व्हीएस न्युज - तुम्ही जर सोशल मीडिया वापरत असाल तर ही बातमी आवर्जून वाचा. नोकरदार तरुणाई सेक्सटॉर्शनची शिकार होत असल्याची धक्कादायक बाब वारंवार समोर येतेय. व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून फसवणूक करुन ते व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करण्याची धमकी देत खंडणी वसूल करण्याच्या प्रकरणांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. पुणे सायबर पोलिसांत या संदर्भात दोन गुन्हे तर 150 तक्रारी दाखल झाल्यानं खळबळ उडालीय.
पुण्यातील शिवाजीनगर येथील सायबर पोलीस ठाण्यात काही दिवसांपूर्वी एक तरुण तक्रार देण्यासाठी आला होता. तक्रारीत म्हटल्याप्रमाणे, लॉकडाऊन काळात घरी असताना फेसबुकवरुन एका मुलीची त्याला फ्रेन्ड रिक्वेस्ट आली होती. त्यांच्यानंतर थेट व्हॉटसअॅप नंबर शेअर झाले आणि हळूहळू व्हिडीओ कॉलवर बोलणं होऊ लागलं. नंतरच्या काळात त्या मैत्रिणीने याला नग्न होण्यास सांगितलं. यानेही प्रतिसाद दिला. नंतर थेट तोच व्हिडीओ व्हॅट्सअॅपला येऊन धडकला आणि पैश्याची मागणी होऊ लागली. पैसे देण्यास नकार दिल्यास तुझ्या फ्रेंड लिस्टमध्ये असलेल्या प्रत्येकाला हा व्हिडीओ शेअर करेल असा दमही भरला. हे फक्त याच तरुणाच्या बाबत घडलं नाही तर पुण्यात 150 हून अधिक जणांच्या बाबत घडलंय. यामध्ये श्रीमंत कुटुंबातील मुलं, नोकरदार, व्यावसायिक, उद्योजक अशा व्यक्तीचा समावेश आहे. भीती आणि बदनामीमुळे हे पैसे देऊन मोकळे झालेय. पुणे सायबर पोलिसांनी याची गंभीरतेने दखल घेतलीय. दोन आरोपींच्या मागावर असून लॉकडाऊन संपताच दिल्ली, मध्यप्रदेश, राजस्थान येथे कारवाईसाठी जाणार आहे.
काय काळजी घ्याल?
अनोळख्या व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नका
परिचित नसल्यास व्हॅटसअॅप कॉलवर संवाद साधू नका
व्हिडीओ, छायाचित्र पाठवतांना विचार करा चुकीचं काही घडत असल्यास कुटुंबातील व्यक्तीला, मित्र-मैत्रिणीला किंवा पोलिसांशी संवाद साधा.
मनोरंजन किंवा कामाच्या निमित्ताने सोशल माध्यमांचा वापर बघून सायबर गुन्हेगार तुमच्यावर पाळत ठेवतात. तुमच्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न करतात आणि नंतर तुम्ही त्यांच्या जाळ्यात अडकतात आणि सेक्सटॉर्शनचे शिकार बनतात. त्यामुळे काळजीपूर्वक सोशल मीडियाचा वापर करा.
व्हीएस न्युज - शिवस्वराज्य दिनी कचरामुक्त, स्वच्छ पुणे जिल्हा अभियान सुरु करण्यात आले आहे. हे अभियान शिवस्वराज्य दिन ते गांधी जयंती या दरम्यान राबविण्यात येणार आहे. अभियान गावागावात घराघरात पोहोचविण्यासाठी जिल्ह्यातील सर्व अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधीनी प्रयत्न करण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले असून राज्यात आणि देशात या मोहिमेत पुणे जिल्हा प्रथम क्रमांकावर आणण्यासाठी प्रयत्न करावे. शिवस्वराज्य दिनी कचरामुक्त पुणे जिल्हा मोहिमेचा शुभारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते महात्मा गांधी सभागृह पुणे जिल्हा परिषद येथे करण्यात आला.
