व्हीएस न्यूज – ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये पॅनलला मतदान का केले नाही, असे विचारत आणि त्याचा राग मनात ठेवून चौघांनी एका महिलेला लाथाबुक्यांनी मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. हा प्रकार 28 फेब्रुवारी रोजी सकाळी दहाच्या सुमारास खेड येथे घडला.
मीरा बाळासाहेब रौंधळ, बाळासाहेब रौंधळ, स्वप्नील रौंधळ, महेंद्र रौंधळ (सर्व रा. रौंधळवाडी पाईट, ता. खेड) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी दीपाली सोमनाथ रौंधळ (वय 30 रा. रौंधळवाडी पाईट, ता. खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
आरोपींनी 28 फेब्रुवारी रोजी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये आमच्या पॅनलला मतदान का केले नाही ? त्यामुळे आमचा उमेदवार पडला असे म्हणत, त्याचा राग मनात धरुन मीरा यांनी दीपाली यांना लाथाबुक्यांनी मारहाण केली. तर, तिघांनी शिवीगाळ, दमदाटी करत जीवे मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे. चाकण पोलीस तपास करत आहेत.
व्हिएस न्युज - पक्षनेते एकनाथ पवार यांच्या कार्यपद्धतीच्या निषेधार्थ भाजपच्या नगरसेविका माया बारणे यांनीच पालिकेच्या प्रवेशद्वारासमोर शुक्रवारी आंदोलन केले. शुक्रवारी सकाळी बारणे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू झाले. त्यामुळे सुरक्षारक्षकांनी प्रवेशद्वार बंद केले. त्यामुळे मुख्यालयात येणारी वाहने रस्त्यावरच अडकली. त्याचा फटका महापौर राहुल जाधव यांनाही बसला. महापौर गाडी सोडून चालत मुख्यालयात दाखल झाले.
पत्रकारांशी बोलताना बारणे म्हणाल्या,की शहरात बांधकाम व्यावसायिक बेकायदा बांधकामे करत आहेत, त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत आहे. आयुक्त तसेच पक्षनेत्यांचे पालिकेच्या कारभारावर कसलेही नियंत्रण राहिले नाही. काही ठिकाणी प्रशासन आणि बांधकाम व्यावसायिकांचे संगनमत आहे. पूर्णत्वाचा दाखला घेतलाच जात नाही.
थेरगावात १२ मीटर रस्त्याचे काम नियमबाह्य़ पद्धतीने केले जात आहे. सामान्यांना नियम सांगितले जातात. धनदांडग्यांकडून नियमांची उघडपणे पायमल्ली केली जात आहे, असा आरोप बारणे यांनी केला.
व्हीएस न्युज - पश्चिम महाराष्ट्र भव्य राज्यस्तरिय शरीरसौष्ठव ‘खासदार श्री २०१९’ चा मानकरी पिंपरी चिंचवडचा रूपेश चव्हाण ठरला. शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त संत तुकारामनगर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुल येथे हजारो क्रीडा प्रेमींच्या उपस्थितीत ही स्पर्धी पार पडली. शिवसेनेचे पिंपरी विधानसभा संघटक जितेंद्र ननावरे यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते.
या स्पर्धेत पिंपरी चिंचवडच्या रुपेश चव्हाण याने खासदार श्री-२०१९ हा किताब पटकावला. खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते यावेळी पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी बेस्ट पोजर अतुल साळुंखे (पुणे), मोस्ट इंप्रूड राजेंद्र जाधव (कोल्हापूर), अपकमिंग बॉडी बिल्डर तुषार चोरगे (पिंपरी चिंचवड) यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शिवसेनेचे पिंपरी विधानसभा संघटक जितेंद्र ननावरे यांनी स्पर्धेचे आयोजन केले.
महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग असोसिएशनचे राजेश सावंत, प्रणव मुजुमदार, विजय मोरे, संजय महाडिक यांनी पंच म्हणून काम पहिले. विभागप्रमुख राजेश वाबळे, भोलाराम पाटील, रवींद्र ओव्हाळ यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. याप्रसंगी पुणे जिल्हा संपर्क नेते बाळाभाई कदम, शिवसेना शहरप्रमुख योगेश बाबर, महापालिका गटनेते राहुल कलाटे, नगरसेवक निलेश बारणे, सचिन भोसले, जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, चिंचवड विधानसभा प्रमुख अनंत कोऱ्हाळे, पुणे जिल्हा संघटिका उर्मिलाताई काळभोर, उपशहरप्रमुख रोमी संधू,तुषार नवले, माजी नगरसेवक किरण मोटे, संतोष सौंदणकर, उद्योजक संतोष बारणे, निलेश भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.
व्हीएस न्युज - जम्मू- काश्मीरमधील नौशेरा येथे घुसखोरी करणारे पाकिस्तानचे एफ १६ हे लढाऊ विमान पाडण्यात भारताच्या हवाई दलाला यश आले आहे. विमान कोसळत असताना पॅराशूट देखील दिसले. मात्र, विमानातील पाकिस्तानी वैमानिकाविषयी अद्याप कोणतीही माहिती मिळू शकलेले नाही. या कारवाईद्वारे भारताने पाकिस्तानला पुन्हा एकदा दणका दिला आहे.
मंगळवारी बालाकोट येथे भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राइकनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताला धमकी दिली होती. भारताला योग्य वेळी प्रत्युत्तर दिले जाईल, असे त्यांनी म्हटले होते. यानंतर बुधवारी सकाळी पाकिस्तानच्या तीन लढाऊ विमानांनी भारताच्या हद्दीत घुसखोरी केली. या तीन विमानांना भारतीय हवाई दलाने पिटाळून लावले. यातील एक विमान भारताने पाडले असून पाक हवाई दलाच्या ताफ्यातील एफ १६ विमान पाडण्यात यश आले आहे.
नौशेरा भागात विमान कोसळले असून विमान कोसळत असताना एक पॅराशूटही दिसले. विमानातील वैमानिकाने पॅराशूटद्वारे उडी मारली असावी, अशी शक्यता आहे. मात्र, वैमानिकाविषयी अद्याप कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही.
व्हीएस न्युज - कर्तव्यनिष्ठ आणि धडाडीचे आयपीएस अधिकारी म्हणून ओळखले जाणारे विश्वास नांगरे पाटील यांची बदली झाली आहे. नाशिक पोलीस आयुक्तपदी विश्वास नांगरे पाटील यांची बदली झाली असून लवकरच ते पदभार स्विकारणार आहेत. नाशिक पोलिस आयुक्त रवींद्र सिंघल यांची बदली झाली असून त्यांच्या जागी विश्वास नांगरे पाटील यांची नियुक्ती झाली आहे.रवींद्र सिंघल यांच्या नियुक्तीबद्दल मात्र अद्याप कोणती माहिती मिळालेली नाही.
रवींद्र सिंघल आणि विश्वास नांगरे पाटील दोघेही धडाडीचे आयपीएस अधिकारी म्हणून ओळखले जातात. अनेक तरुण दोघांना आपला आदर्श मानतात. स्पर्धा परिक्षेसाठी तयारी करणारे अनेक तरुण विश्वास नांगरे पाटील यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवतात. मूळचे सांगली जिल्ह्याचे असणारे विश्वास नांगरे पाटील यांनी खडतर प्रवास करत यश मिळवलं आहे. याचा अनेकदा त्यांनी आपल्या भाषणातही उल्लेख केला आहे. स्पर्धा परिक्षेसाठी अनेक तरुणांना ते मदतदेखील करतात.
