व्हिएस न्युज - करोना विषाणूचा प्रदुर्भाव रोखण्यासाठी ३० एप्रिल पर्यंत लॉकडाऊन लागू झाल्याने नागरिक कुटुंबासहीत घरातच आहेत. प्रभाग क्रमांक ९ येथील अजमेरा कॉलनी आणि मासुळकर कॉलनी या परिसरात नागरिकांना जेवणाची व जीवनावश्यक वस्तूंची उणीव भासू नये या नेक उद्देश्याने राजेश पिल्ले यांच्या नेतृत्वाखाली एकुण 100 गरजू कूटुंबाना धान्य व जीवनावश्यक वस्तूंचे स्विकृत नगरसेविका वैशाली प्रशांत खाडये यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.
धान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करताना युवा मोर्चा चे प्रभागातील पदाधिकारी संतोष मसने,बापू झेंडे,संदीप पाल्हाडे,मंदार कुलकर्णी,आकाश पवार,आमीण बेग,विवेक भाट,मुकुंद वेदपाठक व इतर पदाधिकारी उपसथित होते.
कोव्हिड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ९ येथील काही परिसरामध्ये जनजागृती करण्यासाठी राजेश पिल्ले यांच्या कडून ऑटोरिक्षांमधून ध्वनिक्षेपकाद्वारे प्रचार करण्यात येत आहे. दिवसातून ८ तास या ऑटोरिक्षांमधून नागरिकांना वैयक्तिक स्वच्छता, लॉकडाऊनच्या कालावधीत घरी राहून करायच्या उपाययोजना, तसेच घराबाहेर पडल्यावर सामाजिक अंतर राखणे, सरकारच्या सूचना आणि मार्गदर्शक तत्वांचे पालन करणे, अफवांचा फैलाव रोखणे, कोविड-19 रोगाबद्दलच्या संदेशांचा प्रचार केला जात आहे अनेक वेळा स्वतः राजेश पिल्ले या रिक्षा मधून नागरिकांना प्रबोधन करताना दिसतात.
व्हीएस न्यूज - पिंपरी चिंचवड शहरातील कोरोना कोवीड १९ साथरोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरातील सर्व भाजी मंडई ,आठवडी बाजार ,मोशी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती येथील भाजीपाला व फळे विक्रीस पूर्णत:प्रतिबंध करण्याचा आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिला असून त्याची अंमलबजावणी शनिवार दिनांक ११ एप्रिल पासून सायंकाळी ६ वाजता पासून मंगळवार दिनांक १४ एप्रिल २०२० पर्यंत करण्यात येणार आहे.कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी व उपाययोजना करण्याबाबत सार्वजनिक आरोग्य विभागाच्या महाराष्ट्र कोवीड १९ उपाययोजना नियम २०२० नुसैर एखाद्या भौगोलिक क्षेत्रात उद्रेक/प्रादुर्भाव आढळल्यास आयुक्त यांना सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित केले आहे.साथरोग नियंत्रण अधिनियम १८९७ मधील तरतूदीनुसार खालील ठिकाणी भाजीपाला व फळे विक्रीसाठी पूर्णता प्रतिबंध करण्यात आला आहे.
१) भोसरी भाजीमंडई २) चिखली भाजीमंडई ३)चिंचवड भाजीमंडई ४)आकुर्डी भाजीमंडई ५) पिंपरी भाजीमंडई ६) थेरगाव भाजीमंडई ७)वाकड भाजीमंडई ८)सर्व आठवडे बाजार ९)पिंपरी चिंचवड शहरातील हातगाड्या १०)कृषी उत्पन्न बाजार समिती मोशी ११) किरकोळ भाजीपाला व फळेविक्री .
