व्हीएस न्यूज - गुजरातचे नवनिर्वाचित आमदार जिग्नेश मेवानी यांनी रविवारी शनिवारवाड्यावर आयोजित परिषदेत वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळेच भीमा कोरेगाव येथे दोन गटांमध्ये वाद झाला. मेवानी आणि जेएनयू छात्र संघटनेचे उमर खालिद हे या घटनेला जबाबदार असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी तक्रार अक्षय बिक्कड आणि आनंद धोंड यांनी केली आहे.
शनिवारवाड्यावर भीमा कोरेगावच्या संग्रामाला दोनशे वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त झालेल्या एल्गार परिषदेत त्यांनी भडकावू भाषण दिल्याचा आरोप करत त्यांच्याविरुद्ध डेक्कन पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. दरम्यान, अशा स्वरूपाचा तक्रार अर्ज प्राप्त झाला असून, पुढील कार्यवाहीसाठी तो विश्रामबाग पोलिसांकडे पाठवला आहे, असे डेक्कनचे वरिष्ठ निरीक्षक अजय कदम यांनी सांगितले; पण विश्रामबागचे वरिष्ठ निरीक्षक अप्पासाहेब शेवाळे यांनी अशा स्वरूपाची तक्रार अद्याप प्राप्त झालेली नाही, असे स्पष्ट केले.