व्हीएस न्यूज - शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असून देखील स्वच्छता मोहिमेत इंदिरा ग्रुपचे योगदान मोलाचे आहे. इंदिरा ग्रुपचा आदर्श घेउन इतर संस्थानी स्वच्छता मोहिमेत योगदान देवून शहराचा नावलौकिक वाढवावा, असे अवाहन पिंपरी चिंचवड महापालिकेचे सह.आयुक्त दिलीप गावडे यांनी केले.
वाकड येथील इंदिरा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या वतीने “इंदिरा स्वच्छता अभियान अंतर्गत इंदिरा कॉलेजच्या परिसरातील कचरा संकलनासाठी कायमस्वरुपी सुरू केलेल्या कचरा गाडीचे लोकार्पण केले. यावेळी ते बोलत होते. इंदिरा ग्रुपच्या तपस्या कॅम्पसमध्ये हा कार्यक्रम पार पडला. यावेळी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्वच्छता अभियानाच्या राजदूत (ब्रँड अँबेसिडर) प्रसिद्ध नेमबाज अंजली भागवत यांच्या हस्ते कचरा गाडीचे फित कापून उद्घाटन करण्यात आले. यावेळी इंदिरा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या अध्यक्षा डॉ. तरिता शंकर आणि इंदिरा समूहाचे संचालक प्रा. चेतन वाकडकर तसेच इंदिरा ग्रुपचे विश्वस्त शार्दुल गांगल,मनुष्यबळ व प्रशासकीय संचालक संदीप गायकवाड,प्रकल्प संचालक आदेश गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
गावडे पुढे म्हणाले कि, परदेशात गेल्यावर आपण तेथील त्यांचे कडक नियमांचे पालन करतो. तेच नियम आपल्या देशात पाळल्यास आपला देश जगात चमकेल. इंदिरा ग्रुपच्या पुढाकाराने सुरू केलेल्या उपक्रमामुळे सामाजिक जागरूकता निर्माण होईल. परिसरात कचरा आणि घाण कुठे हि न फेकता तो कचरा कुंडी मध्येच टाकावा आणि आपला परिसर स्वच्छ ठेवावा जेणे करून रोगराई पसरण्याचा धोका टळेल व ती आपण पार पाडलीच पाहिजे अशी विचारधारणा असलेला इंदिरा ग्रुप कंबर कसून स्वच्छता अभियान राबवत आहे. शिवाय लोकांनी प्लास्टिक बॅग वापरणे टाळून जिथे तिथे कचरा करू नये.
इंदिरा ग्रुपच्या अध्यक्षा डॉ. तरिता शंकर यांनी स्वच्छतेचे महत्त्व सांगत म्हणाल्या कि, हि कचरा गाडी कचरा उचलण्यासाठी कायमस्वरूपी जनसेवेत उपलब्ध करून देत आहोत “स्वच्छ ठिकाणी देवाचा वास असतो” असे मानतो. केवळ इंदिरा कॉलेजचा परिसर नव्हे तर सभोवतालच्या २ किलोमीटर अंतरावरचा परिसर स्वच्छ राहावा या हेतूने ७ लाख रुपये खर्च करून गाडी खरेदी केली. हि गाडी दिवसभर कचरा उचलून विल्हेवाट लावेल. यासाठी ड्रायव्हर व हेल्पर, डिझेलचा येणारा महिन्याचा ४५ हजार रुपये खर्च इंदिरा ग्रुप करणार आहे.
व्हीएस न्यूज - पिंपरी चिंचवड महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांकडे सगळ्यांनीच दुर्लक्ष केले आहे. ही गावे कोणत्याही सुविधांपासून वंचित राहणार नाही. कोणत्याही प्रकारचे आरोप करताना पुरावासहित सादर करा, विकासाचे ‘राजकारण’ करु नका, असे मत आमदार महेश लांडगे यांनी मोशी येथे व्यक्त केले.
पिंपरी चिंचवड महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांवर २० वर्षांपासून अन्याय होत होता. तो अन्याय दूर करण्याचा ‘शब्द’ या परिसरातील नागरिकांना मी दिला होता. तो पाळला असून या भागात रस्त्यांची कामे सुरु होत आहेत. याचा मला मनस्वी आनंद आहे. आगामी काळात पालिकेतील या समाविष्ट गावांत रस्ते, मुबलक पाणी, उड्डाण पूल, क्रीडांगणे, उद्याने विकसित करण्यावर माझा भर असणार आहे. शहराच्या इतर परिसराचा ज्या पद्धतीने विकास झाला आहे. त्याच पद्धतीने समाविष्ट गावाचा विकास करुन गावाचा कायापालाट केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही.