११ एप्रिल २०२० रोजी सायंकाळ ६ वाजतापासून मंगळवार दि १४ एप्रिल २०२० रोजी रात्री बारा वाजेपर्यत हे आदेश लागू करण्यात आले आहेत.त्यानुसार या संबंधित परिसरातील पोलीस स्टेशन प्रमुख या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करतील व संपूर्ण शहरात कोणतीही भाजीमंडई किरकोळ भाज्या व फळे विक्री व आठवडे बाजार बंद राहतील याची खबरदारी घेतील असेही आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी काढलेल्या आदेशात नमूद केले.
व्हीएस न्युज - पिंपरी येथील मोरवाडी चौकातून अवैध रित्या गावठी हातभट्टी दारूची रिक्षा मधून वाहतूक करणाऱ्यास अटक करण्यात आली आहे. विलास दौलत जाधव ( रा. आनंद नगर , झोपडपट्टी चिंचवड )असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्या कडून ७१ हजार ५२०/- रु किमतीचा हातभट्टी दारूचा साठा जप्त करण्यात आला आहे. पिंपरी वाहतूक विभागाचे पोलीस शिपाई पुजारी( ब.क्र -१५५८) यांच्या फिर्यादीवरून पिंपरी पोलीस ठाण्यात 'मुंबई दारूबंदी अधिनियम कलाम ६५(अ)(ई)' प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे .संपूर्ण शहरात संचारबंदी असतानाही दारू आणि गुटख्याची तस्करी सुरूच असल्याचे अनेक वेळा दिसून आले आहे . .
मिळालेल्या माहिती नुसार दिनांक १०-०४-२०२० रोजी पिंपरी वाहतूक विभाचे सह.पो.नि संतोष पाटील त्यांच्या टीम सोबत मोरवाडी चौक येथे लॉकडाऊन व संचारबंदी साठी नाकेबंदी करत असताना एक रिक्षा ( एम एच -१४ -जीसी- ९८८१) पोलिसांनी इशारा देऊन सुद्धा थांबली नाही व लगेचच पो.शि पुजारी व पो.शि लावटे यांनी शिताफीने पाठलाग करत रिक्षा अडवली असता त्यात हातभट्टी दारू असल्याचे समोर आले. पुढील तपस पिंपरी पोलीस करत आहे .
व्हीएस न्युज - पिंपरी चिंचवडमध्येही कोरोनासह आता सारी आजाराचे संकट ओढावले आहे. एका महिलेमध्ये सिव्हीअरली अॅक्युट रेस्पिरेटरी इलनेस अर्थात सारीची लक्षणं आढळून आली आहेत. त्यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. सारी आणि कोरोनाची लक्षणं ही एकसारखीच आहेत. विशेष म्हणजे पुण्यातील महिलेला सारीसह कोरोनाचीही लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
राज्यात कोरोना विषाणूचे आव्हान असतानाच राज्यातील विविध शहरांमध्ये आता सारी आजार पसरल्याचे समोर आलं आहे. औरंगबाद, हिंगोली, पिंपरी चिंचवड येथे सारी आजाराचे रुग्ण आढळून आले आहेत. सारी आणि कोरोनाची लक्षणं एकसारखीच असल्याचे तज्ञांनी सांगितले आहे. विशेष म्हणजे सारीच्या एका रुग्णाला कोरोना झाल्याचेही समोर आलं आहे. त्यामुळे सारीच्या रुग्णांवरही बारीक लक्ष ठेवलं जात आहे.
औरंगाबादमध्ये दहा दिवसात 11 जणांचा सारी आजाराने मृत्यू
औरंगाबादमध्ये सारी आजाराचा हाहाकार पाहायला मिळत आहे. कारण गेल्या दहा दिवसात तब्बल 11 जणांचा सारी आजाराने मृत्यू झाला आहे. 29 एप्रिल ते 7 मार्च या दहा दिवसात 11 जणांचा सारी आजाराने मृत्यू झाल्याने औरंगाबादमध्ये एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे यामधील एक रुग्ण हा कोरोना पॉझिटिव्ह होता.
