माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील हजारो कर्मचाऱ्यांची विशेष मेाहीम; चार दिवसांत १२ हजार जणांचा ‘ऑनलाइन’ निषेध
व्हिएस न्युज - हिंजवडी आयटी पार्ककडे जाणाऱ्या रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडवण्यात आणि ठोस उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यास स्थानिक लोकप्रतिनिधी आणि संबंधित शासकीय यंत्रणांना येत असलेले अपयश लक्षात घेऊन हिंजवडी परिसरात काम करणारे माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील हजारो कर्मचारी (आयटिअन्स) वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी एकवटले आहेत. ‘फ्री अप हिंजवडी’ या मोहिमेद्वारे लढा देण्यास सुरुवात झाली असून अवघ्या चार दिवसांत तब्बल १२ हजार जणांनी ऑनलाइन माध्यमातून स्वाक्षरी करत वाहतूक कोंडीचा निषेध केला.
हिंजवडी परिसरातील वाहतूक कोंडीच्या समस्येने गंभीर स्वरूप धारण केले आहे. हिंजवडी परिसरातील माहिती तंत्रज्ञान कंपन्यांकडे दररोज हजारो कर्मचारी नियमित जा-ये करीत असतात. तीन ते सहा किलोमीटर अंतरावरील कंपन्यांमध्ये जाण्यासाठी आयटिअन्सना वाहतूक कोंडीमुळे किमान दोन ते तीन तासांचा प्रवास करावा लागत आहे. वर्षांनुवर्षे ही परिस्थिती कायम असून वाहतूक कोंडी दूर करण्याची केवळ चर्चाच होत आहे. हायपरलूप, मेट्रो, बीआरटी, नव्याने काही पर्यायी मार्ग असे आश्वासन आयटिअन्सना देण्यात येत आहे. पण वाहतूक कोंडी होणाऱ्या लहान-मोठय़ा बाबींकडे शासकीय यंत्रणा आणि लोकप्रतिनिधींकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्यामुळेच आता ही कोंडी फोडण्यासाठी ‘फ्री अप हिंजवडी’ ही मोहीम आयटिअन्सनी हाती घेतली आहे. त्याबाबतची माहिती या मोहिमेचे समन्वयक सुधीर देशमुख यांनी दिली.
हिंजवडी आयटी पार्ककडे जाणाऱ्या रस्त्यांवर होत असलेली वाहतूक कोंडी लक्षात घेऊन यापूर्वीही आयटिअन्सनी वाहतूक सुधारणेचा आराखडा केला होता. आयटिअन्सना भेडसाविणारे प्रश्न मांडतानाच कोंडी होणारे रस्ते, डार्क स्पॉटची निश्चिती आणि त्यावरील उपाययोजनांचा आराखडाही त्यांनी शासकीय यंत्रणांना सादर केला होता. पण त्याची काटेकोर अंमलबजावणी होऊ शकली नाही. पिंपरी-चिंचवड महापालिका, महाराष्ट्र औद्योगिक महामंडळ, पीएमआरडीए, सार्वजनिक बांधकाम विभाग, वाहतूक पोलीस, ग्रामपंचायत अशा संबंधित घटकांकडून हतबलता व्यक्त होत असल्यामुळे स्वाक्षरी मोहीम राबविण्यास सुरुवात झाली आहे. www.change.org यावरून आयटिअन्सने स्वाक्षरी मोहीम राबवली असून या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास ही बाब आणून देणार आहे.
भविष्यात भीषण वाहतूक कोंडी
हिंजवडी आयटी पार्कमध्ये दोन ठिकाणाहून प्रवेश करता येऊ शकतो. भूमकर चौक आणि वाकड चौक ही दोन ठिकाणे त्यादृष्टीने महत्त्वाची आहेत. सहा वेगवेगळे मार्ग याच ठिकाणी एकत्र येतात. या भागातच प्रामुख्यानेवाहतूक कोंडी निर्माण होते. हिंजवडी आयटी पार्क सहा टप्प्यात उभारला जाणार असून दोन टप्पे पूर्ण झाले आहेत. तिसऱ्या टप्प्यात कंपन्यांची उभारणी सुरु झाली आहे. उर्वरित टप्प्यांचे काम पूर्ण झाले तर वाहतूक कोंडीची समस्या भीषण होणार आहे.
शासकीय यंत्रणांचे दुर्लक्ष
पिंपरी-चिंचवड महापालिका, महाराष्ट्र औद्योगिक महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्रामपंचायत, पीएमआरडीए, वाहतूक पोलीस आणि राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारित हिंजवडी आयटी पार्ककडे जाणारे रस्ते आहेत. या शासकीय यंत्रणांकडे त्यासंदर्भात सातत्याने पाठपुरावा करण्यात आला आहे. वाहतूक पोलिसांकडे अपुरे मनुष्यबळ असून वाहतूक नियंत्रण दिव्यांची उभारणी, अतिक्रमणमुक्त रस्ते, तसेच रस्त्यांवरील खड्डय़ांची दुरुस्ती होत नसल्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे.