दरम्यान कोल्हापूर परिक्षेत्र महानिरीक्षकपदी असणाऱ्या विश्वास नांगरे पाटील यांची बदली झाल्याने त्यांच्या जागी प्रकाश मुत्याल यांची नियुक्ती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
विश्वास नांगरे पाटील यांची आतापर्यंतची कारकिर्द –
व्हीएस न्युज - शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांच्या शुल्काची तातडीने प्रतिपूर्ती करावी, राज्यातील सर्व शाळांसाठी शाळा संरक्षण कायदा करावा, अशा विविध मागण्यांसाठी इंडिपेंडन्ट इंग्लिश स्कूल असोसिएशनने (ईसा) येत्या सोमवारी (२५ फेब्रुवारी) राज्यभरातील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या शाळा बंदमध्ये राज्यातील सुमारे अडीच हजार शाळा सहभागी होणार आहेत.
ईसाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजेंद्र सिंग यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. सहसचिव ओम शर्मा, विनय जोशी आदी या वेळी उपस्थित होते. १ नोव्हेंबर २०१८चा शासन निर्णय रद्द करावा, १८ नोव्हेंबर २०१३च्या शासन निर्णयात सुधारणा करावी, शालेय विद्यार्थी वाहतूक संदर्भामध्ये विद्यार्थ्यांच्या वाहतुकीची जबाबदारी मुख्याध्यापकांऐवजी शालेय वाहतूक व्यवस्थापकावर सोपवावी, मोफत गणवेश, पुस्तके, पिशवी आणि अन्य साहित्य उपलब्ध करण्याची जबाबदारी सरकारने घ्यावी, स्वयं अर्थसाहाय्यित शाळांचा दर्जा वाढ होण्यासाठी तातडीने ऑनलाइन प्रक्रिया सुरू करावी आदी मागण्या करण्यात आल्या. ‘राज्यातील खासगी इंग्रजी शाळांच्या मागण्या अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. या मागण्यांच्या पूर्ततेसाठी राज्य सरकारकडून ठोस कारवाई न करता केवळ तात्पुरते उपाय केले जातात. त्यामुळे या शाळांच्या इंडिपेंडन्ट इंग्लिश स्कूल असोसिएशनने येत्या २५ फेब्रुवारीला राज्यभरातील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. २१ जिल्ह्य़ांतील शाळा, ७ संघटनांनी या संपाला पाठिंबा दिला आहे,’ असे सिंग यांनी सांगितले.
व्हीएस न्युज - बुधवारी(दि.२०) झालेल्या मंदिर दुर्घटने प्रकरणी ठेकेदारास सांगवी पोलिसांनी अटक केली असून जेरबंद केलं आहे.राहुल जयप्रकाश जगताप असं ठेकेदाराचे नाव आहे. त्याला पिंपरी-चिंचवड महानगरपालिका बांधकाम परवाना विभाग यांनी सदरचे मंदिर हे अनधिकृत असल्याने नोटीस बजावली होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करत ठेकेदाराने मंदिराचे बांधकाम सुरू ठेवले होते. तेव्हा सभामंडप कोसळून तीन मजुरांचा मृत्यू झाला तर नऊ जण जखमी झाले आहेत.
सविस्तर माहीती अशी की, बुधवारी दुपारी पाऊणे चारच्या सुमारास पिंपळे गुरव येथे नदी काठेवर महादेव मंदिराच्या बांधकाम जीर्णोद्धाराचे काम सुरू होते. काही मजूर हे मंदिरात दगड आणून टाकत होते तर काही जण सभामंडपाला आधार दिलेले लोखंडी रॉड आणि लाकडी बांबू काढून घेण्याचे काम करत होते. त्याच वेळी अचानक सभामंडम मजुरांच्या अंगावर कोसळला यात १२ कामगार अडकले होते. त्यातील तीन मजुरांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला, यात एका महिलेचा समावेश होता. तर ऐकूण नऊ मजूर जखमी झाले होते.