हिंगोलीत 19 वर्षीय मुलीचा सारी आजाराने मृत्यू
हिंगोली शहरातील एका 19 वर्षीय मुलीचा सारी आजाराने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर या युवतीच्या घरातील आठ जणांना हिंगोलीच्या रुग्णालयात आयसोलेशन वॉर्डात ठेवण्यात आले आहे.
सारी आजार म्हणजे काय?
सेवीअर अॅक्युट रिस्पायरेटरी इलनेस अर्थात सारी आजाराची लक्षणं ही कोरोना सारखीच आहेत. यामध्ये रुग्णाला सर्वसाधारणपणे 38 अंश सेल्सिअस ताप, खोकला, घशात खवखव, धाप लागणे आणिश्वास घेण्यास त्रास होणे, अशी लक्षणं असतात. हे एक प्रकारचे इन्फेक्शन असते. ते विषाणूमुळे किंवा साथीमुळे अशा दोन्ही प्रकारे असू शकते. तर कोरोनाचे इन्फेक्शन हे केवळ साथीच्या स्वरुपाचे आहे.
दरम्यान, पिपरी चिंचवडमध्ये आता एकूण 22 कोरोना रुग्ण झाले आहेत. यातील 12 रुग्ण कोरोनामुक्त झालेत. गेल्या बारा तासाच्या आतच 2 रुग्णांना कोरोनाची बाधा झालेली आहे.
व्हिएस न्युज - मास्क न वापरणाऱ्या पिंपरी चिंचवड परिसरातील ३० नागरिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने पोलिसांकडून कलम १८८नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हिंजवडी, चिखली, सांगवी आणि निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत संबंधित पोलिसांनी अशा कारवाया केल्या आहेत. आणखी गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात करोनाबाधितांचा आकडा हा २६ वर येऊन ठेपला आहे. त्यामुळे सर्व प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाल्यात. करोना हा संसर्गजन्य असल्याने पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय परिसरात मास्क न घालणाऱ्या व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात येत आहे. शुक्रवारी सायंकाळी सहापर्यंत तब्बल ३० जणांवर कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
अनेक नागरिक हे सार्वजनिक ठिकाणं जसे बँका, भाजी बाजार, किराणा, मेडिकल दुकानांमध्ये जाताना मास्क वापरत नसल्याचे आढळून आले आहे. मात्र, आता पोलिसांनी कारवाई केल्याने किमान पोलिसांच्या कारवाईने तरी नागरिक मास्क वापरतील अशी आशा व्यक्त केली जात आहे.
व्हिएस न्युज - आरोग्यसेवा क्षेत्रात काम करणारी पुण्यातील 'मोड्यूल इनोव्हेशन्स' नावाची स्टार्टअप कंपनी कोविड -19 च्या निदानासाठी 10 ते 15 मिनिटांची चाचणी तयार करत असून त्याला विज्ञान तंत्रज्ञान विभागाकडून अर्थसहाय्य मिळत आहे.
यूसेन्स (USense) नावाचे याच कंपनीचे प्रमुख उत्पादन असून त्यातील पूर्वसिद्ध संकल्पनेचा वापर करून आता ही कंपनी nCoVSENSEs (TM) तयार करत आहे. कोविड-19 चा सामना करताना मानवी शरीरात तयार होणाऱ्या अँटीबॉडीज म्हणजेच, प्रतिपिंडांचा झटपट शोध घेण्यासाठी याचा उपयोग होईल.
सध्या भारत ज्या टप्प्यावर आहे, त्याचा विचार करता बहुसंख्यांच्या चाचण्या करणे, आता आत्यंतिक महत्त्वाचे आहे. या झटपट चाचणी साधनामुळे, रुग्णांमधील संसर्गाची खात्रीशीर निश्चिती करता येईल. तसेच, एखादा संसर्गित रुग्ण बरा झाला का, किंवा कसे, त्याचप्रमाणे, संसर्गाची स्थितीही समजू शकेल.
