व्हिएस न्युज - देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत येणार, अशी चिन्हं असताना शनिवारी सकाळी देवेंद्र यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याने उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राजभवनात सकाळी हा सोहळा झाला.
08.30: पंतप्रधानांनी केलं देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचं अभिनंदन
'महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी तर उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी शपथ घेतली. महाराष्ट्राच्या उज्वल भवितव्यासाठी हे सरकार काम करेल असा विश्वास मला वाटतो', असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
08.18: राज्याला स्थिर सरकार देण्यासाठी- मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची दुसऱ्यांदा शपथ घेतल्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, "नरेंद्र मोदी, अमित शहा आणि जेपी नड्डा यांचे आभार मानतो. महाराष्ट्राची सेवा करण्याची संधी आम्हाला दिली. महाराष्ट्राच्या जनतेने स्पष्ट जनादेश दिला होता. शिवसेनेने युती नाकारून आघाडी करण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्रात किती काळ राष्ट्रपती राजवट लागू राहणार? खिचडी सरकार नको. इतक्या मोठ्य़ा राज्याला स्थिर सरकारची गरज. शरद पवार यांचे आभार मानतो. आमच्याबरोबर येण्याचा निर्णय त्यांनी घेतला. मी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. काही दिवसातच मंत्रीमंडळाचा विस्तार होईल. विश्वासदर्शक ठरावात आम्ही आमचं बहुमत सिद्ध करू. आम्ही आमचा दावा राज्यपालांना सादर केला. राष्ट्रपती राजवट मागे घेऊन आमचं सरकार स्थापन झालं आहे. महाराष्ट्राला स्थिर सरकार देऊ. शेतकऱ्यांवर संकट आहे. त्यांच्या मागे उभे राहू. जनादेश वेगळा होता. शिवसेनेने भाजपऐवजी काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर जाण्याचा निर्णय घेतला."
महाराष्ट्राच्या समस्या सोडवण्यासाठी घेतला निर्णय- उपमुख्यमंत्री अजित पवार
'निकालाच्या दिवसापासून कोणताही पक्ष सत्तास्थापनेचा दावा करू शकला नाही. महाराष्ट्राला वेगवेगळ्या समस्यांनी ग्रासलं आहे. शेतकऱ्यांचा प्रश्न गंभीर आहे. राज्याला स्थिर सरकार हवं या भूमिकेतून आम्ही एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे', असं अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर बोलताना सांगितलं.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांची पसंती उद्धव ठाकरे यांच्या नावाला होती. काँग्रेस नेते उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री म्हणून स्वीकारण्यास तयार आहेत. शिवसेनेच्या आमदारांनीही उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री होतील हे स्पष्ट केलं. त्यानंतर महाविकास आघाडीच्या बैठकीत यासंदर्भातला प्रस्ताव मांडण्यात आला होता. मात्र आज सकाळी अचानक हा शपथविधी सोहळा झाला आणि सर्वांनाच धक्का बसला.
काल राज्यात सत्ता स्थापनेसाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांची बैठक मुंबईतील नेहरू सेंटर इथे झाली. बैठकीनंतर उद्धव ठाकरे म्हणाले, "अजून चर्चा सुरू आहे. आम्ही असं ठरवलं आहे की कोणतीही गोष्ट अनुत्तरित ठेवायची नाही. अनेक मुद्यांवर एकमत झालं आहे. थोडे बारकावे शिल्लक आहेत. मला अर्धवट माहिती द्यायची नाही. एकत्र पत्रकार परिषद घेऊन घोषणा करू."
व्हिएस न्युज - काही जण मला सांगतात कर्जत जामखेडच्या परिसरात दबाव आहे, काही दहशत आहे. आम्ही काय असं-तसं इथे आलोय काय? जे अशा प्रकारची दादागिरी, गुंडगिरी करतील, ज्या गावच्या बोरी असतात, त्याच गावच्या बाभळी असतात. हे त्यांनी विसरु नये. आम्ही काय बांगड्या घातल्या नाहीत’‘मी आरे ला कारे म्हणणारा कार्यकर्ता आहे. मलाही महाराष्ट्र ओळखतो. त्यामुळे तुम्ही तशा पद्धतीचं धाडस करु नये. कार्यकर्त्यांना कोणी दमदाटीची भाषा केली, तर मला सांगा. मग तो दम देणाराही बघतो आणि त्याच्या खानदानाला बघतो’ असा इशारा माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली.
कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस चे उमेदवार रोहित पवार यांच्या प्रचारार्थ माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत खर्डा येथे शनिवार दि १३ रोजी रात्री जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या वेळी कर्जत जामखेड चे उमेदवार रोहित पवार, राजेंद्र फाळके ॲड. कैलास शेवाळे, राजेंद्र गुंड, प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी,माजी जिल्हा परिषद सदस्य मधुकर राळेभात, विजयसिंह गोलेकर, राष्ट्रवादी चे तालुका अध्यक्ष दत्तात्रय वारे, सुर्यकांत मोरे, कॉंग्रेस चे युवा नेते रमेश दादा आजबे,गजाजन फुटाणे, ज्योतीताई गोलेकार, नितीन धांडे, कर्जत चे बाळासाहेब साळुंके. संजय वराट हनुमंत पाटील, संजय तोरडमल, दयानंद कथले, नगरसेवक अमित जाधव, डिंगाबर चव्हाण, पवनराजे राळेभात, अँड. हर्षल डोके, डॉ. अविनाश पवार, विजय धुमाळ, प्रदीप पाटील, प्रशांत राळेभात, सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की काही जण मला सांगतात कर्जत जामखेडच्या परिसरात काही गटामध्ये काही दबाव आहे, काही दहशत आहे. आम्ही काय असं-तसं इथे आलोय काय? जे अशा प्रकारची दादागिरी, गुंडगिरी करतील, ज्या गावच्या बोरी असतात, त्याच गावच्या बाभळी असतात. हे त्यांनी विसरु नये. आम्ही काय बांगड्या घातल्या नाहीत’,आमच्या कार्यकर्त्यांच्या केसाला कोणी धक्का लावला, तर त्यांच्याकडे बघून घेईन. मी लोकशाही मानणारा आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान मानणारा आहे. मी घटना-कायदा मानणारा आहे. आमचे कार्यकर्ते जर नीट आचारसंहितेचं पालन करत असतील आणि कोण बाहेरचे आणले, तर मलाही जशास तसं उत्तर देता येतं. निवडणूक प्रचारादरम्यान राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर दादागिरी व दहशत पसरवून दबाव आणला जात आहे. मात्र या दबावाला आम्ही घाबरणारे नाहीत. आरे ला कारे म्हणत आम्ही जशास तसे उत्तर देऊ कारण आम्ही काय बांगड्या घातल्या नाहीत. अशा शब्दात अजित पवार यांनी इशारा दिला
व्हिएस न्युज -भुसावळमध्ये अंदाधुंद गोळीबार झाला असून यामध्ये 5 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती देण्यात आली आहे. भाजपचे नगरसेवक रवींद्र खरात उर्फ हंप्या यांच्या कुटुंबावर अज्ञात हल्लेखोरांनी अंधाधुंद गोळीबार केला आहे. यात 5 जणांचा मृत्यू झाला आहे. या संपूर्ण प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी 3 संशयित आरोपींना ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे. रविवारी रात्री उशिरा ही घटना घडली आहे. जेव्हा नगरसेवक रवींद्र हे त्यांच्या कुटुंबासोबत घरी होते. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोर रविंद्रच्या घरी देशी पिस्तूल, चाकू घेऊन घुसले आणि गोळ्या झाडल्या. हल्ला करुन हल्लेखोर तिथून पळून गेले पण नंतर त्यांनी आत्मसमर्पण केलं. हल्ल्यात वापरलेली शस्त्रे घटनास्थळावरून पोलिसांनी जप्त केली असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, या गोळीबारात जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले पण उपचारादरम्यान सर्वांचा मृत्यू झाला. या घटनेमागील खरं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.