प्रश्न नव्हे, उपायांचाही पर्याय
वाहतूक कोंडी सोडवण्यासाठीचा आराखडाही यापूर्वी करण्यात आला होता. मात्र त्याची प्रभावी अंमलबजावणी झाली नाही. हिंजवडी आयटी पार्क आणि आसपासच्या नऊ गावांचा पिंपरी-चिंचवड महापालिकेत समावेश करावा. पीएमआरडीएकडून या भागाचा विकास आराखडा प्राधान्याने करावा. पीएमआरडीए आणि एमआयडीसीने अतिक्रमणे हटवण्यासाठी विशेष पथकांची स्थापना करावी. वाहतूक पोलिसांची संख्या वाढवावी, अशा काही मागण्या आयटिअन्सकडून करण्यात आल्या आहेत.
हे उपाय..
कंपन्यांच्या उत्पादन क्षमतेवर परिणाम
वाहतूक कोंडीमुळे तीन लाख कर्मचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. तीन ते सहा किलोमीटर अंतरासाठी दोन ते तीन तासांचा प्रवास करावा लागतो. प्रती दिन किमान एक लाख वाहने हिंजवडी आयटी पार्ककडे जातात. वाहतूक कोंडीचा फटका बसल्यामुळे कर्मचाऱ्यांचा वेळ वाया जात असल्यामुळे कंपन्यांच्या उत्पादन क्षमतेवरही परिणाम होत आहे.
व्हीएस न्युज - चिंचवडमधील आदित्य बिर्ला रुग्णालयाने आर्थिक दुर्बल घटकातील एका रुग्णावर मोफत उपचार न करता उपचाराचे पैसे देत नाही म्हणून डांबून ठेवल्याने रुग्णालयाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रेखा दुबे, त्यांचा भाऊ राजेश दुबे आणि बिर्ला रुग्णालयातील बाऊंसर तसेच रुग्णालयावर वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इच्छेविरोधात डांबून ठेवणे, जाणीवपूर्वक दुखापत करणे तसेच सामुहिकरित्या गुन्हा केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी रुग्णालयाने डांबून ठेवलेल्या रुग्णाचा मुलगा संजय दशरथ आरडे (वय ३८, रा. कैलासनगर, पाण्याच्या टाकीजवळ, पिंपरी, मूळ रा. चिलवडी, ता. कर्जत, जि. अहमदनगर) यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय यांचे वडील दशरथ शिवाजी आरडे (वय ७२) यांना पिंपरी येथील राहत्या घरी ६ ऑगस्ट रोजी अर्धांगवायूचा झटका आला होता. यामुळे त्यांना सुरुवातीला पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र तेथे त्यांच्या आरोग्यात सुधारणा होत नसल्याने पुढील उपचारासाठी ८ ऑगस्ट रोजी चिंचवड येथील आदित्य बिर्ला रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णाला दाखल करताना उपचारासाठी सुरूवातीला दहा हजार रुपये भरण्यात आले. उपचारानंतर दशरथ आरडे यांना ११ ऑगस्ट रोजी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर रुग्णालय व्यवस्थापनाने दशरथ आरडे यांच्यावरील उपचारापोटी ८६ हजार ५८३ रुपयांचे बिल त्यांच्या हातात ठेवले. आरडे कुटुंबिय गरीब असल्यामुळे त्यांना एवढी मोठी रक्कम भरणे शक्य नव्हते. त्यामुळे त्यांनी आपण दारिद्य्र रेषेखालील असल्याचे रुग्णालय व्यवस्थापनाला सांगितले. कायद्याने आर्थिक दुर्बल घटकांतील रुग्णांवर मोफत उपचार करणे आदित्य बिर्ला रुग्णालयाला बंधनकारक आहे.
रुग्णालय व्यवस्थापनानेही त्याबाबतचा फलक रुग्णालयाच्या दर्शनी भागात लावलेला आहे. त्यामुळे आरडे कुटुंबियांनी रुग्णालयाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रेखा दुबे यांची भेट घेऊन वस्तुस्थिती सांगितली. आरडे हे आर्थिक दुर्बल घटकांतील असल्याचे कागदोपत्री पुरावे देऊनही दुबे यांनी त्यांना उपचाराचे संपूर्ण बिल भरावे लागेल, असे सांगितले. वारंवार विनंती करूनही दुबे यांनी त्यांचे ऐकले नाही.
