व्हीएस न्युज - पिंपरी-चिंचवड शहरात खुलेआम सुरु असलेल्या अवैध धंद्यांमुळे तरुण पिढी वाहवत चालली आहे. ज्या ठिकाणी अवैध धंदे सुरु आहेत, त्या परिसरातील महिलांना घराबाहेर पडणे जिकीरीचे झाले आहे, त्यामुळे शहर उपनगरांतील अवैध धंद्यांना आळा घालावा. अन्यथा प्रजासत्ताक दिनानंतर आंदोलन छेडण्याचा इशारा छावा मराठा संघटनेतर्फे देण्यात आला आहे.
छावा मराठा संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ जाधव यांनी पोलीस आयुक्तांना शहर व उपनगरांतील अवैध धंदे बंद करण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यासंदर्भात निवेदन दिले आहे. तसेच राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, गृहराज्यमंत्री रणजीत पाटील, डीजीपी पडलसगीकर यांनाही निवेदन पाठविण्यात आले आहे.
या निवेदनात रामभाऊ जाधव यांनी म्हटले आहे, की पिंपरी-चिंचवड शहरासाठी नव्याने पोलीस आयुक्तालयाची निर्मिती झाली. पोलीस आयुक्तांनी सुरुवातीला अवैध धंद्यांविरोधात उघडलेल्या मोहिमेमुळे नागरीकांमधून आनंदाचे वातावरण होते. मात्र, काही दिवसात ही कारवाई थंडावल्यामुळे पुन्हा अवैध धंद्यांनी डोके वर काढले. शहरातील कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी, गुन्हेगारी आटोक्यात राहावी, अवैध धंदे चालू नयेत, हा स्वतंत्र पोलीस आयुक्तालय निर्मितीमागील उद्देश होता. मात्र, सद्यस्थितीला या उद्देशालाच हरताळ फासण्याचा प्रकार शहर परिसरात सुरु आहे. प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत सध्या अवैध धंद्यांचा सुळसुळाट झाला आहे. किराणा मालाची दुकाने थाटल्याप्रमाणे जुगाराचे आणि मटक्याचे अड्डे सुरु झाले आहेत. प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत वसूलदार म्हणून नेमलेले पोलीस या अवैध धंद्यांना परवानगी देत सुटले आहेत. प्रत्येक अधिकार्याचा हिस्सा ठरविल्याचे सांगून लाखोंची वसुली चालू आहे, असा आरोपही रामभाऊ जाधव यांनी निवेदनात केला आहे.
निगडी आणि चिखली पोलीस ठाण्यांतर्गत परिसरात पानटपरीवाल्यांकडून शिवीगाळ व मारहाण करून वसुली करीत आहेत, असेही निवेदनात म्हटले आहे. शहर परिसरातील अवैध धंदे तात्काळ बंद करून नागरीकांना दिलासा द्यावा व तरुण पिढीला बिघडण्यापासून रोखावे. अवैध धंद्यांवर येत्या 25 जानेवारीपर्यंत कारवाई न झाल्यास प्रजासत्ताक दिनानंतर रस्त्यावर उतरून छावा संघटनेच्या स्टाईलप्रमाणे आंदोलन करण्यात येईल. यावेळी होणार्या नुकसानीला आपण जबाबदार असाल, असेही रामभाऊ जाधव यांनी पोलीस आयुक्तांना निवेदनाद्वारे सांगितले आहे.
व्हीएस न्युज - दोषी ठरलेल्या स्वस्त धान्य दुकानदाराचा परवाना बहाल केल्याप्रकरणी मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने गिरीश बापट यांच्यावर ताशेरे ओढले आहेत. मंत्री हे जनतेचे विश्वस्त आणि रक्षक असतात. मात्र, त्यांनी कर्तव्यपालनात कसूर केल्याचे या प्रकरणात स्पष्ट दिसते. गिरीश बापट यांनी पदाचा गैरवापर करुन आणि कायद्याची पायमल्ली करत अशा प्रकारचे अनेक आदेश पारित केले, असे ताशेरे हायकोर्टाने ओढले आहेत.
