व्हिएस न्युज - आळंदी ते पंढरपूर पायी दिंडीत चाललेल्या दोन वारकरी महिलांना एका अज्ञात टेम्पोचालकाने धडक दिली. या अपघातात दोन्ही महिलांचा मृत्यू झाला. याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलिसांनी शिताफीने तपास करत टेम्पोचालकाला अटक केली. पांडुरंग बबन पनमंद (वय ४२, रा. सैराज कॉम्प्लेक्स, राजगुरूनगर, ता. खेड) असे अटक करण्यात आलेल्या टेम्पोचालकाचे नाव आहे. जनाबाई अनंता साबळे (वय ५५) आणि सुमनबाई वैजनाथ इंगोले (वय ६०, दोघी रा. परळी वैजनाथ, बीड) अशी अपघातात मृत्यू झालेल्या वारकरी महिलांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जनाबाई आणि सुमनबाई अंबाजोगाईमधील एका दिंडीत अंबाजोगाई ते आळंदी आणि आळंदी ते पंढरपूर या पायी दिंडीत निघाल्या होत्या. ४ जुलै रोजी दिंडी मोशी येथील हॉटेल अथर्वसमोर मुक्कामाला थांबली होती. पहाटे साडेपाचच्या सुमारास प्रातःविधीसाठी जात असताना अज्ञात टेम्पोने त्यांना धडक दिली. या धडकेत त्या गंभीर जखमी झाल्या. यामध्ये दोघींचाही मृत्यू झाला. याप्रकरणी अज्ञात टेम्पोचालकाविरोधात एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
प्रत्यक्षदर्शी कोणीही नसल्याने या प्रकरणाचा तपास करणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. या प्रकरणाचा तपास करत पोलीस उपनिरीक्षक ईश्वर जगदाळे आणि पोलीस शिपाई सुहास जगताप यांनी मोशी, कुरळी, चाकण भागातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. त्यामध्ये त्यांनी एकूण २०६ वाहनांची तपासणी करून गुन्ह्यातील टेम्पोचा शोध घेतला. टेम्पोचालकाला अटक करण्यात आली आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002