व्हीएस न्यूज - नारायण राणे यांना मंत्रिपदी स्थान दिले जाऊ नये म्हणून शिवसेना प्रयत्न करत आहे. शिवसेना संपत चालली असल्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी सांगितले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेनेचे पालकमंत्री, खासदार व आमदाराने साडेतीन वर्षांत विकासासाठी काहीच केले नसल्याची टीका केली. सुंदरवाडी महोत्सवाच्या सांगता समारंभात महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष नारायण राणे बोलत होते. या वेळी व्यासपीठावर माजी खासदार नीलेश राणे, जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. रेश्मा सावंत, सौ. नीलम राणे, आयोजक संजू परब, दत्ता सामंत, सभापती रवींद्र मडगांवकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
सिंधुदुर्गच्या सर्वागीण विकासासाठी मी सन १९९० पासून सतत प्रयत्न करत आहे. रस्ते, पाणी व विजेसोबतच जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करत असल्याचे राणे म्हणाले. मी सी वर्ल्ड, रेडी बंदर, आडाळी एमआयडीसीसारखे अनेक प्रकल्प आणले, पण पालकमंत्री, खासदार व आमदाराने साडेतीन वर्षांत पुढचे पाऊल टाकलेच नाही. विमानतळदेखील रखडून ठेवला असे नारायण राणे म्हणाले.
सुंदरवाडी महोत्सवास आलेल्या कलाकारांच्या हॉटेलमध्ये पोलीस तपासणीच्या नावाखाली मध्यरात्रौ गृहराज्यमंत्री केसरकर यांच्या आदेशाने कलाकारांची तपासणी करण्यात आली. मुख्यमंत्र्यांकडे याबाबत थेट तक्रार करणार असून पालकमंत्री व पोलिसांना सोडणार नसल्याचा इशारा नारायण राणे यांनी दिला. पालकमंत्री कपटी आहे. त्यामुळे महोत्सवासाठी आलेल्या कलाकारांची हॉटेलवर मध्यरात्रौ तपासणी करून कलाकार व त्यांच्या कुटुंबीयांचा अवमान केला आहे. त्यांनी सत्तेचा दुरुपयोग केला असून सन २०१९ च्या निवडणुकीतून पालकमंत्र्यांना पळवून लावणार असा इशारा माजी खासदार नीलेश राणे यांनी दिला.
सुंदरवाडी महोत्सवात गायिका वैशाली सामंत, गायक आदर्श शिंदे, राहुल सक्सेना यांनी उपस्थितांना बहारदार कार्यक्रमाने मंत्रमुग्ध केले. या तीन दिवसांच्या महोत्सवात कलाकारांनी सुंदरवाडी महोत्सवात प्रेक्षकांना बहारदार गाण्यांनी खिळवून ठेवले. सुंदरवाडी महोत्सवाचे आयोजन स्वाभिमान पक्षाचे तालुका अध्यक्ष संजू परब यांनी प्रास्ताविक व स्वागत केले.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002