व्हीएस न्युज - आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने गरिबांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. उज्ज्वला योजनेअंतर्गत सर्व गरीब कुटुंबांना मोफत एलपीजी कनेक्शन(घरगुती गॅस सिलिंडर) देण्याच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. त्यामुळे प्रत्येक गरीब कुटुंबाला मोफत एलपीजी कनेक्शन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
या निर्णयामुळे महागाईने त्रस्त झालेल्या जनतेला दिलासा मिळाला आहे. उज्ज्वला योजनेची २०१६ मध्ये मोदी सरकारने सुरूवात केली होती. आर्थिक बाबींसंदर्भातील कॅबिनेट समितीने उज्ज्वला योजनेचा विस्तार करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे, अशी माहिती पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्याने ज्या गरीब कुटुंबांना एलपीजी कनेक्शन मिळाले नव्हते. किंवा जे याच्यासाठी पात्र नव्हते, अशा सर्व गरिबांना याचा लाभ होणार आहे, असे प्रधान म्हणाले.
आतापर्यंत २०११ च्या सामाजिक आणि आर्थिक जाती जनगणनेनुसार एलपीजी कनेक्शन देण्यात येत होते. त्यानंतर अनुसुचित जाती, मागासलेला समाज आणि पंतप्रधान आवास योजना आणि अंत्योदय योजनेच्या लाभार्थ्यांचाही यामध्ये समावेश केला होता. मात्र, आता या योजनेत सर्व गरीब कुटुंबांचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे आता १०० टक्के कुटुंबांपर्यंत एलपीजी कनेक्शन पोहोचू शकणार आहे, असेही प्रधान यांनी सांगितले. या योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून तेल कंपन्यांना १६०० रुपयांची सबसिडी मिळते. ही सबसिडी गॅस सिलिंडरच्या जोडणीसाठी दिली जाते. मोदी सरकारच्या या योजनेत प्रामुख्याने दारिद्य रेषेखाली येणाऱ्या कुटुंबांतील महिलांना मोफत गॅस कनेक्शन देण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले होते, असे प्रधान यांनी सांगितले.
व्हिएस न्युज - मुंबईतील अंधेरी भागात असलेल्या कामगार रुग्णालयाच्या आगीत सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर एकूण १४७ जण जखमी झाल्याचे समजते आहे. मुंबईतल्या अंधेरी भागात असलेल्या कामगार रूग्णालयाला सोमवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास आग लागली. ही आग अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रयत्नांची शिकस्त करत आटोक्यात आणली. या आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र या आगीत एकूण सहा जणांचा मृत्यू झाल्याचे समजते आहे.
आग लागताच या ठिकाणी अग्नीशमन दलातर्फे मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले. ४० पेक्षा जास्त रूग्णांना शिडीच्या मदतीने खाली उतरवण्यात आले. तसेच कूपर रूग्णालय, होली स्पिरीट हॉस्पिटल, बाळासाहेब ठाकरे ट्रोमा रूग्णालय, सेव्हन हिल हॉस्पिटल या विविध रूग्णालयांमध्ये या रूग्णालयातील रूग्णांना हलवण्यात आले. एकाचा मृत्यू बचाव कार्यादरम्यान झाला होता आता आणखी पाच जणांचा मृत्यू उपचारादरम्यान झाल्याची माहिती समजते आहे.
कामगार रूग्णालय परिसरात आग लागल्याचे समजताच अग्निशमन दलाचे आठ बंब दाखल झाले. त्यानंतर आणखी चार बंब या ठिकाणी आले आणि अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्न करून ही आग नियंत्रणात आणली. रूग्णालयातल्या रूग्णांना बाहेर काढण्याचे कामही सुरु असताना अनेकांनी गर्दी केली होती त्यामुळे बचाव कार्यात अडचणी येत होत्या. पोलिसांनी रूग्णांच्या नातेवाईकांना पांगवले आणि त्यानंतर रूग्णांना विविध रूग्णालयात दाखल करण्यात आले. अंधेरी पूर्व भागात असलेल्या एमआयडीसीत हे रूग्णालय आहे. कुलिंगचे काम सुरु करण्यात आले आहे. मात्र या दुर्घटनेत सहा जण दगावले आहेत.
