व्हिएस न्युज - अभिनेता इरफान खान यांचं निधन हे भारतीय चित्रपटसृष्टी, कलाजगतासाठी मोठा धक्का आहे. त्यांच्या अकाली निधनानं एक दमदार अभिनेता, संवेदनशील माणूस, लढाऊ व्यक्तिमत्वं आपण गमावलं आहे. सहजसुलभ अभिनयातून साकारलेल्या विविधांगी व्यक्तिरेखांमुळे इरफान खान कायम रसिकांच्या स्मरणात राहतील, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना आदरांजली वाहिली.
अभिनेता म्हणून इरफान खान निश्चितच महान होते. त्यांनी साकारलेल्या विविधांगी भूमिका त्यांच्या अष्टपैलू अभिनय कौशल्याची साक्ष देतात. कॅन्सरसारख्या आजारावर मात करुन त्यांनी त्यांच्यातला लढाऊपणा दाखवून दिला होता, परंतू आज अचानक आलेली त्यांच्या निधनाची बातमी ही माझ्यासारख्या असंख्य चित्रपट रसिकांसाठी, त्यांच्या चाहत्यांसाठी अत्यंत क्लेशदायक आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो, असे उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्या शोकसंदेशात म्हटले आहे.
व्हिएस न्युज - देहविक्रय करून उदरनिर्वाह करणाऱ्या महिलांच्या समस्यांकडे एरवी समाजाचे लक्ष जात नाही. या व्यवसायात नाईलाजाने आलेल्या महिलांची परिस्थिती सुधारण्यासाठी, त्यांना सन्मानाचे जीवन जगता यावे यासाठी महिला व बालविकास विभाग प्रयत्न करतो. सध्याच्या ‘कोविड-19’ परिस्थितीत लॉकडाऊनमुळे या महिलांचे उत्पन्न बंद झाल्याने कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीत महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी विभागाच्या सर्व जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांना सूचना देऊन देहविक्रय व्यवसायातील महिलांना अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तू तसेच व्यक्तिगत स्वच्छता साधने पुरविण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार आतापर्यंत राज्यातील या व्यवसायातील सुमारे साडेबारा हजार महिलांपर्यंत पोहोचत त्यांच्या पोटापाण्याची व्यवस्था राज्य शासनाने केली आहे.
लॉकडाऊनमुळे संपूर्ण समाजालाच अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. विशेषतः हातावर रोज काम केल्याशिवाय उदरनिर्वाह होऊ न शकणारे मजूर, कारखान्यातील, बांधकामावरील मजूर आदींच्याबाबतीत दोन वेळच्या अन्नाचा प्रश्न निर्माण झाला. देहविक्रय करणाऱ्या महिलांपुढेही गंभीर समस्या उभी राहिली आहे. हे लक्षात येताच मंत्री श्रीमती ठाकूर यांनी तात्काळ विभागाच्या सचिव, महिला व बालविकास आयुक्त आदींसह व्हिडिओ कॉन्फरन्स घेऊन जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांना या महिलांना मदत उपलब्ध करून देण्यासाठी यंत्रणा त्वरित गतिमान करण्याचे निर्देश दिले. या कामात स्वयंसेवी संस्थांनीही शासनासोबत काम करत खूप चांगले सहकार्य केले आहे.
मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, अहमदनगर या शहरात देहविक्रय व्यवसायातील महिला मोठ्या संख्येने आहेत. मुंबई शहर जिल्ह्यातील कामाठीपुरा, फोकलँड, खेतवाडी, सिप्लेक्स बिल्डिंग, अँटॉप हिल, पारस रोड, दामोदर मॅन्शन या क्षेत्रात देहविक्रय करणाऱ्या महिला राहत आहेत. या महिलांच्या मुलांसाठी दिवसरात्र खुली निवारागृहे चालविली जात आहेत. शासनासोबतच १५-१६ सामाजिक संस्था त्यांच्यासाठी काम करत असून महानगरपालिकेमार्फत अन्नाचे डबे त्यांच्यापर्यंत पोहोचविले जात आहेत. या महिलांना पुढील १५ दिवस पुरेल इतके अन्नधान्याचे (रेशन) किट पुरविण्यात आले असून त्यानंतरही महिनाभराचे रेशन पुरविण्याबाबत नियोजन करण्यात येत आहे. त्याचबरोबर सॅनिटायजर्स, सॅनिटरी किट, सोया बिस्किटे व इतर खाद्य वस्तू या वस्त्यांमध्ये पुरविण्यात येत आहेत. अन्नधान्य पुरवठ्यासाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महानगरपालिकेच्या वतीने मोफत सुलभ शौचालयांची व्यवस्था करण्यात आली आहे. ‘एचआयव्ही’ग्रस्त महिलांसाठी ‘एआरटी’ उपचारपद्धती सुरू असून नियमितपणे औषधे पुरविण्यात येत आहेत.
पुणे जिल्ह्यात सुमारे २ हजार ५०० महिला देहविक्रय व्यवसायात असून त्यांच्यासाठी काम करणाऱ्या १२-१३ संस्थांनी पोलिसांच्या मदतीने त्यांच्यापर्यंत अन्नधान्य, रेशन किट, सॅनिटरी किट पोहोच केले आहे. फरासखाना पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी या मदत कार्यात विशेष भूमिका बजावली आहे. तसेच आरोग्य विभागाकडून नियमित आरोग्य तपासणी केली जात आहे. बुधवार पेठमध्ये देहविक्रय करणाऱ्या महिलांच्या मुलांची संख्या मोठी असून त्यांच्यासाठी शासकीय दूध योजनेतून दुधाचा पुरवठा करण्यात येत आहे. यासाठी कात्रज दूध संघाने मदत केली आहे. ‘सहेली’ संस्थेने येथील महिलांचे मोबाईल रिचार्ज केले असून त्यामुळे त्यांना आपल्या कुटुंबाशी संवाद साधता येत असल्याने मानसिक स्वास्थ्य चांगले राहण्यासाठी त्याची मदत झाली आहे.
नाशिक, अहमदनगर, नागपूर आदी मोठ्या शहरांसोबतच सर्वच जिल्ह्यात या महिलांसाठी रेशन किट वाटप, सॅनिटरी किट वाटप आदी उपक्रम सुरू असून अनेक स्वयंसेवी संस्था तसेच या महिलांच्या मुलांसाठी चाईल्डलाईन संस्था काम करत आहे. काही जिल्ह्यात नोंदणी नसलेल्या छुप्या पद्धतीने देहविक्रय व्यवसायात महिला असून त्यांनाही मदत मिळावी यासाठी महिला व बालविकास विभाग अन्य शासकीय यंत्रणा तसेच स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून प्रयत्न करत आहे. या व्यवसायातील शिधापत्रिका नसलेल्या महिलांनाही शासनाच्या वितरण व्यवस्थेमार्फत रेशन पुरवठा व्हावा यादृष्टीने पाठपुरावा सुरू आहे.
व्हिएस न्युज - दि. २७ – सध्या कोरोना विषाणू संसर्गामुळे राज्यात 24 मार्च 2020 पासून टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे काष्ठ व्यापाऱ्यांना विहित कालावधीत त्यांनी खरेदी केलेला माल (वनोपज) शासकीय आगारातून हलविणे तसेच विभागातील कर्मचाऱ्यांच्या मर्यादित उपस्थितीमुळे आवश्यक त्या परवानग्या घेणेही शक्य होत नाही. म्हणून काष्ठ व्यापाऱ्यांनी टाळेबंदीपूर्वी (24 मार्च 2020 पूर्वी ) खरेदी केलेल्या वनोपजावरील व्याज व शिक्षार्थ जमीन भाडे माफ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे अशी माहिती वनमंत्री संजय राठोड यांनी दिली आहे.
