व्हीएस न्युज - २५ हजार रुपयांरु लाच स्वीकारताना सहायक पोलीस निरीक्षकास अॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले. गुन्हा दाखल न करण्यासाठी ५० हजार रुपयांची मागणी पोलीस निरीक्षकांनी केली होती. ही कारवाई मंगळवारी करण्यात आली. या कारवाईमुळे लाचखोरांचे धाबे दणाणले आहेत.
असिफ वहाब बेग (वय-३८) असे लाच स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आलेल्या सहायक पोलीस निरीक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी ३६ वर्षीय युवकाने ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली आहे. असिफ बेग पालघर जिल्ह्यातील माणिकपूर पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. तक्रारदार यांनी एका महिलेविरुद्ध अदखलपात्र गुन्हा माणिकपूर पोलीस ठाण्यात दाखल केला आहे. गुन्हा दाखल करण्यात आलेल्या महिलेने देखील तक्रारदार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. महिलेने दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल न करण्यासाठी बेग याने तक्रारदाराकडे ५० हजार रुपयांची मागणी केली. तडजोडीमध्ये २५ हजार रुपये देण्याचे ठरले होते. तक्रारदार यांनी ठाणे लाचलुचपत प्रतिबंघक विभागाकडे याची तक्रार केली. पथकाने पंचासमक्ष पडताळणी केली असता बेग याने ५० हजार रुपयाची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. पथकाने मंगळवारी पोलीस ठाण्यात सापळा रचून बेग याला २५ हजार रुपयाची लाच स्विकारताना रंगेहाथ पकडले.
ही कारवाई ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक अंकुश बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक सचिन मोरे, तानाजी गायकवाड, संदेश शिंदे, महिला पोलीस शिपाई रजपूत, चालक पोलीस शिपाई त्रिभुवन यांच्या पथकाने केली.
सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या हेल्प लाईन क्रमांकावर संपर्क साधावा.
व्हीएस न्युज - बहुजन वंचित आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी सोलापूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला. या मतदारसंघात त्यांची लढत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि भाजपाचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर महाराज यांच्याशी होणार आहे. आंबेडकर यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात ६ कोटी ७३ लाख रूपयांची संपत्ती दाखवली आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी उमेदवारी अर्जासोबत दिलेल्या प्रतिज्ञापत्रात कुटुंबाच्या नावे ६ कोटी ७३ लाख रुपयांची संपत्ती दाखवली आहे. यातील ३ कोटी १५ लाखांची मालमत्ता वारसाहक्काने मिळाल्याचे त्यांनी नमूद केले आहे. त्यांच्या कुटुंबाकडे १ लाख २० हजार रूपयांची रोख रक्कम आहे. त्यांच्या नावे गडचिरोली जिल्ह्यातील मुडसा येथे जमीन आहे. मुलगा सुजातच्या नावे रत्नागिरी जिल्ह्यातील अंबावडे येथे आणि पत्नीच्या नावे वेल्हा तालुक्यातील ओसडे येथे जमीन आहे.
आंबेडकरांच्या नावे ४१ लाख ८१ हजार १८९, पत्नीच्या नावे ७३ लाख ८६ हजार २७३ तर मुलगा सुजातच्या नावे ९ लाख ५५ हजार ४५४ रुपयांची जंगम मालमत्ता आहे. स्वत:च्या नावे ३२ लाख, पत्नी अंजली यांच्या नावे १ कोटी १५ लाख तर सुजातचया नावे ३ कोटी १५ लाख रुपयांकपैकी पाचवा हिस्सा स्थावर मालमत्ता आहे. स्वत:च्या नावे अकोला, पत्नीच्या नावे पुणे आणि मुलाच्या नावे मुंबईतील खार येथे घर आहे. याची किंमत २ कोटी इतकी आहे. आंबेडकर यांचे २०१७-१८ मधील उत्पन्न ८ लाख ६० हजार १९० तर पत्नीचे २१ लाख ०९ हजार १४० रुपये असल्याचे म्हटले आहे.