व्हीएस न्युज - बीडमधील आष्टी तालुक्यात १४ वर्षांच्या मुलाची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. मारेकऱ्यांनी हत्येपूर्वी मुलाच्या कुटुंबीयांकडे २० लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती. मात्र, दिशाभूल करण्यासाठी मारेकऱ्यांनी ही चिठ्ठी ठेवली असावी, असा संशय आहे. या हत्येप्रकरणी पोलिसांनी गणेशच्या दोन मित्रांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
आष्टी तालुक्यातील केरुळ या गावात एकनाथ आंधळे, पत्नी, मुलगा गणेश आणि दोन मुलींसह राहतात. गणेश आंधळे (वय १४) हा सातवी इयत्तेत शिकतो. गणेशचे आई- वडील हे ऊसतोडणीच्या कामासाठी बाहेर गेले होते. १२ डिसेंबर रोजी शाळेतून परतल्यावर गणेश खेळण्यासाठी संध्याकाळी घराबाहेर गेला. यानंतर तो घरी परतलाच नाही. आई- वडीलांनी पोलिसांकडे गणेश बेपत्ता असल्याची तक्रार देखील केली. रविवारी सकाळी एका तरुणाला गावातील रस्त्यावरील दगडावर एक चिठ्ठी सापडली. ही चिठ्ठी हिंदीत लिहिली होती. ‘मुलाच्या सुटकेसाठी २० लाख रुपये द्यावे, अन्यथा त्याची हत्या करु, अशी धमकी चिठ्ठीत देण्यात आली होती. ‘पोलिसांकडे जाऊ नका, पोलिसांकडे गेलात तर तुमच्या मुलीचेही अपहरण करु’, असे देखील चिठ्ठीत म्हटले होते.
पोलिसांनी अपहरणाच्या दृष्टीने घटनेचा तपास सुरु केला. मात्र, दुपारी तीनच्या सुमारास गावातील शिवारात गणेशचा मृतदेह आढळला. मृतदेहावर अॅसिडही टाकण्यात आले होते. गणेशच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नाही. त्यामुळे त्यांच्याकडून २० लाखांची खंडणी का मागितली जाईल, असा प्रश्न निर्माण झाला आहे. पोलिसांनीही तपासात दिशाभूल करण्यासाठी ही चिठ्ठी ठेवण्यात आली होती. गणेशची हत्या अगोदरच झाली असावी, असा अंदाज व्यक्त केला. पोलिसांनी या प्रकरणात गणेशच्या दोन मित्रांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
व्हीएस न्युज - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर मंगळवारी दुपारी एका व्यक्तीने मिरची पूड फेकल्याचा प्रकार समोर आला आहे. दिल्ली सचिवालयात ही घटना घडली असून सुरक्षा कर्मचाऱ्यांनी मिरची पूड फेकणाऱ्या तरुणाला ताब्यात घेतले आहे. अनिल शर्मा असे या तरुणाचे नाव असून तो दिल्लीतील रहिवासी आहे.
दिल्ली सचिवालयात मंगळवारी दुपारी एक तरुण पोहोचला. त्याने केजरीवाल यांच्यावर मिरची पूड फेकली. या प्रकारानंतर सचिवालयात तैनात असलेल्या पोलिसांनी त्या तरुणाला ताब्यात घेतले. त्या तरुणाने केजरीवाल यांना धक्काबुक्की केली असून त्याने केजरीवाल यांच्यावर गोळीबार करण्याचीही धमकी दिल्याचे समजते. केजरीवाल यांच्या डोळ्यात मिरचीपूड गेल्याचे वृत्त आहे. पोलिसांनी मिरचीपूड फेकणाऱ्या तरुणाला ताब्यात घेतले आहे. अनिल शर्मा असे या तरुणाचे नाव असून त्याची चौकशी सुरु आहे.