या निर्णयानुसार टाळेबंदीपूर्वी झालेल्या लिलावातील वनोपजाकरिता (इमारती लाकूड, बांबू ,जळाऊ लाकूड) टाळेबंदी कालावधी हा शून्य कालावधी (zero period ) म्हणून गणला जाणार आहे व त्या काळात कोणत्याही प्रकारचे दंड,व्याज व जमीन भाडे आकारण्यात येणार नाही असेही या निर्णयात म्हटले आहे. मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्य सरकारांनी घेतलेल्या निर्णयाप्रमाणेच राज्यातील वन विभागाने हा निर्णय घेतला आहे अशीही माहिती वनमंत्र्यांनी यावेळी दिली.
दि.15 जानेवारी 2020 च्या शासन निर्णयानुसार व्यापाऱ्यांना लिलावाच्या दिनांकापासून किंवा प्राधिकाऱ्याने बोली मान्य केल्याचे कळविल्याच्या दिनांकापासून 7 दिवसाच्या आत विक्री मूल्याची 25 टक्के रक्कम वस्तू व सेवा कर कायद्यानुसार भरणे आवश्यक होते. तसेच त्यानंतर झालेल्या विलंबाबद्दल दरसाल 18 टक्के दराने व्याज जीएसटीच्या रकमेसह द्यावे लागणार होते. परंतु वनविभागाने घेतलेल्या या निर्णयामुळे राज्यातील काष्ठ व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
व्हिएस न्युज - कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या कालावधीत, सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत कार्यरत हेल्पलाईन कक्षाकडे शिधापत्रिकेवर मिळणाऱ्या धान्याच्या अनुषंगाने आवश्यक ते मार्गदर्शन व त्या अनुषंगिक तक्रारी यांच्याकरिता खालील क्रमांकावर सकाळी 10.00 ते सायंकाळी 06.00 वाजेपर्यंत नागरिकांना संपर्क करता येईल.
1) निशुल्क क्रमांक -1800224950
2) बी.एस.एन.एल/एम.टी.एन.एल. (ग्राहकांकरिता )-1967
3) 022-23720582
4) 022-23722970
5) 022-23722483
6) 022-23721912
(खालील क्रमांक कोविड 19 कालावधी पर्यंत कार्यरत राहतील तसेच सार्वजनिक व साप्ताहिक सुटीच्या दिवशी बंद राहतील)
7) 022-22023107
8) 022-22026048
व्हिएस न्युज
दि. २७ : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेने झोपडपट्टी व दाटीवाटीच्या वस्त्यांमध्ये आरोग्य तपासणीसाठी 350 पथके तयार केली असून या माध्यमातून गतीने आरोग्य तपासणी होणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली
डॉ. म्हैसेकर म्हणाले, पुणे शहरामध्ये गेल्या 10 ते 15 दिवसांपासून ज्येष्ठ नागरिक व ज्यांना इतर विकार आहेत जसे की, डायबेटीस, ब्लड प्रेशर, हृदयरोग, किडनी विकार किंवा अस्थमा अश्या वेगवेगळ्या विकारांमुळे मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिक आणि असे विकार असणाऱ्या व्यक्ती कोरोनाबाधित होवून तो रोग त्यांच्यासाठी जीवघेणा ठरत आहे. त्यामुळे पुणे महानगरपालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड यांच्या पुढाकारातून एक चांगला उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून झोपडपट्टी किंवा दाटीवाटीच्या वस्त्या आहेत, त्या भागात 350 पथके पाठविण्यात येत आहे. या पथकाकडे पल्सऑक्सीमीटर, थर्मोस्कॅनर देण्यात आले आहेत. या माध्यमातून विविध विकार असलेल्या रुग्णांचा तसेच ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांची ऑक्सीजन सर्क्यलेशन लेव्हल, त्यांचे विकार नियंत्रणात आहेत की नाही, आणि त्यांना संभाव्य कोविड रोग होत असेल तर त्यांना वेगळे करुन त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्याबाबतची मोहीम महानगरपालिकेने हाती घेतली आहे.