बीडमधील मुरंबी गावात राहणारे साहेबराव वाघमारे यांनी बिभीषण माने यांच्याविरोधात जिल्हाधिकारी व जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. माने यांचे स्वस्त धान्य दुकान असून ते शिधापत्रिकाधारकांना स्वस्त माल देत नाही व हा माल काळ्या बाजारात विकतात, असा आरोप त्यांनी केला होता. अंबाजोगाईच्या तहसीलदारांनी या प्रकरणाची चौकशी केली होती.
यात दुकानदार माने दोषी आढळल्याने त्यांचा परवाना रद्द करण्यात आला होता. जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीतही तो दोषी आढळल्याने हे प्रकरण शेवटी अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांच्याकडे पोहोचले. बापट यांनी दुकानदार माने याला आणखी एक संधी देत परवाना बहाल केला. ही संपूर्ण घटना २०१६ सालची होती. बापट यांच्या निर्णयाविरोधात साहेबराव वाघमारे यांनी अॅड. सिद्धेश्वर ठोंबरे यांच्यामार्फत हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती. याचिकेत बापट यांच्या निर्णयाला आव्हान देण्यात आले होते. हायकोर्टाने या याचिकेवर गुरुवारी निकाल दिला. हायकोर्टाने गिरीश बापट यांचा आदेश रद्द करत जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी दिलेला आदेश कायम ठेवण्याचा निर्णय दिला.
त्यामुळे या दुकानदाराचा परवाना रद्द झाल्याचे स्पष्ट झाले आहे. निकाल देताना हायकोर्टाने बापट यांच्यावर ताशेरे ओढले आहेत. मंत्रीमहोदयांनी कर्तव्यात कसूर केली असून त्यांनी परवाना बहाल का केला, असा प्रश्न हायकोर्टाने विचारला.
व्हीएस न्युज - पिंपरी चिंचवड शहरामध्ये विविध राज्यातुन तसेच जिल्ह्यातून नागरीक आपल्या कुटूबांचा उदरनिर्वाह करण्यासाठी वास्तव्यास आलेले आहेत. त्यात समाजातील वंचित व गोर-गरीब नागरिकांचा समावेश आहे. जे अंत्यविधीचा खर्चही भागवू शकत नाहीत. त्यांचासाठी महापालिकेने मोफत अंत्यविधीचा मागे ठराव केला होता. त्याची अंमलबजावणी करण्यात यावी, यासाठी शिवसेनेचे युवराज दाखले यांनी आयुक्तांना निवेदन दिले आहे.
मुंबई महानगरपालिका प्रांतिक अधिनियमानुसार राज्यातील नाशिक, अहमदनगर, मुंबई तसेच कोल्हापूर या ठिकाणच्या नागरीकांच्या अंत्यविधीचा खर्च महानगरपालिकेच्या वतीने केला जातो. याच धर्तीवर नागरीकांच्या अत्यंविधीचा खर्च करण्याचा ठराव आपल्या महानगरपालिकेत मंजुर केला आहे. माञ, या ठरावाची अंमलबजावणी आपल्या महानगरपालिकेच्या प्रशासनाकडुन केली जात नाही. त्यामुळे गोर-गरीब व सर्वसामान्य जनतेला अंत्यविधीच्या वेळी अनेक आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
याची आपण स्वत: गांभीर्याने दखल घेऊन, येत्या २१ दिवसांच्या आत सदरील ठराव अमलात आणण्याच्या सुचनावजा आदेश द्यावेत. अन्यथा शिवसेना स्टाईलने सर्वसामान्य जनतेला सोबत घेऊन, प्राथमिक स्वरूपामध्ये महानगरपालिकेच्या गेटवर अंत्यविधीचा कार्यक्रम केला जाईल. याकामी उद्भवणाऱ्या गोष्टींची जबाबदारी आपली व आपल्या प्रशासनाची राहील, असे या निवेदनात दाखले यांनी म्हटले आहे.
