व्हीएस न्यूज - वाकड पोलिस ठाण्याच्या हद्दीत गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद असलेल्या सराईत गुन्हेगार रोहन उर्फ गंग्या वासुदेव वाघमारे याला पोलिसांनी दीड वर्षासाठी तडीपार केले आहे. गेल्या काही दिवसांपासून छोट्या मोठ्या गुन्हेगारी कारवायामूळे गंग्याची दहशत निर्माण झाली होती.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक सतीश माने यांच्या सुचनेनुसार पोलिस कर्मचारी सुहास पाटोळे, नाना झेंडे यांनी त्याच्या सर्व गुन्ह्यांचे रेकॉर्ड तयार करून तडीपारीचा प्रस्ताव पाठवला होता. या प्रस्तावावरून उपायुक्त गणेश शिंदे यांनी त्यास दीड वर्ष तडीपार करण्याचे आदेश दिले आहेत.
व्हीएस न्यूज - तरुणींचे सोशल मीडियाचे अकाऊंट हॅक करून त्यावर त्यांचे फोटो मॉर्फ करून ते व्हायरल करण्याची धमकी देऊन खंडणी उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या इंजिनीअरला सायबर शाखेने अटक केली. त्याने सहा तरुणींकडे अशाप्रकारे खंडणी मागितली आहे.
कृष्णा बळीराम फड (रा. खणावळकर आळी, पनवेल) असे अटक केलेल्याचे नाव आहे. फड हा कोल्हापूर येथे इंजिनीअरिंगचे शिक्षण घेत आहे. त्याला फेसबुक, इन्स्ट्राग्राम, स्नॅपचॅट या सोशल मीडिया अकाऊंटला हॅक कसे करायचे माहिती होते. त्याचा गैरवापर करीत त्याने तरुणींची अकाऊंट हॅक करण्यास सुरुवात केली. सहापैकी दोन तरुणींनी सायबर शाखेकडे तक्रार केल्यानंतर त्याचा तपास केला असता, फड याने हा उद्योग केल्याचे समोर आले. त्यानुसार त्याला अटक केली.
पिंपळे सौदागर येथील एका तरुणीचे इन्स्टाग्रामचे अकाऊंट हॅक झाले आहे. त्यावर अश्लिल फोटो व मजकूर टाकला आहे. बदनामी टाळायची असेल तर १५ हजार रुपये दे; अन्यथा मॉर्फ केलेले आणखी काही फोटो व्हायरल करेन, अशी धमकी दिल्याची तक्रार तिने सायबर शाखेकडे केली. सायबर सेलच्या उपनिरीक्षक रूपाली पवार आणि मंदा नेवसे यांनी या संदर्भात तपास केला. त्यावेळी फड याचे नाव समोर आले. त्याला सायबर शाखेने अटक केली.
फड हा त्या तरुणींचे अकाऊंट हॅक करून त्या अकाऊंटमधील तरुणींच्या मित्र-मैत्रिणींनाही पैशाच्या मदतीसाठी मेसेज करीत असे. त्यांच्याकडे पासवर्ड व युजर आयडीही मागत असे. फडने आतापर्यंत सहाजणींचे अकाऊंट हॅक केले. त्यांचे फोटो मॉर्फ करून ते व्हायरल करण्याची धमकी दिली आहे. अकाऊंट हॅक करण्यासाठी त्याने वापरलेला मोबाईल जप्त केला आहे. अशा प्रकारे बदनामीकारक मजकूर टाकून खंडणी मागण्याचा प्रयत्न केला असेल तर तरुणींनी सायबर शाखेकडे तक्रार करावी, असे आवाहन उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी केले आहे.
२७६ गुन्हे दाखल
एकीकडे सोशल मीडियावर सक्रिय राहण्याची क्रेझ वाढत असताना, दुसरीकडे त्याचा धोकाही निर्माण होत आहे. सोशल मीडियावरून बदनामी करणे, अश्लिल फोटो टाकणे, ब्लॅकमेल करणे असे प्रकार घडत आहेत. गेल्या सोळा महिन्यांत सायबर शाखेकडे अशा प्रकारच्या ७९५ तक्रारी आल्या आहेत. त्यांपैकी २७६ तक्रार अर्जांचा तपास करून आरोपींचा शोध घेण्यात आला आहे. त्यांना अटक करण्यात आली आहे.