गोळीबारात मयत झालेल्याची नावे
1)सागर रवींद्र खरात
2) हंसराज रवींद्र खरात,
3) रवींद्र बाबुराव खरात
4)मोहित गजरे
5) सुनिल बाबुराव खरात
गोळीबारानंतर 1) शेखर मेघे 2) मोहसीन अजगर खान 3) मयुरेश सुरडकर हे स्व:त पोलीस ठाण्यात हजर झाले असून पोलीस अन्य आरोपींचा शोध घेत आहेत.
व्हीएस न्यूज - पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँक प्रकरणात दिवसागणिक नवनवीन बाबी समोर येत आहे. अधिकाऱ्यांद्वारे पोलिसांमध्ये दाखल केलेल्या तक्रारीनुसार पीएमसी बँकेने कर्जाची रक्कम लपवण्यासाठी २१ हजारांपेक्षा अधिक बनावट खाती उघडली असल्याची माहिती समोर आली आहे. या बँक घोटाळ्याने खातेधारकांसह गुतवणुकदारांच्या पायाखालची जमीन सरकवली आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागाद्वारे सोमवारी एक तक्रार दाखल करण्यात आली.
यामध्ये बँक प्रशासनावर नॉन-परफॉर्मिंग अॅसेट्सला लपवणं आणि 4,355.66 कोटी रूपयांचे कर्ज वितरित करण्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. दाखल केलेल्या तक्रारीनुसार केवळ एका बांधकाम व्यावसायिक कंपनी आणि त्याच्या समूह कंपन्यांसाठी तब्बल ४४ कर्ज मंजूर करण्यात आल्याची माहिती आहे.
हाऊसिंग डेव्हलपमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (एचडीआयएल) या कंपनीवर बँकेचे तब्बल २ हजार ५०० कोटी रूपयांचे कर्ज आहे. तसंच ही कंपनी दिवाळखोरीत काढण्यात आली होती. ही कंपनी दिवाळखोरीत निघाल्यानंतरही रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक सुचनांनुसार पीएमसी बँकेने त्या कंपनीला एनपीएमध्ये टाकलं नव्हते. रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक सुचनांनुसार बँकांच्या नुकसानीची माहिती बँकांनी रिझर्व्ह बँकेला देणे बंधनकारक आहे. परंतु पीएमसी बँकेकडून ही माहिती देण्यात आली नाही. तसंच पीएमसी बँकेचे एकूण कॅश रिझर्व्ह १ हजार कोटी रूपये आहे. तर २ हजार ५०० कोटींचे रूपयांचे कर्ज येणे बाकी आहे.
व्हीएस न्यूज - अगदी थोड्याच कालावधीत लोकप्रिय झालेल्या येवले चहाचे कोंढव्यातील उत्पादन केंद्र बंद ठेवण्याचे आदेश अन्न आणि औषध प्रशासनाचे (एफडीए) सह आयुक्त एस. एस. देशमुख यांनी दिले आहेत. येवले चहा प्यायल्याने पित्त होत नाही. तसेच, चहासाठी मिनरल वॉटर वापरले जात असल्याचा चुकीचा दावा त्यांना अंगलट असून, कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी, पँकबंद मालावर कोणती माहिती नसणे अशा विविध नियमांचे उल्लंघन केल्याने पुढील आदेश येईपर्यंत उत्पादन केंद्र बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे. मात्र, शहरातील विविध चहा केंद्र मात्र, माल असेपर्यंत सुरु राहणार आहेत.
येवले चहामधे मेलानाईटचा वापर केला जात असल्याचे वृत्त पसरले आहे. त्या पार्श्वभूमीवर एफडीएने कोंढव्यातील येवले फूड प्रॉडक्ट येथे तपासणी केली. चहा पावडर, साखर, चहा मसाला यांचे नमुने आणि सहा लाख रुपयांचा साठा संशयावरुन जप्त केला आहे. तसेच, अन्नपदार्थांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. येत्या तीन आठवड्यात प्रयोगशाळेच्या अहवालानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल.