व्हीएस न्युज - तारा मोबाईल क्रेशेस संस्थेच्या २०१९ चा वार्षिक सांस्कृतिक समारंभ सिम्बायोसिस कॉलेज, विमान नगर येथील सभागृहात रविवार (दि. ६) जानेवारी रोजी संपन्न झाला. संस्थेच्या या वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे हे तिसरे पर्व आहे. दरवर्षी संस्थेच्या मुलांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी संस्था वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करीत आली आहे.
बांधकाम साईट वरील पुणे शहरातील संस्थेच्या १५ साईटस वरील ११५ मुलांनी हा कार्यक्रम सादर केला. या कार्यक्रमास मुलांचे भरभरून कौतुक करण्यास प्रमुख पाहुणे म्हणून जयप्रकाश श्रॉफ कुशल लेबर वेल्फेअर क्रेडाई-पुणे मेट्रो चे अध्यक्ष , कमांडर रुबीक बेरी, सी. ई. ओ. कुशल, समीर पारखी, लेबर वेल्फेअर क्रेडाई यांनी उपस्थिती लावली. त्याच बरोबर योगेश भोंगळे, सदस्य लेबर वेल्फेअर समिती, तंत्रज्ञान व्यवस्थापक पल्लवी कोठारी , विपणन व्यवस्थापक विनीत मुतालिक याही मान्यवरांनी मुलांची पाठ थोपटली. मुलांचा कार्यक्रम पाहून प्रमुख पाहुणे यांनी "तारे जमीन पर उतर आये है!" असे तारा मोबाईल क्रेशेस च्या मुलांबद्दल कौतुकाचे बोल उद्गारले. समीर पारखी आणि कमांडर बेरी यांनी कार्यक्रमाच्या आखणी आणि नियोजनाबाबत कौतुक केले तसेच समीर पारखी यांनी क्रेडाई पुणे मेट्रो च्या वतीने विशेष अभिनंदन केले. संस्थेच्या संचालक मंडळातील सर्व सदस्य अध्यक्षा मधुरा गोखले , डॉ निशा मुन्शी, शीतल पटवर्धन आणि संस्थेच्या अध्यक्ष म्हणून अनेक वर्षे कार्यभार सांभाळलेल्या फ्रेनी तारापोर यांनीही मुलांच्या सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होऊन उपस्थिती लावली.
संस्थेच्या प्रमुख कार्यकारी अधिकारी प्रणिता मडकईकर आणि त्यांची एकूण ५० जणांची टीम यांचे अविरत परिश्रम आणि संस्थेने नियुक्त केलेल्या नृत्य निर्देशक प्रसाद धावडे यांचाही इथे विशेष उल्लेख आणि कौतुक होणे अपरिहार्य आहे. या स्तुत्य उपक्रमाचे सर्वच स्तरातुन कौतुक होत आहे. संस्थेच्या या कार्यक्रमाचे वैशिष्ठ्य म्हणजे संस्थेच्या सर्वच टीम ने स्थलांतरित होणाऱ्या या मुलांच्या मदतीने महाराष्ट्राची लोकधारा यावर आधारित महाराष्ट्रची संस्कृती, ग्रामीण भागातील चित्र त्यांच्या नृत्यामधून सादर केली. तसेच स्थलांतरामुळे आणि आर्थिक परिस्थिती मुळे शिक्षणात येणाऱ्या अडथळ्यांबाबत आणि बालविवाहासारख्या अजूनही दिसून येणाऱ्या नाजूक विषयाची मांडणी सर्व प्रेक्षकांसमोर केले. वय, भाषा, संस्कृती या सर्वांचा अडसर दूर करून या मुलांनी नृत्य, नाटुकली सादर केली. मुलांच्या या कार्यक्रमाचे विशेष कौतुक म्हणजे या कार्यक्रमाचे सूत्र संचालन हि मुलांनीच केले.
