व्हीएस न्यूज - फेसबुक आणि ट्विटर यांसारख्या सोशल मीडिया संकेतस्थळांवर वेळ वाया घालविणाऱ्या विद्यार्थ्यांना आळा बसावा, यासाठी सोशल मीडियावर निर्बंध आणण्याचा विचार बांगलादेश सरकार करत आहे. हे अॅप म्हणजे डिजिटल अफू असल्याचे सरकारचे म्हणणे आहे.
“फेसबुक व यासारख्या अॅपवर कोट्यवधी विद्यार्थी वेळ वाया घालवतात. त्यामुळे त्यांचे लक्ष विचलित होते. याचा परिणाम त्यांच्या सामाजिक व शैक्षणिक जीवनावर होत आहे,” असे बांगलादेश टेलिकम्युनिकेशन अँड रेग्युलेटरी कमिशनचे अध्यक्ष शाहजहान महमूद यांनी एएफपी वृत्तसंस्थेला सांगितले.
या संदर्भात उचलण्यात येणाऱ्या पावलांबाबत विचारले असता महमूद म्हणाले, की सोशल मीडिया अॅपसाठीचे शुल्क वाढविण्यावर विचार सुरू आहे. याची अंमलबजावणी कशी करायची, याचा सूक्ष्मपातळीवर विचार सुरू आहे. शैक्षणिक व बौद्धिक लाभाच्या संकेतस्थळांवर याचा परिणाम होता कामा नये, असे ते म्हणाले. सध्या हा प्रस्ताव बंधन आणणारा वाटत असला तरी दीर्घकालीन दृष्टीने तो विद्यार्थी व देशाच्या दृष्टीने फायद्याचा ठरणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. गेल्याच महिन्यात बांगलादेशमध्ये 3जी ऐवजी 4जी सेवा सुरू करण्यात आली होती.