त्यामुळे संजय आरडे यांनी सामाजिक कार्यकर्ते अजिज शेख यांची भेट घेऊन सर्व माहिती दिली. त्यांना घेऊन ते रुग्णालयात गेले असता रुग्णालय व्यवस्थापनाने त्यांना रुग्णाला भेटू दिले नाही. तसेच रुग्णाला जेवणही दिले जात नव्हते. रुग्णाला भेटण्याचा प्रयत्न केल्यास तेथे सुरक्षेसाठी ठेवलेले बाऊंसर यांनी आरडे यांना धक्काबुक्की केली. गेल्या दहा दिवसांपासून हा सर्व प्रकार सुरू होता.
अखेर आरडे यांनी काही सामाजिक कार्यकर्त्यांसोबत धर्मादाय आयुक्ताकडे धाव घेतली. धर्मादाय आयुक्ताने सर्व वस्तुस्थिती जाणून घेतल्यानंतर आदित्य बिर्ला रुग्णालयाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रेखा दुबे यांच्याशी संपर्क साधला. रुग्ण आर्थिक दुर्बल घटकातील असल्याचे पुरावे असून, रुग्णाला डिस्चार्ज देण्यास सांगितले. तसेच याबाबत वाकड पोलिसांनाही कळविण्यात आल्याने त्यांनी दुबे यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर दुबे यांनी बुधवारी (दि. २२) सकाळी अकरा वाजेपर्यंत रुग्णाला डिस्चार्ज देण्यात येईल, असे धर्मादाय आयुक्त व वाकड पोलिसांना आश्वासन दिले. प्रत्यक्षात त्यांनी रुग्णाला डिस्चार्ज दिला नाही.
संजय आरडे यांनी दुपारपर्यंत वाट पाहून वडिलांना डिस्चार्ज न मिळाल्याने सामाजिक कार्यकर्ते अजिज शेख, लोकशाही संस्थेचे अध्यक्ष अजय लोंढे, ग्राहक हक्क संघर्ष समिती अध्यक्ष अमोल उबाळे, नॅशनल ब्लॅक पँथर पार्टीच्या महिला अध्यक्षा संगीता शहा, रिपब्लिकन युवा मोर्चाचे उपाध्यक्ष भारत मिरपगारे, सामाजिक कार्यकर्ते रवि भोसले, अंजना गायकवाड, मल्लाप्पा याड्रमी, जितू गिल यांच्यासह वाकड पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर वाकड पोलिसांनी आदित्य बिर्ला रुग्णालय, रुग्णालयाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रेखा दुबे, त्यांचा भाऊ संजय दुबे आणि बाऊंसर विरोधात दशरथ आरडे यांना इच्छेविरोधात डांबून ठेवणे, जाणीवपूर्वक दुखापत करणे तसेच सामुहिकरित्या गुन्हा केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
वाकड पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश दत्तात्र्य माने तपास करत आहेत
व्हीएस न्युज - चिंचवडमधील आदित्य बिर्ला रुग्णालयाने आर्थिक दुर्बल घटकातील एका रुग्णावर मोफत उपचार न करता उपचाराचे पैसे देत नाही म्हणून रुग्णाला गेल्या ९ दिवसांपासून डांबून ठेवण्यात आले आहे. त्यामुळे या रुग्णालयांवर व रुग्णालयाच्या सीईओ रेखा दुबे यांच्यावर फसवणूक व अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अजिज शेख यांनी पोलिस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांच्याकडे केली आहे.
दरम्यान, अजिज शेख, त्यांचे कार्यकर्ते तसेच रुग्ण दशरथ शिवाजी यांच्या नातेवाइकांनी आदित्य बिर्ला रुग्णालयाकडून होत असलेल्या अन्यायाविरोधात धरणे आंदोलन सुरू केले आहे.
यासंदर्भात अजिज शेख यांनी पोलिस आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, “दशरथ शिवाजी आरडे (वय ७२, रा. कैलासनगर, पिंपरी) यांना अर्धांगवायूचा झटका आला होता. त्यामुळे त्यांना ८ ऑगस्ट रोजी चिंचवड येथील आदित्य बिर्ला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारासाठी त्यांनी रुग्णालयात दहा हजार रुपये भरले. तसेच रुग्णालयाने त्यांना औषधे बाहेरून आणण्यास लावले. त्यामुळे त्यांनी औषधांवरही हजारो रुपये खर्च केले आहेत. वास्तिवक दशरथ आरडे हे आर्थिक दुर्बल घटकांतील आहेत. त्यामुळे त्यांच्यावर आदित्य बिर्ला रुग्णालयात मोफत उपचार होणे हा त्यांचा कायदेशीर हक्क आहे. आर्थिक दुर्बल घटकात मोडत असल्याचे सर्व कागदोपत्री पुरावे त्यांनी रुग्णालय व्यवस्थापनाला दाखविले. तरीही रुग्णालयाने त्यांच्यावर मोफत उपचार केले नाहीत.