या सर्व कलागुणांना वाव देताना संस्था मुलांना या संधी लहानपणापासूनच उपलब्ध करून देते. मुलांच्या सर्वांगिण विकासामध्ये संस्था स्वतः मुले, पालक, बांधकाम व्यावसायिक, प्रत्येक व्यक्ती आणि इतर व्यावसायिक समाज यांचा सहभाग आहे असे मानते. संस्थेच्या या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक मुलास आयुष्यात हि दुर्मिळ संधी मिळवून देण्यासाठी संस्था मुलांच्या बांधकाम साईट वरील डे केअर सेंटर मध्ये सर्वांगिण विकासास पोषक असा कार्यक्रम राबविते. संस्थेच्या आरोग्य, आहार, शिक्षण, खेळ आणि मनोरंजन या चार क्षेत्रातील कार्यक्रम हा मुलांच्या सर्वागीण विकासास पोषक ठरतो.
बांधकाम साईटवरील सतत भटकंती करणाऱ्या आणि अनेक दृष्टीने असुरक्षित असणाऱ्या या मुलांच्या सर्वागीण विकासाचे कार्य संस्था २००७ सालापासून अव्याहतपणे करीत आहे. संस्थेच्या या कामामध्ये मुलांच्या आरोग्यासाठी सकस आहार, वैद्यकीय तपासणी आणि त्यावरील उपचार, खेळ, पालकांसाठी सल्ला व मार्गदर्शन, शिक्षणासाठी शाळाप्रवेश, निरंतर शिक्षणासाठी सपोर्ट क्लासेस, वैयक्तिक मार्गदर्शन व सल्ला, कलागुणांची तोंडओळख होण्यासाठी संधी, क्रीडा व कला याना विशेष प्रोत्साहन, संगणक युगातील कौशल्य इत्यादी उपक्रमांचा समावेश होतो. संस्थेच्या या कार्यक्रमाची सुरवात जन्मापूर्वी पासून आवश्यक असणाऱ्या गर्भ संस्कारापासून ते मुलांच्या स्वावलंबन आणि सुजाण नागरिकत्वा पर्यंत आशा प्रवासाच्या स्वरूपात आहे.
संस्थेच्या या प्रवासात समाजातील हितचिंतक आणि सुजाण वाचक वर्ग यांना विविध उपक्रमांना आधार आणि त्यात सहभागी होण्याचे आवाहन करीत आहे. या कार्यात सहभागी होण्यास उत्सुक वर्गाने संस्थेच्या फेसबुक पेज ला आणि वेबसाईट ला भेट द्यावी .
संपर्कासाठी तारा मोबाईल क्रेशेस
पुणे:Taramobilechrechespune@gmail.com, 8380088833, 7722010794, 7722010795 www.taramobilecrechespune.org
वव्हीए न्युज - पोलीसनामा ऑनलाईन- पुण्यातील येरवडा परिसरात कुटुंबासमवेत राहणाऱ्या एका १३ वर्षाच्या शाळकरी मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना गुरुवारी घडली असून त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही.
विवेक मनोज जाधव (वय-१३ रा. जयप्रकाशनगर येरवडा) असे आत्महत्या करणाऱ्या मुलाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत विवेक हा येरवडा परिसरातील मोझे विद्यालयात इयत्ता आठवीमध्ये शिकत होता. काल सकाळी त्याची आई कामाला गेली होती तर वडील दुसऱ्या खोलीत झोपले होते. दरम्यान विवेक याने वरच्या खोलीत जाऊन ओढणीच्या सहाय्याने छताच्या लोखंडी अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केली. वडीलांना झोपेतून उठल्यावर वरच्या खोलीचा दरवाजा बंद दिसला. त्यांनी दरवाजा ठोठावला मात्र आतून काहीच प्रतिसाद येत नव्हता. अखेर वडीलांनी नागरिकांच्या मदतीने खोलीचा दरवाजा तोडला. खोलीत प्रवेश केला त्यावेळी विवेक याने गळफास घेतल्याचे दिसले. त्याला तातडीने खाली उतरवून रुग्णालायात नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषीत केले.
