व्हीएस न्युज - पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याबरोबर झालेल्या एकेरीतील वादातून पिंपरी-चिंचवड पालिकेतील आक्रमक स्वभावाचे विरोधी पक्षनेते दत्ता साने आता अधिक आक्रमक झाले आहेत. भाजपने अविश्वास ठराव आणलेले नाशिक पालिकेचे आयुक्त तुकाराम मुंडे तुम्हाला नको असतील, तर आम्हाला द्या, असा आहेर त्यांनी भाजपला दिला आहे.याव्दारे त्यांनी एकाच दगडात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपच्या कथित भ्रष्टाचाराला रोख लावून आपला अपमान करणाऱ्या आयुक्तांना धडा शिकविण्याचा दुहेरी हेतू यामागे साने याचा असल्याचे दिसून येत आहे.
दोन दिवसांपूर्वी पिंपरी-चिंचवड पालिकेच्या स्मार्ट सिटीच्या सल्लागार समितीच्या बैठकीत हर्डीकर व साने यांच्यात मोठा वाद झाला होता. त्यांनी एकमेकांचा एकेरी उल्लेख केला होता. त्याच दिवशी साने यांनी हर्डीकर यांच्यावर सडकून टीकाही केली होती. दरम्यान, मुंडे प्रकरण समोर आले. नाशिक पालिकेत सत्ताधारी भाजपने त्यांच्यावर अविश्वास प्रस्ताव दिला होता.मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीमुळे तो तूर्त टळला. हा धागा पकडून त्यांना मुंडे नको असतील, तर आम्हाला ते द्या, अशी मागणी साने यांनी केली आहे. याव्दारे भाजपला आपले भय ना भ्रष्टाचार या घोषणेनुसार पिंपरी-चिंचवडमध्ये कारभार करता येईल, असा टोलाही त्यांनी लगावला. तसेच हर्डीकर यांनी त्यांना अज्ञानी संबोधल्याचा वचपा काढून एकाच दगडात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्नही त्यांनी केला आहे. मुंडेंना पिंपरीत आणण्याची मागणी करून त्यांनी वादग्रस्त हर्डीकर यांच्या बदलीचीच अप्रत्यक्ष मागणी केली आहे. वेळ पडली,तर मुख्यमंत्र्यांकडे ती सुद्धा करू, असे ते सरकारनामाशी बोलताना म्हणाले.
दरम्यान, आयुक्तांबरोबर त्यांचे सहकारी अधिकाऱ्यांनाही साने यांनी दुसरीकडे लक्ष्य केले आहे. पंतप्रधान आवास योजनेचा चुकीचा डीपीआर बनवून पालिकेला कोट्यवधी रुपयांचे नुकसान पोचविणारे सह शहर अभियंता राजन पाटील व कार्यकारी अभियंता प्रदीप पुजारी यांना निलंबित करून त्यांची सीबीआय चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. त्याजोडीने पालिका गैरकारभाराविरुद्ध या ना त्या प्रकारे आवाज उठविण्याचे त्यांचे काम सुरूच असून दररोज एक दोन प्रकरणात ते आयुक्तांना निवेदन देत आहेत. त्यामुळेच वैतागलेल्या आयुक्तांनी साने यांचा भर बैठकीत परवा अपमान केल्याचे समजते.
व्हीएस न्युज - चिंचवड पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या चापेकर चौकामध्ये 29 मे 2018 रोजी आकाश लांडगे या 24 वर्षीय तरुणाचा निर्घृण खून करण्यात आला. याप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्यातील तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली. मात्र, मुख्य आरोपी अदयाप फरार होता. फरार असलेल्या मुख्य आरोपीला चिंचवड पोलिसांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम तालुक्यातून अटक केली.
रणजित बाबू चव्हाण (वय 23, रा. वेताळनगर झोपडपट्टी, चिंचवड), असे अटक करण्यात आलेल्या सराईत आरोपीचे नाव आहे. यापूर्वी चिंचवड पोलिसांनी आकाश लांडगे खून प्रकरणात स्वप्नील ऊर्फ बाबा मोरे, प्रफुल्ल ढोकणे, सोन्या वराडे या तिघांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश लांडगे याच्या खुनाच्या गुन्ह्यातील फरार सराईत आरोपी रणजित घटना घडल्यापासून फरार होता. चिंचवड पोलीस त्याचा शोध घेत होते. रणजित आरसोली, ता. भूम, जि. उस्मानाबाद येथे असल्याची माहिती पोलिसांना त्यांच्या सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार चिंचवड पोलिसांच्या तपास पथकाने आरसोली या गावात जाऊन सापळा रचून रणजितला ताब्यात घेतले. रणजित याच्यावर विविध पोलीस ठाण्यांमध्ये 16 गुन्हे दाखल आहेत. तसेच तो चिंचवड, निगडी, वाकड, वडगाव मावळ या पोलीस ठाण्यातील फरार आरोपी होता. यावरून त्याला अटक करण्यात आली.
ही कारवाई पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त सतिश पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रभाकर शिंदे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विश्वजीत खुळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत जाधव, पोलीस हवालदार जगताप, पोलीस नाईक आखाडे, शेलार, शिरसाठ, पोलीस शिपाई डोके, आंबटवार यांच्या पथकाने केली.
काय आहे रायबा उर्फ आकाश लांडगे प्रकरण ?
