व्हिएस न्युज - केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीजने आयोजित केलेल्या इंडिया@75 : मिशन 2022 परिषदेला संबोधित केले. ते म्हणाले, देशातील 115 महत्वाकांक्षी जिल्ह्यांमध्ये एमएसएमईचे अस्तित्व सुधारण्याची तातडीची गरज आहे. सध्या जीडीपीमध्ये त्यांचे योगदान नगण्य आहे, मात्र त्यांच्याकडे व्यवस्थित लक्ष पुरवल्यास ते मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करु शकतात.
मंत्री म्हणाले, अगदी लहान उद्योगांची सुक्ष्म वित्तपुरवठ्याची गरज भागवण्यासाठी त्यांना एमएसएमई कार्यकक्षेत आणण्यासाठी सरकार काम करत आहे. नुकताच, एमएसएमई संकल्पनेचा विस्तार करण्यात आला आहे आणि 50 कोटी पर्यंतची गुंतवणूक आणि 250 कोटी पर्यंतची उलाढाल असलेल्या उद्योगांना एमएसएमईच्या नवीन व्याख्येत समाविष्ट केले आहे. तसेच एमएसएमई अंतर्गत उत्पादन आणि सेवा क्षेत्र या दोहोंना समान परिभाषीत करुन एकत्रित आणले आहे.
गडकरी यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेच्या सर्वांगिण विकासासाठी कल्पना आणि सूचना सादर करण्याचे आवाहन सीआयआय प्रतिनिधींना केले. त्यांनी चीनचा दाखला देत सांगितले की, त्याठिकाणी 10 प्रमुख उद्योगांचा निर्यातीत 70 टक्के वाटा असतो. ते म्हणाले, तंत्रज्ञान अद्यतन करुन एमएसएमई क्षेत्रात भारतही नवीन निर्यात मार्ग शोधू शकेल. यामुळे मोठ्या प्रमाणात सहाय्यक घटकांची वाढ होण्यास मदत होईल, असे ते म्हणाले.
गडकरी यांनी रस्त्यांच्या विम्यासाठी सध्याच्या बँक हमीऐवजी नवीन प्रस्ताव तयार करण्याचे आवाहन सीआयआयला केले. यामुळे रस्ते प्रकल्पाला लवकर आर्थिक तरतुदी करता येतील आणि भांडवल उभे करता येईल, ज्यायोगे प्रकल्प जलदगतीने पूर्ण होतील. देशातील रस्त्यांमध्ये कसा बदल होत आहे हे त्यांनी तपशीलवार सांगितले, तसेच प्रस्तावित 22 नवीन हरित एक्सप्रेसवे प्रकल्पांमुळे यात आणखी सुधारणा होईल, असे ते म्हणाले.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002