त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार सुप्रियाताई सुळे, खासदार डॉ. अमोल कोल्हे (व्हिडीओ कॉन्फरन्सिंगव्दारे), जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. निर्मला पानसरे, उपाध्यक्ष रणजित शिवतरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद व पदाधिकारी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, आज राज्यभर शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारुन आपण शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर निष्ठा ठेवून काम करण्याचा संकल्प करुया, महाराष्ट्राला आणखीन महान राष्ट्र बनविण्यासाठी एकजूटीने व एकदिलाने काम करावे. कचरामुक्त, स्वच्छ पुणे जिल्हा अभियान आपण सुरु केले आहे हे अभियान पुणे जिल्हयाच्या आरोग्य, आर्थिक, सामाजिक विकासाला बळ देईल. छत्रपती शिवरायांनी, जिजाऊ मॉसाहेबांनी वसवलेल्या पुण्याचा गौरव वाढविण्याचा काम करेल, याची मला खात्री आहे.
सन 2016 मध्ये पुणे जिल्हा परिषदेने शिवराज्यभिषेक दिन साजरा करण्याचा ठराव केला होता. आज तोच शिवराज्यभिषेक दिन राज्यस्तरावर शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला. ही जिल्हा परिषदेसाठी आनंदाची बाब आहे. शिवस्वराज्य दिनाच्या निमित्ताने आपण राज्यातील प्रत्येक जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतमध्ये शिवस्वराज्य गुढी उभारत आहोत. ही गुढी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराची पताका आहे. अभिमान, स्वाभिमानाची ही पताका आपल्याला कायम फडकवत ठेवायची आहे. राज्याला, देशाला कोरोनाच्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. या संकटातून आपल्याला राज्याला, देशाला बाहेर काढायचे आहे. सध्या ग्रामीण भागात वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता कोरोनामुक्त गाव ही स्पर्धा राज्य शासनाने जाहीर केली आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून ग्रामीण भागातल्या कोरोनामुक्तीच्या कामाला प्रोत्साहन मिळेल. तज्ज्ञांनी कोरोनाच्या तिस-या लाटेचा इशारा दिला आहे. खबरदारी म्हणून प्रत्येक गावात तीस तीस बेडची कोरोना सेंटर उभारत आहोत. पंधराव्या वित्त आयोगातून कोरोनाच्या उपाययोजना करण्यासाठी निधी देण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामीण भागात कोरोनाप्रतिबंधित उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यास मदत होणार आहे. राज्य सरकारने अर्थसंकल्पात शिवस्वराज्य सुंदरग्राम अभियान, महिलांना सन्मान देण्यासाठी राजमाता जिजाऊ गृहस्वामिनी योजना, महिला धोरणांबाबत राज्य नेहमी अग्रेसर आहे. मुलींना बारावी पर्यंतचे शिक्षण मोफत, राज्य परिवहन महामंडळाच्या बसने मोफत प्रवासासाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले योजना सुरु केली आहे. माझी वसुंधरा अभियानात पुणे जिल्हयाने सर्वोत्तम कामगिरी केली आहे. जिल्हयाने विविध अभियानात चांगली कामगिरी केली आहे, त्याचप्रमाणे कचरामुक्त, गावस्वच्छता, नालेसफाई, एक कुटुंब एक शोषखड्डा मोहिमेमध्येही जिल्हयाने सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी प्रयत्न करावे.
पुणे शहर, पिंपरी चिंचवड महानगरपालिका शेजारील गावांची कचरा समस्याबाबत महापालिका आणि ग्रामपंचायतींनी विशेष प्रयत्न करावे. असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी सांगितले. यावेळी खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, पुणे जिल्हा परिषदेने चांगला आणि महत्त्वाचा उपक्रम हाती घेतल्याबद्दल जिल्हा परिषदेचे अभिनंदन.
जिल्ह्याच्या आरोग्य आणि ग्रामीण विकासासाठी केंद्रातून निधी आणि विविध योजना आणण्यासाठी आम्ही सतत प्रयत्न करीत राहू. या योजनांची योग्य अंमलबजावणी करण्याचे काम पदाधिकाऱ्यांनी करावे. यावेळी खासदार डॉ. अमोल कोल्हे म्हणाले, शिवस्वराज्य दिनी जिल्हा परिषदेने एक चांगला उपक्रम सुरु केला आहे. घनकचरा व्यवस्थापन ही काळाची गरज आहे. वाढत्या शहरीकरणामुळे स्वच्छतेबाबत अनेक समस्या निर्माण होत आहेत. पुढच्या पिढ्यांसाठी आरोग्य हे महत्वाचे असून त्यामुळे कचरामुक्त गाव, कचरामुक्त जिल्हा होणे आवश्यक आहे.
यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांनी कचरामुक्त पुणे जिल्हा अभियानाबाबत माहिती दिली. शोषखड्डे, उपयुक्तता व नियोजनाबाबत तालुका भोर येथील वाठार हिमा गावचे सरपंच संदीप खाटपे, घनकचरा व्यवस्थापनाबाबत तालुका बारामती येथील जळगाव सुपेचे सरपंच श्रीमती कौशल्या खोमणे, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाबाबत पंचायत समिती शिरुरच्या सभापती मोनिका हरगुडे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगव्दारे माहिती दिली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शिवशक राजदंड स्वराज्यगुढीचे पूजन करुन गुढी उभारण्यात आली. तसेच छत्रपती शिवाजी महाराज व यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करण्यात आले.
पत्नीसह प्रियकर अटकेत
व्हीएस न्युज - प्रेमसंबंधात अडथळा ठरणाऱ्या अभियंत्याचा दुधातून झोपेच्या गोळ्या देऊन पत्नीकडून खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली. गाढ झोपेत असलेल्या पतीचा गळा दाबून खून केल्याप्रकरणी पत्नीसह प्रियकरालाही अटक करण्यात आली.
मनोहर नामदेव हांडे (वय २७, रा. हिंदवीनगर, उरळी देवाची, सासवड रस्ता) असे खून झालेल्याचे नाव आहे. पतीचा खून केल्याप्रकरणी पत्नी अश्विनी मनोहर हांडे (वय १९, रा. हिंदवीनगर, उरळी देवाची, सासवड रस्ता), प्रियकर गौरव संतोष सुतार (वय १९, रा. उत्तमनगर, फुरसुंगी, हडपसर) यांना अटक करण्यात आली. २४ मे रोजी मनोहर हांडेचा अकस्मात मृत्यू झाला होता. या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास करण्यात येत होता. या दरम्यान हांडेचा अश्विनीचे आरोपी गौरव याच्याबरोबर प्रेमसंबंध असल्याची माहिती मिळाली होती.
शवविच्छेदन अहवालात मनोहरचा मृत्यू झोपेच्या गोळ्यांचे अतिरिक्त सेवन तसेच त्याचा गळा दाबण्यात आल्याचे नमूद करण्यात आले होते. पोलिसांच्या चौकशीत अश्विनीचे गौरवबरोबर विवाहबाह्य़ संबंध असल्याचे उघड झाले होते. पती मनोहर प्रेमसंबंधात अडथळा ठरत असल्याने तिने प्रियकराबरोबर संगनमत केले. २३ मे रोजी गौरवने तिला झोपेच्या गोळ्या आणून दिल्या. त्यानंतर पतीला दुधातून तिने झोपेच्या गोळ्या दिल्या. गाढ झोपेत असलेल्या मनोहरचा दोघांनी गळा दाबून खून केल्याची कबुली पोलिसांना दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, गुन्हे शाखेचे निरीक्षक सुभाष काळे यांनी घटनास्थळी भेट दिली.
करोनामुळे मृत्यू झाल्याचा बनाव
मनोहर करोनाबाधित असल्याने तो अलगीकरणात राहून घरीच उपचार घेत होता. त्याचा खून केल्यानंतर आरोपी गौरव पसार झाला. दुसऱ्या दिवशी मनोहर झोपेतून उठला नाही. अश्विनीने पतीचा करोनाने मृत्यू झाल्याचा बनाव केला. त्यामुळे सुरुवातीला या प्रकरणात पोलिसांनी अकस्मात मृत्यू अशी नोंद केली होती. सहायक पोलीस निरीक्षक राजू महानोर, उपनिरीक्षक केतन निंबाळकर, नितीन गायकवाड, शंकर नेवसे, अमित साळुंके, श्रीनाथ जाधव यांनी या प्रकरणाचा तपास करून गुन्हा उघडकीस आणला.
