व्हीएस न्यूज - होळीच्या पूर्वसंध्येला बिहारमध्ये काँग्रेसला मोठा झटका बसला असून पक्षाच्या माजी प्रदेशाध्यक्षांसहीत चार आमदारांनी संयुक्त जनता दलात(जदयू) प्रवेश केला आहे. पक्षांतर करणारे सर्व आमदार विधान परिषदेचे सदस्य आहेत.
माजी प्रदेशाध्यक्ष डॉ अशोक चौधरी यांच्यासहीत दिलीप चौधरी, रामचंद्र भारती आणि तनवीर अख्तर या आमदारांनी जदयू प्रवेश केला आहे. अशोक चौधरी यांनी काल रात्री उशिरा आपल्या सरकारी निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन या निर्णयाची माहिती दिली. यावेळी अशोक चौधरी म्हणाले, “मी अध्यक्षपद हाती घेतल्यानंतर बिहारमध्ये काँग्रेसला उभे केले. चार आमदार असलेल्या पक्षाला 27आमदारांपर्यंत आणले. विधान परिषदेत काँग्रेसचे सहा सदस्य झाले. परंतु मला कशी वागणूक दिली, हे सर्वांना माहीत आहे. माझ्यावर खोटे आरोप करण्यात आले, त्यामुळे पक्ष सोडण्यावाचून माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता.”
मी आणि अन्य तीन आमदार जदयूची सदस्यता घेणार आहोत. या संबंधात मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याशी माझे बोलणे झाले आहे. विधान परिषदेत स्वतंत्र गट स्थापन करण्यासाठी अर्ज दिला आहे,अशी माहितीही त्यांनी दिली. तसेच आणखी अनेक जण काँग्रेस सोडण्यास तयार असल्याचेही ते म्हणाले. दरम्यान काँग्रेसचे प्रभारी बिहार अध्यक्ष कादरी यांनी चौधरी व अन्य तीन नेत्यांना पक्षातून निलंबित करण्याची घोषणा केली आहे.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002