व्हीएस न्युज - आयएएसच्या परीक्षेची तयारी करणारा तरुण 100 क्रमांकावर अखेरचा कॉल करुन, पुण्यातून बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी चतु:श्रुंगी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली असून, पुणे पोलिसांसह मुंबई पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
रिजॉय जयराजन पन्थोकुलोथू असं तरुणाचं नाव असून, तो गेल्या चार महिन्यांपासून बेपत्ता आहे. मूळचा केरळचा रहिवासी असलेला 27 वर्षीय रिजॉय बीएससी झाला आहे. रिजॉय आयएएस परीक्षेची तयारी करत होता.
लग्नानंतर रिजॉय पुण्यात पत्नीसोबत राहत होता. मात्र,लग्नाच्या सहा महिन्यांतच त्यांनी परस्पर सहमतीने घटस्फोटासाठी अर्ज केला. मात्र तेव्हापासून तो तणावात होता. त्याचा भाऊ झिनॉयही पुण्यात राहतो. तो पुण्याच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत नोकरीला आहे.
15 नोव्हेंबर रोजी भावाचा रिजॉयसोबत संपर्क झाला. त्याने त्याला नाश्ता करण्यासाठी घरी बोलावलं. रात्रीचं जेवण सोबत करु, असं सांगून रिजॉयने फोन ठेवला. वडिलांसोबतही त्याचं बोलणं झालं. जेवणासाठी रात्री उशिरापर्यंत रिजॉय घरी न आल्याने, त्याच्या भावाने शोधाशोध केली. अखेर भावाने चतु:श्रुंगी पोलिस ठाण्यात रिजॉय बेपत्ता झाल्याची तक्रार दिली.
झिनॉयने ‘एबीपी माझा’ला दिलेल्या माहितीनुसार, पुणे सायबर पोलिसही या प्रकरणाचा तपास करत होते. त्यांच्या तपासात रिजॉयने अंधेरीतून 100 क्रमांकावर अखेरचा कॉल केला. तो कॉल 40 सेकंद सुरु होता. मात्र, त्यानंतर तो नॉट रिचेबल झाला. त्यामुळे रिजॉयला शोधण्याचं आव्हान मुंबई आणि पुणे पोलिसांसमोर आहे.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002