व्हीएस न्यूज - कर्नाटकातील म्हैसूर येथील राजघराण्यांच्या नवीन वारसाचे नाव आद्यवीर असे ठेवण्यात आले आहे. म्हैसूरच्या राजघराण्यात अशाप्रकारे बारसे होण्याचा हा 65वर्षानंतरचा पहिलाच प्रसंग होता.
रविवारी म्हैसूर येथील राजमहालात झालेल्या एका साध्या कार्यक्रमात हा नामकरण विधी पार पडला. राजे यदुवीर आणि राजकुमारी त्रिशिका कुमारी यांच्या या बाळाचे नाव आद्यवीर नरसिंह वाडियार असे ठेवण्यात आले आहे. यावेळी शाही दाम्पत्याने साधेसेच कपडे घातले होते, तर बारशाचा हा कार्यक्रम फक्त राजघराण्याच्या सदस्यांपुरताच मर्यादित होता. मात्र यावेळी राजमहालाची फुलांनी सजावट करण्यात आली होती.
यापूर्वी श्रीकांतदत्त नरसिंह वाडियार यांचा नामकरण विधी 20 फेब्रुवारी 1953 रोजी झाला होता. म्हैसूरच्या गादीवर बसणाऱ्या वाडियार घराण्याच्या राजांना निःसंतान असल्याचे सांगितले जाते. या राजघराण्याला आणि त्यांच्या वारशांना घटनात्मक किंवा कायदेशीर महत्त्व नाही. मात्र कर्नाटकातील बहुतांश लोक त्यांच्याकडे आदराने पाहतात. या राजघराण्याकडे एका अंदाजानुसार 10 हजार कोटींची संपत्ती आहे. म्हैसूरचे सध्याचे राजे यदुवीर कृष्णदत्त चामराज वाडियार यांची पत्नी त्रिशिका कुमारी यांनी 6 डिसेंबर रोजी बाळाला जन्म दिला होता. यदुवीर आणि त्रिशिका यांचे लग्न जून 2016 साली झाले होते. वाडियार घराण्याच्या राजांना निःसंतान असल्याचा शाप असल्याचे मानले जाते आणि आद्यवीर हा या घराण्यात 400 वर्षांनी जन्मलेला पहिला वारस आहे.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002