व्हीएस न्युज - पुणे मुंबई महामार्गावरील कासारवाडी येथील डाई-ईची कंपनीचे व्यवस्थापनाने बेकायदा स्थलांतर सुरु केले आहे. आज रोजी (सोमवारी) प्रयोगशाळेसाठी आवश्यक असणारे रसायन गुजरात येथे पाठविण्यासाठी पोलीस बंदोबस्तात या साहित्याचे ट्रक पाठविण्याचा प्रयत्न केला. परंतु इंटकचे जिल्हाध्यक्ष कैलास कदम यांच्या नेतृत्वाखालील सतर्क कामगारांनी हा डाव उधळून लावला. कामगारांची उपासमार थांबवून कंपनी प्रशासनाने त्यांच्याशी चर्चा करून तोडगा काढावा, वेतन करार करून थकबाकी देण्यात यावी, निवृत्त कामगारांनाही त्याचे लाभ मिळावेत, नंतरच कंपनीतून प्रयोगशाळेचे साहित्य पाठविण्यास संमती देऊ, अशी भूमिका कैलास कदम यांनी घेतली. तर आवश्यक रसायनच कंपनीतून पाठवण्यात येत आहे, अशी कंपनी व्यवस्थापनाचे म्हणणे होते. मात्र, सदर वाहनांमध्ये प्रयोगशाळेतील रसायनाबरोबरच काही मशिनरीदेखील या वाहनांमध्ये असल्याचे कामगारांनी बंदोबस्तावरील पोलीस पथकाच्या निदर्शनास आणून दिले. त्यामुळे फक्त रसायनच पाठविणार असाल तरच आम्ही बंदोबस्त देऊ, अन्यथा आम्ही आपणास सहकार्य करू शकणार नाही अशी भूमिका भासेरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विकास देशमुख यांनी घेतली. अखेर कंपनी व्यवसथापनाने कोणताही प्रतिसाद न दिल्यामुळे पोलीस फौजफाटा तेथून निघून गेला.
पुणे मुंबई महामार्गावरील कासारवाडी येथील डाई-ईची कंपनी व्यवस्थापनाने बेकायदा स्थलांतर सुरु केले आहे. याला कंपनीतील कामगारांनी तीव्र विरोध केला असून, शनिवार दि. 25 ऑगस्ट पासून कंपनी प्रवेशव्दारासमोर हिंद कामगार संघटनेच्या (इंटक) वतीने ठिय्या आंदोलन इंटकचे जिल्हा अध्यक्ष कैलास कदम यांच्या नेतृत्वाखाली सुरु करण्यात आले आहे. डाई-ईची करकरिया ही कंपनी पुणे मुंबई महामार्गावर कासारवाडी येथे 54 वर्षापूर्वी सुरु करण्यात आली. या कंपनीत उत्पादनाशी संबंधित शेकडो कामगार काम करीत आहेत. परंतू मागील काही दिवसांपासून कंपनी व्यवस्थापनाने कामगारांना व कामगार संघटनेला पूर्णत: अंधारात ठेवून अचानकपणे कंपनी गुजरात येथे स्थलांतरीत करण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी कंपनीतील मशिनरी काढून गुजरातकडे रवाना करण्यात येत आहेत. कामगारांना देशोधडीला लावणारा हा निर्णय कंपनी व्यवस्थापनाने कामगार संघटना, राज्य सरकार, उद्योग मंत्रालय, श्रम मंत्रालय यांना सर्वांना अंधारात ठेवून घेतला आहे. याच्या विरोधात हिंद कामगार संघटनेने माननीय न्यायालयाकडून स्थगिती आदेश मिळविला आहे. असे असूनही कंपनी व्यवस्थापनाने सोमवारी प्रयोगशाळेसाठी लागणारे आवश्यक साहित्य गुजरात येथे पाठविण्याची तयारी केली होती. त्यासाठी पोलीस बंदोबस्त मागवण्यात आला. यावेळी उपस्थित कामगार, त्यांचे कुटुंबियांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त करून कंपनीतील वाहने बाहेर पाठविण्यास विरोध केला.