व्हीएस न्युज - ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ आणि ‘जय भवानी जय शिवाजी’चा जयघोष, ढोल-ताशांचा निनाद, तुतारीचा गजर आणि मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके अशा वातावरणात शिवराज्याभिषेक दिन रविवारी उत्साहात साजरा करण्यात आला. शिवाजीनगर परिसरातील एसएसपीएमएस येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर भगव्या स्वराज्यध्वजासह ३१ फूट उंचीची शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारण्यात आली.
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय आणि शिवजयंती महोत्सव समितीतर्फे आयोजित कार्यक्रमात विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत, खासदार गिरीश बापट, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्रा. नितीन बानगुडे पाटील, अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष प्रतापराव पवार, महाविद्यालयाचे प्राचार्य बी. बी. आहुजा, उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाचे संचालक धनराज माने, श्रीमंत युवराज मालोजीराजे छत्रपती, श्रीमंत मधुरिमा राजे मालोजीराजे छत्रपती, समितीचे संस्थापक अमित गायकवाड यांच्यासह स्वराज्यघराण्याचे वंशज सहभागी झाले होते. राज्यातील ५१ गड-किल्लय़ांवर स्वराज्य घराण्यांच्या प्रतिनिधींनी स्वराज्यगुढी उभारली.
सामंत म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळ्याचा दिन हा प्रत्येक मराठी माणसाच्या आयुष्यातील महत्त्वाचा दिवस आहे. हा दिवस शिवस्वराज्य दिन म्हणून मोठय़ा स्वरूपात साजरा करण्याच्या संकल्पनेला सुरुवात झाली आहे. हा दिवस राष्ट्रीय सण म्हणून साजरा केला जावा यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. पुढील वर्षी उत्कृष्ट शिवज्योत रॅलीचे आयोजन करणाऱ्या महाविद्यालयाला राज्य शासनाकडून पारितोषिक दिले जाणार आहे. डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, छत्रपती शिवरायांचे लोककल्याणकारी कार्य प्रेरणादायी आणि नवी ऊर्जा देणारे आहे. शिवस्वराज्य दिन साजरा करण्याबरोबरच शासनाने राज्यातील गड-किल्ल्यांच्या रक्षणासाठी कार्यक्रम हाती घेतला आहे.
व्हीएस न्युज - पुणे शहराबरोबरच पिंपरी -चिंचवड शहरातील अनेक निर्बंध सोमवारपासून (७ जून) शिथिल करण्यात आल्याने शहरवासीयांना दिलासा मिळाला आहे. सर्व प्रकारची दुकाने दुपारी चार वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी पालिकेने दिली आहे. उपाहारगृहे, बार, फूडकोर्ट सोमवार ते शुक्रवापर्यंत ५० टक्के आसन क्षमतेने सुरू राहणार असून व्यायामशाळा, सलून, स्पा, ब्यूटी पार्लर दुपारी चारवाजेपर्यंत सुरू ठेवता येणार आहेत. सायंकाळी पाच वाजेपर्यंत पाच जणांपेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई असून पाचनंतर संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी रविवारी याबाबतचे आदेश जारी केले. शहरातील सर्व अत्यावश्यक सेवांमध्ये नमूद केलेल्या सेवा, दुकाने आठवडय़ातील सर्व दिवस दुपारी चार वाजेपर्यंत खुली राहतील. इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार दुपारी चार वाजेपर्यंत खुली राहतील. शनिवार व रविवारी पूर्णपणे बंद राहतील. सार्वजनिक ठिकाणे, उद्याने, खुली मैदाने सकाळी पाच ते नऊ वाजेपर्यंत खुली राहतील. या कालावधीत व्यायामासाठी चालणे व सायकल चालवण्याची मुभा राहील. मॉल, सिनेमाघर, नाटय़गृह बंदच राहतील. लोकल सेवा अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीच राहील. पीएमपी बस अत्यावश्यक सेवेतील व्यक्तींसाठी ५० टक्के क्षमतेने सुरू राहील. मालवाहतूक करणाऱ्यांना तीन व्यक्तींसह प्रवास करण्याची मुभा असेल. आंतरजिल्हा प्रवासास सशर्त परवानगी राहील. खासगी कार्यालयांमध्ये ५० टक्के क्षमतेने दुपारी चार वाजेपर्यंत काम सुरू ठेवता येईल. अत्यावश्यक सेवा आणि कोविडशी संबंधित शासकीय कार्यालये पूर्ण क्षमतेने सुरू राहतील. निवासाची व्यवस्था असल्यास चित्रीकरणास परवानगी असेल. कामगारांच्या राहण्याची व्यवस्था असल्यास बांधकामांना परवानगी असेल. ५० जणांच्या उपस्थितीत धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम करता येतील.