व्हीएस न्युज - भारतीय हवाई दलातील विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांना आपण खूप चांगली वागणूक दिली असा पाकिस्तानकडून जोरदार प्रचार सुरु आहे. पण प्रत्यक्षात वस्तुस्थिती अशी नाही. पाकिस्तानच्या ताब्यात असताना अभिनंदन वर्थमान यांचा प्रचंड मानसिक छळ करण्यात आला. भारतात परतल्यानंतर अभिनंदन वर्थमान यांनी ही माहिती दिली. पाकिस्तानात आपला शारीरिक नव्हे तर प्रचंड मानसिक छळ करण्यात आला असे अभिनंदन यांनी सांगितले. एएनआयने सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे.
बुधवारी भारतीय हद्दीत घुसलेल्या पाकिस्तानी विमानांना पिटाळून लावताना झालेल्या हवाई संघर्षात विग कमांडर अभिनंदन वर्थमान यांचे मिग-२१ विमान पाकव्याप्त काश्मीरमध्ये कोसळले व ते पाकिस्तानी सैन्याच्या हाती लागले. अभिनंदन यांना शुक्रवारी रात्री ९.२० च्या सुमारास पाकिस्तानने भारताकडे सोपवले. अभिनंदन यांच्या सुटकेला जवळपास तीन तास उशीर झाला. पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी अभिनंदन यांना सीमारेषा पार करण्यासाआधी जबरदस्तीने व्हिडीओ रेकॉर्ड करायला लावला. त्यामुळे त्यांना तीन तास उशीर झाला.
त्यातूनच पाकिस्तानी सैन्याची वाईट बाजू दिसते. अभिनंदन सध्या दिल्लीमध्ये असून कुलिंग डाऊन प्रोसेस अंतर्गत एअर फोर्सच्या सेंट्रल मेडिकल केंद्रात त्यांच्यावर सध्या वेगवेगळया वैद्यकीय चाचण्या सुरु आहेत. शनिवारी सकाळी अभिनंदन त्यांच्या कुटुंबियांना भेटले. एअर फोर्सच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही त्यांची भेट घेतली.
व्हीएस न्युज - पुलवामा येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानने आपली मुजोरी कायम ठेवत भारताकडे या हल्ल्याबाबत पुरावे मागितले आहेत. त्यानंतर भारताने पाकिस्तानला जोरदार दणका दिला आहे. पाकिस्तानाला जाणारे पाणी रोखून त्यांची कोंडी करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी टि्वट करुन आज (गुरूवार) दिली आहे.
गडकरी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, सिंधू जल करारातून भारताने माघार घेतली आहे. त्यामुळे पाकिस्तानला जाणारे पाणी आता भारत स्वत:साठी वापरणार आहे. पूर्वेकडच्या नद्यांचे पाणी आता जम्मू-काश्मीर आणि पंजाबसाठी वापरण्यात येणार आहे, असे गडकरी यांनी म्हटले आहे. व्यास, रावी आणि सतलज या तीन नद्यांचे पाणी भारतातून पाकिस्तानला जाते. भारताच्या या निर्णयामुळे पाकिस्तानची पाण्यासाठी भटकंती होईल. तीन नद्यातील पाणी प्रकल्पाद्वारे पाकिस्तान ऐवजी यमुना नदीत सोडण्यात येईल. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानवर दबाव वाढवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे. याचा भाग म्हणून भारताने हा निर्णय घेतल्याची शक्यता आहे.
दरम्यान, पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानविरोधात देशभरात संतापाची लाट उसळली आहे. पाकिस्तानावर कठोर कारवाई करण्याची मागणी सर्व स्तरातून होत असताना केंद्र सरकारने हा अत्यंत मोठा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर पाकिस्तानचा मोस्ट फेव्हर्ड नेशनचा दर्जा भारत सरकारने आधीच काढून घेऊन पाकिस्तानला संभाव्य धोक्याची सुचना करून दिली होती.
व्हीएस न्युज - मुंबईत २००३ मध्ये झालेल्या भीषण बॉम्ब स्फोटप्रकरणातील फाशीची शिक्षा सुनावलेल्या आरोपीचा शनिवारी रात्रीच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला. मोहम्मद हानिफ सईद असे या आरोपीचे नाव आहे. तो नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत होता. हानिफ त्याची पत्नी फेहमिदा आणि अशरत अन्सारी या तिघांनी मिळून दोन टॅक्सीमध्ये शक्तीशाली बॉम्ब स्फोट घडवून आणण्याचा कट रचला होता.