अनिल शर्मा हा सचिवालयाच्या आत मिरची पावडर घेऊन कसा पोहोचला, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मुख्यमंत्र्यांची सुरक्षा भेदण्यात तो यशस्वी झाल्याने दिल्ली पोलिसांच्या कारभारावरही प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, अरविंद केजरीवाल यांच्यावर यापूर्वीही हल्ला झाला आहे.
यापूर्वी त्यांच्यावर शाईफेक, चप्पल फेकल्याचा प्रकारही घडला होता. आम आदमी पक्षाचे माजी नेते कपिल मिश्रा यांनी या घटनेचा निषेध केला आहे. ‘राजकारणात हिंसाचाराचे समर्थन कधीच करता येणार नाही. मात्र, निवडणूक जवळ आल्या की केजरीवाल यांच्यावर असे हल्ले होतात’, असे सूचक विधान करत त्यांनी या हल्ल्यावर शंका उपस्थित केली आहे.
व्हीएस न्युज - बॉलीवूडचा दबंग अभिनेता सलमान खान याचा मोबाईल क्रमांक दिला नाही म्हणून त्याच्या पीएला धमकी दिल्याप्रकरणी उत्तर प्रदेशच्या एका रेकॉर्डवरील गुन्हेगाराला शनिवारी वांद्रे पोलिसांच्या एका विशेष पथकाने अटक केली.
शेरा ऊर्फ शेरु असे या गुन्हेगाराचे नाव असून त्याला सोमवारपर्यंत मुंबईत चौकशीसाठी आणले जाईल. शेरुविरुद्ध अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद असून त्याची करेली परिसरात प्रचंड दहशत असल्याचे बोलले जाते. दबंग अभिनेता सलमान खान हा वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये राहतो. चार दिवसांपूर्वी त्याच्या पीएला एका अज्ञात व्यक्तीने फोन करून सलमानचा मोबाईल क्रमांक मागितला होता. मात्र तो देण्यास पीएने नकार दिल्याने त्यांच्यात वाद झाला. त्यातच फोन करणार्याने पीएला ‘मुंबईत येऊन तुझा गेम करू’ जिवे मारण्याची धमकी दिली. तीन दिवसांपूर्वीच सलमानच्या पीएने वांद्रे पोलीस ठाण्यात तशी तक्रार केली.
या तक्रारीची गंभीर दखल घेत अज्ञात व्यक्तीविरुद्ध 504, 506 भादंवी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता. पोलिसांनी ज्या क्रमांकावरुन ही धमकी देण्यात आली होती, त्याची माहिती काढण्याचा प्रयत्न केला असता फोन करणारा उत्तर प्रदेशातील शेरु ऊर्फ शेरा असल्याचे स्पष्ट झाले. वांद्रे पोलिसांच्या विशेष पथकाने शेराला अलाहाबादच्या करेली परिसरातील त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले होते. सलमानच्या पीएला धमकावल्याची कबुलीही त्याने दिली.
शेरु हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. करेली परिसरात काही स्थानिक गुंडांची प्रचंड दहशत असून त्यात शेरुचा समावेश आहे. त्याच्याकडून पोलिसांनी एक मोबाईल जप्त केला असून याच मोबाईलवरून सलमानच्या पीएला जिवे मारण्याची धमकी दिली होती. हा मोबाईल फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात येणार आहे.
व्हीएस न्युज - पॉस्कोसारख्या घटनेत काही पत्रकार, छायाचित्रकार हे पीडित मुलीचे किंवा कुटुंबाचे फोटो घेतात. या कृत्यामुळे पोलिसही हैराण होतात. त्यामुळे बदलत्या कायद्याची जाण पत्रकारांना हवी, असे मत शिवसेनेच्या प्रवक्त्या आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी परिसंवादात व्यक्त केले.