जागा मालकाचा उपोषणाचा इशारा
व्हिएस न्यूज - दापोडी येथील सर्व्हे नं. 77 हिस्सा नं.4 ब येथील जागा भाऊसाहेब मुगुटमल यांची आहे. त्यांच्या जागेत पालिकेच्या जलनिःसारण विभागाने ड्रेनेज लाईन टाकून अतिक्रमण केले आहे. ही ड्रेनेज लाईन त्वरीत काढून घ्यावी, अशी मागणी मुगुटमल यांनी केली आहे. अन्यथा पालिकेच्या विरोधात उपोषणाला बसेन, असा इशारा त्यांनी दिला आहे.
याबाबत त्यांनी पालिका आयुक्तांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, दापोडी येथील सर्व्हे नं. 77 हिस्सा नं.4 ब येथील जागा भाऊसाहेब मुगुटमल यांची आहे. त्यांच्या जागेशेजारी मोकळी जागा उपलब्ध असताना देखील पालिकेच्या जलनिःसारण विभागाने मुगुटमल यांच्याच जागेत बेकायदेशीरपणे ड्रेनेज लाईन टाकली आहे. काम सुरू होण्यापुर्वी मुगुटमल यांनी जलनिःसारण विभागाकडे तक्रार केली होती. त्यांच्या तक्रारीकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच परिसरातील काही नागरिक आमच्या जागेत येऊन काहीही करू लागले आहेत. वारंवार आमच्याशी वाद घालत असून माझ्या जीवाला काही बरे-वाईट झाल्यास जलनिःसारण विभागाचे संबंधित अधिकारी जबाबदार राहतील. आमच्या हक्काच्या जागेतील ड्रेनेज लाईन त्वरीत काढून टाकावी. अन्यथा पालिकेच्या विरोधात उपोषण करण्यात येईल, असा इशारा मुगुटमल यांनी दिला आहे.
व्हिएस न्यूज - भिगवण अपघातात जीव गमावलेल्या गायकवाड कुटुंबीयांतील पाचही जणांचे मृतदेह शनिवारी सकाळी त्यांच्या यमुनानगर येथील घरी आणण्यात आले. त्यानंतर निगडीतील अमरधाम स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. पुणे-सोलापूर महामार्गावर भिगवणजवळील डाळज गावच्या हद्दीत स्कॉर्पियो गाडीचा टायर फुटून शुक्रवारी सायंकाळी हा अपघात झाला होता. प्रकाश रामचंद्र गायकवाड (वय 67), सुनीता प्रकाश गायकवाड (वय 58), संदीप प्रकाश गायकवाड (वय 40), शीतल संदीप गायकवाड (वय 32), आभिराज संदीप गायकवाड (वय 5, सर्वजण रा. रा. नाना-नानी पार्क यमुनानगर निगडी) अशी या अपघातात मृत्यू झालेल्या गायकवाड कुटुंबातील सदस्यांची नावे आहेत. या भीषण अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या गायकवाड कुटुंबातील पाच सदस्यांचे पार्थिव दोन रुग्णवाहिकांमधून सकाळी त्यांच्या राहत्या घरी यमुनानगरमध्ये आणण्यात आले. त्यांच्या पार्थिवावर सकाळी साडेदहाच्या सुमारास निगडीतील अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे गायकवाड कुटुंबावर दु:खाचा डोंगर पसरला आहे. अंत्यविधीसाठी निगडी परिसरातील नागरिक गायकवाड कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी झाले असून अंत्यविधीला असंख्य नागरिकांनी गर्दी केली होती. आजोळी गेल्यामुळे बचावलेल्या या कुटुंबातील सदस्य विश्वराजच्या (वय 7) हातून या पाचही सदस्यांना अखेरचे पाणी देण्यात आले. तो आजोळी गेला असल्याने देवदर्शनसाठी गेला नव्हता. मात्र, त्याला आजी, आजोबा, आई, वडील आणि धाकटा भाऊ अभिराज सोडून केल्याने तो पोरका झाला आहे. तर, सर्वांना विश्वराजचे चुलत आजोबा सुभाष गायकवाड यांनी अग्नी दिला. या अपघातात गायकवाड परिवारातील प्रमोद प्रकाश गायकवाड (वय30) व हेमलता प्रमोद गायकवाड (वय28) हे आणखी दोघे जण जखमी झालेले आहेत. त्यापैकी हेमलता गायकवाड यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. आई-मुलाला एकाच चितेवर अग्नी शीतल गायकवाड आणि त्यांचा मुलगा अभिराज गायकवाड या दोन्ही मायलेकरांचाही मृत्यू झाला आहे. या दोघांवर अंत्यसंस्कार करताना एकाच चितेवर त्यांना अग्नी देण्यात आला.
