पिंपरी – माथाडी कामगार दिवसभर घाम गाळून कष्टाचे काम करतात. परंतु, त्यांना योग्य मोबदला दिला जात नाही. राज्य सरकारने माथाडी कामगारांच्या बाजूने घेतलेल्या कायद्याची माथाडी मंडळाकडून अंमलबजावणी केली जात नाही, हे मोठे दुदैव आहे. माथाडी मंडळाने सुधारीत अध्यादेशाची त्वरित प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, अशी आग्रही मागणी महाराष्ट्र मजदूर संघटनेचे अध्यक्ष व कामगार नेते इरफान सय्यद यांनी केली आहे. कायद्याची अंमलबजावणी न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.
तसेच, कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी राज्याचे कामगार मंत्री संभाजी निलंगेकर पाटील यांना साकडे घातले असल्याचेही त्यांनी सांगितले. पिंपरीत बुधवार दि.१० रोजी झालेल्या पत्रकार परिषदेते ते बोलत होते. यावेळी, महाराष्ट्र मजदूर संघटनेचे सल्लागार बाळासाहेब शिंदे, उपाध्यक्ष किसन बावकर, खंडू गवळी, कार्याध्यक्ष परेश मोरे, सचिव प्रवीण जाधव, सहसचिव सर्जेराव कचरे, पांडुरंग कदम, ज्ञानोबा मुजुमले, राजू तापकीर, भिवाजी वाटेकर, समर्थ नाईकवडे, ओमकार माने, नागेश व्हनवटे, पांडूरंग काळोखे, संदीप मधुरे, गोरक्षनाथ दुबले, संतोष जाधव, मारुती कौदरे आदी उपस्थित होते.
इरफान सय्यद म्हणाले, राज्याच्या औद्योगिक क्षेत्रातील विविध कंपन्यात कार्यरत असणाऱ्या माथाडी, हमाल, कष्टकरी, असंघटीत हमाल या सारख्या श्रमजिवी कामगारांच्या नोकरीचे नियमन करणे, त्यांच्या कामाच्या बाबतीत अटी, शर्ती तसेच श्रमाच्या मोबदल्यात देण्यात येणाऱ्या वेतनाबाबत अधिक चांगल्या तरतुदी करण्यासाठी माथाडी कामगार कायद्यात योग्य त्या सुधारणा केल्या आहेत. त्या संबंधीचा सुधारित अध्यादेव देखील काढला आहे. या सुधारित कायद्यात माथाडी मंडळाच्या योजनांच्या माध्यमातून असुरक्षित कष्टकरी माथाडी कामगारांच्या तसेच त्यांच्या मालकांच्या नोंदण्या करण्याबरोबर या असुरक्षित घटकांसाठी स्वतंत्र्य भविष्यनिर्वाह निधी, उपदान, बोनस, भरपगारी रजा, आरोग्य सुविधा, कामाच्या निश्चित वेळा, कामगारांना नोकरीविषयक संरक्षण अशा विविध कामगारांना सुविधा दिल्या आहेत. तसेच, मुंबई, ठाणे परिसरातील कामगारांसाठी स्वतंत्र मंडळ स्थापन करून आरोग्यसुविधा दिल्या जातात. परंतु, पुणे जिल्हा, पिंपरी-चिंचवड सारख्या औद्योगिक परिसरातील माथाडी कामगारांसाठी अशा सुविधा दिल्या जात नाहीत. जीवन विमा निगम या संस्थेच्या सुविधा मिळत नाहीत. सरकारचा हा कायदा व त्यातील योजना अत्यंत लोकप्रिय झाल्या आहेत.
प्रत्यक्षात मात्र त्याची अंमलबजावणी होत नाही. या सुधारित अद्यादेशाची माथाडी मंडळाकडून अंमलबजावणी केली जात नाही. त्यामुळे माथाडी कामगार विविध सोयी-सुविधांपासून वंचित राहत आहे. हाल अपेष्टात माथाडी कामगार विविध सोयी-सुविधांपासून वंचित रहात आहे. हाल अपेष्टात जीवन जगतात. त्यामुळे माथाडी कामगार मंडळाने सुधारित अद्यादेशाची त्वरित अंमलबजावणी करावी. त्याचबरोबर माथाडी मंडळात करोडे रुपयांचा भरणा होत असतानादेखील मंडळातील अपुऱ्या मनुष्यबळाअभावी हजारो कामगारांचे प्रश्न वर्षानुवर्ष प्रलंबित आहेत. याकडेही सय्यद यांनी लक्ष वेधले आहे. हे प्रश्न लवकरात- लवकर मार्गी लागावेत, अन्यथा आगामी काळात महाराष्ट्र मजदूर संघटनेच्या वतीने हजारो कामागारांसह तीव्र आंदोलन छेडले जाईल, असेही त्यांनी सांगितले. या कायद्याची अंमलबजावणी व्हावी, यासाठी आपण स्वतः कामगार मंत्री संभाजीराज निलंगेकर पाटील यांना निवदेन दिले आहे. मंत्री पाटील यांनी कष्टकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून या कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, अशी अपेक्षा देखील सय्यद यांनी यावेळी व्यक्त केली आहे.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002