अन्न सुरक्षा मानदे कायदा २००६ नुसार पॅकबंद केलेली चहा पावडर, साखर आणि चहा मसाल्याच्या पाकिटावर कोणताही उल्लेख नाही. त्यामुळे त्यात नक्की कोणता अन्नपदार्थ किती प्रमाणत आहे, हे समजू शकत नाही. उत्पादन प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी योग्य शिक्षण येतलेल्या व्यक्तीची नेमणूक केलेली नसणे, अन्न पदार्थांची प्रयोगशाळेतून तपासणी न करणे, कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी केल्याचे प्रमाणपत्र उपलब्ध नसणे, तसेच उत्पादनाच्या ठिकाणी पेस्ट कंट्रोल केले नसल्याची त्रुटी आढळली आहे. येवले चहाची वृत्तवाहिनीवर जाहीरात प्रसिद्ध केली जाते. त्यात येवले चहा प्यायल्यावर पित्त होत नसल्याचा दावा केला जातो. तसेच, चहासाठी मिनरल वॉटर वापरले जाते. ही जाहीरात दिशाभूल करणारी असल्याचे एफडीएने म्हटले आहे. या प्रकरणी एफडीएचे सहायक आयुक्त संजय नारागुडे यांनी नोटीस बजावली आहे.
तसेच, अॅडर्व्हटायझिंग स्टॅण्डर्ड कौंसिल आॅफ इंडियाकडे देखील तक्रार नोंदविल्याचे एफडीएच्या अधिकाºयांनी सांगितले. अन्नसुरक्षा अधिकारी इम्रान हवालदार व रमाकांत कुलकर्णी यांच्या पथकाने ही कारवाई केली.
...म्हणून मिनरल वॉटरचा दावा ठरला खोटा
बाजारात मिळणारे विविध कंपन्यांच्या पाण्याला मिनरल वॉटर म्हणण्याची प्रथा रुढ झाली आहे. मात्र, कायद्यात मिनरल वॉटर आणि बाटलीबंद पाणी यांची व्याख्या वेगळी आहे. गंगोत्रीच्या खोऱ्यामधील नैसर्गिक पाण्याला मिनरल वॉटर म्हटले जाते. त्यावर कोणतीही प्रक्रिया केलेली नसते. निसर्गत:च ते पाणी शुद्ध असते. इतर, ठिकाणचे बाटलीबंद पाणी हे प्रक्रियायुक्त असते, असे सह आयुक्त संजय नारागुडे म्हणाले.
व्हीएस न्युज - कोहिनूर मिल खरेदी प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीने नोटीस बजावली आहे. २२ ऑगस्ट रोजी ईडी कार्यालयात चौकशीसाठी उभे राहावे, असे आदेश ईडीकडून देण्यात आले आहेत. मात्र, ईडी चौकशीच्या आधीच ठाण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. मनसेचा निष्ठावंत कार्यकर्ता प्रवीण चौगुलेने स्वःला जाळून घेऊन आत्महत्या केली आहे.
ही घटना मंगळवारी रात्री उशिराने ठाण्यात घडली. राज ठाकरे यांना ईडीने नोटीस पाठवल्यामुळे आपण आत्महत्या करत आहोत, असे प्रवीणने आपल्या मित्रांना आत्महत्येपूर्वी सांगतले होते. राज ठाकरे यांना ईडीने नोटीस बजावल्यामुळे तो प्रचंड तणावात गेला होता. त्याने सोशल मीडियावर देखील तशाप्रकारचे पोस्ट टाकले होते. अखेर प्रचंड तणावाखाली त्याने रात्री उशिरा आत्महत्या केली. प्रवीण हा राज ठाकरेंचा प्रचंड चाहता होता. तो मनसेचा निष्ठावंत कार्यकर्ता होता. त्यामुळे मनसेचा कोणताही कार्यक्रम असो किंवा आंदोलन असो, तो स्वतःच्या शरीरावर मनसेचा झेंडा रंगवून कार्यक्रमात सर्वात पुढे असायचा. प्रवीणच्या जाण्याने मनसेने फार मोठा निष्ठावंत कार्यकर्ता गमवला आहे.
