व्हीएस न्यूज - भाजपाने निवडणूकीपुर्वी भाववाढ स्थिर ठेवण्याचे आश्वासन दिले होते. सर्व नागरिकांच्या बँक खात्यात 15 लाख रुपये जमा करु. शेती मालाला भाव मिळवून देण्यासाठी स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करु. देशातील बेरोजगारीचा प्रश्न सोडविण्यासाठी दरवर्षी चार कोटी युवकांना रोजगार देऊ. गरीब व अल्पउत्पन्न गटातील कुटूंबांना मोफत घरे देऊ. महिला सक्षमीकरणासाठी नविन योजना अमलात आणू. नद्यांचे संर्वधन, सुशोभिकरण करुन जलपर्यटनास चालणा देऊ. अशा शेकडो घोषणा केल्या होत्या. केंद्रात व राज्यात भाजपाचे सरकार स्थापन होऊन चार वर्ष उलटून गेली तरी सरकारने एकही आश्वासन पूर्ण केले नाही. तर उलट गोरगरिब नागरिकांना तासनतास बँकेच्या रांगेत उभे करुन खाते काढून घेतले आणि आता डिजिटललायजेशनच्या नावाखाली अनेक प्रकारचे टॅक्स आकारुन गरीबांच्या पैशांवर सरकारने डल्ला मारला आहे. मागील चार वर्षात महाराष्ट्रात औद्योगिक गुंतवणूक कमी झाली. त्यामुळे नविन रोजगार तर नाहीच उलट आहे तेच कामगार बेरोजगार झाल्याचे चित्र राज्यात व विशेषता पिंपरी चिंचवड मध्ये दिसत आहे. युपीए सरकारने दिलेल्या घरकुल योजना गुंडाळण्याचे काम भाजपा करीत आहे. नद्यांचे संर्वधन तर दुरच नदी पात्रातील अतिक्रमण देखील भाजप सरकारला काढता आले नाही. अशा निष्क्रिय भाजपा सरकारला जनता आगामी निवडणूकीत घरी बसवेल. यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या महिला माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार,राष्ट्रवादी प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, महिला प्रदेश अध्यक्षा चित्राताई वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी काळात जनजागृती करुन तीव्र आंदोलन छेडणार आहे. असे वैशाली काळभोर यांनी सांगितले.
राष्ट्रवादी महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी पिंपरी चिंचवडमध्ये गॅस दरवाढी विरोधात केंद्र व राज्य सरकारचा आंदोलन करुन निषेध केला. यावेळी महिलांनी ‘ना तेरी है, ना मेरी है। ये सरकार लुटेरी है।।’ अशा घोषणा दिल्या. दोन दिवसापुर्वी घरगुती गॅस, सिलेंडरच्या किंमतीत 48 रुपयांची वाढ केली. या दरवाढीमुळे महिला भगिनींना कुटूंबाचा मासिक खर्च चालविणे अवघड झाले आहे. पेट्रोल, डिझेलचे भाव शंभरीकडे कुच करीत असताना वाढलेल्या वाहतूक खर्चामुळे आणि शेतक-यांच्या संपामुळे भाजीपाल्यासह सर्वच पदार्थाच्या किंमती उच्चांकी पातळीवर आहेत. या गॅस वाढीचा व पेट्रोल, डिझेल वाढीचा निषेध करण्यासाठी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस कमिटीच्या अध्यक्षा वैशाली काळभोर यांनी मंगळवारी (दि. 5 जून) पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक आणि चिंचवड गावातील चापेकर चौकात चुल पेटवून पिठलं,भाकरी करुन निषेध केला.
यावेळी माजी महापौर व नगरसेविका अपर्णा डोके, नगरसेविका संगीता ताम्हाणे, कार्याध्यक्षा पुष्पा शेळके, मनीषा गटकळ, संघटिका कवीता खराडे, माजी उपमहापौर विश्रांती पाडाळे, लता ओव्हाळ, माजी नगरसेविका शकुंतला भाट, गंगा धेंडे, सुप्रिया पवार, संगीता जाधव, जयश्री पाटील, विद्या दिसले, दिपाली देशमुख, मंगला ढगे, रंजना कसबे, प्रिती मोकाशी, निलीमा कळंब, मंदा पेटकर, मिनल नवले, शिल्पा बिडकर, रुपाली गायकवाड, सविता धुमाळ, रामदास मोरे, नरेंद्र जाधव, दत्ता ओव्हाळ, आंनदा यादव, बाळासाहेब पिल्लेवार आदी उपस्थित होते.
