व्हीएस न्युज - आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने गरिबांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. उज्ज्वला योजनेअंतर्गत सर्व गरीब कुटुंबांना मोफत एलपीजी कनेक्शन(घरगुती गॅस सिलिंडर) देण्याच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. त्यामुळे प्रत्येक गरीब कुटुंबाला मोफत एलपीजी कनेक्शन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
या निर्णयामुळे महागाईने त्रस्त झालेल्या जनतेला दिलासा मिळाला आहे. उज्ज्वला योजनेची २०१६ मध्ये मोदी सरकारने सुरूवात केली होती. आर्थिक बाबींसंदर्भातील कॅबिनेट समितीने उज्ज्वला योजनेचा विस्तार करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे, अशी माहिती पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्याने ज्या गरीब कुटुंबांना एलपीजी कनेक्शन मिळाले नव्हते. किंवा जे याच्यासाठी पात्र नव्हते, अशा सर्व गरिबांना याचा लाभ होणार आहे, असे प्रधान म्हणाले.
आतापर्यंत २०११ च्या सामाजिक आणि आर्थिक जाती जनगणनेनुसार एलपीजी कनेक्शन देण्यात येत होते. त्यानंतर अनुसुचित जाती, मागासलेला समाज आणि पंतप्रधान आवास योजना आणि अंत्योदय योजनेच्या लाभार्थ्यांचाही यामध्ये समावेश केला होता. मात्र, आता या योजनेत सर्व गरीब कुटुंबांचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे आता १०० टक्के कुटुंबांपर्यंत एलपीजी कनेक्शन पोहोचू शकणार आहे, असेही प्रधान यांनी सांगितले. या योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून तेल कंपन्यांना १६०० रुपयांची सबसिडी मिळते. ही सबसिडी गॅस सिलिंडरच्या जोडणीसाठी दिली जाते. मोदी सरकारच्या या योजनेत प्रामुख्याने दारिद्य रेषेखाली येणाऱ्या कुटुंबांतील महिलांना मोफत गॅस कनेक्शन देण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले होते, असे प्रधान यांनी सांगितले.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002