लग्नसमारंभासाठी ५० जणांची तर अंत्यविधी, दशक्रिया विधीसाठी २० जणांच्या उपस्थितीची परवानगी राहील. बैठका, सभा, निवडणुका ५० जणांच्या उपस्थितीत घेता येईल. शाळा, महाविद्यालये, शिकवणी वर्ग ३० जूनपर्यंत बंदच राहतील. परीक्षार्थी विद्यार्थ्यांना पालकांसोबत संचारबंदी काळातही प्रवास करण्याची मुभा असेल. कृषी संबंधित सर्व दुकाने आठवडाभर दुपारी चार वाजेपर्यंत सुरू राहतील. करोना रुग्णसंख्येत वाढ झाल्यास सुधारित आदेश काढण्यात येतील, असे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.
उत्पादन क्षेत्र ५० टक्के क्षमतेने सुरू राहील
निर्यातपूर्वक उद्योगांमधील उत्पादन नियमितपणे सुरू राहील. अत्यावश्यक वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या उद्योगांना आवश्यक कच्चा माल पुरवणारी संपूर्ण साखळी तसेच सतत प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांना परवानगी असेल. इतर उत्पादन क्षेत्र ५० टक्के क्षमतेने सुरू राहील. त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी वाहतूक व्यवस्था संबंधित उद्योगांना करावी लागणार आहे.
दिवसाआड सम-विषम पध्दतीने मुभा
शहरातील बाजारपेठांमध्ये सम-विषम पध्दतीने दिवसाआड ५० टक्के दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. मालकासह दुकानातील कर्मचाऱ्यांना दर १५ दिवसांनी करोना चाचणी करणे बंधनकारक आहे. त्याची अंमलबजावणी क्षेत्रीय अधिकारी वैद्यकीय विभागाच्या मदतीने करणार आहेत. स्थानिक परिस्थितीनुसार निर्बंध वाढवण्याचे अधिकार क्षेत्रीय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
पुण्यातील गर्दी आणि अनलॉकबद्दल अजित पवारांनी केलं भाष्य? संजय राऊतांच्या विधानावर मांडली भूमिका
व्हीएस न्यूज - करोनाचा उद्रेक झाल्यानंतर पुण्यात तातडीने निर्बंध लागू करण्यात आले होते. जवळपास दीड ते दोन महिन्यांनंतर पुण्यातील निर्बंध काही प्रमाणात शिथिल करण्यात आले आहेत. मात्र, निर्बंध शिथिल होताच पुण्यातील रस्त्यांवर आणि बाजारपेठांमध्ये लोकांची वर्दळ वाढली आहे. खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत असल्याचं दिसत आहे. पुण्यातील वाढत्या गर्दीवर चिंता व्यक्त करत उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी नागरिकांना आवाहन केलं.
पु्ण्यात अजित पवारांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. लॉकडाउनचे निर्बंध काही प्रमाणात शिथिल करण्यात आल्यामुळे पुण्यात पुन्हा गर्दी होत असल्याचं दिसत आहे. यावर अजित पवारांनी चिंता व्यक्त केली. अजित पवार म्हणाले, “गर्दी झाली तर काही कठोर निर्णय घ्यावे लागतात. व्यापाऱ्यांना देखील विनंती आहे, त्याबद्दल लक्ष द्यावे. अन्यथा आणखी कठोर निर्णय घेण्यास लावू नका. लोक कंटाळली आहेत. लोकांची कामे रखडली आहेत, त्यामुळे बाहेर पडत आहेत. पण करोना संकट दूर झालेलं नाही. जर गर्दी वाढत राहिली, तर एका बाजूची आज आणि दुसर्या बाजूची उद्या अशा पद्धतीने दुकाने सुरू करण्याची वेळ आणू नका. त्यासाठी नागरिकांनी गर्दी करू नये. बाहेर पडताना, नियमांचे पालन करावं,” असं आवाहन अजित पवार यांनी केलं.