उपचारानंतर त्यांना ११ ऑगस्ट रोजी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. परंतु, उपचाराचा खर्च देण्याची त्यांची ऐपत नसल्यामुळे रुग्णालयाने गेल्या नऊ दिवसांपासून त्यांना सोडलेले नाही. तसेच त्यांचे औषध व जेवणही बंद करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या नातेवाइकांनाही त्यांना भेटू दिले जात नाही. दशरथ आरडे यांना रुग्णालयाच्या सीईओ रेखा दुबे यांनी अक्षरशः डांबून ठेवले आहे. त्यामुळे रुग्णालय व्यवस्थापन व सीईओ रेखा दुबे यांच्यावर फसवणूक आणि अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.”
व्हीएस न्युज - सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळाचा ४१ वा वार्षिक स्नेहमेळावा काळेवाडी येथील जोतीबा मंगल कार्यालय येथे १५ आॅगस्ट रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. या वेळी हजारोंच्या संख्येने सिंधुदुर्गवासीय उपस्थित होते. स्थानिक नगरसेविका उषा (माई) काळे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या वेळी मंडळाचे अध्यक्ष अजय पाताडे, रामकृष्ण राणे, अंकुशराव साईल, प्रमोद राणे, परशुराम प्रभू, अरविंद पालव आदी मान्यवर उपस्थित होते.
मुलांचा सांस्कृतिक कार्यक्रम झाला. परीक्षक म्हणून शोभा गायकवाड, मेघा साईल यांनी काम पाहिले. नाट्यसिंधूच्या वतीने प्लॅस्टिकबंदीबाबत समाज प्रबोधनपर एकांकीका सादर करण्यात आली. ‘शिक्षणाचा सोपा मार्ग’ या विषयावर वक्ते सदाशिव पांचाळ यांचे व्याख्यान झाले.
स्थायी समिती अध्यक्षा ममता गायकवाड, कोकण महासंघाचे अध्यक्ष व पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते डॉ. कैलास कदम, शिवसेना जिल्हा संघटीका सुशिला पवार, माजी नगरसेविका विजया सुतार, प्रमोद ताम्हणकर, उद्योजक संतोष सुतार, अविनाश चाळके यांच्या हस्ते जिल्हा अंतर्गत दिला जाणारा ‘सिंधुदुर्ग जिल्हा भुषण पुरस्कार’ कोकण कन्या रिना व वर्षा विश्वास केसरकर या दोन उच्चशिक्षित तरुणींना देण्यात आला. या दोघी बहिणींनी वडिलांच्या आजारपणानंतर पुरुषांनाही लाजवेल अशी शेती करुन तरुणांपुढे एक आदर्श घडविला आहे.
सदरच्या मंडळांतर्गत दिला जाणारा पुरस्कार चंद्रकांत नाईक यांना देण्यात आला. दोन्ही पुरस्कारांचे स्वरूप रोख रक्कम अकरा हजार, मानपत्र, शॉल, श्रीफळ असे होते. त्याचप्रमाणे पाच ज्येष्ठ कार्यकर्ते चंद्रकांत चव्हाण, गणपत सावंत, शरद कवठणकर, भास्कर प्रभू, मधुसुदन परब यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
व्हीएस न्युज - पिंपरी-चिंचवड महापालिकांच्या प्रसुती रुग्णालयांतील ताण यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयावर (वायसीएमएच) पडत असल्याने अनेक बाळांतनींची गैरसोय होते. ही गैरसोय रोखण्यासाठी महापालिका आयुक्तांनी आरोग्य विभागाला सात दिवसांच्या आत आदीत्य बिर्ला स्मृती रुग्णालयाबरोबर (एबीएमएच) करारनामा करण्याचे आदेश दिले आहेत. या करारनाम्यानुसार महापालिकेच्या आकुर्डी, सांगवी, थेरगाव, तालेरा, जिजामाता, यमुनानगर व भोसरी रुग्णालयात प्रसुतीसाठी दाखल होणाऱ्या महिलांना रात्री आठ ते सकाळी आठ या वेळेत उद्भवणाऱ्या तातडीच्या उपचारांसाठी पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात हलविण्यात येते. वायसीएमएचमध्ये पुर्वीपासूनच उपचारासाठी आलेल्यांची गर्दी व त्यातून या सातही रुग्णालयांतून शिफारशीने दाखल झालेल्या रुग्णांचा मोठ्या प्रमाणावर रुग्णालयीन कामावर ताण येतो. यामुळे अनेक वेळा लेबर रुममध्ये जागा उपलब्ध होत नाही. यामुळे एबीएमएचने वायसीएमएचला पुढील तीन महिन्यांसाठी रुग्णांची मोफत तपासणी व उपचार देण्याचा प्रस्ताव पाठवला होता. या प्रस्तावाला आज अखेर महापालिका आयुक्त श्रावण हार्डीकर यांनी मान्यता दिली.