व्हीएस न्यूज - पावसाळा काही दिवसावरच येऊन ठेपला आहे. त्यामुळे या दिवसात चेम्बर्स, ड्रेनेज लाईन, स्टॉर्म वॉटर लाईन तुंबण्याच्या समस्या मोठ्या प्रमाणात वाढतात. नागरिकांना त्याचा फार त्रास होतो. त्यामुळे पिंपळे सौदागरमधील नगरसेवक शत्रुघ्न काटे व नगरसेविका निर्मला कुटे यांनी सतत पाठपुरावा करत पावसाळा सुरु होण्यापूर्वी पुर्व तयारी तसेच खबरदारी म्हणून परिसरातील सर्व स्टॉर्म वॉटर लाईन, ड्रेनेज लाईनची साफ सफाई कामाची सुरुवात करण्याचे आदेश आरोग्य विभागाला दिले होते.
याची अंमलबजावणी करत आरोग्य विभागाने युद्ध पातळीवर प्रभागातील सर्व चेम्बर्स, ड्रेनेज लाईन, स्टोर्म वॉटर साफसफाई करण्याबाबत अभियान सुरु केले आहे. या अभियानामुळे पावसाळा सुरु झाल्यानंतर गटारी, नाले तुंबणार नाहीत. स्टॉर्म वाटर लाईन पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होईल जेणेकरून पावसाचे पाणी कुठेही साचणार व तुंबणार नाही. त्यामुळे नागरिकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही.
यासंदर्भात आवश्यक त्या सूचनाही नगरसेवक शत्रुघ्न काटे व नगरसेविका निर्मला कुटे यांनी आरोग्य विभागाला दिले. तसेच हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचेही सांगितले.
व्हीएस न्यूज - गेल्या दोन वर्षापासून पिंपरी चिंचवड शहरात कार्यरत असलेल्या एमआयएम पक्षाला सुरूंग लागला आहे. वरिष्ठ नेत्यांचे होत असलेले दुर्लक्ष, कार्यकर्त्यांची होणारी कुचंबणा यामुळेच नाराज होत शहर कार्यकारिणी बरखास्त करण्यात आलीय. शहराध्यक्ष अकील मुजावर यांच्यासह सर्वच पदाधिकार्यांनी थेट पक्षाचेच राजीनामे दिले आहेत.
शहराध्यक्ष अकिल मुजावर, महासचिव शफीमुल्ला काझी, प्रवक्ते धम्मराज साळवे यांनी याबाबत एमआयएमचे आमदार इम्तियाझ जलील यांना सर्व पदाधिकार्यांनी राजीनामे सादर केले आहेत. या राजीनाम्यात म्हटले आहे की, ऑल इंडिया मजलिस ए इतिहादुल मुस्लिमीन (एमआयएम) पक्षाचे कार्य २०१६ पासून प्रामाणिकपणे अविरत कार्य करत होतो. फेब्रुवारी २०१७ च्या महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत पक्षाचे १४ उमेदवार स्वबळावर दिले होते. या निवडणुकीत सर्व उमेदवारांनी कार्यक्षमपणे लढतही दिली. या निवडणुकीच्या प्रचारासाठी राष्ट्रीय नेते खासदार असददुद्दीन ओवेसी यांची जाहीर सभा राज्य कोर कमिटीने नियोजित केली होती. या सभेसाठी आम्ही मोठ्या प्रमाणावर आर्थिक खर्च करून नियोजन केले होते. मात्र ऐंनवेळी ही सभा रद्द करण्यात आल्याने स्थानिक नागरिक तसेच पक्षातील कार्यकर्त्यांचा रोष आमच्यावर ओढला गेला. ही सभा रद्द झाल्यामुळे निवडणुकीवरही त्याचा परिणाम झाला. मोठ्या पराभवाला सामोरे जाऊन देखील खचून न जाता आम्हा पक्षाच कार्य सुरुच ठेवले. काही दिवसांपूर्वी देहूरोड येथे शिवसेनेचे उपनेते हाजी अराफत शेख यांच्या वडिलांच्या वादग्रस्त दर्ग्याच्या व देहूरोड मुस्लिम जमात दफनभूमी येथे पक्षाचे आमदार वारीस पठाण यांच्या हस्तक्षेपामुळे १७ निष्पाप युवकांवर गुन्हे दाखल झाले. यामुळे शहरातील उलेमा आणि मुस्लिम समाजसेवक व मुस्लिम संघटना नाराज झाले आहेत. आगामी काळात एमआयएम पक्षाला कोणत्याही प्रकारचे सहकार्य करणार नाही अशी भूमिका सर्वांनीच जाहीर केली आहे.