व्हिएस न्यूज - चारचाकी वाहनांना बसविण्यात आलेल्या क्रॅश गार्डवर होणाऱ्या कारवाईस दिल्ली उच्च न्यायालयाने स्थगिती दिली असल्याने वाहनांना सेफ्टी गार्ड बसवू शकतो, अशी माहिती इंडियन सेफ्टी गार्डस इंडस्ट्रीजचे उपाध्यक्ष मनिष कोल्हटकर यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली.
कोल्हटकर यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, चार चाकी वाहनांचे सेफ्टी गार्ड पादचारी व प्रवाशांना सुरक्षित नसल्याचे कारणामुळे रस्ते महामार्ग व परिवहन मंत्रालयाच प्रियांक भारती यांनी वाहनांना बसवलेले क्रॅश गार्डस काढून टाकण्याचे परिपत्रक काढून सर्व राज्यांना दिले होते. त्यांच्या परिपत्रकामुळे अनेक राज्यात वाहनांना बसविलेले सेफ्टी गार्ड काढण्याची कारवाई सुरू केली होती. यावर असोसिएशनने कोर्टात धाव घेतली. याबाबतीतची पहिली सुनावणी दि 12 मार्च 2018 ला झाली. या सुनावणीदरम्यान कोणत्या कायद्याच्या आधारे हि बंदी आणली असा प्रश्न कोर्टाने विचारला. यावर रस्ते वाहतूक रस्ते आणि महामार्ग मंत्रालयाने मोटर व्हेईकल सेक्शन 110 अंतर्गत कायदा बनवून बंदी आणू शकतो. असे उत्तर दिले. यावर कोर्टाने ताशेरे ओढत 2 पाने अहवाल सादर करण्याचा आदेश दिला. 20 ऑगस्ट 2018 पर्यंत स्थगिती दिली आहे. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश गीता मित्तल व सी. हरिशंकर यांनी या खटल्याचा निकाल दिला.
कोल्हटकर पुढे म्हणाले कि, प्रवासी आणि पादचारी यांची आम्हालाही काळजी आहे. केवळ आमचे उत्पादन विकून मोकळे होणार नाही तर वाहनाचे सौंदर्य व मानवी सुरक्षा या दोन्ही बाबी लक्षात घेवून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सुरक्षित असे सेफ्टी गार्डची निर्मिती करण्यावर आमचा भर आहे. या निर्णयामुळे उद्योजक व नागरीकांना एक दिलासा मिळाला आहे. हे सेफ्टी गार्ड बनवणे, विकणे आणि वाहनांना लावण्यावर आता बंदी नसल्याचेही कोल्हटकर यांनी पत्रात म्हटले आहे.
व्हिएस न्यूज - येथील ओटास्कीममध्ये बेकायदेशीर जमाव जमवून एका तरुणाला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. याप्रकरणी 15 ते 17 जणांच्या टोळक्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भरत थोरात (वय 25, रा. निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार फिरोज डंके, हैदर शेख, संदीप खैरनार, शमीम शेख (सर्व रा. ओटास्कीम, निगडी) यांच्यासह इतर दहा ते बारा जणांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निगडी ओटास्कीमधील जिवलग सोसायटीसमोर मंगळवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास 15 ते 17 जणांचे टोळके आले. हातात तलवारी, कोयता घेऊन या टोळक्याने थोरात याला शिवीगाळ केली. तसेच, मारहाणा करून जीवे मारण्याची धमकी दिली.
पोलीस उपनिरीक्षक एस. एस. सूर्यवंशी तपास करीत आहेत.
व्हिएस न्यूज - भरधाव वाहनाच्या धडकेत एका युवकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी मध्यरात्री पावणेदोनच्या सुमारास मुंबई-बंगळुरू महामार्गावर बावधान येथील ओंकार ब्रीजजवळ घडली.
निखील बबन आनेराव (वय 25, रा. गणपतीमंदिरा शेजारी, बालेवाडी) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. त्याचे वडील निखील आनेराव (वय 50) यांच्या फिर्यादीनुसार अज्ञात वाहनचालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई-बंगळुरू महामार्गावर बावधानच्या ओंकार ब्रीजजवळ निखीलला अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यात गंभीर जमखी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. धडक देणारा वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाला.
फौजदार एम. के. आबनावे तपास करीत आहेत.
व्हीएस न्यूज - ‘आमदार लक्ष्मण जगताप सोशल फाऊंडेशन यांच्या वतीने दिव्यांगास कृत्रिम हात-पाय (जयपूर फूट) वाटप करण्यात आले. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कार्यालयामध्ये शुक्रवारी दुपारी १ वाजता दिव्यांगास कृत्रिम अवयवयाचा आधार देण्यात आला.