ईडी चौकशीवरुन राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना शांत राहण्याचा सल्ला दिला होता. राज यांनी यासंदर्भात एक पत्रक देखील जारी केले होते. या पत्रकामध्ये आपल्या कार्यकर्त्यांना त्यांनी ‘तुम्हाला डिवचण्याचा प्रयत्न होईल, पण शांत रहा! लोकांना त्रास होईल असे कोणतेही कृत्य करू नका’, असे आवाहन केले होते. दरम्यान, ईडीने दिलेली नोटीस मनसैनिकांना जिव्हारी लागली आहे. राज ठाकरे म्हणजे आपले आराध्य दैवतच अशी भावना कार्यकर्त्यांची आहे. यातूनच प्रवीण चौगुले या तरुणाने आत्महत्या केली. ही फार अत्यंत दु:खद आणि धक्कादायक आहे.
व्हीएस न्युज - दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि दिल्ली काँग्रेसच्या अध्यक्षा शीला दीक्षित यांचे निधन झाले आहे. वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. यामुळे दिल्लीत दोन दिवसीय राजकीय दुखवटा जाहीर करण्यात आला असून, कोणताही सरकारी कार्यक्रम होणार नाही. भाजपाने देखील दोन दिवसातील पक्षाचे सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत.
शीला दीक्षित यांनी १५ वर्षे मुख्यमंत्रीपद भूषवलं आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. दिल्लीतील एक्सॉर्ट रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. १९९८ ते २०१३ या काळात त्यांनी दिल्लीचं मुख्यमंत्रीपद भूषवलं होतं. दीक्षित यांच्या निधनावर काँग्रेसमधून शोक व्यक्त होत आहे. देशभरात काँग्रेसची पडझड होत असताना शीला दीक्षित यांच्या सारख्या ज्येष्ठ नेत्यांच्या निधनामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
शीला दीक्षित यांनी तीन वेळा दिल्लीचे मुख्यमंत्री पद भूषावलं आहे. दिल्लीमध्ये सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेल्या मुख्यमंत्री म्हणून शीला दीक्षित यांना ओळखलं जातं. ३१ मार्च १९३८ रोजी शीला दीक्षित यांचा जन्म पंजाबमधील कपूरथला येथे झाला होता. शीला दीक्षीत यांचे शिक्षण दिल्लीमध्ये झालं आहे. दिल्लीच्या कॉन्व्हेंट ऑफ जीझस अँड मेरी स्कूलमधून शिक्षण घेतलं. त्यानंतर दिल्ली विद्यापीठाच्या मिरांडा हाऊस कॉलेजमधून मास्टर्स ऑफ आर्ट्समध्ये पदवी घेतली. शीला दीक्षित यांनी १९८४ ते १९८९ पर्यंत उत्तर प्रदेशमधील कन्नौज लोकसभेच्या खासदार होत्या. १९८६ ते १९८९ या कालावधीत शीला दीक्षित यांनी केंद्रीय मंत्रीपदाची जबाबदारीही सांभाळली होती.
शीला दीक्षित यांची २०१४ मध्ये केरळ राज्याच्या राज्यपालपदी नियुक्ती केली होती. मात्र, त्यांनी २५ ऑगस्ट २०१४ मध्ये राजीनामा देत काँग्रेसमध्ये पूर्णकाळ कार्यरत राहण्याचा निर्णय घेतला होता. यंदाच्या लोकसभा निवडुकीत शीला दिक्षीत यांना भाजपाच्या मनोज तिवारीकडून पराभवचा धक्का बसला आहे. १९८४ ते १९८९ या कार्यकाळात शीला दीक्षित यांनी संयुक्त राष्ट्र आयोगात ५ वर्ष भारताचं प्रतिनिधीत्व करून महिलांच्या समस्येकडे संयुक्त राष्ट्राचं लक्ष वेधलं होतं.
व्हीएस न्युज - मुंबई पोलिसांनी बुधवारी रात्री मोठी कारवाई करत अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या पुतण्याला अटक केली आहे. मुंबई क्राईम ब्रांचच्या खंडणी विरोधी पथकाककडून ही अटकेची कारवाई करण्यात आली आहे. दाऊदचा पुतण्या रिजवान कासकरला खंडणी मागण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. रिजवान कासकर देश सोडून पळून जाण्याच्या तयारीत असताना त्याला बेड्या ठोकण्यात आल्या.