त्यानुसार, २५ ऑगस्ट २००३मध्ये ऐतिहासिक ‘गेट वे ऑफ इंडिया’ आणि ‘झवेरी बझार’ येथे हे स्फोट झाले होते. यामध्ये ५२ जणांचा मृत्यू झाला होता तर २४४ जण जखमी झाले होते. सईदच्या मृत्यूबाबत माहिती देताना कारागृहाचे अधीक्षक राणी भोसले यांनी सांगितले की, शनिवारी अचानक त्याची प्रकृती बिघडल्याने त्याला नागपूरच्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अॅण्ड हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले. रुग्णालयात तातडीने त्याच्यावर उपचार सुरु करण्यात आले मात्र, दीड तासांच्या अवधीतच त्याचा मृत्यू झाला. या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही मात्र, शवविच्छेदन अहवालानंतरच ते समोर येईल.
सोमवारी सईदच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत त्याचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे. दरम्यान, ऑटोस्पाय झाल्यानंतर हानिफचा मृतदेह त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात सोपवण्यात येणार आहे.
व्हीएस न्युज - शेवगावच्या पोलिसाचा खून केल्याप्रकरणी नाशिक रोड जेलमध्ये असलेला आरोपी पिन्या कापसे याला न्यायालयीन कामासाठी घेऊन जात असताना त्याने पोलिस उपनिरीक्षकाला जीवे मारण्याची धमकी दिली याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखलकरण्यात आला आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, कैदी सुरेश उर्फ पिन्या भरत कापसे (रा.अंतरवली, ता.शेवगाव, जि.अहमदनगर) हा नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहे. औरंगाबाद न्यायालयाच्या आदेशानुसार कापसेला ताब्यात घेण्यासाठी बीडचे पोलीस गेले होते. कापसे याला पोलीस वाहनात बसवत असताना त्याने पोलीस उपनिरीक्षक जोगदंड यांना त्याच्या वकिलाला फोन करण्यास सांगितले. मात्र जोगदंड यांनी त्यास नकार देताच त्याने त्यांना धक्काबुक्की केली. यावेळी मध्यस्थीसाठी धावून गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली. तसेच जोगदंड यांना तुमचे घर पाहिले आहे, मी पाच पन्नास लाख रुपये खर्च करून तुम्हाला जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी दिली. तसेच आरडाओरड करत आपल्याला न्यायालयात यायचे नाही तर जेलमध्येच राहायचे आहे, असे सांगत गोंधळ घातला.याप्रकरणी जोगदंड यांनी नाशिक रोड पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पिन्या कापसे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
काय गुन्हा केला होता
तीन वर्षांपूर्वी शेवगाव पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल दीपक कोलते व इतर पोलीस कर्मचारी मुंगी येथे गेले होते. त्यावेळी पिन्या कापसे व त्याचा साथीदार या गावातून जात होते. त्यावेळी कोलते व कापसे यांच्यात झटापट झाला. त्यातून कापसे याने तीक्ष्ण हत्याराने कलते यांचा खून केला होता. त्यामुळे नगर जिल्हा पोलीस हादरले होते.
व्हीएस न्युज - शहरातील वंजारगल्ली परिसरात दोन हजार रुपयांच्या बनावट चलनी नोटांची निर्मिती होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आज रात्री पोलीस उपाध्यक्ष संदीप मिटके यांच्या पथकाने छापा टाकून दोघांना अटक केली आहे.
दोन हजार रुपयांच्या बनावट चलनी नोटांची निर्मिती केली जात असल्याची माहिती उपाधीक्षक मिटके यांना मिळाली होती. त्यावरून त्यांच्या नेतृत्वाखालील पोलिस पथकाने एका घरावर छापा टाकला. तेथे दोन हजार रुपयांच्या तब्बल चाळीस हजार मूल्यांच्या नोटा सापडल्या.