विवेक हा आई वडील व लहान भावासोबत गेल्या सहा महिन्यांपासून जयप्रकाशनगर येथे भाड्याने राहत होता. आई वडील दोघेही सिक्युरिटीचे काम करतात. ११ डिसेंबर २०१८ पासून तो शाळेत आलेला नव्हता. त्याचा लहान भाऊ त्याच शाळेत शिकतो.
तो आजारी असल्यामुळे शाळेत येत नव्हता अशी माहिती त्याच्या भावाने शिक्षकांना दिली होती. विवेक हा वर्गात हुशार होता. त्याने अचानक आत्महत्या कां केली याबाबत संभ्रम आहे. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी आत्महत्येची नोंद केली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सुशिल बोबडे करत आहेत.
व्हीएस न्युज - रस्त्याने पायी चाललेल्या एका तरुणाला चाकुचा धाक दाखवून लुटण्यात आले. ही घटना चिंचवड वाल्हेकरवाडी येथील मार्तड मल्हार हॉटेलच्या मागील बाजुस घडली. याप्रकरणी अमोल अजित विश्वास (वय २३, रा वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.त्यानुसार, तीन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अमोल हे चिंचवड वाल्हेकरवाडी येथील मार्तड मल्हार हॉटेलच्या मागील बाजुच्या रस्त्यावरुन पायी चालले होते. यावेळी दुचाकीवरुन आलेल्या तिघा चोरट्यांनी अमोल यांना चाकुचा धाक दाखवून धमकावले. तसेच त्याच्याजवळील ९ हजार ५०० रुपये किमतीचा मोबाईल आणि काही रोख रक्कम जबरदस्ती हिसकावून चोरुन नेली. चिंचवड पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.
व्हीएस न्युज – ठाणे येथील राज्य महामार्ग पोलीस उप अधीक्षक म्हणून कार्यरत असलेले श्रीकांत मोहिते यांची पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात सहायक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचा आदेश गुरुवार गृह विभागाने प्रसिध्द केला.
गृह विभागाने एकूण १८ बड्या पोलीस अधिकाऱ्यांच्या राज्यातील विविध ठिकाणी बदल्या केल्या आहेत. यामध्ये अपर पोलीस अधिक्षक, उप अधिक्षक, सहायक पोलीस आयुक्त, विभागीय पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात सहायक आयुक्त म्हणून नियुक्त करण्यात आलेले श्रीकांत मोहिते यांनी पूर्वी ठाणे येथे राज्य महामार्ग उप अधिक्षक म्हणून काम पाहिले आहे. यामुळे त्यांचा वाहतूक नियोजनात तगडा अनुभव असल्याचे बोलले जात आहे.
व्हीएस न्युज - देशी बनावटीचे पिस्तुल आणि एका जिवंत काडतुसासह तरुणाला भोसरीतील कै. अकुंशराव लांडगे सभागृह गेटच्या समोरुन अटक करण्यात आली आहे. ही कारवाई गुरुवारी (दि.३) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास गुन्हे शाखा युनिट १ च्या पथकाने केली.
