व्हीएस न्यूज - देशातील पहिला द्रुतगती मार्ग ठरलेल्या पुणे-मुंबई एक्सप्रेस वेचे शिल्पकार नितीन गडकरी यांनी आणखी एका द्रुतगती मार्गाचे शिवधनुष्य पेलण्याचे ठरविले आहे. देशाची राजधानी दिल्ली व राज्याची राजधानी मुंबई यातील अंतर तब्बल 106 किलोमीटरने कमी करणारा एक्सप्रेस वे बांधणार असल्याचे गडकरी यांनी जाहीर केले आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक, जहाज, जल संसाधन, नदीविकास आणि गंगा पुनरुत्थान मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी नवी दिल्लीत ही घोषणा केली. दिल्ली आणि मुंबईच्या मेट्रो शहरांना जोडण्यासाठी या एक्स्प्रेसवेची आवश्यकता आहे. या दोन राजधान्यांमध्ये सहा लेनचा एक्स्प्रेस वे बांधणार असून यांमुळे दोन महानगरांमधील वाहतूक सुकर होईल. तसेच या शहरांमधील अंतर सुमारे 106 किलोमीटरने कमी होईल, असेही ते म्हणाले. हा महामार्ग अविकसित, मागास आणि आदिवासी भागांना जोडण्यात येणार असून त्यामुळे या भागांचा विकास सहजपणे करता येईल. या एक्सप्रेस वेचे हे सर्वात मोठे वैशिष्ट्य असेल, असेही ते म्हणाले.