सध्याची रिअल टाइम रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन पोलीमेरास चेन रिऍक्शन (RT-PCR) ही पद्धत सर्वोत्कृष्ट असली तरी ती महागडी व वेळखाऊ आहे, तसेच त्यासाठी विशिष्ट प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज असते. तर या नवीन झटपट चाचणीमुळे या अडचणीवर कार्यक्षम पद्धतीने व कमी खर्चात तोडगा निघू शकतो.
“या चाचण्या म्हणजे, PCR वर आधारित खात्रीलायक तंत्राला पर्याय ठरू शकत नाहीत, हे खरे, मात्र प्रतिपिंडे शोधून काढण्यावर आधारित असणाऱ्या या चाचण्या बहुसंख्य लोकांच्या झटपट तपासण्या करण्यासाठी जगभर वापरात आहेत. संख्येने मर्यादित असणाऱ्या PCR यंत्रांवरील भार हलका होण्यास यामुळे मदत होते. तसेच, धोरणे ठरवणे, निर्णय घेणे अशा कामांनाही हे तंत्र सहाय्य्यभूत ठरते.”- असे मत, विज्ञान तंत्रज्ञान विभागाचे सचिव प्रा.आशुतोष शर्मा यांनी व्यक्त केले आहे. मा
शरीरात विषाणूजन्य संसर्गाचा शिरकाव होताच तयार होणाऱ्या IgG आणि IgM या प्रतिपिंडांचा शोध घेण्याच्या उद्दिष्टाने तयार केलेली ही nCoVSENSe चाचणी, ‘स्पाईक’ प्रथिनांविरोधात काम करते. त्यामुळे ती खासकरून कोविड-19 च्या निदानासाठी उपयुक्त ठरते. ये
2 ते 3 महिन्यांत राष्ट्रीय पातळीवरील संस्थांकडून आवश्यक त्या परवानग्या मिळाल्यावर ही चाचणी प्रत्यक्षात उपयोगात आणण्याचा या कंपनीचा विचार आहे. या आजारातून लोक बरे झाले का, हे ठरवण्यासाठी भविष्यातही याचा उपयोग होऊ शकतो. विमानतळ, रेल्वेस्थानके, रुग्णालये, अशा अनेक ठिकाणी प्रवासी आणि रुग्णांच्या तपासणीसाठी हे वापरल्यास, भविष्यात पुन्हा संसर्ग उफाळण्याचा धोका आपण टाळू शकतो. सदर तंत्रज्ञानाची व्यवहार्यता सिद्ध झाली आहे, तथापि, त्या उत्पादनाची उपयोगिता आणि स्पष्टीकरण देणारा प्रोटोटाईप अद्यापि बाकी आहे.
व्हिएस न्युज - एका अपघातग्रस्त रिक्षा चालकावर शस्रक्रिया केली. त्यानंतर केलेल्या तपासणीत तो रुग्ण कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले. यामुळे त्याच्यावर शस्त्रक्रिया करणारे ४२ डॉक्टर आणि ५० कर्मचारी यांना क्वारन्टाईन करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, पिंपर चिचंवड मधील एका खाजगी रुग्णालयात दि. ३१ मार्च रोजी एका अपघातग्रस्त रिक्षा चालकावर शस्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रिया करीत असताना या रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. यामुळे डॉक्टरांनी त्याचे सॅम्पल कोरोनाच्या तपासणी करता प्रयोगशाळेकडे पाठवले.
हा रुग्ण दिल्लीतील निजामुद्दीन इथे पार पडलेल्या तबलिगी जमातच्या कार्यक्रमाला हजर होता ही माहिती त्याने डॉक्टरांपासून लपवून ठेवली. या रुग्णाचा अपघात झाला होता. त्यामध्ये इंटरनल ब्लिडिंग झाल्यामुळे त्याची सर्जरी करावी लागली. त्यानंतर दोन दिवस त्याला ताप येत होता. डॉक्टरांनी रुग्णाच्या आईकडे या संदर्भात चौकशी केली त्यावेळी हा रुग्ण तबलिगी जमातच्या कार्यक्रमात हजर असल्याची माहिती समोर आली.