याप्रकरणी ठेकेदार राहुल जयप्रकाश जगताप याच्यावर मृत्यूस जबाबदार ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच कामगारांना हेल्मेट,सेफ्टी शूज,सेफ्टी जाळी दिले नसल्याचे फिर्यादीत म्हटलं आहे. त्यामुळे जगताप याला सांगवी पोलिसांनी जेरबंद केलं आहे. अधिक तपास सांगवीचे पोलीस उपनिरीक्षक निकुंभ हे करत आहेत.
व्हिएस न्युज - पिंपरी-चिंचवड महापालिकेचा कर्मचारी असलेले बनावट ओळखपत्र तयार करुन महापालिका भवनात सरासपणे वावरणाऱ्या एका तरुणाला पिंपरी पोलिसांनी अटक केले आहे. ही कारवाई बुधवारी (दि.२०) सायंकाळी साडेचारच्या सुमारास महापालिकेच्या मुख्य प्रवेशव्दारा जवळ करण्यात आली. संदेश रामचंद्र जाधव असे अटक करण्यात आलेल्या या तरूणाचे नाव आहे.
याप्रकरणी सुरक्षा विभागप्रमुख उदय जरांडे यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदेश हा महापालिकेच्या आरोग्य विभागाचे मजूर म्हणून असलेले ओळखपत्र घालून सरासपणे महापालिका भवनात वावरत होता. बुधवारी तो महापालिका भवनात प्रवेश करणार होता. इतक्या तेथील सुरक्षारक्षकांना त्याचा सशंय आला. त्यांनी त्याची चौकशी करुन ओळखपत्र पाहिले असता ते बनावट असल्याचे आढळून आले. तसेच तो पालिकेत कोणत्याही विभागात कामास नसल्याचे आढळून आले. यावर महापालिकेच्या सुरक्षा रक्षकांनी त्याला ताब्यात घेऊन पिंपरी पोलिसाच्या हवाली केले.
दरम्यान सहा महिन्यांपूर्वी देखील संदेश याने पालिकेत सुरक्षारक्षक म्हणून प्रवेश केला होता. त्यावेळी त्याला समज देऊन सोडून देण्यात आले होते. त्याने चिंचवड येथील एका व्यक्तीकडून पालिकेचे बनावट ओळखपत्र बनवून घेतल्याचे कबूल केले आहे. पिंपरी पोलिस तपास करत आहेत.
व्हिएस न्युज - पुण्यातील मंचर येथे २०० फूट बोअरवेलमध्ये पडलेल्या मुलाची अखेर सुटका करण्यात आली आहे. तब्बल १५ तासांनी मुलाला बोअरवेलच्या बाहेर काढण्यात यश मिळालं आहे. मुलाला बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफकडून शर्थीचे प्रयत्न सुरु होते. सकाळी एनडीआरएफचं पथक मुलापर्यंत पोहोचलं होतं. पण कमरेचा भाग अडकला असल्या कारणाने त्याला बाहेर काढण्यात अडचण येत होती. पण अखेर मुलगा सुखरुप बाहेर पडला आहे.
रवी पंडित असं या मुलाचं नाव आहे. खेळता खेळता तो बोअरवेलमध्ये पडला होता. या परिसरात रस्त्याचे बांधकाम सुरु असून अनेक कामगार या कामात सहभागी आहेत. रवीचे आई-वडिलही बांधकाम मजूर असल्याने तोही आई-वडिलांसोबत याठिकाणी होता. बोअरवेलवर कोणतेही झाकण नसल्याने खेळता-खेळता ६ वर्षांचा रवी थेट बोअरवेलमध्ये पडला होता. बुधवारी सायंकाळी ४.३० ते ५ वाजताच्या सुमारास ही घटना घडली होती.
