एनडीएच्या खासदारांनी २३ दिवसांच्या पगारावर सोडले पाणी
नवी दिल्ली
2018-04-05
व्हीएसन्यूज – सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संसदेच्या अधिवेशनात होत असलेल्या गोंधळावरुन जुंपली असून विविध मुद्यांवरुन संसदेच्या अधिवेशनात मोठा गदारोळ झाला. संसदेचे त्यामुळे कामकाज होऊ न शकल्यामुळे २३ दिवसांचे वेतन न स्वीकारण्याचा निर्णय राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) खासदारांनी घेतला असल्याची माहिती संसदीय कामकाज मंत्री अनंत कुमार यांनी दिली आहे.
संसदेच्या अधिवेशनाचा अमूल्य वेळ गदारोळामुळे कामकाज होऊ न शकल्याने वाया गेला. कॅबिनेटच्या बैठकीतही याचे पडसाद पाहायला मिळाले. बहुतांश खासदारांनी या बैठकीत वेतन न स्वीकारण्याची भूमिका मांडल्यामुळे जनतेमध्ये चांगला संदेश जाईल, असे मत अनेक खासदारांनी मांडले. संसदेचे कामकाज विरोधकांमुळेच होऊ शकले नाही, असा संदेश लोकांपर्यंत जावा, असा भाजपचा प्रयत्न आहे. यासोबतच संसदेच्या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ एनडीएचे खासदार निदर्शनेदेखील करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.