पुणे महानगरपालिकेने हाती घेतलेल्या या मोहिमेअंतर्गत आपल्या घरातील ज्येष्ठ तसेच इतर काही विकार असणाऱ्या व्यक्तीला तपासून वैद्यकीय सल्ल्यानुसार आपल्या घरात वेगळ्या रुममध्ये ठेवणे किंवा मनपाने सोय केलेल्या ठिकाणी ठेवणे आवश्यक आहे. कोरोना या रोगावर मात करण्यासाठी आपले सहकार्य महत्त्वाचे ठरणार आहे. 60 ते 70 टक्के लोकांना हा रोग जीवघेणा ठरत नाही, मात्र ज्येष्ठ नागरिकांच्या जिवाला धोका होऊ शकतो, त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेत या मोहिमेअंतर्गत त्यांची तपासणी करुन घ्यावी, असे आवाहनही विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी केले आहे.
सामान्य रुग्णांच्या उपचारासाठी खाजगी डॉक्टरांनी आपापले दवाखाने सुरू करण्याबाबत निर्देश देवूनही बहुतांशी डॉक्टरांनी अद्याप क्लिनीक सुरू केले नसल्याचे निदर्शनास आले आहे. तेव्हा वैद्यकीय अधिका-यांनी त्वरित हॉस्पिटल सुरू करून नागरिकांना सेवा उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केले.
व्हिएस न्युज - रायगडमधील उरण तालुक्यातील जासई येथे आई सुजादेवी आणि वडील गोविंद कुमार यांच्याबरोबर राहणारं अवघ्या 18 महिन्यांचं बाळ, नाव अम्रित गोविंद कुमार निषाद. दि. 12 एप्रिल रोजी या बाळाला ताप आल्याचं निमित्त झालं. आई-वडिलांनी जासईतल्या संजीवनी हॉस्पिटलमधील डॉक्टरांकडे नेलं. त्यांनी बाळाला तपासून दि.13 एप्रिल रोजी उरणच्या ग्रामीण रुग्णालयाला पाठविले. येथील शासकीय यंत्रणा तातडीने कामाला लागली, बाळाला तपासल्यानंतर त्याच्या जीवाला कोणत्याही प्रकारचा धोका नको म्हणून त्याच दिवशी कामोठे येथील एमजीएम इस्पितळात दाखल केले. सातव्या दिवशी म्हणजेच दि.20 एप्रिलला हे बाळ कोविड-19 च्या चाचणीत पॉझिटिव्ह आले. आरोग्य यंत्रणेने या बाळावर सात दिवस आवश्यक ते उपचार केले आणि सोमवार,दि.27 एप्रिल 2020 रोजी संध्याकाळी सहा वाजता अम्रित गोविंद कुमार निषाद, वय 18 महिने याला इस्पितळातून घरी सोडण्यात आले.
पहिल्या दिवसापासूनच रायगडच्या पालकमंत्री कु.आदिती तटकरे, जिल्हाधिकारी निधी चौधरी आणि त्यांचे सहकारी, पनवेल महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख आणि त्यांचे सहकारी, एमजीएम हॉस्पिटलची संपूर्ण टीम, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.प्रमोद गवई, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर मोरे, पनवेल कोविड हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.यमपल्ले आणि त्यांचे सहकारी, प्रांताधिकारी दत्तात्रय नवले, उरणचे तहसिलदार भाऊसाहेब अंधारे या सर्वांनी या बाळाला बरे करण्यासाठी प्रशासकीय, वैद्यकीय अशा सर्वच प्रकारचे शर्थीचे प्रयत्न केले होते.
आज या सर्वांच्या प्रयत्नांना यश मिळाले अन् हा बालयोद्धा करोना नामक महाभयंकर चक्रव्यूह भेदून यशस्वीपणे परत आला. त्याचं, त्याच्या आई-वडिलांचं सर्वांनी टाळ्या वाजवून अभिनंदन तर केलंच परंतु या बालयोद्ध्याने जगालाही संदेश दिला..
मुंबई दि. २८: टिकटॉक कंपनीने (बाईट डान्स (इंडिया) टेक्नॉलॉजी, प्रा. लि) कोविड विरुद्धच्या लढ्यात आपला सहभाग नोंदवला असून मुख्यमंत्री सहाय्यता निधीत ५ कोटी रुपयांची मदत जमा केली आहे. तसेच बँक ऑफ महाराष्ट्र कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस १ कोटी रुपयांची मदत दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या मदतीसाठी मनापासून धन्यवाद दिले आहेत.