समाविष्ट गावातील पहिल्या टप्प्यातील ९० कोटींच्या रस्त्यांच्या कामाचे आज आमदार लांडगे यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. या कामांमध्ये मोशी येथील गट क्रमांक ५७ ते ६१ पर्यंतचा १८ मीटर डीपी रस्ता, शिवाजीवाडी ते मोशी, मोशी आळंदी रस्ता ते इंद्रायणी नदी (केळगावपुलापर्यंतचा) १८ डीपी रस्ता डुडुळगाव, च-होली पठारे मळा, डी वाय पाटील कॉलेज विकास आराखड्यातील ३० मीटर रुंदीच्या रस्त्याचे उर्वरित (पूर्व पठारे मळा, च-होली) च-होली मुख्य रस्ता, दाभाडे वस्ती ते इंद्रायणी नदीपर्यंतचा ४५ मीटर रुंद रस्ता, पुणे आळंदी रस्ता ते दाभाडे वस्ती येथील ३० ते ४५ मीटर डीपी रस्ता विकसित करणे आझादनगर च-होली या कामांचे भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी महापौर नितीन काळजे, उपमहापौर शैलजा मोरे, स्थायी समितीच्या अध्यक्षा सीमा सावळे, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, क्रीडा समितीचे सभापती लक्ष्मण सस्ते, सारंग कामतेकर, भीमा फुगे नगरसेविका सुवर्णा बुर्डे, ई क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी आणि पदाधिकारी आदी उपस्थित होते. आमदार महेश लांडगे म्हणाले, ”महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांकडे आजवर सर्वांनी दुर्लक्ष केले. त्यांना विविध सोयी-सुविधांपासून वंचित ठेवले. त्यांच्याकडे केवळ मतपेढी म्हणून पाहिले गेले. मी आमदार झाल्यापासून गेल्या तीन वर्षांत समाविष्ट गावातील विकासासाठी सर्वाधिक निधी खर्च केला आहे. महापालिका निवडणुकीत समाविष्ट गावातील नागरिक भाजपच्या पाठीमागे उभे राहिले. त्यांना आम्ही गावांच्या विकासाचे आश्वासन दिले होते. त्यानुसार आम्ही शब्द पाळला आहे. भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, मी, महापौर नितीन काळजे, स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे, पक्षनेते एकनाथ पवार आम्ही सर्वांनी समाविष्ट गावाचा कायापालट करण्याचा निर्धार केला आहे”. तसेच कचरा डेपो, शहराचा विकास आदींबाबत त्यांनी भाष्य केले.
”समाविष्ट गावात ४२५ कोटी रुपयांच्या खर्चाची कामे केली जाणार आहेत. त्यातील पहिल्या टप्प्यातील ९० कोटींच्या कामांचे आज भूमिपूजन झाले आहे. गेल्या २० वर्षांत विकासापासून वंचित असलेल्या समाविष्ट गावांमधील अविकसित रस्ते आणि आरक्षणांच्या विकासाला प्राधान्य देण्यात आले आहे. भाजपने समाविष्ट गावातील नागरिकांना न्याय दिला आहे. समाविष्ट गावात मोठ्या प्रमाणात विकास कामे केली जाणार आहेत. गेल्या २० वर्षांत विकासापासून वंचित असलेल्या समाविष्ट गावांमधील अविकसित रस्ते आणि आरक्षणांच्या विकासाला प्राधान्य देण्यात आले आहे”, असेही आमदार लांडगे म्हणाले.
आताच्या पाच वर्षाचा शहराचा विकास व मागील २० वर्षाचा शहराचा विकास कसा झाला हे नागरिकांनीच तपासून पहावे. कोणत्याही विषयात विकासाच राजकारण करु नका. समाजाचे प्रश्न कसे सोडवता येतील याकडे पहा. ”शहराचा इतर भागात चांगल्या पद्धतीने विकास झाला आहे. त्याच धर्तीवर समाविष्ट गावांत प्रशस्त रस्ते करण्यात येत आहेत. उद्याने, क्रीडांगणे, मुलबक पाण्याची सोय करण्यात येणार आहे. समाविष्ट गावातील चांगला विकास होऊन नागरिकरण वाढेल. मोठ-मोठे प्रकल्प येतील. त्याचा नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. भाजपचा अजेंडा विकास कामांचा आहे. त्यानुसार पक्षाने विकास कामे सुरु केली आहेत. सत्तेच्या माध्यमातून आम्ही जनसेवा करत आहोत”, असेही आमदार लांडगे म्हणाले. महापौर नितीन काळजे म्हणाले, ”पालिकेतील समाविष्ट गावात २० वर्षांपासून रस्ते झाले नव्हते. त्यामुळे नागरिकांचे मोठे हाल होत होते. महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता आल्याने आमदार महेश लांडगे यांच्या माध्यमातून समाविष्ट गावाचा विकास होत आहे. रस्ते झाल्यावर शेतक-यांना मोठा फायदा होईल. हे रस्ते करत असताना गेल्या २० वर्षांत विकासापासून वंचित असलेल्या समाविष्ट गावांमधील अविकसित रस्ते आणि आरक्षणांच्या विकासाला प्राधान्य देण्यात आले आहे. याचे सर्व श्रेय भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे यांचे आहे”.
