व्हीएस न्यूज - परमार्थात श्रवण व सद्गुरु यांना फार महत्व आहे. सद्गुरुशिवाय गती नाही तर श्रवण हा परमार्थाचा पायाच आहे. कोणाकडून तरी माळ किंवा मंत्र घेतला म्हणजे आपल्याला सद्गुरु मिळाला असे समजू नये. वास्तविक, गुरु-शिष्य संबंध जोडण्याची ही केवळ एक सांप्रदायिक रीत आहे. इतकेच याने परमार्थ-मार्गात पहिले पाऊल टाकले एवढेच घडले. श्रवणाची वाट चोखाळली शुध्द। गेले भेदाभेद निवारोनी।। असे मार्गदर्शन प्रल्हाद वामनराव पै यांनी रविवारी भोसरी येथे केले. आमदार महेश लांडगे आणि मित्र परिवाराने संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली पुण्यस्मरण सोहळ्याच्या समारोप प्रसंगी खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, महापौर नितीन काळजे,उपमहापौर शैलजा मोरे, जीवनविद्या मिशनचे माजी विश्वस्त शैलेश मोरे, पै. किसनराव लांडगे, पै. सचिन बबनराव लांडगे, नगरसेवक, नगरसेविका आदी उपस्थित होते.
खा. श्रीरंग बारणे म्हणाले की, समाजातील प्रत्येक घटक सुखाच्या मागे धावत आहे. सुख कुठे मिळेल याचा शोध माणूस अव्याहतपणे घेत असतो. काही वेळा तो आपल्या मार्गावरुन भरकटण्याचा सुध्दा धोका असतो. परंतू जीवनविद्या मिशन समाजाला सुखाचा मार्ग दाखविण्याचे काम करीत आहे. सद्गुरु वामनराव पै यांचे हे कार्य प्रल्हाद पै पुढे नेत आहेत. प्रारंभी खा. बारणे, आ. महेश लांडगे यांचा मिशनच्या वतीने सत्कार करण्यात आला. तर उद्योजक कार्तिक लांडगे, नितीन लांडगे, युवराज लांडगे, नितीन लांडगे, सागर लांडगे, प्रज्ञा कार्तिक लांडगे यांनी प्रल्हाद पै यांचा सत्कार केला.
या तीन दिवसीय सोहळ्यात राज्यभरातून सुमारे एक लाखांहून जास्त साधकांनी पै यांच्या प्रबोधनपर व्याख्यानाचा लाभ घेतला. 450 हून जास्त व्यक्तींनी अवयव व देहदानाचे अर्ज भरले. जीवनविद्या मिशनच्या वतीने चालविण्यात येणा-या संस्कार शिक्षण अभियान, गर्भ संस्कार, विद्यार्थ्यांना, तरुणांना मार्गदर्शन, कौटूंबिक सौख्य, स्वानंदयोग, जीवन जगण्याची कला, तुमचा उत्कर्ष तुमच्या हातात या मार्गदर्शन शिबिरांचा नागरिकांनी लाभ घ्यावा. यासाठी महेशदादा लांडगे स्पोर्टस् फाऊंडेशन आणि मित्र परिवार प्रयत्नशील राहिल असे आमदार महेश लांडगे यांनी सांगितले.
जीवनविद्या मिशन आणि महाराष्ट्र शासनाचा सार्वजनिक आरोग्य विभाग व विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वय समिती यांच्या वतीने तीन दिवस अवयव प्रत्यारोपण, प्रतिरोपण आणि अवयव आणि देह दानाविषयी जगजागृती करण्यात आली. अवयव दान करण्यास इच्छुक असणा-या व्यक्तींचे अर्ज भरुन घेण्यात आले. यामध्ये राजू हरिभाऊ भगत या अंध व्यक्तीसह 450 व्यक्तींनी अवयव दानाचे अर्ज भरले. अशी माहिती समन्वयक विवेक पालव यांनी दिली.
पै पुढे म्हणाले की, मनावर ताबा मिळविण्यासाठी साधनेची आवश्यकता आहे. साधनेमुळे हळूहळू माणसाच्या मानसिकेतेत बदल होतो. माणसातील कृतघ्नपणा संपून कृतज्ञपणा जागृत होतो. माणसाची आसक्तीची ओढ कमी होऊन विरक्तीकडे प्रवास सुरु होतो. एखादे कर्म करताना कुठे थांबायचे हे कळले की मनुष्य प्रगतीकडे वाटचाल करतो. कर्म करत असताना आपण दैववादी होतो. देवावर अवलंबून राहतो. परंतू देवाने मनुष्याला प्रारब्ध दिले आहे. ते कर्म करण्यासाठी, म्हणजेच कर्म करण्यासाठीच प्रारब्ध भोगताना एका बाजूने कर्म दुस-या बाजूने प्रारब्ध आणि या दोन्हीच्या माध्यमातून क्रियमान व्हावे. कर्माचे फळ मिळण्यासाठी अनुकूल परिस्थिती यावी लागते. संगत आणि संस्कार यातून अनुकूल परिस्थिती निर्माण होते. चांगल्या संगतीने गुण तर कुसंगतीने दोष वर येतात. सध्या युवा पिढीमध्ये नैराश्यमुळे व कुसंगतीमुळे व्यसनाचे व आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. अंत:र्मन शांत असेल तर अशा परिस्थितीवर सहज मात करता येते. अंत:र्मन शांत राहण्यासाठी जीवनविद्येची प्रार्थना म्हणा, मन शांत होईल. अंत:र्मन तुम्हाला उन्नतीकडे घेऊन जाईल, असे पै यांनी सांगितले.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002