टिकटॉक इंडियाचे प्रमुख निखील गांधी यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री कार्यालयात पत्र पाठवून कोविड १९ विरुद्धच्या त्यांच्या लढ्याची माहितीही कळवली आहे. ते म्हणतात की, मुंबई आणि महाराष्ट्रात टिकटॉकच्या कर्मचाऱ्यांची संख्या १ हजारावर असून राज्याप्रतीच्या सामाजिक दायित्वाची त्यांना जाणीव आहे. महाराष्ट्र पोलीस दलातील कर्मचाऱ्यांसाठी कंपनीने गृह विभागाला एक लाख मास्क उपलब्ध करून दिल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.
टिकटॉक वापरकर्त्यांपर्यंत कंपनीने कोविड १९ संदर्भातील माहिती ऑनलाईन पद्धतीने पोहोचवून जनजागृतीचे काम केले आहे. कोविड १९ युद्धात सहभागी होण्यासाठी टिकटॉक ॲपवर लाईव्ह डोनेशन जमा करण्याच्या व्यवस्थेसह या मदत कार्यात सहभागी होण्याचे आवाहन कंपनीकडून करण्यात येत आहे.
या जागतिक आपत्तीमध्ये जबाबदार कॉर्पोरेट सिटिझन म्हणून कोविड १९ विषाणू विरूद्धच्या लढ्यात सहभागी होण्यासाठी, सहकार्य करण्यासाठीच कंपनीने ही पाऊले उचलल्याचे श्री. गांधी यांनी म्हटले आहे.
बँक ऑफ महाराष्ट्र कर्मचाऱ्यांकडून १ कोटीची मदत
बँक ऑफ महाराष्ट्र कर्मचाऱ्यांच्या वतीने विजय कांबळे, जनरल मॅनेजर, मुंबई यांनी काल मुख्यमंत्री सहाय्यता निधीस १ कोटी रुपयांची मदत दिली. या रकमेचा धनादेश त्यांनी नुकताच मुख्यमंत्री कार्यालयात जमा केला.
कोविड १९ या विषाणूविरुद्धच्या लढ्यात आबालवृद्ध सहभागी होत आहेत. आज बँक ऑफ महाराष्ट्रच्या कर्मचाऱ्यांनीही यात सहभागी होत आपले योगदान दिले असून एक कोटी रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करण्यासाठी दिला आहे.
आतापर्यंत २८५ कोटींची मदत जमा
या मदतीसह आतापर्यंत मुख्यमंत्री सहाय्यता निधीत एकूण २८५ कोटी रुपयांची मदत जमा झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या मदतीसाठी बँक ऑफ महाराष्ट्रला आणि कर्मचाऱ्यांना मनापासून धन्यवाद दिले आहेत.
मुख्यमंत्री सहाय्यता निधीत रक्कम जमा करू इच्छिणाऱ्यांसाठी खात्याची माहिती खालीलप्रमाणे आहे.
इंग्रजीत-
Chief Minister’s Relief Fund-COVID 19
Savings Bank Account number 39239591720
State Bank of India,
Mumbai Main Branch,
Fort Mumbai 400023
Branch Code 00300
IFSC CODE- SBIN0000300
मराठीत-
मुख्यमंत्री सहाय्यता निधी-कोविड 19
बँकेचे बचत खाते क्रमांक- 39239591720
स्टेट बँक ऑफ इंडिया,
मुंबई मुख्य शाखा, फोर्ट, मुंबई 400023
शाखा कोड 00300
आयएफएससी कोड SBIN0000300
या देणग्यांना आयकर अधिनियम 1961 च्या 80 (G) नुसार आयकर कपातीतून 100 टक्के सूट देण्यात येते. या खात्यात सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा केले आहे.
