व्हीएस न्यूज - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जाँग यांचे शत्रूत्व संपूर्ण जगाला माहीत आहे. गतवर्षी दोन्ही राष्ट्राध्यक्षांनी एकमेकांना संपवण्याची धमकी दिली होती. आता नवीन वर्षाच्या आरंभीच किम जाँगने अमेरिकेला पुन्हा एकदा धमकावले आहे. नवीन वर्षानिमित्त देशाला संबोधित करताना त्यांनी अमेरिकेच्या कोणत्याही भागाला लक्ष्य करण्याची आपली क्षमता असल्याचे म्हटले. संपूर्ण अमेरिका आपल्या अण्वस्त्रांच्या आवाक्यात आहे, आणि या अण्वस्त्राचे बटन नेहमी माझ्या टेबलावर असते..ही धमकी नव्हे तर सत्य आहे, असेही ते म्हणाले.
किमच्या मते, अमेरिका आता उत्तर कोरियाविरोधात कधीच युद्ध पुकारणार नाही. आम्ही अमेरिकेच्या सर्वच भागांवर अण्वस्त्रांनी हल्ला करण्याची क्षमता विकसित केली आहे. दरम्यान, त्यांनी दक्षिण कोरियाशी आपण चर्चेस तयार असल्याचेही म्हटले. चर्चेच्या माध्यमातून एकमेकांमधील तणाव दूर करणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले. फेब्रुवारी महिन्यात दक्षिण कोरियात हिवाळी ऑलिम्पिकमध्ये उत्तर कोरियाचे खेळाडू पाठवण्याबाबत किम म्हणाले की, दोन्ही कोरियाचे अधिकारी लवकरच एकमेकांना भेटतील आणि यावर विचार करतील. या स्पर्धेचे आयोजन यशस्वी होईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. हिवाळी ऑलिम्पिकमध्ये कोरियन देशांना चांगली कामगिरी करून दाखवण्याची संधी आहे. प्योंगयांग आणि सियाल यांच्यात चांगले संबंध प्रस्थापित व्हावेत. उत्तर कोरियाच्या सुरक्षेला जेव्हा धोका असेल, असे जाणवेल तेव्हाच आम्ही अण्वस्त्रांचा वापर करू असा इशारा देखील त्यांनी दिला.
व्हीएस न्यूज - आसामने रविवारी ‘नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीझन्स’चा मसुदा जाहीर केला. आसाममधील ३.२९ कोटींपैकी १. ९ कोटी लोकांना अधिकृत भारतीयाचा दर्जा देण्यात आला आहे. उर्वरित नावांची तपासणी सुरु असल्याची माहिती ‘रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया’ शैलेश यांनी दिली.
रविवारी रात्री आसाममध्ये ‘नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीझन्स’चा पहिला मसुदा जाहीर करण्यात आला. आसाममधील विधानसभा निवडणुकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपची सत्ता आल्यास बांगलादेशी घुसखोरांना शोधून त्यांना पुन्हा बांगलादेशमध्ये पाठवू, असे आश्वासन दिले होते. स्थानिक हिंदूंचे रोजगार हिरावून घेणाऱ्या आणि बेकायदा घुसलेल्या मुस्लिमांवर कारवाई करु, अशी गर्जनाच भाजपने केली होती. या दृष्टीने आसाममध्ये ‘नॅशनल रजिस्टर सिटीझन’ला (एनआरसी) महत्त्व प्राप्त झाले आहे. १९५१ च्या जनगणनेनुसार हा मसुदा तयार करण्यात आला आहे. यामुळे बांगलादेशी घुसखोरांना शोधणे शक्य होणार आहे.
रविवारी रात्री जाहीर झालेल्या मसुद्यानुसार ३.२९ कोटी अर्जदारांपैकी १.९ कोटी लोकांना अधिकृत भारतीय नागरिकाचा दर्जा देण्यात आला. राज्यातील एनआरसीचे समन्वयक प्रतीक हजेला याबाबत माहिती देताना म्हणाले, ज्यांचे नाव पहिल्या यादीत नाही, त्यांनी चिंता करण्याची गरज नाही. ही अत्यंत कठीण आणि किचकट प्रक्रीया होती. त्यामुळे पहिल्या यादीत काही लोकांना स्थान मिळू शकले नसेल, पण यामुळे घाबरण्याचे कारण नाही, असे त्यांनी सांगितले. एनआरसी मसुद्यातील दुसरी यादी कधी जाहीर होणार असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले, हे सर्व काम सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखाली सुरु आहे. ही संपूर्ण प्रक्रीया २०१८ मध्ये पूर्ण होणार आहे, असे त्यांनी सांगितले.
मे २०१५ पासून एनआरसीसाठीच्या अर्ज प्रक्रियेला सुरुवात झाली. आसाममधील ६८.२७ लाख कुटुंबांकडून एकूण ६.५ कोटी कागदपत्रे प्राप्त झाली होती. एनआरसीबाबत तक्रारी करता येतील, मात्र एनआरसीचा अंतिम मसुदा जाहीर झाल्यानंतरच तक्रार करता येईल, असे प्रतीक हजेला यांनी सांगितले. बांगलादेश युद्धाच्या दरम्यान हजारो बांगलादेशी भारतात विस्थापित झाले. यात आसाममधील प्रमाण लक्षणीय असून तेव्हापासून स्थानिक विरुद्ध बांगलादेशी असा वाद सुरु आहे.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002