व्हीएस न्यूज – पिंपरी चिंचवड ग्रामीण भागातून निर्माण झालेली नगरी असून या नगरीने लोककलेला नेहमीच दाद दिली आहे, असे मत सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी व्यक्त केले. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पिंपरी चिंचवड शाखा व लोकरंग सांस्कृतिक कलामंच यांच्या वतीने आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या तिस-या अखिल भारतीय मराठी लोककला संमेलनाचे उदघाटन त्यांच्या हस्ते झाले त्यावेळी बोलत होते. यावेळी संमेलनाचे अध्यक्ष डॉ. रामचंद्र देखणे, कार्यक्रमाचे अध्यक्ष महापौर नितीन काळजे, मुख्य निमंत्रक आमदार लक्ष्मण जगताप, स्वागताध्यक्ष भाऊसाहेब भोईर, उपमहापौर शैलजा मोरे, स्थायी समिती सभापती ममता गायकवाड, नगरसद्स्या अनुराधा गोरखे, शर्मिला बाबर, आयुक्त श्रावण हर्डीकर, राही भिडे, प्रकाश खांडके, प्रविण गोळे, कार्यकारी अभियंता प्रविण तुपे आदी मान्यवर उपस्थित होते. राज्यपाल श्रीनिवास पाटील म्हणाले , साधी माणसं हे या शहराचा वैशिष्ठ आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका आपल्या वाढलेल्या उत्पनाचा उपयोग सामान्यांसाठी करत आहे हे पाहून आनंद होत आहे. बालगंधर्व व शाहीर पठ्ठे बापूराव हे महाराष्ट्राला पडलेलं सुंदर स्वप्न होतं. असेही ते म्हणाले. संमेलनाध्यक्ष डॉ. रामचंद्र देखणे म्हणाले, पिंपरी चिंचवड लाखो वारक-यांच्या दिंड्यांनी पावन झालेली भूमि आहे. लोककलाकार शरीराने जरी मनोरंजन करत असले तरी मनाने ते प्रबोधन करत असतात. लोककलांच्या संवर्धनासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. लोककलांसाठी स्वतंत्र विद्यापीठ उभे केले पाहिजे. हे संमेलन पठ्ठे बापूरावांच्या नावाने भरवल्याचा आनंद होत आहे. पठ्ठे बापुरावांनी तमाशाला वेगळी ओळख मिळवून दिली. असेही ते म्हणाले. महापौर नितीन काळजे भाषणात म्हणाले, मनपाच्या वतीने लोककला जिवंत ठेवण्यासाठी नेहमीच प्रयत्न केले जातात. चांगले कलाकार या शहरात घडावे याकरिता मनपाच्या वतीने नेहमीच व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाते, विविध स्पर्धा आयोजित करण्यात येतात. स्वागताध्यक्ष भाऊसाहेब भोईर म्हणाले, लोककलेतील सर्व घटकांचा अभ्यास असलेले व्यक्तिमत्व उदघाटक व अध्यक्ष म्हणून आजच्या संमेलनाला लाभले आहेत. पिंपरी चिंचवड शहरात देशाच्या सर्व भागातून आलेले नागरिक आपापली संस्कृती, परंपरा व लोककला घेऊन येथे आले. त्यामुळे शहरात देशातील विविध सण, समारंभ व लोककला अनुभवायला मिळतात, असेही ते म्हणाले. यावेळी जेष्ठ अभिनेत्री लीलाताई गांधी यांना जीवनगौरव व प्रभाकर मांडे यांना लोककला साहित्य गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच वसंत अवसरीकर, संजीवनी मुळे, पुरषोत्तम महाराज पाटील, बापूराव भोसले, मुरलीधर सुपेकर, सोपानजी खुडे, प्रतिक लोखंडे आदींना देखील सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमापूर्वी शहरातून निघालेल्या महाराष्ट्राच्या विविध लोककलांचे दर्शन घडवणा-या दिंडीला नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नाना शिवले यांनी केले तर आभार प्रशांत खांडके यांनी मानले.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002