“पेट्रोल-डिझेलचे दर १०० रूपयांच्यावर पोहोचले आहेत. त्यामुळे राज्य सरकारकडे कर कमी करण्याची मागणी होत आहे, परंतु गेल्या वर्षांपासून आपण करोनाशी लढत आहोत. त्यामुळे करामध्ये कपात करता येणार नाही. केंद्राची परिस्थिती आता चांगली आहे,” असं सांगत त्यांनी पेट्रोलवर दर कपातीचा निर्णय केंद्राकडे टोलावला.
संजय राऊतांच्या विधानावर मांडली भूमिका
पुणे महापालिका निवडणुकीत शिवसेना ८० जागा जिंकेल. किंग किंवा किंग मेकर असू, असं शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत म्हणाले होते. त्यावरही अजित पवार यांनी भूमिका मांडली. “प्रत्येकजण पक्ष वाढविण्याच्या दृष्टीने भूमिका मांडत असतात. त्यातून त्यांनी मांडली असावी. आगामी महापालिकेत प्रभाग २,३ की ४ करिता अनुकूल आहात का, त्यावर ते म्हणाले की, “सध्याच्या स्थितीला मी तरी २ करिता अनुकूल आहे,” अशी माहिती पवार यांनी दिली.
व्हीएस न्यूज - पोलिसांपासून बचावासाठी अवैध धंद्यावाले अनेक शक्कल लढवतात. अशाच प्रकारे एका महिलेने गावठी हातभट्टीची दारू तयार करून कॅनमध्ये भरून घरामागच्या मोकळ्या जागेत पुरायची. त्या दारूची वाहतूक करून आसपासच्या परिसरात विक्री करायची. पिंपरी - चिंचवड पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा पथकाने या दारुभट्टीवर छापा मारत हा प्रकार उघडकीस आणला आहे. या कारवईत तीन लाख ५२ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणात एका महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सामाजिक सुरक्षा पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, नेरे दत्तवाडी रोडलगत असलेल्या शिवांजली नगर, हिंजवडी येथे एक महिला ही गावठी हातभट्टीची दारू तयार करून ती दारू प्लास्टिक कॅनमध्ये भरून ते कॅन तिच्या राहत्या घराच्या पाठीमागील बाजूस मोकळ्या मैदानात पुरत आहे, अशी माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी शुक्रवारी (दि. ४) दुपारी सव्वाएकच्या सुमारास छापा मारून कारवाई केली. दोन लाख ८० हजारांची टाकी, त्यात साडेतीन हजार गावठी दारू बनविण्याचे रसायन, एक हजारांची लोखंडी टाकी, ५०० रुपयांची मोकळी टाकी, २०० रुपयांचा एक पाईप, ७० हजार रुपये किमतीची ७०० लिटर गावठी हातभट्टीची दारू, असा एकूण तीन लाख ५२ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल या कारवाईत पोलिसांनी जप्त केला. आरोपी महिला ही गावठी हातभट्टीची दारू तयार करून प्लास्टिक कॅनमध्ये भरून साठवत होती. दारूचे ते कॅन तिच्या राहत्या घरामागील मोकळ्या जागेत पुरायची. तसेच तिला शक्य होईल तेव्हा वाहतूक करून आजबाजूच्या परिसरात ती दारू विक्री करायची. पोलिसांनी कारवाई करून दारू तयार करण्याचे रसायन नष्ट केले. तसेच जमिनीत पुरलेले दारूचे कॅन उकरून काढून जप्त केले. सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रदीपसिंग सिसोदे, धैर्यशील सोळंके, प्रणिल चौगले, पोलीस कर्मचारी विजय कांबळे, संतोष बर्गे, भगवंता मुठे, अनिल महाजन, मारुती करचुंडे, गणेश कारोटे, राजेश कोकाटे, सोनाली माने यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो कामाला गती येण्यासाठी त्रिस्तरीय समिती गठित
व्हिएस न्युज - पंचवटी, पाषाण ते पौड रोड भुयारी मार्गाच्या सर्वेक्षणासाठी लागणारी संरक्षण विभागाची परवानगी नुकतीच मिळाली असून पुणे महानगरपालिकेने सर्वेक्षणाचे काम गतीने सुरु करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले.
हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो आणि पंचवटी, पाषाण ते पौड रोड भुयारी मार्गाच्या कामाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज सर्किट हाऊस येथे आढावा बैठक घेण्यात आली, यावेळी त्यांनी या सूचना केल्या. बैठकीला आमदार सिद्धार्थ शिरोळे, विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, ‘पीएमआरडीए’चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास दिवसे, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत पुणे मेट्रो मार्गिका 3 हिंजवडी ते शिवाजीनगर कामकाजाचा आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला. मेट्रोचे काम गतीने पूर्ण होण्यासाठी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त व ‘पीएमआरडीए’च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी एकत्रितपणे कामकाज करावे, असे सांगितले. नागरिकांशी संवाद साधून मेट्रोचे काम जलदगतीने होण्यासाठी महापालिका व पीएमआरडीए मधील अपर जिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांची त्रिसदस्यीय समिती गठित करण्यात आली. या समितीमध्ये माधव जगताप, नितीन उदास व सुनंदा गायकवाड यांचा समावेश करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
बैठकीत हिंजवडी ते शिवाजीनगर मार्गावरील पुणे मेट्रोच्या कामकाजाचा आढावा घेतला. प्रकल्प निश्चिती, मान्यता, कामकाजाची सुरुवात, भूसंपादनाची सद्यस्थिती, केंद्र आणि राज्य शासनाची जागा, पर्यायी रस्ते तसेच अंमलबजावणीतील महत्त्वाचे टप्पे व प्रकल्प राबवण्यासाठी सुरु असलेल्या कार्यावाहीबाबतचा आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला.
विभागीय आयुक्त सौरभ राव, महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, पीएमआरडीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास दिवसे यांनी याविषयी माहिती देऊन कामे वेळेत पूर्ण होण्यासाठी नियोजन केल्याचे सांगितले.
व्हिएस न्युज - पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची प्रधानमंत्री कार्यालयात उपसचिव पदी निवड झाल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी आमदार सिद्धार्थ शिरोळे, विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, ‘पीएमआरडीए’चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास दिवसे, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
पुण्याच्या प्रश्नांची जाण असणारे अधिकारी नवल किशोर राम यांना प्रधानमंत्री कार्यालयात काम करण्याची संधी मिळाली आहे, ही चांगली बाब असून पुण्याचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी श्री. राम प्रयत्न करतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.
यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी देखील नवल किशोर राम यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
व्हिएस न्युज - पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांच्या अटी लागू करून फूल बाजार सूरू करण्याचे आदेश काढावेत.
पिंपरी चिंवडमधील कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पिंपरीतील सूरू असणारा फूल बाजार अनेक दिवसापासून बंद झाल्यामुळे फूल उत्पादक शेतकऱ्यांना अक्षरशः फूले रोज फेकून देण्याची वेळ शेतकर्यांवर आली आहे त्यांना अनेक मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागत आहे.
फूल बाजारातील सर्व व्यापारी चिंतेत असून आशीच परिस्थिती राहिले तर मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण होवू शकते. शेतकरी हातघाईला आला असून शेतकर्यांच्या हिताचा निर्णय घ्यावा आशी मागणी गणेश आहेर यांनी केले आहे.
महानगरपालिका आयुक्तांनी शेतकर्यांचा विचार करून पिंपरीतील फूल बाजार सकाळी ७ ते १० या वेळेत सूरू करण्याचे आदेश द्यावेत. ज्यांने करून फूल उत्पादक शेतकर्यांना थोडा का होईना पण आधार मिळेल आशी मागणी पिंपरी फुल बाजारातील फूलांचे व्यापारी गणेश आहेर हे पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्तांना केली आहेत.