सुरुवातीला तो केवळ १० फुटांवर अडकला असण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. माहिती मिळाल्यानंतर मंचर पोलीस घटनास्थळी हजर झाले होते. नंतर एनडीआरएफची तुकडी घटनास्थळी दाखल झाली. यानंतर त्याला बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु झाले होते. अंधार पडल्याने मदतकार्यात अडचणी येत होत्या. पण अखेर १५ तासांनी रवीला बोअरवेलच्या बाहेर काढण्यात आलं आहे. संबंधित घटनेत जे कोणी दोषी असतील किंवा आढळतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी माहिती पोलीस निरीक्षक खराडे यांनी दिली आहे.
व्हीएस न्युज - अवघ्या काही महिन्यांवर येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील १२ पोलीस निरीक्षक, १३ सहायक पोलीस निरीक्षक आणि ५० पोलीस उपनिरीक्षकांच्या बदल्या कऱण्यात आल्या आहेत. या बाबतचा आदेश सोमवारी (दि.१९) काढण्यात आला. कोणत्याही प्रकारच्या निवडणुकां दरम्यान पोलिसांच्या बदल्या होणे हे रुटींग आहे. निवडुकी दरम्यान विशेष काळजी घ्यावी लागते. त्यामुळे नियोजन करुन पोलिसांच्या बदल्या योग्य ठिकाणी करण्यात येतात.
यादरम्यान बऱ्याचदा राजकीय नेते हस्ताक्षेप करुन आपल्या सोईनुसार पोलीस अधिकाऱ्यांची बदली करुन घेतात. तर काही पोलीस एकाच ठिकाणी बसतान मांडून असतात. यामुळे कोणत्याही निवडुकी पूर्वी पोलिसांच्या बदल्या केल्या जातात. दरम्यान काही महिन्यांपूर्वी स्थापन झालेले पोलीस आयुक्तालयात या आगोदरच पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वारंवार बदल्या होत असल्याने काही पोलीस कर्मचारी अस्वस्थ झाले आहेत. तर काहींनी खाजगीमध्ये निराशा व्यक्त केली आहे.
बदली झालेल्यांमध्ये पोलीस निरीक्षक भानुदास जाधव (वपोनि तळेगाव दाभाडे ते पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा युनीट-२), सुधाकर काटे (पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा युनीट-२ ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक तळेगाव दाभाडे), अमरनाथ रामचंद्र वाघमोडे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक निगडी ते पोलीस निरीक्षक वाहतुक शाखा), राजेंद्र पांडूरंग कुंटे (वपोनि भोसरी एमआयडीसी ते नियंत्रण कक्ष संलग्न), भीमराव एन. शिंगाडे (पोलीस निरीक्षक विशेष शाखा ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक निगडी अतिरिक्त कार्यभार), विवेक व्ही. मुगळीकर (वरिष्ठ पोलीस निरीक्षक चिखली ते पोलीस निरीक्षक सायबर सेल), श्रीराम बळीराम पोळ (पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक चिखली अतिरिक्त पदभार), शंकर वामनराव अवताडे (पोलीस निरीक्षक गुन्हे चिखली ते पोलीस निरीक्षक वाहतुक विभाग देहूरोड), सतिश पवार (पोलीस निरीक्षक वाहतुक विभाग देहूरोड ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक आळंदी), आर.पी. चौधर (वरिष्ठ पोलीस निरीक्षक आळंदी ते पोलीस नियंत्रण कक्ष संलग्न), उमेश औदुंबर तावसकर (पोलीस निरीक्षक वाहतुक शाखा ते वाहतुक नियंत्रण कक्ष), सतिश विठ्ठलराव नादुरकर (पोलीस निरीक्षक गुन्हे भोसरी एमआयडीसी ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतिरिक्त कार्यभार) यांचा समावेश असून १३ सहायक पोलीस निरीक्षक तर ५० पोलीस उपनिरीक्षकांचा समावेश आहे.