डॉक्टरांनी या रुग्णाच्या काही टेस्ट केल्यानंतर शनिवारी त्याचा रिपोर्ट आला. या रिपोर्टमध्ये तो कोरोना ‘पॉझिटिव्ह’ असल्याचे समजल्यानंतर त्याच्यावर सर्जरी करणाऱ्यांसह इतर डॉक्टरांनाही ‘क्वारंटाईन’ करण्यात आले आहे. या ४० डॉक्टरांच्या थुंकीचे आणि काही ब्लड सँपल्स तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
रुग्णालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार सुरुवातीला डॉक्टरांनी या रुग्णाच्या कुटुंबीयांना आणि रुग्णाला ट्रॅव्हल हिस्ट्री विचारली असता त्यांनी नकार दिला होता. त्यावेळी कोणीही बोलायला तयार नव्हते. ताप आल्यानंतर त्याच्या आईने दिल्लीला जाऊन आल्याचा खुलासा केला. या ४० पैकी ३० जण हे रुग्णालयातील स्टाफ तर १० डॉक्टरांचा समावेश आहे. त्या सर्वांचे सॅपल्स पाठवण्यात आले आहेत.
दोनच दिवसांपूर्वी त्या रिक्षाचालकाचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. त्यामध्ये तो रिक्षाचालक कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले. यामुळे त्या रिक्षाचालकांवर शस्रक्रिया करणारे ४२ डॉक्टर आणि ५० कर्मचारी यांना क्वारंटाइन करण्यात आले. यामुळे पिंपरी चिंचवड शहरात एकच खळबळ उडाली आहे.
व्हिएस न्युज - करोना विषाणूचा प्रदुर्भाव रोखण्यासाठी २१ दिवसांचे लॉकडाऊन लागू झाल्याने नागरिक कुटुंबासहीत घरातच आहेत. पण मजूरी करुन दररोज आपली उपजिविका भागवणारे कष्टकरी हे घरीच असल्याने कुटुंबाची उपजिविका भागवण्यासाठी हतबल झाले आहेत. मातोश्री सामाजिक संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष गणेश आहेर यांनी सोशल डिस्टनसिंगची काळजी घेत पिंपरी चिंचवड शहरातील रहाटणी, काळेवाडी फाटा, वाकड, थेरगांव, पिंपरीगांव,तापकिर मळा,रहाटणीगांव, परिसरात घरोघरी धान्याचे वाटप केले.
या उपक्रमाबाबत माहिती देत गणेश आहेर म्हणाले की, कोरोनाचे संकट संपूर्ण जगावर आले आहे व त्याचा वाढता संसर्ग रोखणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी देशासाठी २१ दिवसांचे लॉकडाऊन जाहीर केले आहे. हा लॉकडाऊन १४ एप्रिलपर्यंत असणार आहे. नागरिकांना घरातच राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पिंपरी चिंचवड शहरातील हातावर पोट असणऱ्यांची संख्या खुप मोठी आहे. घरातील राशन अल्प असल्यामुळे या कष्टकऱ्यांची परिस्थिती बिकट होत चालली आहे . परंतु, अशा स्थितीत एकमेकांच्या मदतीला धावून जाणे गरजेचे आहे. पिंपरी चिंचवड शहर माझ्या कुटुंबासारखेच आहे व त्यामुळे अन्नधान्याचे वाटप केले.
अन्न-धान्याचा पुरवठा नियमितपणे होणार असला तरी, तो खरेदी करण्यासाठी कष्टकऱ्यांच्या घरात पैसेच नाहीत, अशी परिस्थिती अनेक ठिकाणी निर्माण झाली आहे.