महाराष्ट्र राज्य कार्यकारणी शहरात पक्षबळकट करण्यासाठी कार्य करत नाही.जनतेला पक्षाकडून कोणत्याही प्रकारचा न्याय मिळत नाही. त्यामुळे आम्ही पक्षात का कार्य करावे असा प्रश्न निर्माण झाला आहे. म्हणूनच पक्षाची कार्यकारिणी बरखास्त करून आम्ही सर्व पदाधिकारी राजीनामे देत असल्याचे राजीनामा पत्रात म्हटले आहे.
व्हीएस न्यूज - एका सोनसाखळी चोराला त्याच्या साथीदारांसह वाकड पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून दोन लाख ४५ हजार रुपये किमतीचे आठ तोळे सोने जप्त करण्यात आले आहे. झटपट पैसे कमविण्यासाठी चोरीसारखे गुन्हे करत असल्याची कबुली दोन्ही चोरांनी दिली आहे. विशेष म्हणजे मुख्य आरोपी हा एका वृत्तवाहिनीचा पत्रकार असल्याची माहीती तपासात समोर आली आहे.
नसीम सादिक उस्मानी (वय ३२, रा. जगतापनगर, लेन नंबर पाच, थेरगाव) आणि मोहम्मद शराफत हुसेन अली (वय २४, मूळ रा.ग्राम-पोस्ट अफजलगढ, ता. धामपूर, जि. बिजानेर,उत्तर प्रदेश, सध्या रा. थेरगाव) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलीस उपआयुक्त गणेश शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, साखळीचोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी वाकड पोलिसांनी तपास पथक तयार केले. या पथकाने २९ मे रोजी साखळी चोरीच्या घटना घडलेल्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्यानुसार नसीम आणि मोहम्मद हे दोघे अॅक्टिव्हा मोपेड (एम एच १४ / जी आर ५४६८) वरून वाकड,थेरगाव आणि काळेवाडी परिसरात पायी चालत जाणा-या महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने चोरून नेत असल्याचे निष्पन्न झाले.
त्यानुसार आरोपींवर कारवाई करत दोघांना अटक केली. त्यांच्याकडून ८२ ग्रॅम वजनाचे २ लाख ४५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. यामुळे वाकड पोलीस ठाण्यातील तीन आणि सांगवी पोलीस ठाण्यातील दोन सोनसाखळी चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
अटक करण्यात आलेला आरोपी नसीम हा अन्याय भ्रष्टाचार निवारण समितीचा पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष, एका संघटनेचा पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष आणि एका वृत्त वाहिनीचा पत्रकार म्हणून काम करत होता. त्याने आपला साथीदार मोहम्मद अली याला वेळोवेळी दिल्लीवरून बोलावून पिंपरी चिंचवड शहरात सोनसाखळी चोरीचे गुन्हे केले आहेत. मोहम्मद अली याच्यावर दिल्लीमधील पोलीस ठाण्यात जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे, पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त विक्रम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुनील पिंजण, पोलीस उपनिरीक्षक हरीश माने, तपास पथकातील विक्रम कुदळ, विजय गंभीरे, अशोक दुधवणे, प्रमोद कदम, विक्रांत गायकवाड, शाम बाबा, नितीन गेंगजे, मधुकर चव्हाण, बिभीषण कन्हेरकर, अनिल महाजन, सनी जोंधळे, महंमद नदाफ, धनराज किरनाळे, दादा पवार यांच्या पथकाने केली.