चिपळूण येथील पत्रकारांच्या राज्यस्तरीय संमेलनात माध्यमांची विश्वासार्हता या विषयावर परिसंवाद झाला. परिसंवादाचे अध्यक्ष विश्वास मेहेंदळे होते. परिसंवादात जतीन देसाई, समीरण वाळवेकर, नितीन केळकर, जयू भाटकर यांनी सहभाग घेतला. सूत्रसंचालन प्रसन्न जोशी यांनी केले. प्रेक्षकात उपस्थित असलेल्या माधव भंडारींना आयत्यावेळी परिसंवादात सहभागी करून भाजपची सत्ता आल्यावर माध्यमांवरील सरकारचा दबाव वाढला आहे का, असा प्रश्न प्रसन्न जोशींनी विचारला. त्यावेळी आणीबाणीचा संदर्भ देऊन गळचेपी कोणी केली,असा उलट प्रश्न भंडारींनी केला.
नितीन केळकर यांनी इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियापेक्षा आजची पिढी सोशल मीडियावर अधिक विश्वास ठेवते. योग्य, अयोग्य काय याची पडताळणीही ही पिढी करते, असे मत व्यक्त केले. ब्रेकिंग न्यूज दाखविताना वाहिन्यांनी ताळतंत्र सोडू नये,अन्यथा विश्वासार्हतेला तडा जातो असे मत समीरण यांनी मांडले. प्रबोधनात्मक कार्यक्रमांना प्रेक्षकांकडून टीआरपी मिळत नसल्याची खंत प्रसन्न जोशींनी व्यक्त केली.
माध्यमांच्या तुलनेत वृत्तपत्रांची विश्वासार्हता अधिक असल्याचे मत गोऱ्हे यांनी व्यक्त केले. परिसंवादात विविध मुद्द्यांवर चर्चा सुरू असताना वादाचा प्रसंगही उद्भवला. मात्र अध्यक्ष विश्वास मेहेंदळेंनी विनोदी शैलीतून हे वाद थांबविले.
व्हीएस न्युज - अहमदनगरचा माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम याने अहमदनगर महापालिका निवडणुकीसाठी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. श्रीपाद छिंदमने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरले होते. ज्यासंदर्भातली ऑडिओ क्लिप जाहीर झाल्यावर निषेधाचे तीव्र पडसाद राज्यभरात उमटले होते. भाजपाने श्रीपाद छिंदमची हकालपट्टी केली. त्याचे उपमहापौरपद रद्द केले तसेच मनपाच्या महासभेत छिंदमचे नगरसेवकपदही रद्द करण्याचा प्रस्ताव महासभेत सादर झाला होता.
छिंदम विरोधात गुन्हा दाखल झाल्यावर त्याला तुरुंगवासही भोगावा लागला, छिंदमला सशर्त जामीन मंजूर झाल्यावर तो अज्ञातस्थळीही गेला होता. राजकीय आकसापोटी मला गुंतवण्यात आल्याचं छिंदमने त्याच्या जामीन अर्जात म्हटलं होतं. श्रीपाद छिंदम निवडणूक लढवणार की नाही याबाबत विविध चर्चा सुरु होत्या. अशात अहमदनगरच्या प्रभाग ९ मधून त्याने अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे अहमदनगरमध्ये चर्चांना उधाण आले आहे. अहमदनगर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ९ डिसेंबर २०१८ मतदान होणार आहे तर मतमोजणी १० डिसेंबर २०१८ ला होणार आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
श्रीपाद छिंदमने उपमहापौरपदावर असताना एका कामासंदर्भात बांधकाम विभागाचे कर्मचारी अशोक बिडवे यांना फोन केला. यावेळी बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांबाबत अपशब्द वापरले. छिंदमच्या फोनची ही ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली. त्यानंतर श्रीपाद छिंदमवर टीका झाली त्याचा निषेध करण्यात आला. १६ फेब्रुवारीला श्रीपाद छिंदमला पोलिसांनी अटक केली होती.