संकटाच्या या परिस्थितीत ज्यांना शक्य आहे त्यांनी यथा शक्ती मदत करावी असे आवाहन मातोश्री सामाजिक संस्था पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने अध्यक्ष गणेश आहेर.,नवनाथ (माऊली) जाधव, गणेश पाडूळे,गोरख पाटील, निलेश भोरे, रविकिरण घटकार, शिल्पाताई आनपण, संजय गायके, बाळासाहेब गायकवाड, नरसिंग माने, आधिकराव भोसले, गणेश वाळूंज, मारुती म्हस्के, दत्ता गिरी यांच्या वतीने करण्यात येत आहे.
व्हीएस न्युज - पिंपरी-चिंचवड शहरातील बऱ्याच समाजकंटकांना कलम 144 चे महत्व माहीत नाही की कोरोना विषाणू ला अटकाव करण्याचे प्रशासनाचे प्रयत्न अपुरे पडत आहेत असा प्रश्न उपस्थित होत आहे.
कोरोना विषाणूला रोखण्यासाठी राज्य सरकारने कलम 144 अन्वये जमावबंदी लागू केली असताना देखील पिंपरी-चिंचवड शहरातील काही परिसरातील नागरिकांचा वावर दिसून येत आहे चौकातील तरुणांचे घोळके धावत्या रिक्षा विनाकारण दुचाकीवर भटकणारे तरुण नेहमीप्रमाणे आजही रस्त्यावर वावरताना दिसून येत आहेत शहरात नागरिकांची गर्दी जर अशीच राहिली तर कोरोना विषाणूला रोखणे हाताबाहेर जाईल अशी भीती प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे पिंपरी चिंचवड शहरात पोलिसांनी संचारबंदी देखील लागू केली आहे. तरीही मुख्यतः निगडी,दापोडी,पिंपरी,भोसरी,काळेवाडी या ठिकाणी गर्दी दिसून येत आहे.
'कलम 144' म्हणजे काय…?
>सीआरपीसी अंतर्गत येणारे कलम 144 शांती व्यवस्था कायम ठेवण्यासाठी लागू केली जाते.
>पाच किंवा जास्त लोकांनी एकत्र येण्यास निर्बंध आणले जातात यालाच जमावबंदी अथवा कर्फ्यू असं म्हणतात.
>कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जमावबंदीचे आदेश लागू करण्यात येतात.
>जमावबंदीचा आदेश लागू करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तसेच जिल्हा न्यायदंडाधिकारी देत असतात.
>कलम 144 चे पालन न केल्यास पोलीस त्या व्यक्तीला अटक करू शकते.
>जमाव बंदीचे उल्लंघन करणाऱ्याला एक वर्षाची शिक्षा होऊ शकते.
>या आदेशाचा कालावधी हा दोन महिन्यापेक्षा जास्त असता कामा नये, कालावधी पूर्ण झाल्यावर पुन्हा जमावबंदी लागू केली जाऊ शकते.
>परंतु अत्यावश्यक काळात जर राज्य सरकारला वाटले तर याची अंमलबजावणी सहा महिन्यापर्यंत सुद्धा लागू केली जाऊ शकते.
व्हिएस न्यूज -करोना व्हायरसच्या संकटामुळे पुणे शहरातील व्यापाऱ्यांपाठोपाठ सलून मालकांनी दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता पुण्याच्या मार्केट यार्डातील ‘फळे-भाजीपाला व कांदा – बटाटा बाजारा’बाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
“करोना व्हायरसच्या संकटामुळे शुक्रवार दिनांक 20 मार्च 2020 व शनिवार दिनांक 21 मार्च 2020 रोजी फळे-भाजीपाला व कांदा – बटाटा बाजार संपूर्णपणे बंद असेल. तसेच, 31 मार्च 2020 पर्यंत दर बुधवारी व दर शनिवारी संपूर्ण बाजार स्वच्छतेसाठी बंद केला जाईल”, असा निर्णय घेण्यात आल्याची माहिती छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड आडते असोसिएशनकडून देण्यात आली आहे. आडते असोसिएशन व दोन्ही कामगार संघटना यांची आज, दिनांक 18 मार्च 2020 रोजी तातडीची सर्वसाधारण सभा घेण्यात आली. या सभेत हा निर्णय एकमताने घेण्यात आला.