व्हीएस न्यूज - कोरेगाव-भीमा येथे १ जानेवारी झालेल्या दंगलीमधील पीडित आणि तिथे राहणारी पूजा सकट हिच्या हत्या प्रकरणी जबाबदार असणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करावी,या मागणीसाठी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या कार्यालयासमोर आज आंदोलन करण्यात आलं. तसंच यावेळी गिरीश बापट यांच्या राजीनाम्याचीही मागणी करण्यात आली.
भीमा कोरेगाव येथील हिंसाचारानंतर ५ महिने होऊन गेले पण अद्यापपर्यंत दोषींवर कोणत्याही प्रकारची कारवाई या सरकारने केलेली नाही, ही निषेधार्थ बाब आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट हे पीडितांचे प्रश्न सोडविण्यात अपयशी ठरले आहेत, त्यामुळे त्यांनी पालकमंत्री पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. रिपब्लिकन युवा मोर्चाचे राहुल डंबाळे यांच्या नेतृतत्त्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी, ‘माझ्या मुलीची हत्या होऊन दोन महिन्याचा कालावधी होऊन गेला. मात्र त्यातील आरोपीही अद्याप मोकाट आहेत. त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई करावी’, अशी मागणी पूजा सकटच्या वडिलांनी केली.
दरम्यान, कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणात आज पुण्याच्या विश्रामबाग पोलिसांनी तीन जणांना अटक केल्याने खळबळ उडाली आहे. आज सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास विश्रामबाग पोलिसांनी एल्गार परिषदेचे आयोजक आणि दलित लेखक सुधीर धवळे यांना त्यांच्या गोवंडी येथील घरातून ताब्यात घेतले. तर वकील सुरेंद्र गडलिंग यांना नागपुरातून आणि माओवाद्यांचे नेते रोना विल्सन यांना दिल्लीतून अटक करण्यात आली आहे.
व्हीएस न्यूज - पुणे येथील राष्ट्रीय सुरक्षा प्रबोधिनीवर बुधवारी केंद्रीय गुन्हे अन्वेक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी (सीबीआय) छापा मारला. एनडीएमध्ये शिक्षकांची निवड आणि नियुक्तीमध्ये घोटाळा झाल्यामुळे ही छापेमारीची कारवाई करण्यात आली आहे. सीबीआयने एनडीएच्या मुख्याध्यापकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पॉलिटिकल सायन्सचे प्राध्यापक, केमिस्ट्री, गणित विषयाचे सहाय्यक प्राध्यापक यांच्यावर शिक्षक निवडीमध्ये घोटाळा केल्याचा आरोप आहे. एनडीएमधील कार्यालये आणि आरोपींच्या निवासस्थानी शोध मोहिम सुरु आहे. एनडीएमधून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलामध्ये सेवा बजावतात.
एनडीए देशातील एक प्रतिष्ठीत सैन्य प्रशिक्षण देणारी संस्था असून अनेकदा विदेशातूनही उमेदवार इथे प्रशिक्षणासाठी येतात. एनडीमध्ये निवड होण्यासाठी विद्यार्थ्यांना खूप परिश्रम करावे लागतात तसेच इथल्या खडतर प्रशिक्षणानंतर उत्तम दर्जाचे लष्करी अधिकारी तयार होतात. एनडीएमधून भारतीय सैन्य दलांमध्ये गेलेल्या अधिकाऱ्यांनी प्रत्येक युद्धात महत्वाची भूमिका बजावली आहे.