यावेळी कंपनीचे संचालक डॉ. संजय पुरव यांनी मशिनरी बाहेर पाठविली जात नसून केवळ रसायन पाठविण्यात येणार आहे, कोणत्याही कामगाराला कामावरून कमी केले जाणार नाही, चर्चेने कामगारांचे प्रश्न सोडविले जातील, असे आश्वासन दिले. मात्र, 11 वर्षांपासून आमचा शांततेच्या मार्गाने लढा सुरू आहे. व्यवस्थापनाने कामगारांचे मूलभूत अधिकार हिरावून घेतले आहेत. सर्वोच्च न्यायालयानेदेखील कासारवाडीस्थीत कंपनीतून मशिनरी अन्यत्र स्थलांतरीत करण्यास मज्जाव केला आहे, याची आठवण कदम यांनी करून दिली. तसेच न्यायालयाची प्रत उपस्थित पोलीस अधिकारी, कंपनी व्यवस्थापनास दिली. यावर आम्ही संघटनेच्या व्यक्तिंशी चर्चा करणार नाही, अशी भूमिका व्यवस्थापनाने घेतली. त्यावर कंपनीत कार्यरत असलेले कर्मचारी, निवृत्त कर्मचारी यांची समिती तयार केली आहे, ते आपल्याकडे मागण्या मांडतील, त्यावर चर्चा करावी, नंतरच कंपनीतून संबंधित वाहने साडावीत अशी मागणी कदम यांनी केली. परंतु कंपनी व्यवस्थापनाकडून निर्णायक प्रतिसाद मिळाला नाही.
कंपनी व्यवस्थापनाने यापूर्वीच कोणतीही लेखी सूचना न देता कामगारांची बस आणि कॅन्टिन सुविधा बंद केली आहे. शासकीय सुट्टीच्या दिवशी रात्री अपरात्री कामगारांच्या डोळ्यात धूळफेक करून कंपनी व्यवस्थापन मशिनरी हलविण्याचे काम करीत आहे. कामगारांची ही फसवणूक लक्षात आल्यामुळे कामगारांनी ठिय्या आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. हिंद कामगार संघटनेची मागणी आहे की, पूर्वी 200 कोटींचा टर्नओव्हर होता, तो आता 1200 कोटींवर गेला आहे. आता केवळ 27 कायम कामगार कार्यरत आहेत. त्यामुळे कोर्टाच्या आदेशाची कंपनी व्यवस्थापनाने अंमलबजावणी करावी तसेच सर्व कामागरांना पूर्वीप्रमाणे 60 दिवसांची ग्रॅज्यूईटी व जे कामगार 2008 सालानंतर सेवानिवृत्त झालेत त्यांनाही फरकासह ग्रॅज्यूईटी मिळावी. कायद्याप्रमाणे पूर्व प्रथेप्रमाणे फरकासह बोनस मिळावा. कंपनीने पूर्वीप्रमाणेच उत्पादन सुरु करून ज्या कामगारांना खोट्या आरोपांपोटी कामावरून काढून टाकले आहे त्यांना पूर्ववत कामावर घ्यावे.
2008 सालापासून प्रलंबित असलेला कामगार वेतन करार कामगार संघटनेशी चर्चा करून केला पाहिजे. तसेच कामगारांच्या सर्व सुविधा पूर्वीप्रमाणेच सुरु करण्यात यावी व निवृत्त झालेल्या कामगारांच्या जागेवर नव्याने कायमस्वरूपी कामगारांची भरती करण्यात यावी. व त्यांना संघटनेचे सभासद होण्यासाठी हक्क मिळावेत. कंपनी स्थलांतरीत करण्याचे हे काम कंपनी व्यवस्थापनाने ताबडतोब बंद करावे. तसेच आतापर्यंत या कपंनीतून बाहेर पाठविण्यात आलेली मशीनरी पुन्हा कंपनीत आणून उत्पादन सुरु करावे. या विषयाबाबतच हिंद कामगार संघटना न्यायालयात लढा लढतच आहे. कंपनी व्यवस्थापनाने सर्व उत्पादन पूर्ववत सुरु करून कामगारांच्या न्याय हक्क मागण्या मान्य कराव्यात अन्यथा संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा कैलास कदम यांनी दिला आहे.
यावेळी आनंदराव फडतरे, मारुती पाटील, शिवाजी मंडलिक, संजय काशिद, कमलाकर इंगळे, शिवाजी घाटे, वीरसेन ननवरे, विनायक पोतदार, गणपत जगदाळे, सुरेखा ससाणे, रामचंद्र पवार, प्रल्हाद भाकरे, बबन घाटे, बिलास बधे, सत्यवान गवस, शांताराम कदम, एल. एम. पिंटो, राजेंद्र नांगरे, सदानंद जोशी, कृष्णानंद साई, डेव्हीड खरात, राजेंद्र नांद्रे, वसंत नागोसे, पद्माकर मोडक, घनश्याम भारंबे, मेहमूद सुतार, नामदेव होले, ज्ञानेश्वर जाधव, केशव जाधव, रमेश रबडे, राजेंद्र पवार, छबू जवळकर, शिवाजी हांडे, अंकुश करके, बाळू थिटे, रिचर्ड, श्यामराव शिंदे, नाथूराम फाळके, प्रकाश पवार, रवी दीक्षित, भोजा मुलीया, जेरॉय लोबो, आनंद भोसले, भीमराव साळवी, दशरथ शेडगे, चंद्रकांत गायकवाड आदी उपस्थित होते.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002