व्हिएस न्युज - कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशात घोषित करण्यात आलेला लॉकडाऊन 17 मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. मात्र या काळातही राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये दारु विक्रीला सशर्त परवानगी मिळाली आहे. रेड, ग्रीन आणि ऑरेंज अशा तिन्ही झोनमध्ये दारूची दुकाने उघडली जातील, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रधान सचिव भूषण गगरानी यांनी सांगितले व त्या प्रमाणे दारूची दुकाने उघडली सुद्धा ,पण तळीरामांची दारूच्या दुकानाच्या बाहेरील झुंबड बगता आणि कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावा लक्षात घेता दारू विक्रीला परवानगी देणे हा निर्णय धोकेदायक ठरत असल्याचे दिसत आहे. पिंपरी चिंचवड शहरात तर सोशल डिस्टंस्टिंगचा आणि कोरोना प्रतिबंध उपाययोजनांचा फज्जा उडाला आहे म्हणून पिंपरी चिंचवड महानगपालिकेचे प्रभाग क्रमांक ९ चे नगरसेवक समीर मसुळकर यांनी लॉक डाऊन संपुष्टात आल्यावरच दारू विक्रीला परवानगी द्या अशी मागणी पुण्याचे पालकमंत्री व महाराष्ट्राचे उप मुख्यमंत्री अजित पवार यांना केली आहे.
इतर राज्यांच्या तुलनेत महारष्ट्रातील रुग्णांची संख्या मोठी आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारने आर्थिक कारण पुढे करून राज्यभरात दारू विक्रीला परवानगी देण्याचा आत्मघातकी निर्णय घेतला आहे. निदान दारू विक्री मुळेतरी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव राज्यात वाढू नये असे मत नगरसेवक समीर मासुळकर यांनी व्यक्त केले.
व्हिएस न्युज - दिव्यांग व्यक्तींची ऑनलाईन नोंदणी, प्रमाणपत्र याचबरोबर दिव्यांगांसाठी असलेल्या विशेष योजनांचा लाभ मिळवून देणे सुकर करण्याच्या उद्देशाने बीड जिल्हा परिषद व समाज कल्याण विभागाच्या वतीने नव्याने सुरू करण्यात आलेल्या ‘दिव्यांगसाथी’ (divyangsathizpbeed.com) या विशेष संकेतस्थळाचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
याप्रसंगी अशा प्रकारचे संकेतस्थळ राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात असावे या दृष्टिकोनातून विभागाला सूचना करण्यात येतील, अशी माहितीही धनंजय मुंडे यांनी दिली.
या संकेतस्थळावरून जिल्ह्यातील सर्व गावातील ग्रामसेवकांमार्फत येत्या एक महिन्याच्या आत दिव्यांग व्यक्तींची माहिती भरण्यात येईल, यामध्ये प्रामुख्याने त्यांचे आधार कार्ड, बँक खाते, दिव्यांग प्रमाणपत्र आदी बाबींचा समावेश असेल; जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजीव येडके हे यासाठी नोडल अधिकारी म्हणून काम पाहतील, अशी माहिती समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त डॉ.सचिन मडावी यांनी दिली.
या संकेतस्थळावरून जिल्ह्यातील दिव्यांगांची नोंदणी करून, प्रमाणपत्र प्राप्त लाभार्थ्यांना ३ टक्के खर्च योजना, विमा, पेन्शन, एसटी-रेल्वे पास इत्यादी योजनांचा लाभ मिळवून देणे, पात्र लाभार्थींना स्वावलंबन कार्ड मिळवून देणे, तपासणी व ऑनलाईन नोंदणी, तसेच आरोग्यविषयक सेवा मिळवून देणे या उद्देशाने जिल्ह्यातील सर्व दिव्यांग व्यक्तींची नोंदणी करण्यात येणार आहे.
अशा प्रकारचे संकेतस्थळ असावे अशी इच्छा धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली होती, त्याला प्रतिसाद देत त्यासाठी सर्वात प्रथम त्यांच्याच बीड जिल्ह्यातील समाज कल्याण विभागाच्या व जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन हे संकेतस्थळ आकाराला आणले त्याबद्दल धनंजय मुंडे यांनी श्री.येडके व श्री.मडावी यांचे अभिनंदन केले आहे.
दरम्यान जिल्ह्यातील ग्रामीण सह शहरी भागातील सर्व दिव्यांग व्यक्तींची नोंद घ्यावी, सर्व पात्र लाभार्थ्यांपर्यंत विभागाची प्रत्येक योजना पोहोचविण्यासाठी मदत व्हावी असे चोख नियोजन करून हा उपक्रम राबविण्यात यावा, अशा सूचना यावेळी श्री.मुंडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी बीडचे आमदार संदीप क्षीरसागर, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, समाज कल्याण सहायक आयुक्त डॉ.सचिन मडावी, जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजीव येडके यांसह प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002