रोहन सहदेव पाषणकर (वय २३, रा. नांदे म्हाळुंगे रोड, वाघजाई रोड, सर्व्हे नं.४९/१) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी तरुणाचे नाव आहे. त्याच्या विरोधात अवैधरित्या पिस्तुल बाळगल्या प्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी गुन्हे शाखा युनिट १ मधील पोलीस शिपाई सचिन मोरे यांना त्यांच्या खबऱ्याकडून माहिती मिळाली कि, एका तरुण भोसरीतील कै. अकुंशराव लांडगे सभागृह गेटच्या समोर पिस्तुल घेऊन उभा आहे. यावर पोलिसांनी तातडीने त्या ठिकाणी सापळा रचून रोहन याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ एक देशी बनावटीचे पिस्तुल आणि एका जिवंत काडतुस आढळून आले. पोलिसांनी ते जप्त करुन रोहनला अटक केली. पोलीस उपनिरीक्षक काळुराम लांडगे तपास करत आहेत.
व्हीएस न्युज - नगर रस्त्यावर येथील फिनिक्स मॉलजवळ पीएमपीच्या बसला शुक्रवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास आग लागली. येरवडा अग्निशामक दलाच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणली. परंतु, या आगीत बस पूर्णपणे जळून खाक झाली.
संबंधित बस चिखली येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये पासिंग करण्यासाठी नेण्यात आली होती. पण, बसमध्ये तांत्रिक त्रुटी असल्याने ही बस पासिंग चाचणीत अनुत्तीर्ण झाली होती. तेथून येत असताना फिनिक्स मॉलजवळ बसने पेट घेतला. ही बस वाहतुकीमध्ये नसल्याने तिच्यामध्ये फक्त चालकच होता. या आगीत बस पूर्ण जळाली असल्याची माहिती पीएमपी प्रशासनाने दिली.
याबाबत विमाननगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक दिलीप शिंदे म्हणाले, "ही बस सीएनजीवर चालणारी होती. नगर रस्त्यावरील फिनिक्स मॉलजवळ आली असता बसच्या पुढील भागातून अचानक धूर येऊ लागला आणि काही क्षणातच बसने पेट घेतला. बसचा पुढचा भाग फायबरचा असल्याने आग वाढली. आणि त्यानंतर ती संपूर्ण बसला लागली.'' बस चालकाने प्रसंगावधान राखत बस बाजूला घेतली आणि बाहेर उडी मारली.
अग्निशामक दलाने पंधरा मिनिटात आग अटोक्यात आणली. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
व्हीएस न्युज - आपली नक्कल करतो अशा गैरसमजातून एका शिक्षकाने विद्यार्थाला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. विद्यार्थ्याला मारहाण करणाऱ्या या शिक्षकाविरोधात विद्यार्थ्याच्या आईने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून याप्रकरणी गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. पिंपरी चिंचवडच्या मोशी येथील शाळेत ही घटना घडली.
सविस्तर माहिती अशी, शंकर महादेव खोचरे (वय १४) असे मारहाण झालेल्या विद्यार्थ्याचे नाव असून तो नूतन प्रशालेत इयत्ता ८ वीत शिक्षण घेत आहे. बुधवारी शेवटच्या हिंदी विषयाच्या तासाला शिक्षक कळसाईत हे वर्गात शिकवत होते. कळसाईत यांनी एका विद्यार्थीनीला आडनावाने हाक मारली, त्यानंतर पुन्हा तशीच हाक विद्यार्थ्यांमधून आली. यावर चिडलेले शिक्षक कळसाईत यांनी शंकरनेच आपली नक्कल केल्याचे समजून त्याला छडीने पाठीवर वळ उठेपर्यंत शिक्षा केली, यात शंकर गंभीर जखमी झाला आहे. तसेच शाळा सुटल्यानंतर शंकरला घरीही जाऊ दिले नाही, असे फिर्यादीत म्हटले आहे. घरी आल्यानंतर शंकरने आईला घडलेला प्रकार सांगितला. याप्रकरणी शंकरची आई बबिता खोचरे यांनी पोलिसांत फिर्याद दिली असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.
