व्हीएस न्युज - कामगारांच्या हितासाठी नागरिकांना त्रास न होता वेळप्रसंगी आंदोलने, संप करून व्यवस्थापनाला व सरकारला भूमिका बदलविण्यास भाग पाडणारे कामगार नेते अशी शरद राव यांची ओळख होती. कामगारांच्या भल्यासाठी संघर्ष कधी करायचा आणि कधी थांबवायचा हे राव यांनी देशभरातील कामगार संघटनांना शिकविले. त्यांच्या विधायक दृष्टीकोनामुळेच तळेगावमध्ये कामगार व त्यांच्या मुलामुलींसाठी डॉ. राम मनोहर लोहिया विद्यापीठासारखी प्रशिक्षण संस्था उभी राहिली, हे अभिमानास्पद आहे, असे गौरवोद्गार केंद्रीय माजी मंत्री खासदार शरद पवार यांनी तळेगाव येथे काढले.
शनिवारी दि. 1 सप्टेंबर रोजी दिवंगत कामगार नेते शरद राव यांच्या व्दितीय पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण खा. शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. मुंबई म्युनिसिपल मजदूर युनियन आणि म्युनिसिपल इंजिनिअर्स असोसिएशन यांच्या वतीने तळेगाव दाभाडे येथे डॉ. राम मनोहर लोहिया समाजवादी विद्यापीठात आयोजित केलेल्या या कार्यक्रमात स्वागताध्यक्ष मुंबई म्युनिसीपल इंजिनिअर्स असोसिएशनचे कार्याध्यक्ष नवनाथ घाडगे, हिंद मजदूर सभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष ॲड. महाबळ शेट्टी, माजी खासदार विदुरा (नाना) नवले, आमदार संजय भेगडे, माजी आमदार कृष्णराव भेगडे, मदन बाफना, तळेगाव नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, मुंबई म्युनिसीपल मजदूर युनियनचे सचिव गोविंद कामतेकर, फेडरेशनचे कार्याध्यक्ष शशिकांत (बबन) झिंजुर्डे, नूर अहमद (कलकत्ता), देवेंद्र गौतम (राजस्थान), शंकर साळवी, सुरेश ठाकूर, साईनाथ राजाध्यक्ष, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, मूर्तीकार संदीप मुंढे, निमंत्रक ॲड. सुखदेव काशीद, रमेश मालवीय, वामन कविस्कर, अशोक जाधव, पिंपरी-चिंचवड कर्मचारी महासंघाचे मनोज माछरे, आबा गोरे, संजय कुटे, नितीन समगिर, अंबर चिंचवडे आदींसह राज्यभरातील महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषदांचे कामगार प्रतिनिधी बहुसंख्येने उपस्थित होते.
शरद राव यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करताना खासदार पवार यांनी सांगितले की, 1967 साली मी विधानसभेत पहिल्यांदा निवडून आलो. त्यावेळी कामगार क्षेत्रात जॉर्ज फर्नांडीस यांचे मुंबईमध्ये वर्चस्व होते. खासदारकीच्या निवडणुकीत स. का. पाटील यांचा पराभव शरद राव आणि जॉर्ज फर्नांडीस यांच्या जोडीने केला. हिंदुस्थान लिव्हरमधील कामगार लढ्यापासून जॉर्ज फर्नांडीस यांना खासदार करण्यापर्यंतच्या कार्यकालात शरद राव यांचे नाव पुढे आले. मुंबई देशाची औद्योगिक व आर्थिक राजधानी आहे. तेथे घडणा-या घटनांची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली जाते. बाबरी मस्जिद पडल्यानंतर मुंबई ठप्प झाली होती. पंतप्रधानांनी मला मुंबईत पाठविले, त्यावेळी सरकारी अधिकारी व मुंबई मनपाचे कामगार नेते म्हणून शरद राव यांच्या बरोबर बैठक मी घेतली. मुंबईतील लोकल, बेस्ट आणि आरेची दूध गाडी सुरु झाली तर मुंबई पूर्ववत सुरु होईल, असे मी मत मांडल्यानंतर शरद राव यांनी पुढाकार घेऊन मुंबईतील लोकल व बेस्ट बससेवा पुन्हा सुरु करण्यास पुढाकार घेतला. मुंबईसह 18 राज्यातील, 18 लाखांहून जास्त कामगारांचे, विविध कामगार संघटनांचे नेतृत्व शरद राव यांनी केले. यापूर्वी मी तळेगावात त्यांच्या बरोबर आलो होतो, आता त्यांच्याशिवाय आलो आहे. शरद राव यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सोहळा आहे. मनपा कामगारांना 15 टक्के बोनस देण्याबाबत त्यांची आग्रही भूमिका होती. म्हणूनच मी मनपा कर्मचा-यांना बोनस देऊ शकलो. यापूर्वी महानगरपालिकांचे निर्णय आयुक्त व कामगार प्रतिनिधी यांच्या चर्चेव्दारे सुटत होते. आता महापालिका, नगरपालिकांचे छोटे-मोठे निर्णय मंत्रालयातून घेतले जातात, हे चांगल्या सरकारचे लक्षण नाही. मुंबई म्यूनिसिपल मजदूर युनियनचा गेल्या दोन वर्षांपासून वेतन करार प्रलंबित आहे, याबाबत आपण लवकरच कामगार प्रतिनिधींना बरोबर घेऊन सरकारशी चर्चा करू, असे आश्वासन खा. पवार यांनी दिले. तसेच जॉर्ज फर्नांडीस, बाळासाहेब दंडवते यांच्यानंतर कामगारांचे हित पाहणारा नेता म्हणून शरद राव यांचे नाव भारतीय कामगार इतिहासात नोंदविले जाईल. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी सहा वर्षे आजारपणाशी लढत होते, तसेच अंथरूणाला खिळून असणारे कामगार नेते जॉर्ज फर्नांडीस, जसवंत सिंग यांच्या आजारपणाविषयी मला अस्वस्थता वाटते, असेही खा. पवार म्हणाले.
स्वागताध्यक्ष नवनाथ घाडगे यांनी सांगितले की, एका गरीब कामगाराच्या घरात शरद राव यांचा जन्म झाला होता. त्यामुळे कामगारांच्या वेदनांची जाणीव मनात ठेवुनच त्यांनी कामगार संघटनेचे काम पंचेचाळीस वर्षांहून अधिक काळ केले. कामगारांसाठी लढणारा शरद राव नावाचा हा युगपुरुष कामगार चळवळीच्या मुशीत तावून सुलाखून निघालेले एक रत्न होते. जेंव्हा जेंव्हा कामगार आंदोलनात संभ्रम निर्माण होत असे, तेंव्हा शरद राव हे कामगार चळवळीला नवनिर्माणाच्या मार्गावर घेऊन जायचे. मुंबईसह देशातील एक अभ्यासू कामगार नेते म्हणुन त्यांची लोकप्रियता होती.
ॲड. महाबळ शेट्टी यांनी सांगितले की, शरद राव यांचे दिनांक 1 सप्टेंबर, 2016 रोजी निधन झाले. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून, विशिष्ट ध्येयाने प्रेरित होऊन, महापालिकेतील कामगार, कर्मचारी, अधिकारी, अभियंते, मुंबईसह महाराष्ट्रातील विविध कारखाने - उद्योग - व्यवसायातील कामगार-कर्मचारी, कापड बाजारातील गुमास्ता, कंत्राटी कामगार, फेरीवाले, टॅक्सी-ऑटोरिक्षा चालक-मालक, रोजंदारीत, किरकोळ विक्रेते, छोटे दुकानदार, श्रमजीवी-कष्टकरी, गोर-गरीब आणि सर्वसामान्य नागरीकांना न्याय-हक्क मिळवुन देण्यासाठी आयुष्यभर अहोरात्र झटलेले, प्रामुख्याने बृहन्मुंबई महानगरपालिका कामगार, कर्मचारी, अधिकारी, परिचारिका - परिसेविका-तंत्रज्ञ, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी आणि अभियंत्यांची दैदिप्यमान ऐतिहासिक संघर्ष लढ्याचे भिष्म पितामह विख्यात कामगार नेते दिवंगत शरद राव यांचे चिरंतन स्मारक म्युनिसीपल मजदूर युनियन आणि म्युनिसीपल इंजिनिअर्स असोसिएशनचे नेते ॲड. सुखदेव काशिद आणि नवनाथ घाडगे यांच्या संकल्पनेतून साकार होत आहे. राव यांचे हे स्मारक कामगारांना नेहमीच प्रेरणादायी ठरेल, असेही शेट्टी म्हणाले.
जलतरणपटू शाम शिंदे, मूर्तीकार संदीप मुंढे, महानगरपालिका फेडरेशनचे कार्याध्यक्ष बबन झिंजुर्डे, नाना ओरपे, तळेगाव नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांचा खा. पवार यांच्या हस्ते यावेळी सत्कार करण्यात आला. ॲड. महाबळ शेट्टी, सुखदेव काशीद, चित्रा जगनाडे, नूर अहमद, शंकर शेट्टी आदींनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन ज्योती आंबेकर यांनी केले. अशोक जाधव यांनी आभार मानले.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002