व्हिएस न्युज - महाविद्यालयात झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन तीन जणांच्या टोळक्यांनी चिखली येथे जावून पाच जणांना लोखंडी रॉड आणि काठीने जबर मारहाण करुन गंभीर जखमी केले. या घटनेमध्ये एक महिला देखील जखमी झाली आहे. ही घटना मंगळवारी रात्री जाधववाडी, चिखली येथे घडली. या प्रकरणी योगेश संतोष इंगळे (वय १९ रा. जाधववाडी चिखली) या तरुणाने चिखली पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेश संतोष इंगळे व इतर चौघे आशा पाच जणाना मारहाण करण्यात आली आहे. याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात शुभम ईश्वर तायडे (वय १९), शुभम देवानंद प्रधान (वय २२), महेश बाळू लगाडे (वय २२), जाधववाडी, चिखली) या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यासह दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. फिर्यादी आणि आरोपी यांचे पिंपरीतील नवमहाराष्ट्र महाविद्यालयात भांडण झाले होते. या भांडणाचा राग मनात धरुन आरोपींनी चिखली येथे जाऊन पाच जणांना लोखंडी रॉड आणि काठीने मारहाण केली. तसेच धमकी दिली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मधुसूदन घुगे करीत आहेत.
व्हिएस न्युज - मोहसीन शेख या तरुणाच्या हत्याला पाच वर्ष पूर्ण होत असून मोहसीन शेख ला त्याच्या कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी “जस्टीस फॉर मोहसीन मुव्हमेंट” तर्फे काही प्रमुख मुद्दे घेऊन संपूर्ण महाराष्ट्रात लढा उभारउ असून विविध मागण्या साठी संपूर्ण महाराष्ट्रभरातून तरुणांनी एकत्र येत जवळपास १७३ ठिकाणाहून राज्यपाल व मुख्यमंत्री यांना तहसिलदार, प्रांत, जिल्हाधिकारी यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पुण्यात २ जून २०१४ मोहसीन शेख या तरुणाची हत्या करण्यात आली होती. सोशल मीडिया वर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्या गेल्या होत्या कुठून टाकल्या होत्या,कोणी टाकल्या होत्या पत्ता लागायच्या आत सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या मोहसीन शेख चा त्यात बळी घेतला गेला. मोहसीन च्या हत्येला आक्षेपार्ह पोस्टचा आधार घेतला गेला मात्र त्या पोस्ट चा आणि त्याचा काडीचा सुद्धा संबंध नव्हता. हत्या करायला कारण मात्र फक्त चेहऱ्यावरील दाढी आणि डोक्यावरील टोपी होती.
कट्टरवाद्यांनी नाहक एका निरपराधाचा जीव घेतला होता. न्यायाच्या प्रतीक्षेत मोहसीन चे वडील सादिक शेख यांचा मृत्यू झाला. आई शबाना परवीन ह्या आजारपणामुळे अंथुरनाला खिळून आहेत. मोहसीन चा छोटा भाऊ मुबीन वर सगळी जबादारी येऊन पडली आहे. या सर्व गोष्टींचा विचार करत मोहसीन शेख ला त्याच्या कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी “जस्टीस फॉर मोहसीन मुव्हमेंट” तर्फे काही प्रमुख मुद्दे घेऊन संपूर्ण महाराष्ट्रात लढा उभा केला गेला असून त्यांच्या प्रमुख मागण्या खालील प्रमाणे
मोहसीन शेख यांच्या हत्येला येत्या २ जून २०१९ ला मोहसीन च्या हत्येला पाच वर्ष पूर्ण होतील. मोहसीन शेख हत्या प्रकरणात न्याय मिळावा म्हणून राज्यपाल व मुख्यमंत्र्यांना विदर्भ, खानदेश, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मुंबई सह १७३ ठिकाणाहून निवेदन सादर केले गेले. अशी माहिती जस्टिस फॉर मोहसीन मुव्हमेंटचे आयोजक सदस्य इम्रान शेख, इरफान शेख सुफियान मणियार, जुनेद आत्तार, अख्तर शेख यांनी दिली.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002