याबाबत आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिलकुमार रॉय यांनी सांगितले की, महापालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये दाखल होणाऱ्या स्त्री रुग्णांना रात्रीच्या वेळी प्रसुतीमध्ये अडचण उद्भवल्यास असे रुग्ण एबीएमएचकडे रेफर करण्यासाठी मान्यता दिली आहे.
महापालिकेद्वारे प्रसुतीसाठी एबीएमएचमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांकडून अथवा नातेवाईकांकडून कोणत्याही स्वरुपाचा खर्च आकारण्यात येणार नाही. उपचार अथवा तपासणीचा खर्च आकारल्याची तक्रारी प्राप्त झाल्यास करार रद्द करण्यात येईल. तसेच सध्या वायसीएमएचमध्ये उपलब्ध नसलेला कॅन्सर सेवा देखील एबीएमएच पुरवणार आहे.
एटीएममधील सीसीटीव्ही चित्रीकरणाची पडताळणी
व्हीएस न्युज - गणेशखिंड रस्त्यावरील कॉसमॉस बँकेच्या मुख्यालयात असलेल्या सव्र्हरवर हॅकरने हल्ला चढवून रुपे डेबिट कार्ड आणि व्हिसा कार्डधारकांची गोपनीय माहिती चोरून ९४ कोटी ४२ लाख रुपयांची रक्कम लांबविल्या प्रकरणात देशभरातील ४१ शहरांमधील ७१ बँकांच्या एटीएम केंद्रातून रोकड काढल्याची माहिती तपासात मिळाली आहे. अडीच हजार व्यवहारांद्वारे विविध एटीएम केंद्रांतून अडीच कोटी रुपये काढण्यात आले आहेत. याबाबतची तांत्रिक माहिती घेण्याचे काम विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) सुरू आहे.
तांत्रिक माहिती क्लिष्ट असल्याने या माहितीचे विश्लेषण क रण्यास वेळ लागणार आहे. महाराष्ट्रातील ज्या बँकांच्या एटीएम केंद्रातून पैसे काढण्यात आले आहेत. त्या एटीएम केंद्रात असलेल्या सीसीटीव्ही चित्रीकरण तपासकामी ताब्यात घेण्यात येणार असल्याची माहिती सायबर गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्त ज्योतिप्रिया सिंह यांनी दिली.
महाराष्ट्रातील पुणे, मुंबई, कोल्हापूर, मुंब्रा तसेच मध्य प्रदेशातील इंदूर शहरातील एटीएम केंद्रातून पैसे काढण्यात आले आहेत. ज्या बँकांच्या एटीएम केंद्रातून पैसे काढण्यात आले आहेत. तेथील सीसीटीव्ही चित्रीकरण पडताळण्यात येणार आहे.
बँकेच्या खातेदाराने पैसे काढले का अन्य दुसऱ्या व्यक्तीने हे पैसे काढले, याची माहिती घेण्याचे काम सुरू असल्याचे पोलीस उपायुक्त सिंह यांनी सांगितले.
काही एटीएम केंद्रातील कक्षात सीसीटीव्ही चित्रीकरण अंधुक आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हे चित्रीकरण सुस्पष्ट करण्यात येणार आहे. कॉसमॉस प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांकडून विशेष पथकाची स्थापना करण्यात आली आहे. या प्रकरणी कॉसमॉस बँकेकडून तांत्रिक माहिती मागविण्यात आली आहे.
रेल्वेच्या २९ वाघिणींद्वारे १४.५ लाख लिटर पाणी रवाना
व्हीएस न्युज - केरळमध्ये पावसाच्या थैमानाचे जनजीवन विस्कळीत झाले असून, पूरस्थितीमुळे पिण्याच्या पाण्याचा भीषण प्रश्न तेथे निर्माण झाला आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी रेल्वेने पुढाकार घेतला आहे. पुणे आणि रतलाम येथून पिण्याच्या पाण्याने भरलेल्या एकूण २९ वाघिणींद्वारे केरळच्या कायनकुलम स्थानकावर तब्बल साडेचौदा लाख लिटर पाणी शनिवारी संध्याकाळी रवाना करण्यात आले आहे. साधारणत: चोवीस तासांच्या कालावधीत हे पाणी केरळला पोहोचणार आहे.
केरळमध्ये आजवरची सर्वात भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे काही भागात विजेसह पिण्याचे पाणीही बंद करण्यात आले आहे. अनेक ठिकणी धर्मशाळांमध्ये किंवा निवारा उभारून पूरग्रस्तांना राहण्याची सोय करण्यात आली आहे. त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची मोठी टंचाई आहे. विविध ठिकाणांहून अनेक प्रकारची मदत पूरग्रस्तांना केली जात असतानाच रेल्वेने मात्र मूलभूत गरज असलेले पिण्याचे पाणी पाठविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पुणे विभागाने तातडीने पाण्याच्या वाघिणींची व्यवस्था केली. शुक्रवारी संध्याकाळपासूनच घोरपडी येथील यार्डात पुणे रेल्वेच्या पथकाने वाघिणींमध्ये पाणी भरणे सुरू केले.