मिळालेल्या माहितीनुसार, छोटा शकीलचा सहकारी अफरोज वदारिया यालादेखील मुंबई पोलिसांनी हवाला प्रकरणी अटक केली होती. याचप्रकरणी दाऊदच्या पुतण्यालाही अटक करण्यात आली आहे. रिजवान कासकर हा दाऊदचा भाऊ इकबाल कासकरचा मुलगा आहे. इकबास कासकरदेखील खंडणीच्या एका गुन्ह्यात सध्या जेलमध्ये आहे. याआधी खंडणी विरोधी पथकाने अहमद रजा याला अटक केली होती. अहमद रजा हा या प्रकरणात फरार असणाऱ्या फहीमचा जवळचा सहकारी आहे. अहमद रजा याला आंतररराष्ट्रीय विमानतळावरुन अटक करण्यात आली होती.
अहमद रजा दुबईहून मुंबईला आला होता आणि रिजवानच्या संपर्कात होता. पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अहमद रजा हा शकील आणि फहीम यांचा निकटवर्तीय असून मुंबई, ठाणे आणि सुरतमध्ये हवाला व्यवसाय करण्याची जबाबदारी त्याच्यावर होती. काही दिवसांपुर्वी दाऊद इब्राहिमचा सहकारी रियाज भाटी यालादेखील मुंबईत अटक करण्यात आली होती. खंडणी विरोधी पथकानेच ही कारवाई केली होती. वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील एमसीए क्लबची सदस्यता मिळवण्यासाठी रियाज भाटीने मुंबईमधील विल्सन कॉलेजची बनावट कागदपत्रं तयार केली होती. २०१३ मध्ये त्याने क्लबचं सदस्यत्व मिळवलं होतं अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे.
पाकिस्तानने नेहमीच दाऊद इब्राहिम आपल्या देशात नसल्याचा दावा केला आहे. मात्र वारंवार पाकिस्तानचा हा दावा फोल ठरला आहे. गुप्तचर यंत्रणांच्या हाती एक फोटो लागला आहे ज्यामध्ये दाऊद खास मित्र जाबिर मोतीवालाची भेट घेत असल्याचं दिसत आहे. व्हायरल होत असलेल्या या फोटोत दाऊद एकदम व्यवस्थित दिसत आहे. याआधी दाऊदची प्रकृती ठीक नसल्याचं वृत्त आलं होतं. गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, जाबिर मोतीवाला दाऊदच्या क्लिंफ्टन हाऊस येथील बंगल्याच्या शेजारी राहतो. त्यांच्यात कौटुंबिक संबंध असल्याची माहिती आहे.
व्हीएस न्युज - पाकिस्तानच्या सैन्य कोर्टाने हेरगिरीच्या आरोपांखाली फाशीची शिक्षा सुनावलेले भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांना नेदरलँडमधील द हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयाने (आयसीजे) आज मोठा दिलासा दिला. कोर्टाचा निकाल भारताच्या बाजूने लागला असून कुलभूषण जाधव यांच्या फाशीवर स्थगिती कायम ठेवण्यात आली आहे. १५-१ च्या फरकाने हा निकाल लागला आहे. यापूर्वी २०१७मध्ये आयसीजेने जाधव यांच्या फाशीला स्थगिती दिली होती, त्यानंतर आपला निर्णय सुरक्षित ठेवला होता.
दक्षिण आशियाच्या आंतरराष्ट्रीय कायदेशीर सल्लागार रीमा ओमर यांच्या माहितीनुसार, आयसीजेने कुलभूषण जाधव प्रकरणी पाकिस्तानकडून भारतावर लावण्यात आलेल्या आरोपांना योग्य मानलेले नाही. २ वर्षे आणि दोन महिने आससीजेमध्ये १५ सदस्यीय खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरु होती. आज या प्रकरणावर निकाल देताना खंडपीठाने जाधव यांना काऊन्सेलर अॅक्सेस देण्याचाही आदेश दिला. तसेच पाकिस्तानने जाधव यांना सुनावलेल्या फाशीचा पुनर्विचार करावा, असे कोर्टाने म्हटले आहे. या शिक्षेचा पुनर्विचार होत नाही तोपर्यंत त्यांना दिलेली फाशीची शिक्षा स्थगित करण्यात येत असल्याचा आदेश यावेळी कोर्टाने दिला.