दि २८: उत्तर प्रदेशमधल्या बुलंद शहर येथे दोन साधूंच्या झालेल्या हत्येबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी फोनवरून बोलून चिंता व्यक्त केली.
या अशा अमानुष घटनेविरुद्ध आम्ही सर्व तुमच्यासोबत आहोत असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राने अशा स्वरूपाच्या घटनेमध्ये ज्या रितीने तातडीने कठोर कायदेशीर कारवाई केली आहे, त्याचप्रकारे बुलंद शहर प्रकरणीदेखील दोषींना कडक शिक्षा होईल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. कोणीही या घटनांना धार्मिक रंग देऊ नये असे आवाहनही त्यांनी केले आहे.
व्हिएस न्युज - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालय आणि त्यासमोरील नवीन प्रशासकीय इमारतीतील कार्यालयांच्या निर्जंतुकीकरणासाठी उद्या दि. २९ व ३० एप्रिल रोजी मंत्रालयातील कामकाज बंद राहणार आहे, अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी दिली.
कोरोनामुळे महामारीची परिस्थिती उद्भवली आहे. त्यामुळे केंद्र शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार सार्वजनिक ठिकाणी तसेच कार्यालयांच्या निर्जंतुकीकरणाची प्रक्रिया स्पष्ट करण्यात आली आहे. त्यानुसार मंत्रालय आणि नवीन प्रशासकीय इमारतीतील सर्व कार्यालयांच्या निर्जंतुकीकरणाचे काम २९ व ३० एप्रिल रोजी करण्यात येणार आहे.
दि. २७: कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर खरीप हंगामासाठी राज्यातील शेतकऱ्यांना बियाणे, खते, किटकनाशके ( कृषि निविष्ठा ) त्यांच्या शेताच्या बांधापर्यंत पोहोचविण्यासाठी कृषी विभागाने नियोजन केले आहे. त्यासाठी कृषी सेवा केंद्र आणि शेतकरी गटांच्या माध्यमातून कार्यवाही करताना कृषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी गावपातळीवर समन्वयक म्हणून काम पाहा. कालबद्ध कार्यक्रम तालुकास्तरावर तयार करून दि. ३१ मे पूर्वी या निविष्ठांचा पुरवठा शेतकऱ्यांना होईल असे नियोजन करण्याचे निर्देश कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी आज दिले.
राज्यातील खरीप हंगामाच्या तयारीच्या दृष्टीने सर्व जिल्ह्यांच्या आढावा बैठका व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेण्यात आल्या आहेत. राज्यामध्ये कोरोना विषाणूच्या प्रार्दुभावामुळे सर्व जिल्ह्यांमध्ये असलेल्या संचारबंदीत शेतकऱ्यांना बियाणे, खते आणि कीटकनाशके यांचा पुरवठा वेळेत होणे आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेऊन कृषि विभागाच्या समन्वयाने कृषि निविष्ठांचा पुरवठा कृषि सेवा केंद्र आणि शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी यांच्यामार्फत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.यामुळे खरेदीसाठी कृषि सेवा केंद्रांवर शेतकऱ्यांची गर्दी होणार नाही आणि त्यामुळे विषाणूचा फैलाव रोखणे शक्य होईल,असे कृषि विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी सांगितले.
गाव पातळीवर कृषी निविष्ठा मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी त्यांच्या भागातील गटांकडे नोंदणी करावी. शक्यतो आत्मा अंतर्गत नोंदणी झालेल्या गटांकडेच नाव नोंदवावे. शेतकऱ्यांनी त्यांच्या नावासह संपूर्ण तपशील (पत्ता, गट नंबर, मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक, ज्या कृषि सेवा केंद्रामधुन निविष्ठा खरेदी कराययी त्याचे नाव आणि आवश्यक निविष्ठा) यांची मागणी गटाकडे नोंदवायची आहे. यासाठी क्षेत्रीय स्तरावरील कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी समन्वयक म्हणून काम पाहतील. सोबतच ते वाहतुकीकरता आवश्यक असणारे परवाने गटांकरीता उपलब्ध करून देतील.