जुनी सांगवी येथील प्रविण जाधव या तरूणास आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते कृत्रिम पाय (जयपूर फूट) वाटप करण्यात आले. तसेच प्रविण यास संजय गांधी योजने अंतर्गत शासनाची पेंशन सुरू करण्यात आली आहे. आमदार लक्ष्मण जगताप सोशल फाऊंडेशनच्या माध्यमातून दहा दिव्यांगांचे हात-पाय याचे मोजमाप घेऊन कृत्रिम हात-पाय (जयपूर फूट) वाटप करण्यात येणार आहे. कोणत्याही दिव्यांग व्यक्तीस मदतीची आवश्यकता असेल तर आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
आमदार जगताप म्हणाले, सामान्य जीवन जगण्यासाठी मनुष्याला निसर्गाने दिलेले सर्वच अवयव हवेत. दुर्दैवाने अनेकांना अपघात किंवा इतर काही कारणांमुळे हात, पाय यासारखे महत्त्वपूर्ण अवयव गमवावे लागतात. मनुष्याचे एक बोट जरी जायबंदी किंवा निकामी झाले, तरी दैनंदिन काम करताना अडचणी येतात. काही लोकांना तर अख्खा हात, पाय किंवा दोन्ही हात व पाय गमवावे लागतात. दिव्यांग व्यक्ती शरीराने अधू असल्या तरी त्या मनाने कुठेही खचलेल्या दिसत नसतात. समाजातील अशा घटकांसाठी काही तरी करावे, या उद्देशाने आमदार लक्ष्मण जगताप ट्रस्ट समाजातील पिडितांना मोफत मदत करत आहे. यावेळी शहर प्रवक्ते अमोल थोरात, स्विकृत सदस्य गोपाळ माळेकर, देविदास पाटिल, प्रमोद ताम्हणकर, अदिती निकम, आकाश वाघमारे आदि उपस्थित होते.
निगडीतील एकाच कुटूंबातील ५ जण ठार
व्हीएस न्यूज - पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर डाळज या ठिकाणी स्कॉर्पिओ गाडीचा अपघात झाल्याने ५ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर दोघेजण जखमी झाले आहेत. हे सर्वजण पिंपरी चिंचवड शहरातील निगडी येथील एकाच कुटूंबातील रहिवासी आहेत.
सोलापूरहून पिंपरीला येत असलेली स्कॉर्पिओ (क्रमांक एम.एच. २० एजी ०९३९) या गाडीचा टायर फुटला. त्यामुळे ही गाडी उलटून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला गेली. रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने येणाऱ्या गाडीने या स्कॉर्पिओला उडवले. या भीषण अपघातामुळे ५ जण जागीच ठार झाले आहेत. तर २ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमी झालेल्या दोघांना भिगवण येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास हा अपघात झाला. मृतांमध्ये दोन महिला, दोन पुरुष आणि एका लहान मुलाचा समावेश आहे असेही समजते आहे.
प्रकाश रामचंद्र गायकवाड (वय ६७), सुनिता प्रकाश गायकवाड (वय ५८), संदीप प्रकाश गायकवाड (वय ४०), शितल संदीप गायकवाड (वय ३२), आभिराज संदीप गायकवाड (वय ५) असे मृतांची नावे असून हे सगळे जण नाना-नानी पार्क यमुनानगर निगडी येथील रहिवासी होते.
व्हीएस न्यूज - यंदा चांगले पाऊसमान होणार असल्याच्या हवामान खात्याच्या अंदाजानंतर आता आणखी एक सांगावा आला आहे. मान्सून अंदमानमध्ये २३ मेपर्यंत, तर केरळ किनारपट्टीवर २९ मे रोजी धडकणार आहे. त्यामुळे तो महाराष्ट्रात दोन दिवस आधी ५ जूनपर्यंत दाखल होण्याची चिन्हे आहेत.
काही दिवसांपूर्वीच स्कायमेट संस्थेने मान्सून २८ मे रोजी केरळात दाखल होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला होता. त्यानंतर, शुक्रवारी हवामान विभागाने २९ मे रोजी मान्सून दाखल होत असल्याचे जाहीर केले. मान्सून दरवर्षी १ जून रोजी केरळमध्ये दाखल होतो. अंदमानमध्ये मान्सूनचे २० मे रोजी होते. या वर्षी २३ मेपर्यंत मात्र अंदमान व दक्षिणपूर्व बंगालच्या उपसागर या भागांत मान्सून
दाखल होईल. त्यानंतर, अपेक्षित स्थिती कायम राहिल्यास पुढील सहा दिवसांमध्ये केरळच्या किनारपट्टीवर सरी बरसतील. त्यानंतर, महाराष्ट्रात सुखसरींचा वर्षाव सुरू होईल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे.
