व्हीएस न्यूज - विधान परिषदेच्या सहा जागांसाठी स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांत होणाऱ्या निवडणुकीत आता भाजप-शिवसेना युती विरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी अशी थेट लढत होणार आहे. भाजपचे विद्यमान आमदार व राज्यमंत्री प्रवीण पोटे यांचा अपवाद वगळता अन्य पाच आमदारांना घरी बसवून नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.
विधान परिषदेत सध्या राष्ट्रवादी व काँग्रेसचे वर्चस्व आहे. सत्ताधारी भाजपसाठी तीच मोठी राजकीय अडचण आहे. त्यामुळे भाजपला आपले संख्याबळ वाढविण्यासाठी आणि काँग्रेस-राष्ट्रवादीला आपले वर्चस्व कायम राखण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची ठरणार आहे. विधान परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत जाधव, अनिल तटकरे व बाबाजानी दुर्राणी यांची मुदत संपत आहे. जाधव, अनिल तटकरे यांच्या जागी राष्ट्रवादीने नवीन उमेदवार दिले आहेत.
परभणी मतदारसंघ काँग्रेसकडे गेल्यामुळे त्या मतदारसंघातील आमदार दुर्राणी यांना निवडणूक रिंगणाच्या बाहेर राहावे लागले. काँग्रेसकडे लातूर-उस्मानाबाद-बीड हा एक मतदारसंघ होता. काँग्रेसचे आमदार दिलीप देशमुख यांची मुदत संपत आहे. मात्र लातूर मतदारसंघ राष्ट्रवादीला देण्यात आल्यामुळे आणि देशमुख यांनीही निवडणूक लढवायची नाही असे ठरविल्यामुळे राष्ट्रवादीने भाजपमधून पक्षात आलेल्या कार्यकर्त्यांला मैदानात उतरवले आहे. भाजपचे प्रवीण पोटे व मितेश भांगडिया हे दोन आमदार निवृत्त होत आहेत. त्यापैकी राज्यमंत्री पोटे यांना अमरावतीमधून पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. तर वर्धा-चंद्रपूर-गडचिरोलीधून भांगडिया यांचा पत्ता कापून त्यांच्या जागी रामदास आंबटकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजप-शिवसेना यांच्यामध्ये अघोषित युती झाली आहे. त्यानुसार भाजप तीन व शिवसेना तीन जागा लढवीत आहे.
विधान परिषद निवडणुकीत युती नाही…
विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेने कोणत्याही पक्षाबरोबर युती केलेली नाही. शिवसेनेचा विजय होण्याची शक्यता असलेल्या जागा लढविण्यात येतील. गोंदियामधील शिवसैनिकांनी अलीकडेच भेट घेतली होती, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002