शेतकरी गट प्रमुख नोंदणी नुसार बियाणे, खते, किटकनाशकांची खरेदी करतील. खरेदीच्या प्रक्रियेत पारदर्शकता असावी यासाठी कृषि अधिकारी कर्मचाऱ्यांनी व्हिडीओ कॉलद्वारे शेतकरी आणि कृषि निविष्ठा विक्रेत्यांमध्ये समन्वय घडवून आणतील. शेतकऱ्यांना वाजवी असणाऱ्या दरातच खरेदी करावी, अशा सूचना कृषि आयुक्त सुहास दिवसे यांनी कृषि सह संचालक, जिल्हा कृषि अधिक्षक यांना दिल्या आहेत.
व्हिएस न्युज - लॉकडाऊननंतर उद्योग विभागाने काही अटी व शर्तींसह उद्योग सुरू करण्यासाठी परवाने जारी केले असून २० ते २७ एप्रिल दरम्यान १३ हजार ४४८ उद्योगांना परवाने जारी करण्यात आल्याचे उद्योग विभागाने कळविले आहे.
केंद्र शासनाने २० एप्रिलपासून लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल केले व काही अटी शर्थींवर उद्योग सुरू करण्यासाठी परवानगी दिली आहे. केंद्राच्या मार्गदर्शक सूचना डोळ्यासमोर ठेवून उद्योग विभागाने उद्योग सुरू करण्यासाठी ऑनलाइन प्रक्रिया राबविली आहे. परवाने मिळवण्यासाठी आतापर्यंत २५ हजार अर्ज दाखल झाले असून अटी व शर्थींचे पालन करणाऱ्या सुमारे १३ हजार ४४८ उद्योगांना परवाने अदा करण्यात आले आहेत.
उद्योग सुरू करताना सामाजिक अंतर राखणे, कामगारांची कंपनी किंवा कारखान्याच्या आवारात राहण्याची सोय करणे, कामगारांचे दळणवळण टाळणे आदी सूचनांचे पालन करणाऱ्यांनाच परवाने दिले जात आहेत. वरील सूचनांचे पालन करण्याची तयारी असलेल्या उद्योगांना आतापर्यंत परवानगी दिली जात आहे.
दरम्यान, १७ एप्रिलपूर्वी सुमारे अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या ६ हजार ५८९ उद्योगांना परवाने दिले आहेत.
दरम्यान, मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, पनवेल, यासह बारा महानगरपालिका क्षेत्रात जिथे रेड झोन आहे, त्या ठिकाणी अद्याप उद्योग सुरू करण्यास परवानगी दिलेली नाही. उद्योग सुरू होणे काळाजी गरज आहे. यामुळे उद्योगचक्राला गती मिळेल, शिवाय कामगारांना रोजगार मिळेल, असा आशावाद उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज घेतलेल्या आढावा बैठकीत व्यक्त केला.
जळगाव, दि.२७ :- जिल्ह्यात कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता आपत्कालीन स्थिती उद्वभल्यास त्यास सामोरे जाण्यासाठी जिल्ह्यात ८ हजार बेडची व्यवस्था करण्यात आली असून कोरोनाच्या प्रतिकारासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याची माहिती पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. तसेच कापूस लागवडीबाबत कृषी मंत्री दादा भुसे यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे चर्चा केली असून १ मे ला जिल्ह्याच्या खरीप हंगामाचा आढावा घेण्यात येणार असल्याची माहितीगुलाबराव पाटील यांनी दिली.
अलीकडच्या काही दिवसांमध्ये जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर आणि कापूस लागवड संदर्भात आज पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी संबंधित विभागाच्या अधिका-यांकडून अजिंठा शासकीय विश्रामगृहात आढावा घेतला.
यावेळी जिल्हा रूग्णालयाचे शल्य चिकित्सक डॉ.एन.एस.चव्हाण, शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. बी.एस.खैरे, जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पाटोडे, कृषी विभागाचे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, कृषी उपसंचालक अनिल भोकरे, जिल्हा परिषदेचे जिल्हा कृषी अधिकारी वैभव शिंदे यांची उपस्थिती होती.