रेल्वेकडे असलेल्या पाण्यासह अग्निशामक दलाच्या मदतीने बाहेरून पाणी आणून १४ वाघिण्यांमध्ये प्रत्येकी ५० हजार लिटर पाणी भरण्यात आले. शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास पाणी भरण्याचे काम पूर्ण करण्यात आले.
रतलाम येथूनही पाण्याच्या १५ वाघिणी पुण्यात येणार होत्या. त्यानुसार पुण्यात इंजिनची व्यवस्था तयार ठेवण्यात आली. दुपारनंतर रतलाम येथील गाडी पुण्यात पोहोचल्यानंतर या गाडीच्या वाघिणी पुण्याच्या गाडीला जोडण्यात आल्या. त्यानंतर पाण्याने भरलेल्या २९ वाघिणी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास केरळकडे रवाना करण्यात आल्या.
पुणे रेल्वेचे व्यवस्थापक मिलिंद देऊस्कर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिण्याच्या पाण्याची विशेष रेल्वे दौंड, वाडी, रेनुगुंटा या मार्गाने केरळच्या कायनकुलम स्थानकावर जाणार आहे. त्या ठिकाणी केरळ सरकारकडून आवश्यकता असलेल्या भागात पाण्याचे वितरण करण्यात येणार आहे.
पुणे विभागातून दुसऱ्यांदा गरजवंतांसाठी पाणी
लातूरमध्ये २०१६ मध्ये पाऊस दीर्घकाळ लांबल्यामुळे दुष्काळी स्थिती निर्माण झाली होती. पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाल्यानंतर रेल्वेच्या पुणे विभागाने पुढाकार घेऊन पाण्याच्या विशेष गाडय़ा लातूरला पाठविल्या होत्या. रेल्वेच्या पाण्याच्या वाघिणी त्या वेळी आपल्याकडे उपलब्ध नव्हत्या. राजस्थानमध्ये सातत्याने विविध भागात पाणी रेल्वेने पोहोचवावे लागते. त्यामुळे तेथे या वाघिणी उपलब्ध असतात. लातूरला पाणी देण्यासाठी राजस्थानमधून पाण्याच्या वाघिणी मागविण्यात आल्या होत्या. रेल्वेने पाणी पाठविण्याचा हा पहिलाच प्रयोग होता. त्यानंतर आता केरळला पाणी पाठवून पुणे विभाग दुसऱ्यांदा गरजवंतांची तहान भागविणार आहे.
व्हीएस न्युज - अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या सचिन प्रकाशराव अंधुरे याला २६ ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी ठोठावण्यात आली आहे.
आज दुपारी साडेबाराच्या सुमारास त्याला सीबीआयच्या विशेष न्यायालयात आणले असता न्यायालयाबाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. न्यायालयामध्ये सीबीआयच्या वकिलांकडून १४ दिवसांच्या कोठडीची मागणी करण्यात आली होती, पण विशेष न्यायाधीश अर्चना मुजुमदार यांनी त्याला ७ दिवसांची सीबीआय कोठडी ठोठावली आहे.
सचिन अंधुरे हा प्रत्यक्ष मारेकरी आहे, त्याच्याकडून हत्यार आणि वाहन ताब्यात घ्यायचे आहे. त्याने ट्रेनिंग कुठे घेतली, कोणी त्याला ट्रेनिंग दिली होती याची माहिती आरोपीच्या चौकशीतून समोर येऊ शकते त्यामुळे १४ दिवसांची कोठडी देण्याची मागणी सीबीआयच्या वकिलांकडून करण्यात आली होती. केंद्रीय गुन्हे अन्वेक्षण विभाग सीबीआयने शनिवारी औरंगाबाद येथून सचिन प्रकाशराव अंधुरे याला अटक केली होती. दरम्यान, माझ्या भावावरील आरोप चुकीचे असून त्याला याप्रकरणात फसवलं जात आहे असा आरोप आरोपीचा भाऊ प्रवीण अंधुरे यांने न्यायालयाबाहेर पत्रकारांशी बोलताना केला.