दरम्यान, यापूर्वी करोनामुळे पुणे व्यापारी महासंघाकडून गुरुवापर्यंत (१९ मार्च) व्यापार बंद ठेवण्यात येणार असल्याने शहरातील व्यापारी पेठेत शुकशुकाट पाहायला मिळाला. करोनामुळे पुणे व्यापारी महासंघाकडून मंगळवार (१७ मार्च) ते गुरुवापर्यंत (१९ मार्च) व्यापार बंद ठेवण्याचा निर्णय सोमवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे, औषधे, किराणामाल विक्रेते वगळून बहुतांश व्यापाऱ्यांनी व्यवहार बंद ठेवले. शहरातील रविवार पेठ, बोहरी आळी, लक्ष्मी रस्ता, तुळशीबाग, महात्मा फुले मंडई, शनिपार,अप्पा बळवंत चौक, फडके हौद चौक, भवानी पेठेतील व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवल्याने नेहमी गजबजलेल्या या भागात शुकशुकाट पाहायला मिळाला. शहरातील व्यापाऱ्यांनी बंद ठेवला असला तरी उपनगरात मात्र सर्वत्र व्यवहार नेहमीप्रमाणे सुरू होते.
व्हिएस न्यूज -शहरात स्थायिक असलेल्या सैनिक परिवारातील एखादा जवान देशासाठी शहीद झाल्यास त्या कुटुंबीयांना आधार म्हणून पाच लाख रुपयांचे अर्थसाहाय्य देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महापालिकेने घेतला आहे.
पालिकेच्या नागरवस्ती विभागाकडून याबाबतचे धोरण ठरवण्याची संपूर्ण कार्यवाही करण्यात येणार आहे. स्थायी समितीने या प्रस्तावासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यास मान्यता दिली आहे. पालिका सभेत त्यावर अंतिम मान्यतेचे शिक्कामोर्तब केले जाईल. त्यानंतर या निर्णयांची अंमलबजावणी होणार आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात मोठय़ा संख्येने सैनिकी कुटुंबीय राहतात. शिक्षण आणि रोजगाराच्या उद्देशाने ते शहरात स्थायिक झाले आहेत. जम्मू काश्मीर, लेह-लडाख यासह देशाच्या विविध ठिकाणी, कठीण परिस्थितीत सीमेवर हे जवान देशसेवेसाठी तैनात आहेत. केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या धर्तीवर पिंपरी पालिकेकडून सैनिक तसेच शहिदांच्या परिवारांना आर्थिक मदत केली जाते. त्याचाच एक भाग म्हणून पिंपरी-चिंचवड शहरात स्थायिक असलेल्या सैनिक परिवारातील जवान देशासाठी शहीद झाल्यास त्या कुटुंबाला अर्थसाहाय्य दिले जाणार आहे, असे याबाबतच्या प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.
या मदत निधीचा उपयोग त्यांच्या कुटुंबीयांसाठी व्हावा, सैनिकी परिवाराचे मनोबल वाढावे, जवानांच्या सर्वोच्च बलिदानाचा सन्मान राखला जावा, असा हेतू या मागे असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.
व्हिएस न्यूज -मुळा-मुठा नदी शुद्धीकरण प्रकल्पाअंतर्गत (जायका) उभारण्यात येणाऱ्या सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पासाठी राबविण्यात आलेल्या निविदा चढय़ा दराने आल्यानंतरही राष्ट्रीय नदी संवर्धन प्राधिकरणाने त्यातील एक निविदा मंजूर करावी, यासाठी दबाव आणण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे खर्च आवाक्यात नसतानाही आलेल्या चारपैकी एका निविदेला मंजुरी देण्याच्या हालचाली महापालिका प्रशासनाकडून सुरू झाल्या आहेत.