व्हीएस न्युज - शिर्डीच्या साईबाबा संस्थान ट्रस्टद्वारा संचलित साईबाबा मंदिराच्या प्रमुखाविरोधात एका भाविक महिलेने छेडछाड आणि विनयभंगाची तक्रार शुक्रवारी पोलिसांत दाखल केली. तक्रार दाखल झाल्यानंत संबंधीत आरोपी फरार झाला आहे. शिर्डी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली.
शिर्डी पोलीस ठाण्याचे अधिकारी बी. एफ. माघाडे यांनी सांगितले की, साई मंदिराचे प्रभारी राजेंद्र जगताप यांच्याविरोधात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. शिर्डीजवळ्याच एका गावातील भाविक महिलेने ही तक्रार दाखल केली आहे. तक्रार दाखल केल्यापासून जगताप हा शिर्डीतून फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. दरम्यान, साई संस्थान ट्रस्टच्या प्रवक्त्यांशी याबाबत संवाद साधला असता त्यांनी या प्रकरणावर बोलण्यास नकार दिला. पोलीस याबाबत चौकशी करीत असल्याने यावर बोलणे योग्य ठरणार नाही, असे या प्रवक्त्याने म्हटले आहे. ‘मिड डे’ने याबाबत वृत्त दिले आहे.
पीडितेच्या तक्रारीनुसार, पीडित महिला गुरुवारी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास आपल्या काही मित्र परिवारासोबत साईबाबांच्या पालखी सोहळ्यासाठी मंदिर परिसरात गेली होती. त्यानंतर मंदिरात प्रार्थना करताना जगताप या महिलेच्या अगदी जवळ आला. त्यानंतर त्याने तिला आक्षेपार्ह पद्धतीने स्पर्श करीत पकडले आणि शिवागाळही केली. तसेच तिला मंदिर परिसरातून बाहेर हाकलून दिले. तसेच पुन्हा मंदिर परिसरात दिसायचे नाही अशी धमकीही दिली. जगतापने यापूर्वीही अनेकदा अशाच प्रकारे इतर महिलांशी देखील वर्तन केले आहे. त्यामुळे शिर्डी संस्थान ट्रस्टने जगातपची प्रमुख प्रभारी पदावरुन हाकालपट्टी करावी अशी मागणी पीडित महिलेने केली आहे. वंदना सोनुने या महिला पोलीस अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनाखील या प्रकरणाची चौकशी शिर्डी पोलिसांनी सुरु केली आहे. मात्र, काल रात्रीपासूनच जगताप हा शिर्डीतून फरार झाला आहे.
शिर्डी हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे आणि श्रीमंत देवस्थान आहे. दरवर्षी लाखो भाविक येथे दर्शनासाठी हजेरी लावतात. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यापासून सुरु झालेल्या साई बाबांच्या समाधी शताब्दी महोत्सवाची गेल्या महिन्यांत सांगता झाली. त्यानिमित्त राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान यांसह अनेक मान्यवरांनी या मंदिराला भेटी दिल्या.
व्हीएस न्युज - भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे सध्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील ४८ मतदारसंघांचा दौरा करत आहेत. त्यांच्या खान्देशातील दौऱ्यात जळगाव आणि धुळ्यात प्रचंड गोंधळ उडाला.
जळगावात भाजपा रावेर लोकसभा क्षेत्रात कार्यकर्ता पदाधिकारी बैठकीत माजी मंत्री एकनाथ खडसे यांना मंत्रीमंडळात कधी घेणार कार्यकर्त्यांनी विषयावर दानवे यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली तर धुळ्यात भाजपच्या दोन गटातील वाद चव्हाट्यावर आला असून सभेतच आमदार अनिल गोटे यांना धक्काबुक्की करण्यात आली आहे.