केरळात साधारणपणे १ जून आणि महाराष्ट्रात ७ जून रोजी मान्सून दाखल होतो. यंदा केरळात २९ मे रोजी दाखल होणार असल्याने महाराष्ट्रातही दोन दिवस आधी येऊ शकतो,असे हवामान विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
सामाजिक सुरक्षा विभागाची कारवाई
व्हिएस न्यूज - स्पा मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय करणाऱ्या चिंचवडगावातील 'स्पा ग्लो' या सेंटरवर सामाजिक सुरक्षा विभाग व गुन्हे शाखेने छापा टाकून तीन मुलींची सुटका केली. स्पा मालकाला गजाआड केले.
अविनाश देवीदास जोगदंड असे अटक केलेल्या मसाज चालकाचे नाव आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंचडगावातील स. नं. 799/6 येथील गावडे बिल्डींगमध्ये आरोपी जोगदंड हा 'स्पा ग्लो' नावाने मसाज सेंटर चालवत होता. या पार्लरमध्ये ठेवलेल्या थेरपीस्ट मुलींकडून आरोपी जोगदंड वेश्या व्यवसाय करून घेत असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली होती. याची खात्री करून पोलीसांनी शुक्रवारी मसाज सेंटरवर छापा टाकला. छाप्यात एक नेपाळी व दोन पुणे शहरातील अशा तीन मुलींची सुटका केली. तसेच मसाज सेंटरमधून 5500 रूपयांची रोकड, 2 मोबाईल, लिव्ह ऍड लायसन्स करारनामा, बॅकेचे धनादेश आदी साहित्य जप्त केले.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव, प्रमोद म्हेत्रे, नितीन तरटे, रमेश लोहकरे, राजेश उंबरे, नितीन लोंढे, कविता नलावडे, ननिता येळे, सुप्रिया शेवाळे, रूपाली चांदगुडे, चिंचवड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे आदींच्या पथकाने केली.
व्हिएस न्यूज - निकृष्ठ दर्जाचे खाद्यपदार्थ, प्रचंड घाणिचे साम्राज्य अशा इतर अनेक कारणास्तव खडकी येथिल सागर बेकरीस खडकी कॅंन्टोन्मेंट बोर्डाच्या वतिने बुधवारी नोटीस बजावण्यात आली. वैद्यकीय अधिकारी कर्नल कुशवाह व कॅंन्टोन्मेंट बोर्डाचे आरोग्य निरिक्षक कलावंत पवार, मुकादम नासिर व त्यांच्या पथकाने बुधवारी महात्मा गांधी रोड येथिल सागर बेकरीची पुनश्च पाहणी केली असता बेकरीमध्ये मोठ्या प्रमाणात चिखल व घाणीचे साम्राज्य आढळुण आले. या व्यतिरीक्त उंदीर घुशींचा वावर ही निदर्शनास आला. कामगार ही अस्वच्छ स्वरुपात कामे करताना आढळुण आले. बेकरीतील माल व वस्तुंवर माल बनविलेली तारीखेचा उल्लेख ही निदर्शनास आले नाही. अशा प्रकारे बेकरी मालकाकडुन आवश्यक त्यासर्व नियमांकडे जाणुन बुजुन दुर्लक्ष केले जात असल्याने कॅंन्टोन्मेंटच्या वतिने बेकरीचे मालक अब्दुल सलाम अन्सारी यांना अंतिम नोटीस बजावण्यात आली.
यावेळी निकृष्ठ दर्ज्याच्या खाद्य पदार्थांची विल्हेवाट लावण्यात आली. सात दिवसात बेकरीत आढळुण आलेल्या अस्वच्छता घाण तसेच इतर त्रुटीबाबत कायदे व नियमांचे पालन न केल्यास बोर्ड प्रशासनाच्या कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा बोर्ड प्रशासनाने या नोटीसी अंतर्गत बेकरी मालक अन्सारी यांना देण्यात आला आहे. बेकरी मालक अन्सारी यांना यापुर्वी ऑक्टोबर 2016 व दि. 28 नोव्हेंबर 2017 रोजी याप्रकरणी दोनदा नोटीस बजावण्यात आली होती.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002