गेल्या आठवड्यापासून अमळनेर आणि भुसावळ तालुक्यात कोरोनाबांधितांची संख्या वाढत असल्याचे दिसून आले आहे. तर मालेगावमुळे चाळीसगाव तालुक्यालाही संसर्गाचा धोका संभवत असल्याने या तीनही तालुक्याच्या सिमा अत्यावश्यक सेवा वगळून इतरांसाठी बंद झाल्या पाहिजे अश्या सुचना देण्यात आल्या. भविष्यात कोरोनाग्रस्तांच्या सुविधेसाठी जिल्ह्यात एकुण ८ हजार बेडची व्यवस्था जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आली आहे. तालुक्यातील प्रत्येक ग्रामीण रूग्णालयात आयसोलेशन वार्डची सुविधा उपलब्ध करून दिली असून तालुका प्रशासन यासाठी सज्ज आहे. तसेच जिल्ह्यास जास्तीत जास्त पीपीई किट उपलब्ध व्हावे यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे ना. गुलाबराव पाटील यांनी यावेळी सांगितले.
व्हेंटीलेटरसाठी मदतीचे आवाहन
याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, संशयितांचे रिपोर्ट लवकरात लवकर उपलब्ध व्हावे यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. कोरोना विषाणू संसर्ग तपासणीसाठी प्रयोगशाळेचे काम ८० टक्के पुर्ण झाले असून त्यासंबंधित मशीनरी येताच संशयित कोरोनाग्रस्तांचे स्वॅब तपासणीची सोय जिल्ह्यातच कार्यन्वित होईल. जिल्ह्यात कोरोनाच्या रूग्णांसाठी व्हेंटीलेटरची आवश्यकता असल्याने जिल्ह्यातील दानशुर व्यक्तींनी पुढे येवून रूग्णांसाठी व्हेंटीलेटरची व्यवस्था करण्यास मदत करावी. असे आवाहनही पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले आहे.
२५ मे नंतर लागवड करावी
राज्याचे कृषीमंत्री ना. दादाजी भुसे यांच्याशी कापूस बियाणे उपलब्धतेविषयी व लागवडी बाबत बोलणे झाले आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्या दरम्यान जिल्ह्यातील मान्यताप्राप्त कृषी केंद्रांवर शेतकर्यांसाठी कापूस बियाणे उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती कृषीमंत्री भुसे यांनी दिली. शेतकर्यांना कापुस बियाणे जरी लवकर उपलब्ध झाली तरी बागायती कापुस लागवड २५ मे नंतरच करावी. कारण मे महिन्याच्या मध्यावधीत तापमान ४५ ते ४७ अंश से. पर्यंत असते, त्यामुळे जास्त तापमानात लागवड केल्यास बियाण्याची उगवण क्षमतेची टक्केवारी कमी होते. उगवले तरी नवीन अंकुर वाळुन प्रती हेक्टरी झाडांची संख्या कमी होते. यामुळे मुळांची वाढ समाधानकारक होत नाही. पाने लाल होऊन झाडांची वाढ खुंटते व मर रोगाचा प्रादुर्भाव होतो, त्यामुळे उत्पन्नात घट होते. त्याचप्रमाणे लवकर लागवड केल्यास गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील म्हणाले.
मान्यताप्राप्त कृषी केंद्रांवरूनच खरेदी करा
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असल्याने सर्वत्र लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. असे असले तरी जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांनी बियाणे, खते, पुर्व मशागत, ठिबक संचाची जोडणी इ. कामांचे चांगले नियोजन मे महिन्यात करुन २५ मे नंतरच कापुस बियाण्यांची लागवड करावी. त्यामुळे आपला उत्पादन खर्च सुद्धा वाचेल व गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव कमी होऊन चांगले उत्पन्न मिळेल. यासाठी शेतकर्यांनी नकली बियाणांच्या आहारी न जाता मान्यताप्राप्त कृषी केंद्रावरून कापसाचे बियाणे खरेदी करावे, असे आवाहन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले आहे.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002