व्हिएस न्यूज - उन्हाळा सुरू झाल्यानंतर आवश्यकतेनुसार पाणीकपात केली जात असली तरी, पिंपरी महापालिकेने मात्र नोव्हेंबरपासूनच दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला आहे. ही पाणीकपात उन्हाळ्यात चार महिने कायम ठेवण्यात येणार आहे. सततची पाणीटंचाई, अपुरा आणि विस्कळीत पाणीपुरवठय़ामुळे महापालिकेने दिवसाआड पाणीपुरवठय़ाचा निर्णय घेतला, तेव्हापासून यासंदर्भातील तक्रारी कमी झाल्या आहेत, असा दावा पाणीपुरवठा विभागाकडून केला जात आहे. शहरासाठी वाढीव पाणी कोटा मंजूर असतानाही त्यासंदर्भातील कार्यवाही मात्र रडतखडत सुरू आहे.
गेल्या वेळी उन्हाळ्यात पाणीकपात लागू करण्यात आली होती. यावेळी २५ नोव्हेंबर २०१९ पासूनच शहरात दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. काही महिन्यापूर्वीपर्यंत पाणीटंचाईवरून शहरभरात रोष होता. अपुऱ्या आणि विस्कळीत पाणीपुरवठय़ाच्या तक्रारी दररोज होत होत्या. पालिकेवर सातत्याने मोर्चेही येत होते. पाण्यावरून चौफेर टीका सहन केल्यानंतर आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिवसाआड पाणीपुरवठा सुरू करण्याचा निर्णय घेतला, त्यास विरोधही झाला. मात्र सद्य:स्थितीत पाणीपुरवठय़ावरून होणाऱ्या तक्रारी कमी झाल्याचे पाणीपुरवठा अधिकारी ठामपणे सांगत आहेत. तूर्त जुलैअखेपर्यंत ही पाणीकपात लागू ठेवण्याचा पालिकेचा मानस दिसून येतो.
शहरासाठी पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणात सध्या ६४ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. दर महिन्याला अंदाजे ११ टक्के पाणीसाठा आवश्यक असतो, असे गृहित धरून पालिकेने आगामी चार महिन्यांचे नियोजन केले आहे. अपेक्षित पाऊस न पडल्यास आणि धरणात जेमतेम २० टक्केच पाणीसाठा राहिल्यास सध्याचा दिवसाआड असलेला पाणीपुरवठा दोन दिवसाआड करण्याची वेळ येऊ शकते, असेही सांगण्यात आले.
पाणी योजनांचे काम रखडलेलेच
भामा आसखेडमधून १६७ दशलक्ष लीटर आणि आंदरा धरणातून १०० दशलक्ष लीटर पाणी पिंपरी-चिंचवडसाठी मंजूर करण्यात आले आहे. मात्र, कित्येक वर्षांपासून त्यापुढील कार्यवाही रडतखडत सुरू आहे. हे पाणी शहरासाठी आणण्याचे नियोजन सुरू आहे, त्यादृष्टीने काम प्रगतिपथावर आहे, असाच सूर महापालिकेकडून सातत्याने आळवला जातो. आंदरातील पाण्यासाठी चिखलीत जलशुद्धीकरण प्रकल्पाचे काम सुरू आहे. त्यासाठी लागणारे पाणी देहू बंधाऱ्यातून आणण्यासाठी जलवाहिन्या टाकण्याचे काम सुरू आहे, असे यासंदर्भात सांगण्यात आले. ३५ किलोमीटर लांबीच्या मावळ बंदनळ योजनेचे काम गोळीबाराच्या घटनेपासून बंदच आहे. ते पुन्हा सुरू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री स्तरावर घेतला जाईल. तूर्ततोही प्रकल्प रखडलेलाच आहे.
दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केल्यापासून पाण्याविषयीच्या तक्रारी कमी झाल्या आहेत. सध्या पाणी जादा दाबाने मिळते आहे. पाण्याच्या उपलब्धतेनुसार नळजोड दिले जात आहेत. नागरिकांनी पाणी जपून वापरावे. पिण्याच्या पाण्याने वाहने धुवू नयेत.
– रामदास तांबे, कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002