व्हीएस न्युज - पोलिसी कामातील वाढत्या राजकीय हस्तक्षेपाबद्दल शिवसेनेचे मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी रविवारी पुन्हा चिंता व्यक्त केली. गुन्हेगाराला सोडविण्यासाठी फोन करणाऱ्या नेत्यांची स्टेशन डायरीत पोलिसांनी नोंद करावी, असा फंडा त्यांनी सुचविला. त्यामुळे राजकीय हस्तक्षेप व गुन्हेगारीही कमी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
केलेल्या कामांचा आढावा जनतेसमोर मांडून त्यांचे प्रश्न समजून घेण्यासाठी 'संवाद खासदारांचा थेट जनतेशी' या कार्यक्रमात बारणे बोलत होते. यावेळी आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार, शिवसेनेचे उपनेते नितीन बानगुडे पाटील, जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, जिल्हा महिला संपर्क संघटीका वैशाली सूर्यवंशी, शहरप्रमुख योगेश बाबर, मधुकर बाबर, महिला शहर संघटिका उर्मिला काळभोर, नगरसेवक प्रमोद कुटे, जितेंद्र ननावरे आदी उपस्थित होते.
बारणे म्हणाले, ''पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नियोजनशून्य कारभारामुळे शहराला पाण्याचा तुटवडा भासत आहे. जेवढे पाणी पवना धरणातून उचलले जात आहे, तेवढे सगळे पाणी शहरापर्यंत पोहोचले तरी सुदधा पाण्याचा प्रश्न मिटू शकतो. पोलिसांना आपले काम चोखपणे करता यावे यासाठी त्यांच्या कामातील राजकीय हस्तक्षेप थांबला पाहिजे. एखादा लोकप्रतिनिधी जर पोलीसांवर दबाव आणत असेल तर जनतेने त्याचे पितळ उघडे करायला हवे."
सध्या राजकीय क्षेत्रात बुवाबाजी सुरू झाली असून त्यापासून प्रत्येकाने सावध राहायला हवे, असा सल्ला बानगुडे पाटील यांनी यावेळी दिला. शिवसेना, भाजप यांची युती होईल न होईल, पण मावळ लोकसभा मतदारसंघातून बारणे हेच निवडून येतील, असा विश्वास मधुकर बाबर यांनी व्यक्त केला.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002