खान्देशच्या दौऱ्यावर असलेल्या दानवे यांच्यासमोर जळगावमध्ये कार्यकर्त्यांनी खडसेंना मंत्रिमंडळात घेण्याबाबत विचारणा केली. कार्यकर्त्यांनी खडसेंच्या पुनर्वसनाबाबत आक्रमक भूमिका घेत दानवेंना जाब विचारला. नाथाभाऊ दोषी आहेत की, निर्दोष एवढेच महाराष्ट्राच्या जनतेला कळू द्यावे अशी भावना त्यांनी व्यक्त केली. यावर खुलासा करत खडसे हे पक्षाचे ज्येष्ठ नेते असून आगामी काळात मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यास त्यांना नक्कीच स्थान दिले जाईल असे सांगून दानवे यांनी वेळ मारून नेली.
व्हिएस न्युज - दक्षिण चीन सागरावरुन चीन आणि अमेरिकेमध्ये सुरु असलेला संघर्ष दिवसेंदिवस अधिक प्रखर होऊ लागला आहे. दक्षिण चीन सागरावरील चीनची वर्चस्ववादाची भूमिका अमेरिकेला अजिबात मान्य नाहीय. त्यामुळे अमेरिकेच्या युद्धनौका नेहमीच या भागात गस्त घालत असतात. सप्टेंबर महिन्यात अशाच एका गस्ती मोहिमेदरम्यान दोन्ही देशांच्या युद्धनौकांमधल्या संघर्षामुळे भीषण परिस्थिती उदभवू शकली असती.
सप्टेंबरमध्ये दक्षिण चीन सागरात अमेरिकेची विनाशिका दिसल्यानंतर चीनच्या युद्धनौकेने तुम्ही चुकीच्या मार्गावर आहात असा अमेरिकेन विनाशिकेला इशारा दिला. त्यानंतर चीनची युद्धनौका अत्यंत धोकादायक पद्धतीने अमेरिकन विनाशिकेच्या जवळ गेली. त्यामुळे दोन्ही जहाजांमध्ये टक्कर होईल अशी स्थिती निर्माण झाली होती.
अमेरिकन विनाशिका डिकॅटयुरने शिट्टी वाजवून चिनी युद्धनौकेला सावध करण्याचा प्रयत्न केला पण चीनच्या युद्धनौकेने त्याची अजिबात दखल घेतली नाही. ते वेगाने अमेरिकन विनाशिकेच्या दिशेने गेले. ते आम्हाला मार्गातून हटवण्याचा प्रयत्न करत होते असे एका अमेरिकन खलाशाने सांगितले.
डिकॅटयुर विनाशिका उजव्या बाजूला वळल्याने सुदैवाने ही धडक टळली. सप्टेंबर महिन्यात हा संघर्ष झाला. जर ही धडक झाली असती तर जहाजाच्या नुकसानीबरोबर दोन्ही बाजूला प्राणहानी झाली असती. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठा तणाव निर्माण होऊ शकला असता असे नाव न छापण्याच्या अटीवर एका वरिष्ठ अमेरिकन अधिकाऱ्याने सांगितले.
दक्षिण चीन सागरातील नैसर्गिक साधनसंपत्तीवर डोळा ठेऊन चीनने तिथे अनेक कृत्रिम बेटे तयार केली आहेत. चीनचा अनेक शेजारी देशांबरोबर दक्षिण चीन सागराच्या मालकीवरुन मोठा वाद सुरु आहे. अमेरिकेला चीनची ही दादगिरी अजिबात मान्य नाहीय. त्यामुळे अमेरिकन नौदलही या भागात मोठया प्रमाणावर सक्रिय आहे.