राष्ट्रीय नदी सुधार योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात सहा सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पांची कामे करण्यासाठी महापालिकेने ४५० कोटी रुपयांचा प्रकल्प आराखडा तयार केला आहे. मत्स्यबीज केंद्र, हडपसर, मुंढवा, भैरोबा नाला, नायडू रुग्णालय आणि नरवीर तानाजी वाडी या ठिकाणी सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प उभारण्याचे प्रस्तावित आहे. या प्रकल्पासाठी जपान येथील जायका कंपनीकडून ९८० कोटी रुपयांचे वित्तीय साहाय्य मंजूर झाले आहे. जायका कंपनीबरोबर करार करताना प्रकल्पाचा वाढीव खर्च महापालिकेला करावा लागणार आहे, असे स्पष्ट नमूद करण्यात आले आहे. प्रकल्पाला ९८० कोटींपुढे जायकाकडून कोणतीही आर्थिक मदत होणार नाही.
पहिल्या टप्प्यात सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प राबविण्यासाठी काढण्यात आलेल्या निविदा चढय़ा दराने आल्या आहेत. चार निविदांचाच अतिरिक्त खर्च साडेपाचशे कोटी रुपयांपर्यंत गेला आहे. याशिवाय भूसंपादनाचा खर्च महापालिकेला करावा लागणार आहे. त्यामुळे हा खर्च आवाक्याबाहेर गेल्यामुळे या निविदा रद्द करण्याची भूमिका महापालिकेने घेतली होती. मात्र राष्ट्रीय नदी संवर्धन प्राधिकरणाने यासंदर्भात महापालिकेवर दबाव टाकला आहे. त्यामुळे महापालिकेनेही एक पाऊल मागे घेतले असून एका निविदेला मान्यता देण्याची हालचाल सुरू केली आहे.
जायका प्रकल्पासंदर्भात गेल्या काही दिवसांपूर्वी दिल्लीत आढावा बैठक झाली. चार टप्प्यापैकी एका टप्प्यातील निविदा चौदा टक्के वाढीव दराने आली आहे. ही निविदा दहा टक्क्य़ांपर्यंत खाली आल्यास त्याला मान्यता मिळू शकते आणि प्रकल्पाचा निधीही परत जाणार नाही, असे राष्ट्रीय नदी संवर्धन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडून महापालिकेला सांगण्यात आले. त्यानुसार चौदा टक्के कमी दराने आलेल्या निविदेसंदर्भात महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी संबंधित ठेकेदारा कंपनीशी चर्चा करणार आहेत. दहा टक्के दराने कामे करण्याची सहमती ठेकेदाराने दर्शविल्यानंतर तसे पत्र प्राधिकरणाला पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर या निविदेला तातडीने मंजुरी दिली जाणार असल्याची माहिती महापालिकेतील अधिकाऱ्यांनी दिली. मुळातच सर्व निविदा जादा दराने आल्या आहेत. एका टप्प्यातील कामासाठी दहा टक्के जादा दराने काम देण्यात येणार असले तरी त्यातून पुणेकरांच्या पैशांची उधळपट्टी होणार आहे. त्यामुळे निविदा मंजुरीवरूनही वाद होण्याची शक्यता आहे.
निधीपरतीची भीती
निविदा चढय़ा दराने आल्यानंतर त्या रद्द करण्याची मान्यता पालिकेने राष्ट्रीय नदी संवर्धन प्राधिकरणाकडे मागितली होती. मात्र त्या वेळी पालिकेने त्यांच्या स्तरावर हा निर्णय घ्यावा, असे सांगण्यात आले. त्यानंतर या निविदा मान्य कराव्यात, अशी भूमिका प्राधिकरणाकडून घेण्यात आली. निविदा मान्य न झाल्यास निधी परत जाईल, अशीही भीती घालण्यात आली आहे.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002