दरम्यान, जाधव यांना कायदेशील मदत देण्यात यावी असेही कोर्टाने म्हटले आहे. या प्रकरणात पाकिस्तानचे म्हणणे आहे की, हेरगिरीच्या आरोपात पाकिस्तानी सैन्याने मार्च २०१६ मध्ये जाधव यांना बलुचिस्तानमधून ताब्यात घेण्यात आले होते. मात्र, भारताने पाकचा हा दावा नेहमीच नाकारला आहे. भारताने म्हटले आहे की, जाधव हे भारतीय नौदलाचे अधिकारी होते. त्यांचे इराणमधून अपहरण करुन पाकिस्तानात आणण्यात आले होते. जाधव यांचा इराणमध्ये स्वतःचा व्यवसाय आहे. त्यामुळे भारताने पाकिस्तानने व्हिएन्ना कराराचे उल्लंघन केल्याचा दावा करीत आयसीजेमध्ये खटला दाखल केला आहे.
पाकिस्तानच्या एका लष्करी कोर्टाने देशात हेरगिरी करण्यास आणि दहशतवाद पसरवण्याच्या आरोपांखाली एप्रिल २०१७ मध्ये जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. आयसीजेने पाकिस्तानला सांगितले की, त्यांचा निकाल येईपर्यंत जाधव यांना देण्यात येणारी फाशीची शिक्षा स्थगित करावी. भारताने आयसीजेकडे जाधव यांची फाशीची शिक्षा रद्द करीत त्वरीत सुटकेची मागणी केली आहे. जाधव यांना दोषी ठरवताना आवश्यक प्रक्रियांचे पाकिस्तानच्या लष्करी कोर्टाने जराही पालन केले नसल्याचा आरोपही भारताने केला आहे.
व्हिएस न्यूज - हिंदू पुरुषांनी मुस्लिमांच्या घरामध्ये घुसून त्यांच्या महिलांवर बलात्कार करायला हवा, असे वादग्रस्त वक्तव्य उत्तर प्रदेशमधील रामकोला येथील भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या नेत्या सुनिता सिंह गौड यांनी सोशल मीडियावर केले होते. फेसबुकवर टीका सुरू झाल्यानंतर त्यांनी ती पोस्ट काढून टाकली.
गौड यांनी फेसबुकवर लिहीले होते की, 'एक उपाय आहे की, 10 हिंदूनी एकत्र येऊन त्यांची (मुस्लिम) बहिण व आईवर मोकळ्या रस्त्यावर सामूहिक बलात्कार करायला हवा. पुढे हत्या करून भर बाजारात लटकावयाला हवे. दगडाचे उत्तर दगडानेच द्यायला हवे. मुस्लिम माता व बहिणींचा 'सन्मान' लुटला पाहिजे. कारण, भारताची सुरक्षा करण्यासाठी दुसरा कोणताच मार्ग नाही.'
दरम्यान, काही वेळातच फेसबुकवरून ही पोस्ट काढून टाकण्यात आली. परंतु, या पोस्टचा स्क्रीन शॉट सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा विजया रहाटकर यांनी या पोस्टबाबत ट्विट केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, 'वादग्रस्त प्रतिक्रेयाला स्थान नाही. गौड यांना 27 जून रोजी पदावरून हटविण्यात आले आहे.'
व्हिएस न्युज - बनावट कंपन्या तयार करून बँकांना हजारो कोटींचा चुना लावणाऱ्या स्टर्लिंग बायोटेक कंपनीचे मालक संदेसरा ब्रदर्सबाबत सक्तवसूली संचलनालयाने (इडी) मोठा गौप्यस्फोट केला आहे. इडीच्या माहितीनुसार, संदेसरा घोटाळा हा पंजाब नॅशनल बँकेपेक्षाही मोठा घोटाळा आहे. इडीच्या सूत्रांनी एएनआयला याबाबत माहिती दिली.