व्हीएस न्युज - संतापजनक आणि चीड आणणारी घटना मेरठमध्ये घडली आहे. एक तीन वर्षांची मुलगी फटाक्यांमुळे गंभीर जखमी झाली आहे. दिवाळीच्या एक दिवसापूर्वी ही घटना घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका मुलानं तिच्या तोंडामध्ये सुतळी बॉम्ब ठेवला आणि तो पेटवला, बॉम्ब तोंडात फुटल्यानं मुलगी गंभीर जखमी झाली आहे. यानंतर तिला तातडीनं हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, मात्र तिची प्रकृती गंभीर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
मिलक गावातील ही घटना आहे. पोलिसांनी तक्रार दाखल करुन घेतली असून आरोपीचा शोध सुरू करण्यात आला आहे. मुलीचे वडील शशी कुमार यांना हरपाल नावाच्या युवकाविरोधात तक्रार केल्याचं म्हटलं जात आहे. पीडित मुलगी घराबाहेर खेळत असताना हरपालनं तिच्या तोंडात सुतळी बॉम्ब ठेवला आणि पेटवला. यात चिमुकलीला गंभीर दुखापत झाली आहे. मुलीला तब्बल 50 टाके पडले आणि घशालाही इजा झाली आहे.
व्हीएस न्युज - उत्तर प्रदेशात शामली येथे रहाणाऱ्या एका मुस्लिम व्यक्तीने आपल्या संपूर्ण कुटुंबासह धर्मांतर करुन हिंदू धर्मात प्रवेश केला आहे. प्रभू रामचंद्र माझ्या स्वप्नात आले. त्यांनी मला हिंदू धर्म स्वीकारायला सांगितला असा दावा या व्यक्तीने केला आहे. धर्मपरिवर्तनानंतर पूर्वीचा शहजाद आता संजू राणा झाला आहे.
माझे पूर्वज हिंदू होते पण धर्मांतर करण्यास त्यांना भाग पाडल्यामुळे ते मुस्लिम बनले असा दावा संजू राणाने केला आहे. प्रभू रामचंद्र मागच्या १५-२० दिवसापासून माझ्या स्वप्नात येत होते. ते मला पुन्हा हिंदू धर्म स्वीकारण्यास सांगत होते. आम्ही आधी हिंदूच होतो. काही शतकांपूर्वी परकीय आक्रमक इथे आले. त्यांनी माझ्या पूर्वजांना मुस्लिम धर्म स्वीकारण्यास भाग पाडला. मी आता माझ्या मूळाकडे परतत आहे असे संजू राणाने सांगितले.
इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे. धर्मांतरासाठी कुठल्याही व्यक्ती किंवा संघटनेचा माझ्यावर दबाव नव्हता. स्वेच्छेने मी हा निर्णय घेतला. माझे कुटुंबिय सुद्धा या निर्णयाने आनंदात आहेत असे संजू राणाने सांगितले.
भगवान राम माझ्या स्वप्नात आले होते हे माझ्या समाजाला कळल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया कशी असेल याची मला चिंता लागून राहिली होती असे संजूने सांगितले. मला जे भय वाटत होते त्यापेक्षा परिस्थिती वाईट होती. काही लोकांकडून मला धमक्या मिळाल्या होत्या. माझे काका सुद्धा माझ्या धर्मपरिवर्तनाच्या निर्णयाविरोधात होते असे संजू राणाने सांगितले. राणाने पोलिसांशी संपर्क साधून संरक्षणाची मागणी केली आहे. पोलीस स्टेशनमध्ये धाव घेऊन मी माझा जीव वाचवला. मला आता माझ्या मुलांची चिंता लागून राहिली आहे असे संजू राणाने सांगितले. संजूच्या जीवाला धोका असल्याबद्दल आम्हाला अद्यापपर्यंत कोणताही ठोस पुरावा मिळालेला नाही असे पोलीस अधीक्षक दिनेश कुमार यांनी सांगितले.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002