व्हीएस न्यूज - महाराष्ट्र सरकारने लागू केलेल्या प्लास्टिक पिशव्यांच्या बंदीला पिंपरी-चिंचवड पॅकींग असोसिएशनच्या वतीने विरोध दर्शवण्यात आला आहे. प्लास्टिक पिशव्यांना सक्षम पर्याय मिळेपर्यंत बंदी मागे घ्यावी, या मागणीसाठी मागील पाच दिवसांपासून धरणे आंदोलन सुरु केले आहे.
दिवसें-दिवस उन्हाचा पारा चढत असताना तळपत्या उन्हात रिव्हर रोड येथे 25 मार्चपासून संघटनेने बेमुदत धरणे आंदोलन सुरु केले आहे. संघटनेचे अध्यक्ष सावल तोतानी,उपाध्यक्ष धीरज ठक्कर, राकेश लखोटीया, महेश दोलवानी, लालचंद गेलरानी, मोहन कुकरेजा, गोपी पावलानी, दीपक अगरवाल, शशी बजाज, इंदू वासवानी, रमेश कुकरेजा, आकाश गेलरानी, गौरव तोतानी, मनोज सत्करतार आदींनी आंदोलनात सहभाग घेतला आहे.
अधिक माहिती देताना सावल तोतानी म्हणाले की, राज्य सरकारने गुढीपाडव्यापासून प्लास्टिक पिशव्यांवर बंदी आणली आहे. त्याचा फटका सुमारे 20 लाखाहून उत्पादक,व्यापारी, कामगार वर्गाला बसला आहे. पिंपरी-चिंचवडसह पुणे, मुंबई, उल्हासनगर, औरंगाबाद, नागपूर आदी शहरांमधील पॅकींग उद्योजक आपला उद्योग बंद करुन आंदोलनात उतरले आहेत. आजची बाजारपेठ प्लाटिकच्या वस्तुंवर अवलंबून आहे. मात्र बंदीमुळे अनंत अडचणींचा सामना प्लास्टिक उद्योगाला करावा लागत आहे.
प्लास्टिक बंदीमुळे उत्पादक, कामगार तसेच त्यावर अवलंबून असलेले व्यापारी यांच्यावर बेरोजगारी ओढावली आहे. प्लास्टिक बंदीमुळे किराणा दुकाने, मिठाई दुकाने,रेस्टॉरंटस्, खाद्य अन्नावर होणारी प्रक्रिया, शॉपिंग मॉल, स्टेशनरी अशा विविध क्षेत्रांवर परिणाम झाला आहे. प्लास्टिक वस्तू विक्री करणारे व्यापारी सुद्धा या व्यवसायावर अवलंबून असून त्यांचाही रोजगार हिरावला गेला आहे. पर्यावरण रक्षणासाठी प्लास्टिक उत्पादक, व्यापारी कटीबध्द आहेत. पर्यावरणाची हानी होणार नाही. याची दक्षता आम्ही घेतच असतो. मात्र, ठोस पर्याय अथवा कोणालाही विश्वासात न देता प्लास्टिक बंदी जाहीर करण्याची सरकारची घाई अन्यायकारक आहे. लाखो उत्पादन, व्यापारी, कामगारांवर बेकारी ओढावली असून प्लास्टिक उत्पादन ठप्प झाले आहे. सरकारने प्लास्टिकला सरसकट बंदी लावण्याबद्दल फेरविचार करावा. अन्यथा 1 एप्रिलपासून आंदोलन तीव्र करावे लागेल, असा इशारा पिंपरी-चिंचवड पॅकींग असोसिएशनच्या वतीने देण्यात आला आहे.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002