बनावट नोटांची निर्मिती करण्यासाठी वापरले जाणारे प्रिंटर, संगणक, कागद व इतर साहित्य पोलिसांनी हस्तगत केले आहे. तेथून दोघांना ताब्यात घेतले असून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
अनेक दिवसांपासून वंजारगल्लीत दोन हजार रुपयांच्या बनावट नोटा तयार केल्या जात असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.
व्हीएस न्युज - जातीपातीचे बंध झुगारुन आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्याला अडीच लाख रुपये देण्याची घोषणा सरकारने केली आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी यासंदर्भात घोषणा केली.
‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशातून जातीव्यवस्थेचा समूळ नायनाट करण्यासाठी आंतरजातीय विवाह हा सर्वात प्रभावी उपाय असल्याचे सांगितले होते. मात्र त्या प्रमाणात आंतरजातीय विवाह होताना दिसत नाही. समाजातील अंधश्रद्धा, जातीय वाद, सरंजामी रुढी-परंपरा, जातपंचायतीच्या नावाची बंधने समाजातून नष्ट करण्यासाठी केवळ आंतरजातीय विवाह हाच पर्याय आहे. त्यामुळे आम्ही आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देण्यासाठी अडीच लाख रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे’ असे बडोले म्हणाले. आतापर्यंत, आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देण्यासाठी शासनाकडून ५० हजार रुपयांचे अर्थसाहाय्य दिले जात होते. पुण्यातील कोरेगाव पार्कमध्ये एपीजे अब्दुल कलाम आझाद स्मारकात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात राजकुमार बडोलेंनी ही घोषणा केली.
यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ‘सावित्रीच्या लेकीं’चा सामाजिक न्याय मंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. आंतरजातीय विवाहातून होणाऱ्या हत्यांच्या घटना सुरु आहेत. या कुप्रथांच्या विरोधात संघर्ष तीव्र करण्याची गरजही बडोलेंनी व्यक्त केली. पहिला सामुदायिक आंतरजातीय विवाह सोहळा फेब्रुवारी महिन्यात मोठ्या प्रमाणावर घेण्यात येईल. या सोहळ्यात येऊन संबंधित जोडप्याने विवाह करावा, असे आवाहन राजकुमार बडोलेंनी केले.
आंतरजातीय विवाह कायद्यात बदल करण्याचा विचारही यावेळी बडोलेंनी बोलून दाखवला. आंतरजातीय विवाह केल्यानंतरच्या घटनांचा मागोवा घेतला तर हत्येसारख्या घटनांपासून त्यांच्या अपत्यांना कायदेशीर संरक्षण, पोलिस मदत अशा बाबींचा समावेश या कायद्यात करणार आहोत. भावी काळात आंतरजातीय विवाहांना विशेष प्रोत्साहनाच्या योजना, शासकीय लाभ, अपत्यांना काही सवलती अशा बाबींचा समावेश करण्याचा मानस आहे. यासंबंधीच्या कायद्याचा मसूदाही तयार असल्याचे ते यावेळी म्हणाले.
व्हीएस न्युज - सालाबादप्रमाणे २०१८मध्येही लाचखोरीत महसूल विभागाने पहिला क्रमांक पटकावला. विशेष बाब ही की या विभागातील अधिकारी तीन कोटी सहा लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले गेले. ही रक्कम शासनाच्या उर्वरित विभागांमधील लाचखोर अधिकाऱ्यांनी स्वीकारलेल्या लाचेच्या ६९ टक्के आणि २०१७च्या तुलनेत सहा पटीने जास्त आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने(एसीबी) २०१८मध्ये राज्यभर ८८४ सापळे रचले. त्यात शासनाच्या विविध विभागातल्या अधिकाऱ्यांसह ११७० आरोपींना चार कोटी ४३ लाख ८६ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली. यापैकी २५ टक्के म्हणजे २१७ सापळे महसूल विभागातील अधिकाऱ्यांसाठी लागले. त्यात या विभागाच्या अधिकाऱ्यांसह २७३ आरोपी तीन कोटी सहा लाख १४ हजार रुपयांची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ सापडले.
