई, पुणे, गोवा, बंगळुरू येथे नववर्षाच्या पार्श्वभुमीवर विक्रीसाठी वितरीत केला जाणार होता.
या चरसची आंतरराष्ट्रीय बाजार पेठेत १२० कोटी रुपये असल्याचे त्यावेळी लोहमार्ग पोलिसांनी सांगितले होते. ललितकुमार दयानंद शर्मा (वय ४९, रा. व्हिलेज शमशी, भुंतर, जिल्हा कूलु) आणि कौलसिंग रुपसिंग सिंग (वय ४०, रा. बंद्रोल, कुलु) या दोघांना अटक करण्यात आली होती. त्यांच्यावर लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सुरुवातीला हा तपास लोहमार्ग पोलिस ठाण्याकडे होता.
त्यावेळी त्यांनी तपासात अनियमितता केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला असल्याचे समजते. त्यानंतर एटीएसकडे हा तपास सोपवण्यात आला होता. एटीएसने संबंधीत कारवाईच्या आधारे पुढे देखील कारवाई केली होती. त्यानंतर आता याच प्रकरणात पोलिस अधिकाऱ्यासह आठ जणांना निलंबीत करण्यात आले आहे.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002