व्हीएस न्युज :- नऊ सराईत गुन्हेगारांकडून 11 तोळे 3 ग्रॅम सोने-चांदीचे दागिने 23 मोबाईल फोन, 3 देशी बनावटीचे पिस्टल, 3 जिवंत काडतुसे, 2 सेन्ट्रो मोटार, 1 स्विफ्ट मोटार, 1 करिझमा दुचाकी आणि रोकड असा तब्बल 14 लाख 7 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. विविध पोलीस ठाण्यातील 15 गुन्हे उघडकीस आले आहेत. सुरजितसिंग राजपालसिंग टाक (रा. बिराजदारनगर, हडपसर), हर्षल गुलाब पवार (रा. कुळे, ता.मुळशी), महेश शिवदास दिक्से (वय-28, रा. लोणी, ता. रिसोड, वाशीम), सॅम्युयल ऊर्फ विशाल डेडली ऑरनॉड (वय-30, रा. संभाजीराव हौसिंग सोसायटी, मिलींदनगर, पिंपरी), अतुल अविनाश पवार (वय-25, रा. मिलींदनगर, पिंपरी), सागर कुमार इंद्रा (वय-25, रा. कैलासनगर, बालाजी कॉलनी, थेरगाव), राहूल श्रीहरी काळे (वय-37, रा. बुधवार पेठ, पुणे), अक्षय आबासाहेब कोळेकर (वय-19, रा. साने कॉलनी, साने चौक, मोरेवस्ती, चिखली), शुभम नितीन काळभोर (वय-19, रा. भिमशक्तीनगर, मोरेवस्ती, चिखली) अशी आरोपींची नावे आहेत. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी टाक हा आपल्या साथीदारांसह मोहननगर येथे घरफोडी करताना पोलीसांनी त्याला ताब्यात होते. त्यांच्याकडून सात गुन्हे उघडकीस आले असून दोन मोटारींसह सुमारे साडेचार लाखांचा ऐवज जप्त केला. तर आरोपी हर्षल पवार याच्याकडून तीन गुन्हे व 9 तोळे सोन्याचे दागिने जप्त केले. महेश दिक्से याच्याकडून 89 हजारांचा एक ऍपलचा मोबाईल जप्त करण्यात आला. आरोपी ऑरनॉल्ड, अतुल पवार, इंद्रा यांच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल, एक जिवंत काडतुस, एक लोखंडी कोयता, एक सुरा, एक चारचाकी स्वीफ्ट मोटार असा 3 लाख 50 हजार 700 रूपयांचा ऐवज जप्त केला. आरोपी राहूल काळे याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल, 2 जिवंत काडतुसे असा 51 हजारांचा ऐवज जप्त केला. अक्षय कोळेकर व एका अल्पवयीन मुलाकडून 2 लाख 10 हजार रूपये किंमतीचे 20 मोबाईल, एक करिझमा दुचाकी जप्त केली. तर शुभम काळभोर याच्याकडून 16 हजारांचे दोन मोबाईल जप्त करण्यात आले. असा 14 लाख 7 हजार 725 रूपयांचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला. ही कामगिरी पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त सतिश पाटील, पिंपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीधर जाधव, पोलीस निरीक्षक (गुन्हे) मसाजी काळे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार बाळासाहेब अंतरकर, विठ्ठल बढे, महिला फौजदार रत्नमाला सावंत, हरिदास बोचरे, दत्तात्रय नणनवरे आदींच्या पथकाने केली.
व्हीएस न्युज - शिवशाही व्यापारी संघटनेच्या महाराष्ट्र कार्यकारिणी आज प्रदेश सचिव गणेश आहेर यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आली.
पिंपरी येथील नारायण मेघाजी लोखंडे सभागृहात आयोजित कऱण्यात आलेल्या शिवशाही व्यापारी संघाच्यावतीने पदनियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. यावेळी शिवशाही व्यापारी संघाचे प्रदेशाध्यक्ष युवराज दाखले,प्रदेश उपाध्यक्ष गोरख पाटील , चिंचवड विधानसभा अध्यक्ष निलेश भोरे, खजिनदार माऊली जाधव, रोहिदास तांबे, शिवसेना उपविभागप्रमुख प्रमुख प्रदीप दळवी, पिंपरी विधानसभा अध्यक्ष बाळासाहेब गायकवाड,मनोहर कानाडे(संत तुकाराम नगर विभागअध्यक्ष. शिवशाही संघटनेचे पि चि उपाध्यक्ष गणेश पाडुळे ,दत्ता गिरी (थेरगाव विभाग अध्यक्ष) महिला आघाडीच्या सारिका तामचीकर(,महीला सल्लागार )रत्नप्रभाताई नवगिरे,शिल्पाताई मरडेकर (चिंचवड विधानसभा महीला अध्यक्ष ) नरसिंग माने,आकाश घटकार,रविकिरण घटकार , आदी उपस्थित होते.