नालासोपारा स्फोटक प्रकरणात अटकेत असलेल्या शरद कळसकरच्या चौकशीतून सचिन अंधुरेचे नाव समोर आले. सचिन आणि शरद दोघे मित्र आहेत. एटीएसने दोन दिवसांपूर्वी औरंगाबादमधून सचिनला ताब्यात घेतले. त्याचा गुन्ह्यात सहभाग असेल तर त्याला अटक केली जाईल अन्यथा सोडून देऊ असे एटीएस अधिकाऱ्यांनी सचिनच्या कुटुंबियांना सांगितले होते. त्याचा गुन्ह्यातील सहभाग समोर आल्यानंतर त्याला अटक करुन सीबीआयकडे सोपवण्यात आले.
शरद कळसकर आणि सचिन अंधुरे दोघे औरंगाबादचे आहेत. कळसकर केसापुरी गावचा रहिवासी आहे तो कोल्हापूर नोकरीला असल्याचे सांगायचा. सचिन अंधुरे कुंवारफल्ली राजाबाजार येथे राहतो. निराला बाजार येथे एका कपडयाच्या दुकानात तो कामाला आहे. पत्नी, भाऊ आणि एक वर्षाची मुलगी असा त्याचा परिवार आहे. मे महिन्यात औरंगाबादमध्ये झालेल्या दंगलीत त्याचा सहभाग असल्याची माहिती मिळाली आहे. सचिनच्या फेसबुक अकांऊटवरुन तो हिंदुत्ववादी विचारसरणीचा असल्याचे स्पष्ट झाले.
श्रीकांत नावाच्या आणखी एका व्यक्तिला जालन्यातून अटक करण्यात आली असून त्यामुळे पुढच्या काही दिवसात आणखी काही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे.
नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा मागच्या पाचवर्षांपासून तपास सुरु आहे. सचिन अणदुरेच्या अटकेने या संपूर्ण कटाचा उलगडा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. २० ऑगस्ट २०१३ रोजी नरेंद्र दाभोलकर पुण्यात असताना मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडले होते. त्यावेळी सकाळी आठ ते साडे आठ दरम्यान त्यांची गोळया झाडून हत्या करण्यात आली होती. दोन अज्ञात बंदुकधाऱ्यांनी अत्यंत जवळून त्यांच्यावर चार गोळया झाडल्या होत्या. रक्ताच्या थारोळयात कोसळलेल्या दाभोलकरांचा जागीच मृत्यू झाला होता.
डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि डॉ. गोविंद पानसरे या दोन्ही हत्या प्रकरणात तपासाच्या प्रगतीबद्दल मुंबई उच्च न्यायलयाने नाराजी व्यक्त करुन सीबीआय आणि विशेष तपास पथकाची (एसआयटी) कानउघडणी केल्यानंतर दोन आठवडयांनी ही अटकेची कारवाई झाली आहे.
न्यायाधीश एससी धर्माधिकारी आणि न्यायाधीश भारती दानग्रे यांच्या खंडपीठासमोर दाभोलकर आणि पानसरे हत्या प्रकरणांच्या याचिकांवर सुनावणी झाली. न्यायालयाच्या देखरेखीखाली तपास व्हावा अशी मागणी या याचिकेत करण्यात आली होती. त्यावेळी न्यायालयाने राज्यातील स्थिती समाधानकारक नाही. पोलिसांवर दगड फेकले जात आहेत. जमाव रस्त्यावर आहे. बस जाळल्या जात आहेत. हे सर्व दु:खद आहे असे निरिक्षण न्यायालयाने नोंदवले होते.
दोन्ही हत्या प्रकरणातील मारेकऱ्यांना पकडू न शकल्याबद्दल न्यायालयाने सीबीआय आणि एसआयटी दोघांची कानउघडणी केली होती. तुम्ही अधिकारी काश्मीर ते त्रिपुरापर्यंत प्रवास करता पण रिकाम्या हाताने परत येता या शब्दात सुनावले व तपास अहवाल स्वीकारण्यास नकार दिला. सरकार बदलतील पण तुम्हाला तपास करावा लागेल. तुम्ही तुमच्या अहवालात तेच तेच सांगत आहात. अजून तपासात प्रगती का नाही झाली ? असा सवाल न्यायालयाने विचारला होता.
व्हीएस न्यूज – पुणे विद्यापीठ चौकातील तरुणावर झालेल्या गोळीबार प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी एकाला नाकाबंदी करून पकडले आहे. ही घटना शनिवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली होती. दरम्यान, विद्यापीठ चौकात भरदिवसा गर्दीत हा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. समीर किसन येणपुरे (वय 39, रा. मेहदले गैरेज, एरंडवणा) असे गोळीबार झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी गोळीबार करणा-या शुक्राचार्य मधाळे आणि त्याच्या साथीदाराला हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे.