स्टर्लिंग बायोटेक कंपनी लिमिटेड आणि संदेसरा समुहाचे प्रमुख प्रमोटर नितीन संदेसरा, चेतन संदेसरा आणि दिप्ती संदेसरा यांनी बनावट कंपन्या तयार करून बँकांना 14 हजार 500 कोटींचा गंडा घातला. इडीच्या सूत्रांकडून एएनआयला ही माहिती देण्यात आली. इडीने याप्रकरणी बुधवारी स्टर्लिंग बायोटेकची 9 हजार कोटींपेक्षा अधिक मूल्याची संपत्ती जप्त केली. यामध्ये नायजेरियातील ऑईल रिग, एक जहाज, एक विमान आणि लंडनमधील संपत्ती जप्त केली आहे. यापूर्वी हिरे व्यापारी नीरव मोदी आणि त्याचा मामा मेहुल चोक्सी याने पीएनबी बँकेला 11 हजार 400 कोटींचा गंडा घातला होता. कारवाई दरम्यान, इडीला अनेक दस्तऐवज मिळाल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. यावरून संदेसरा समुहाने शेल कंपनीच्या सहाय्याने भारतीय बँकांच्या परदेशातील शाखांमधून 9 हजार कोटी रूपयांचे कर्ज घेतल्याचे समोर आले होते.
तसेच इडीच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार स्टर्लिंग बायोटेक लिमिटेडने भारतीय बँकांकडून भारतीय आणि परदेशी चलनातही कर्ज घेतले होते. संदेसरा समुहाने आंध्रा बँक, यूको बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, अलाहाबाद बँक आणि बँक ऑफ इंडियाकडून हे कर्ज घेतले होते. ऑक्टोबर 2017 मध्ये संदेसरा समुहावर सीबीआयने एफआयआर दाखल केला होता. त्यानंतर इडीनेही त्यांच्यावर खटला दाखल केला होता. सीबीआयने 5 हजार 383 कोटी रूपयांच्या घोटाळा आणि मनी लाँड्रींग प्रकरणी संदेसरा समुहावर एफआयआर दाखल केला होता.
व्हीएस न्युज - गडचिरोलीतील दादापूर येथे तब्बल ३६ वाहनांची जाळपोळ केल्यानंतर नक्षलवाद्यांनी बुधवारी कुरखेड्यापासून अवघ्या ६ किलोमीटर अंतरावरील जांभूरखेडा गावाजवळ भूसुरुंग स्फोट घडवला. या स्फोटात १५ जवान शहीद झाले असून या घटनेने महाराष्ट्र दिनी पोलीस दलावर शोककळा पसरली आहे.
बुधवारी मध्यरात्री कुरखेडा तालुक्यातील दादापूर(रामगड) येथे नक्षल्यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या कामावरील तब्बल ३६ वाहने, यंत्रसामग्री व कार्यालये जाळली. त्यानंतर बुधवारी सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास जलद प्रतिसाद पथकातील जवान खासगी वाहनाने कुरखेडा येथून पुढे जात असताना कुरखेड्यापासून ६ किलोमीटर अंतरावरील जांभूरखेडा गावाजवळील पुलावर नक्षलींनी भूसुरुंग स्फोट घडवला. यात १५ जवान शहीद झाले असून खासगी वाहनाचा चालकही ठार झाला आहे. घटनास्थळी नक्षली आणि पोलिसांची चकमक सुरु आहे.
पुराडा-मालेवाडा-येरकड या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १३६ चे काम सुरु असून, हे काम दुर्ग येथील अमर इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीद्वारे करण्यात येत आहे. या कंपनीचा दादापूर येथे गावाशेजारीच डांबर प्लांट असून, दोन कार्यालयेही आहेत. तेथे अनेक वाहने होती. मंगळवारी रात्री दीडशेहून अधिक सशस्त्र नक्षली दादापूर येथे गेले. त्यांनी संपूर्ण गावभर शासनाविरोधात मजकूर लिहिलेले बॅनर लावले आणि नंतर वाहने व अन्य यंत्रसामग्रीला आग लावली होती.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002