शिवशाही व्यापारी संघाच्या पदाधिका-यांच्या नियुक्त्या पुढीलप्रमाणे - महादेव काळे (लातुर जिल्हाध्यक्ष), विजय पिंगळ (नाशिक जिल्हाध्यक्ष), दिपक बिजेकर (दिंडोरी तालुकाध्यक्ष), पुणे शहराध्यक्ष (गोगा सुपेकर), सुनीता खंडाळकर.(पुणे महिला शहराध्यक्ष), विशाल बाविस्कर (पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष), गणेश पाडोळे (पिंपरी-चिंचवड उपाध्यक्ष), बाळासाहेब गायकवाड (पिंपरी विधानसभा अध्यक्ष), सतीश भवाळ (पिंपरी विधानसभा उपाध्यक्ष), राज गिरी (चिंचवड विधानसभा उपाध्यक्ष), भीमराव कुलकर्णी (खराळवाडी विभाग अध्यक्ष), कर्जत तालुकाध्यक्ष (सुहास ठाकरे), रंजत यादव ( मुंबई उपाध्यक्ष ), प्रफुल्ल भोसले (उल्हासनगर विभागाध्यक्ष), बलराम जाधवानी (उल्हासनगर विभागाध्यक्ष), प्रकाश जैन (ठाणे जिल्हाध्यक्ष), बबलू वाणी (संभाजीनगर पूर्व शहराध्यक्ष), नितीन देशमुख (संभाजीनगर पूर्व उपाध्यक्ष), सागर बनसोडे (संभाजीनगर मध्य शहराध्यक्ष), साजिद कुरेशी, मुश्ताक कुरेशी (संभाजीनगर मध्य उपाध्यक्ष). सय्यद सलाबउद्दीन ( संभाजीनगर मध्ये शहर सचिव)
व्हीएस न्यूज - प्रभाग क्र.३२ अंतर्गत सांगवी, नवी सांगवी परिसरातील नाल्यांच्या साफसफाई कामकाजाला वेग आला असून पावसाळा सुरू होण्यापूर्वी नालेसफाई पूर्ण करण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आरोग्य खात्याने कंबर कसली असल्याचे चित्र सांगवी परिसरात दिसून येत आहे. नगरसेवक हर्षल ढोरे यांनी स्वत: या लक्ष देऊन या कामाचा आढावा घेतला.
आरोग्य विभागाकडुन जुनी सांगवीतील कै. शकुंतलाबाई शितोळे शाळेशेजारील व शिवांजली परिसरातील नाले साफ – सफाई पूर्ण करण्यात आली. नवी सांगवी दशक्रिया घाट,इंद्रप्रस्थ सोसायटी समोरील नाला साफसफाईचे कामकाज प्रगतीपथावर सुरू आहे. आरोग्य निरीक्षक उद्धव डवरी यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य खात्याचे पंधरा ते वीस कर्मचारी गेली पंधरा दिवस नालेसफाईच्या कामात व्यस्त आहेत.
शिवांजली परिसर व दशक्रिया घाट येथील नालेसफाईच्या कामाची नगरसेवक हर्षल ढोरे यांनी पाहणी केली. “एम एस काटे चौक, नर्मदा गार्डेन येथील नाला साफसफाईच्या कामासाठी आरोग्य विभागाच्या मदतीला स्थापत्य विभागामार्फत जेसीबी व अन्य साधनसामुग्री उपलब्ध करून दिली जाईल. येत्या आठ-दहा दिवसांत सांगवी-नवी सांगवीतील नालेसफाईची कामे मार्गी लावली जातील,” असे नगरसेवक हर्षल ढोरे यांनी सांगितले.
व्हीएस न्यूज - जनसेवा सहकारी बँक लि. हडपसर पुणे या बँकेच्या भोसरी एमआयडीसी शाखेतील एटीएम सेवेला आज (सोमवार) पासून प्रारंभ झाला. भोसरी विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश लांडगे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे सह संपर्क प्रमुख मिलिंदराव देशपांडे यांच्या हस्ते एमटीएम सेंटरचे उद्घाटन करण्यात आले.