समीर याचा फ्लेक्स लावण्याचा व्यवसाय आहे. तर, आरोपी शुक्राचार्य मधाळे याची एरंडवणे भागात टपरी होती. अतिक्रमण विभागाने मधाळे याची टपरी तोडली. समीर येणपुरे याच्या सांगण्यावरुनच अतिक्रमण विभागाने ही कारवाई केली, असा संशय मधाळे याला होता. शनिवारी समीर विद्यापीठ चौकातून जात होता. त्यावेळी दुचाकीवरुन आलेल्या शुक्राचार्य याने समीर याच्यावर गोळीबार केला. त्यात जखमी झालेल्या समीर याच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. वर्दळीतील आणि भरदिवसा घडलेल्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान, गोळीबार करणा-या शुक्राचार्य आणि त्याच्या साथीदाराला हिंजवडी पोलिसांनी नाकाबंदी करून पकडले आहे. चतुःशृंगी पोलीस पुढील तपास करीत आहेत.
महिन्याभरानंतर गुन्ह्याचा छडा लावण्यात पोलिसांना यश.
व्हीएस न्यूज – हातउसने घेतलेले आठशे रुपये आणि मोबाइलचे मेमरी कार्ड परत केले नसल्याने मित्राचा खून केल्याचे तपासत निष्पन्न झाले आहे. महिनाभरापूर्वी म्हणजेच 16 जुलै 2018 रोजी रहाटणी येथे ही घटना घडली होती. याप्रकरणी अनिल श्रावण मोरे (वय 39, रा. सायली पार्क, भैय्या चाळ, रहाटणी, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पवन उर्फ अनिल रमेश सुतार-हिरे (वय 39, मुळगाव चिंबळी ता. खेड जि. पुणे) असे खून झालेल्या वाहन चालकाचे नाव आहे.
रहाटणी येथे 16 जुलैला सकाळी सुतार याचा खून झाल्याचे उघडकीस आले. त्यानंतर पोलिसांनी अज्ञाताविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला होता. तपासादरम्यान सुतारकाम करणारा अनिल आणि पवन हे दोघे मित्र होते, अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तपासाची सूत्रे हलविली होती.
पवन याचा मृत्यू झाल्यापासून अनिल याने मोबाईल फोन बंद करुन ठेवला असल्याची, माहिती पोलिसांना मिळाली. अनिल हा बावधन येथील एका शाळेत सुतारकाम करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता मयत पवन याने हातउसने दिलेले 800 रुपये व मोबाईलचे मेमरीकार्ड परत केले नव्हते. त्यामुळेच पटाशीच्या साहाय्याने खून केल्याची कबूली अनिल याने दिली, अशी माहिती वाकड पोलिसांनी दिली.
व्हीएस न्युज - पिंपरी-चिंचवड मधल्या ताथवडे भागात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पित्यानेच पोटच्या दोन मुलांची हत्या करून नंतर स्वतःहा आत्महत्या केली. पत्नी कामावरून घरी परतल्यानंतर हा मन सून्न करुन सोडणारा प्रकार सामोर आला.
दीपक बरमनने (३५) पोटच्या दोन मुलांची शुभम आणि रुपमची गळा आवळून हत्या केली. शुभम १० वर्षांचा तर रुपम आठ वर्षांचा होता. त्यानंतर दीपकने स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केली.
पोलीस घटनास्थळी पोहोचले असून तपास सुरु केला आहे. घराच्या समोर असलेल्या दोन वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये पती-पत्नी नोकरीला होते. दीपकने इतके टोकाचे पाऊल का उचलले ? त्यामागे काय कारणे आहेत याचा शोध पोलीस घेत आहेत.
व्हीएस न्युज - शिवसेना राहटणी-काळेवाडी विभागाकडुन मा.अटलबिहारी वाजपेयी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून त्यांना आखेरचा जय महाराष्ट्र करित युवराज दाखले म्हणाले कि "आदणीॕय माजी पंतप्रधान मा. अटलबिहारी वाजपेयी यांचे वयाच्या 93 व्या वर्षी निधन झाले आहे. एक कवी मनाचे पर॔तु तरीही कणखर, एका पक्षाचे तरीही सर्व पक्षीयांच्या हृदयामध्ये स्थान असलेले एक विलोभनीय व्यक्तिमत्व आपण गमावले आहे. खरंच एका काळाचा अंत झाला आहे...
अटलबिहारी वाजपेयी यांनी संयुक्त आघाडी चे सरकार कसे चालवावे याचे उत्कृष्ट उदाहरण 1999 ते 2004 या काळात देशासाठी अर्पण करून दिले. विरोधी पक्षातील नेत्यांच्या मताचाही त्यांनी कायम आदर केला. देशातील सामाजिक सौहार्द टिकवण्यासाठी त्यांनी कायम प्राथमिकता दिली. आजच्या विध्वंसक व द्वेषाच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर अटलबिहारी वाजपेयी यांच्या सर्वव्यापी राजकारणाची कमी कायम जाणवत राहील. त्यांच्या निधनाने देशाचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले आहे."
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002