दरम्यान, मारहाण करणारे शिक्षक व्यंकटेश कळसाईत यांनी आपली बाजू मांडताना सांगितले की, वर्गात विद्यार्थांचा गोंधळ सुरू होता. एका विद्यार्थिनीला मी आडनावावरून शांत बसण्यास सांगितले. त्यावेळी माझी बोबडी वळली तेच ऐकून वर्गातील विद्यार्थी संबंधित मुलीला चिडवत होते. ते पाहून मी काही विद्यार्थांना हाताने मारले. त्यानंतर शंकर हा उद्धटपणा करीत दुसऱ्या विद्यार्थांचे नाव घेत मुलीला चिडवत होता. याविषयी मी मुख्याध्यापकांना याबाबत माहिती दिली होती.
भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रावसाहेब बांबळे हे या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.
व्हीएस न्युज - गेल्या वर्षभरात देहूरोड परिसरातून मोबाईल फोनची जबरीचोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात पोलीसांना अखेर यश आले आहे. गुन्हे शाखा युनिट २ च्या पथकाने सापळा रचून या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
मयुर सुनिल महाजन (वय १९, रा. त्रिवेणीनगर तळवडे) व त्याचा अल्पवयीन साथीदार आणि अविनाश प्रकाश लोखंडे (वय २०, रा. विष्णु समुद्रे चाळ, विठ्ठलवाडी देहूरोड व त्याचा अल्पवयीन साथीदार यांना पोलीसांनी सापळा रचून देहूरोड येथून ताब्यात घेतले आहे. तसेच दुसऱ्या कारवाईत बाबा उर्फ शेंड्या राजेश मिसाळ (वय ३१ रा. सध्या साई मंदीरामागे, वेणूनगर वाकड) याला त्याच्या मुळ गावातून आंबेजोगाई, जिल्हा बिड येथून पोलीसांना ताब्यात घेतले आहे. या आरोपींकडून विविध कंपन्यांचे एकूण १ लाख ३२ हजार रूपये किंमतीचे २९ मोबाईल फोन हस्तगत करण्यात आलेत.
ही कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन, अतिरिक्त पोलीस आयुक्त मकरंद रानडे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे सतिश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट २ चे पोलीस निरीक्षक सुधाकर काटे, सहायक पोलीस निरीक्षक सतीश कांबळे, पोलीस उप निरीक्षक हर्षल कदम न पोलीस कर्मचारी भिवसेन सांडभोर, संपत निकम, संजय गवारे, प्रविण दळे, फारूक मुल्ला, मयुर वाडकर, नितीन बहिरट, जमीर तांबोळी, संदीप ठाकरे, राहुल खारगे यांनी केली.
व्हीएस न्युज - ससून रुग्णालयाच्या आवारात असलेल्या महापालिकेच्या जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयातील शिपायाला ५०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) बुधवारी पकडले.
महेश आनंद जातेगावकर (वय ४२, रा. राधिका हौसिंग सोसायटी, विठ्ठलवाडी जकात नाक्याजवळ, सिंहगड रस्ता) असे लाचखोर शिपायाचे नाव आहे. याबाबत एकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली होती. तक्रारदाराच्या वडिलांचा ससून रुग्णालयात काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. ससून रुग्णालयाच्या आवारात महापालिकेचे जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालय आहे. तक्रारदार जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयात मृत्यू दाखला घेण्यासाठी गेला होता. त्यावेळी शिपाई जातेगावकर याने तक्रारदाराकडे ८०० रुपयांची लाच मागितली होती. तक्रारादाराने तडजोडीत ५०० रुपये देण्याचे मान्य केले. त्यानंतर त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली.
ससून रुग्णालयाच्या आवारात बुधवारी दुपारी सापळा लावण्यात आला. तक्रारदाराकडून ५०० रुपयांची लाच घेताना जातेगावकरला पकडण्यात आले. पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक दत्तात्रय भापकर, पोलीस निरीक्षक अर्चना दौंडकर यांनी ही कारवाई केली. पोलीस निरीक्षक राजू चव्हाण या प्रकरणाचा तपास करत आहेत.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002