एटीएम सेंटरच्या उद्घाटन समारंभासाठी जनसेवा सहकारी बँकेचे अध्यक्ष सीेेए प्रदीप जगताप, पालक संचालक अॅड. सतीश गोरडे, मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक जोशी, संचालक सूर्यकांत शिर्के, संदीप सारडा, विनायक गायकवाड,अनुपमा कळसकर, आशा बहिरट, बाळासाहेब कचरे, रवी तुपे, शाखा व्यवस्थापक विलास लांडगे, नगरसेवक बाबू नायर, सीताराम शेट्टी, संदीप जाधव, राजेश भुजबळ, रवींद्र नामदे, सुनीता पाटसकर, शिवसेना उपशहर प्रमुख गजानन चिंचवडे, भाजप प्रवक्ते अमोल थोरात आदी उपस्थित होते. आमदार महेश लांडगे बँकेच्या नवीन सेवेसाठी शुभेच्छा देताना म्हणाले, जनसेवा सहकारी बँक मागील चार दशकांपेक्षा अधिक कालावधीपासून नागरिकांना सेवा देत आहे. आपल्या ठेवीदारांच्या हिताचा विचार करत सातत्याने नवनवीन उपक्रम राबविण्यात येतात. त्यामुळे ठेवीदारांच्या मनात जनता सहकारी बँकेविषयी विश्वास कायम आहे.
अध्यक्ष प्रदीप जगताप म्हणाले की, आर्थिक यशाला गवसणी घालण्यासाठी आर्थिक व्यवहार मोठ्या प्रमाणात होणे गरजेचे आहे. एटीएम सेवेमुळे खातेदारांचे व्यवहार वाढतील. चलन फिरते राहील. बँकेच्या एमआयडीसी शाखेने आतापर्यंत ९५ कोटींचा टप्पा पार केला आहे. येत्या आर्थिक वर्षात १०८ कोटींचा टप्पा गाठण्याचे ध्येय शाखेने ठेवले आहे. त्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
व्हीएस न्यूज – थेरगाव परिसरातील सर्व सामाजिक संस्थांचे संघटन करून "थेरगाव सोशल फ़ाउंडेशन" ची स्थापना करण्यात आली आहे. थेरगाव परिसरातील समस्या निर्मूलन व सामाजिककर्तव्य दक्षतेसाठी या संस्थेची निर्मिती करण्यात आल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
या अगोदर “आंघोळीची गोळी” या संस्थेमार्फ़त सुरु असलेल्या नेल फ़्री ट्री, पेन फ़्री ट्री या उपक्रमाद्वारे ‘खिळेमुक्त झाड़ांचे थेरगाव ' हा कार्यक्रम राबविण्यात आला आहे. तसेच, दि. २० मेरोजी बिर्ला हॉस्पिटल ते केजूदेवी बोटक्लब या मार्गावर असलेल्या सर्व झाडांवरील जाहिरात करण्यासाठी लावलेले बोर्ड, खिळे, स्टेप्लर पिन्स, बाईंडिंग वायर्स, नायलॉन पट्टया तसेच तूटलेले ट्री गार्डकाढुन झाडांना खिळेमुक्त व पर्यायाने बंधनमुक्त करण्यात आले. थेरगाव सोशल फ़ाउंडेशनचे निलेश पिंगळे, अनिकेत प्रभु, राहुल सरवदे, सुशांत पांडे, अनिल घोडेकर, मनोज वंजारी यांच्या संयोजनाने उपक्रम राबविण्यात आला. बापू खोसे, मनिषा दनाने, श्रीकांत धावारे, प्रकाश गायकवाड, अंकुश कूदळे, मयूर कांबळे, रोहीत ढोबळे, अमोल शिंदे, राहुल जाधव, अभिजीत खानविलकर, योगेश ननावरे,सचिन पानढवळे यांच्यासह विविध संस्थांनी या उपक्रमात सहभाग घेतला.
व्हीएस न्यूज - हिंजवडी येथील आयटी कंपनीत काम करणाऱ्या एका २३ वर्षीय तरुणीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. पूजा अंकुश वाघमारे असे आत्महत्या केलेल्या तरूणीचे नाव आहे. हा प्रकार सोमवारी रात्री दहाच्या सुमारास मारुंजी येथे घडला.
पूजा ही आयटी कंपनीत काम करत होती. सोमवारी रात्री तिने राहत्या घरात गळफास घेतला. तिच्या घराशेजारी रहाणाऱ्या नागरिकांना याबाबत संशय आल्यानेत त्यांन हिंजवडी पोसिांना माहिती दिली. माहिती मिळताच हिंजवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घडल्या प्रकाराची चौकशी केली. दरम्यान, पूजाने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समजू शकले नाही.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002