व्हीएस न्यूज - राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेअंतर्गत आज पिंपरी चिंचवड शहरातील १ लाख ९७ हजार ७७८ बालकांना पोलिओचे लसीकरण देण्यात आले असल्याची माहिती महापालिकेचे वैद्यकिय संचालक डॉ. पवन साळवे यांनी दिली.
या पोलिओ लसीकरण मोहिमेचे आज सकाळी भोसरी रूग्णालयात महापौर नितीन काळजे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी डॉ. पवन साळवे, महिला वैद्यकिय अधिकारी डॉ. वर्षा डांगे, रोटरी क्लबचे पदाधिकारी तसेच महापालिकेचे कर्मचारी उपस्थित होते. महापालिकेच्यावतीने संपूर्ण शहरात ८५५ केंद्रावर लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली होती. ८ प्रभारी वैद्यकिय अधिकारी रूग्णालय व ५३ वैद्यकिय अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली २७३४ लसीकरण कर्मचारी नेमण्यात आले होते.
व्हीएस न्यूज - पिंपरी न्यायालयात केस चालविण्यासाठी ‘रिमांड अॅडव्होकेट’ म्हणून अॅड.अतिश लांडगे व अॅड. प्रसन्ना लोखंडे यांची पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने नियुक्ती केली आहे. ज्यांना आपल्या न्यायालयीन प्रक्रियेसाठी वकील नेमणे परवडणारे नाही, अशा नागरिकांना न्यायालयात हक्काचा वकील मिळणार आहे.
अॅड.अतिश लांडगे हे मागील दहा वर्षांपासून पिंपरी न्यायालयात फौजदारी क्षेत्रात वकिली करत असून ते येरवडा कारागृह, बाल सुधारगृह, तसेच पोलीस कोठडी येथील बंद्यांना मागील पाच वर्षांपासून पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत मोफत कायदेविषयक सेवा देत आहेत. आतापर्यंत कारागृहातील ३०० ते ४०० कैद्यांना त्यांनी केसमध्ये कायदेविषयक मार्गदर्शन केले आहे. अभिनेता संजय दत्त येरवडा कारागृहात असताना त्यानेही लांडगे यांच्या कामाची पत्राद्वारे प्रशंसा केली आहे.
हिंजवडी येथील ज्योतीकुमारी खून खटल्यात आरोपीस फाशीची शिक्षा झालेल्या आरोपीच्या वतीने राष्ट्रपतींना शिक्षा माफीसाठी विधीसेवा प्राधिकरणाने त्यांची नियुक्ती केली होती. त्याचा निकाल प्रलंबित आहे. त्यांची आता पिंपरी न्यायालयात “रिमांड अॅडव्होकेट’ म्हणून नियुक्ती झाल्यामुळे पिंपरी न्यायालयात वकील नाही या कारणामुळे कोणीही न्याय हक्कापासून वंचित राहणार नाही. न्यायालयात अटक करून आणल्यानंतर आरोपीतर्फे रिमांडला हजर राहणे, त्यांचा जामीन अर्ज ठेवणे, त्यांच्या केसेस चालविणे गरीब पक्षकारांना यामुळे सोपे होणार आहे.
व्हीएस न्यूज - पुण्यातील मुंढवा परिसरात एका आयटी कंपनीत काम करणाऱ्या तरुणीने सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना आज (सोमवार) दुपारी घडली. अश्विनी गवारे (वय २२, रा. शिरूर) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव असून ती एका आयटी कंपनीत प्रशिक्षणार्थी म्हणून काम करत होती. या घटनेचा अधिक तपास मुंढवा पोलिस करत असून कौटुंबिक कारणामुळे आत्महत्या केली असावी असा पोलिसांचा अंदाज आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंढव्यातील ग्लोबल टॅलेंट ट्रॅक या आयटी कंपनीमध्ये आश्विनी गवारे ही तरूणी नोकरीस होती. मागील सात दिवसांपासून ती रजेवर होती. आजच सकाळी ती कामावर आली होती. त्यानंतर काही वेळाने अचानक ती इमारतीच्या सातव्या मजल्यावर गेली आणि तेथून उडी मारून आत्महत्या केली. तर या आत्महत्येमागे कौटुंबिक कारण असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002