शासनाच्या अन्य कोणत्याही विभागापेक्षा महसूल आणि पोलीस खात्याशी नागरिकांचा रोजच्या जीवनात सर्वाधिक संबंध येतो. त्यामुळे एसीबीकडून रचलेल्या सापळ्यांमध्ये हे दोन विभाग सातत्याने पहिल्या, दुसऱ्या क्रमांकांवर असतात. "खाओ और खाने दो वाली" भूमिका पोलिस खात्याने पत्करल्याने लाचखोरीत दुसरा क्रमांक पटकाविण्याची शक्यता नाकारता येत नाही. गेल्या काही वर्षांमध्ये मात्र महसूल विभाग लाचखोरीत पहिल्या क्रमांकावर आहे.
२०१५मध्ये महसूल विभागाचे ३२१ अधिकारी ३५.१५ लाख, २०१६मध्ये २३७ अधिकारी ७३.७७ लाख तर २०१७मध्ये २२८ अधिकारी ५२.२९ लाख रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीने रंगेहाथ पकडले. २०१८मध्ये महसूल विभागातील २२७ अधिकारी अन्य ४६ सहकाऱ्यांसह लाच स्वीकारताना गजांआड झाले. ही आकडेवारी पाहता गेल्या काही वर्षांच्या तुलनेत लाच मागणाऱ्या अधिकाऱ्यांची संख्या कमी असली तरी त्यांनी मागितलेली लाचेची रक्कम मात्र सहा पटीने वाढल्याचे दिसते. महसूल विभातील अधिकाऱ्यांनी आवाज वाढवल्याने शासनाच्या एकूण लाचखोर अधिकाऱ्यांनी मागितलेली लाचेची रक्कम २०१७च्या तुलनेत दुप्पटीवर गेल्याचे चित्र आहे.
२०१८मध्ये लाचखोर पोलिसांसाठी एसीबीने १९५(२२ टक्के) सापळे रचले. त्यात पोलिसांसह २५८ आरोपी २४ लाख ६६ हजार रुपयांची लाच स्वीकारताना अटक झाले. ही रक्कम एकूण रकमेच्या सहा टक्के आहे. असे असले तरी कारवायांचे प्रमाण जास्त असल्याने महसूल विभागानंतर लाचखोरीत पोलिसांचा दुसरा क्रमांक आहे.
व्हीएस न्युज - नववर्षाचे स्वागत करण्यासाठी जळगावमधील भाजपाशी संबंधित एका नगरसेवकाच्या फार्म हाऊसवर रंगलेली पार्टी चर्चेचा विषय ठरली आहे. या पार्टीवर छापा टाकून पोलिसांनी 18 पुरुष आणि सहा महिलांना ताब्यात घेतले असले तरी या कारवाईवरुन पोलिसांवर राजकीय दबाव आल्याचीही चर्चा आहे. तब्बल 18 तासांनी पोलिसांनी सर्वांना न्यायालयात हजर केले. न्यायालयाने सर्वांची जातमुचलक्यावर सुटका केली आहे.
भाजपाशी संबंधित नगरसेवकाचे ममुराबाद रस्त्यावरच्या शेतात घर आहे. या ठिकाणी ‘थर्टी फर्स्ट’ निमित्त साग्रसंगीत पार्टी आयोजित करण्यात आली होती. या पार्टीत मुजरा करण्यासाठी बऱ्हाणपूर येथून सहा तरुणींना बोलावण्यात आले होते. जळगाव, पाळधी, बऱ्हाणपूर येथील उच्चभ्रू वर्गातील 18 जण या पार्टीत सहभागी झाले होते. या पार्टीवर पोलीस उपअधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी पथकासह छापा टाकला.
पोलिसांनी सहा महिला व 18 पुरुषांना ताब्यातही घेतले. सर्वांना घेऊन पोलिसांचे पथक मंगळवारी सकाळी ६ वाजता तालुका ठाण्यात पोहोचले. मात्र, तोवर या प्रकरणात पोलिसांवर दबाव वाढला. 18 जण उच्चभ्रू वर्गातील असल्याने राजकीय दबाव येत होता. यानंतर दिवसभर पोलीस आणि राजकीय पुढाऱ्यांच्या बैठकांचे सत्र सुरु होते, असे सूत्रांनी सांगितले. अखेर मंगळवारी रात्री नऊ वाजता न्यायालयाने वैयक्तिक जात मुचलक्यावर सर्वांची सुटका केली.
