व्हीएस न्युज - " राजीनामे देऊ, राजीनामे देऊ ' अशी घोषणा देत राहायचे व खोका मिळाल्यानंतर राजीनामे गुपचूप खिशात टाकण्याचे काम सध्या सुरू आहे, अशा शब्दात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता जोरदार टीकास्त्र सोडले.
यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे मनसे कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यामध्ये राज ठाकरे यांनी नेहमीच्या शैलीत उद्धव ठाकरे व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टीकेचे लक्ष्य केले. दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राम मंदिराच्या बांधकामाचा प्रश्न उपस्थित केला होता. केंद्र सरकार राम मंदिर बांधू शकत नसेल तर आम्ही राम मंदिर बांधू, असे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केले होते. या वक्तव्याचा समाचार घेताना राज ठाकरे म्हणाले, यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत खराब आहे. या जिल्ह्यात पाऊल टाकल्याबरोबर येथील स्थितीची कल्पना येते. जलशिवार योजना अयशस्वी ठरली आहे. हे प्रश्न आहेत. या प्रश्नांवर हे नेते काहीच बोलत नाही. राज्यातील या नेत्यांना आता राम मंदिराचे बांधकाम महत्त्वाचे वाटत आहे. काही दिवसांपर्यंत ते " राजीनामे देऊ राजीनामे देऊ', असे बोलत होते. परंतु खोका मिळाल्यानंतर राजीनामे पत्र खिशात गेल्याची टीका ठाकरे यांनी केली.
गेल्या साडेचार वर्षात देशाची जी वाट लागली असून यासाठी पंतप्रधान मोदी जबाबदार असल्याचा आरोप करून ठाकरे म्हणाले, या सरकारपेक्षा कॉंग्रेसचे सरकार बरे होते, असे म्हणण्याची वेळ आली आहे. आंदोलन झाल्यानंतर कॉंग्रेसचे नेते किमान दखल तरी घेत होते. मोदी सरकार तर त्याकडे ढुंकूनही पाहत नाही. मोदी सरकार म्हणजे दोनचार लोकांचे सरकार असल्याची टीका त्यांनी केली.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002