दिलिप पाटील (वय ५४), तरूण रंगलानी (वय ४३), भारत तलरेजा (वय ३२), मुन्ना बारेला, लाला बारेला, नाना बारेला, नितीन वाणी (वय ३२), सर्फराज शेख (वय २३), विशाल वर्मा (वय ३८), प्रवीण जैन (वय ३७ ), राजेश माहेश्वरी (वय ३७), कमलाकर बनसोडे (वय ४०), चंद्रकांत खडके (वय ५२), प्रशांत अग्रवाल (वय ३७), दिलीप रंगलानी (वय ३१), करीम खान अयुब खान (वय २८), गिरीश लाहोटी (वय ३४), सय्यद जावेद सय्यद मतिन (वय २३) यांच्यासह सहा तरुणांनीही पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
व्हीएस न्युज - राज्याच्या तिजोरीत निधीची कमतरता आहे अशी चर्चा असताना फडणवीस सरकारने भाजपाच्या दोन नेत्यांचे 59 लाख रुपये माफ केल्याची माहिती समोर आली आहे. माहितीच्या अधिकारात ही माहिती समोर आली आहे असे माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी म्हटले आहे. न्यूज 18 लोकमत या वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.
डॉ. विजयकुमार गावित यांचे 43 लाख 84 हजार रुपये आणि एकनाथ खडसे यांचे 15 लाख 49 हजार रुपये माफ करण्यात आल्याचे गलगली यांनी स्पष्ट केले. तशा सूचनाही सार्वजनिक बांधकाम खात्याला देण्यात आल्या आहेत. एकनाथ खडसे मंत्री असताना रामटेक या बंगल्यावर राहात होते. तर विजय कुमार गावित हे आघाडी सरकारच्या काळात सुरुची या सदनिकेत राहात होते.
एकनाथ खडसेंनी मंत्रीपद सोडल्यावरही काही दिवस बंगला रिक्त केला नाही. त्या संपूर्ण कालावधीचे भाडे 15 लाख 49 हजार 974 रुपये होते. तर विजय कुमार गावित यांच्या सदनिकेचे 43 लाख 84 हजार 500 रुपये भाडे थकीत होते. या दोन्ही नेत्यांनी हे भाडे माफ करण्याची विनंती केली. विशेष बाब म्हणून या दोन्ही नेत्यांचे थकीत भाडे माफ करण्यात आले.
व्हिएस न्युज - कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या टोळीतील एका गँगस्टरला तब्बल 21 वर्षांनी अटक करण्यात आली आहे. मोहम्मद अहमदखान महाडिक (57) असे या गँगस्टरचे नाव असून खून, खंडणीसारखे अनेक गंभीर गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. ठाण्यातील मुंब्रा येथून त्याला अटक करण्यात आली आहे.
महाडिक याने 1991मध्ये हैदर नावाच्या व्यक्तीचा खून केला होता. त्याला अटकही झाली होती. मात्र 1998मध्ये जामिनावर सुटल्यानंतर तो कर्नाटकात फरार झाला होता. तेव्हापासून पोलीस त्याचा शोध घेत होते पण तो पोलिसांच्या हाती लागला नाही. त्यानंतर 2001 मध्ये नाव बदलून पठाण युसुफखान उस्मान या नावाने बनावट पासपोर्ट तयार करून तो देश सोडून गेला आणि 17 वर्ष मस्कतमध्ये राहिला. आठ महिन्यापूर्वीच तो मुंब्रा कौसा येथील अमरेशपार्क इमारतीत पत्नीसह राहण्यास आला होता.
‘आम्हाला महाडिक मुंबईत परतल्याची कुणकुण लागली होती, तो मुंब्र्यात पत्नीसह राहत असल्याची माहिती मिळताच त्याला अटक करण्यात आली’ अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी दिली. नितीन ठाकरे यांच्या पथकाने सोमवारी महाडिक याला बनावट पासपोर्टसह मुंब्र्यातून अटक केली.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002