आकाश लांडगे आणि रणजित बाबू चव्हाण या तरुणाची एप्रिल-मे 2018 मध्ये भांडणे झाली. त्या रागातून रणजित याने त्याच्या स्वप्नील ऊर्फ बाबा मोरे, सोन्या वराडे आणि प्रफुल्ल ढोकणे या मित्रांच्या मदतीने आकाशचा चाफेकर चौकात मंगळवार (दि. 30) रोजी आकाशला अडवून कोयता आणि रॉडने पायावर आणि कमरेच्या खाली मागील बाजूला वार केले. तसेच सिमेंटची कुंडी आकाशच्या डोक्यात मारली. यामध्ये आकाश गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याच्यावर उपचार सुरु असताना बुधवारी (दि. 31 मे) पहाटे तीनच्या सुमारास आकाशचा मृत्यू झाला.
रणजित चव्हाण याच्यावर तडीपारीची कारवाई देखील करण्यात आली आहे. बाबा मोरे याच्यावर दोन गुन्हे दाखल आहेत. मयत आकाश देखील गुन्हेगार होता. त्याच्यावर भारतीय दंड संहिता कलम 395,427 प्रमाणे गुन्हा दाखल असून त्याबाबतचे दोषारोपपत्र पोलिसांनी न्यायालयात पाठविले होते.
व्हीएस न्युज - पुण्यातील लुल्लानगर चाैकात सीएनजी गॅसच्या गळतीमुळे एका रिक्षाला भर रस्त्यात अचानक आग लागली. या अागीत संपूर्ण रिक्षा जळून खाक झाली आहे. सुदैवाने या अागीत कुठलिही जीवीत हानी झाली नाही. ही घटना रविवारी दुपारी अडीच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, नासीर बागवान (वय ४०) असे रिक्षाचालकाचे नाव अाहे. नासीर हा रिक्षामध्ये सीएनजी गॅस भरुन बिबवेवाडीकडून काेंढव्याकडे जात हाेता. लुल्लानगर येथील चाैकातील सिग्नलला ताे थांबलेला असताना अचानक रिक्षातून धूर येत असल्याचे त्याच्या लक्षात अाले. ताे तातडीने रिक्षाच्या बाहेर पडला अाणि बाजूला जाऊन उभा राहिला. अवघ्या काही मिनिटात अागीने रिक्षाला चारही बाजूने घेरले. अग्निशमन दलाला माहिती मिळताच काैंढवा अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अवघ्या दाेन मिनिटात अाग अाटाेक्यात अाणली. या अागीत संपूर्ण रिक्षा जळून खाक झाली आहे.
व्हीएस न्युज - दिवंगत कामगार नेते शरद राव यांच्या पुतळ्याचे अनावरण माजी केंद्रीय मंत्री खा. शरद पवार यांच्या हस्ते शनिवारी (1 सप्टेंबर) होणार आहे अशी माहिती महाराष्ट्र राज्य महानगरपालिका-नगरपालिका, कामगार कर्मचारी संघटना फेडरेशनचे कार्याध्यक्ष बबन झिंजुर्डे यांनी यावेळी दिली. यावेळी मुंबई म्युनिसीपल मजदूर युनियनचे सचिव गोविंद कामतेकर, कर्मचारी महासंघाचे मनोज माछरे, आबा गोरे, संजय कुटे, चारुशिला जोशी, दिगंबर चिंचवडे, अतुल आचार्य, नितीन समगीर, महाद्रंग वाघेरे, बंटी ठोकळ, उत्तम गंगावणे आदी उपस्थित होते.
झिंजुर्डे यांनी सांगितले की, तळेगाव दाभाडे येथील डॉ. राममोहन लोहिया समाजवादी विद्यापीठ, कडोलकर कॉलनी येथे शनिवारी दि. 1 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता दिवंगत कामगार नेते यांच्या पंचधातूच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण माजी केंद्रीय मंत्री खा. शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष मुंबई म्युनिसीपल इंजिनिअर्स असोसिएशनचे कार्याध्यक्ष नवनाथ घाडगे, अध्यक्ष हिंद मजदूर सभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष ॲड. महाबळ शेट्टी, निमंत्रक ॲड. सुखदेव काशीद, रमेश मालवीय, वामन कविस्कर, अशोक जाधव आदी उपस्थित राहणार आहेत.
शरद राव यांनी चौदा राज्यांमधल्या अठरा लाख कामगारांचे नेतृत्व केले. एका गरीब कामगाराच्या घरात त्यांचा जन्म झाला होता. त्यामुळे कामगारांच्या वेदनांची जाणीव मनात ठेवुनच त्यांनी कामगार संघटनेचे काम पंचेचाळीस वर्षांहून अधिक काळ केले. कामगारांसाठी लढणारा शरद राव नावाचा हा युगपुरुष कामगार चळवळीच्या मुशीत तावून सुलाखून निघालेले एक रत्न होते. जेंव्हा जेंव्हा कामगार आंदोलनात संभ्रम निर्माण होत असे, तेंव्हा शरद राव हे कामगार चळवळीला नवनिर्माणाच्या मार्गावर घेऊन जायचे. मुंबईसह देशातील एक अभ्यासू कामगार नेते म्हणुन त्यांची लोकप्रियता होती.
शरद राव यांचे दिनांक 1 सप्टेंबर, 2016 रोजी निधन झाले. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून, विशिष्ट ध्येयाने प्रेरित होऊन, महापालिकेतील कामगार, कर्मचारी, अधिकारी, अभियंते, मुंबईसह महाराष्ट्रातील विविध कारखाने - उद्योग - व्यवसायातील कामगार-कर्मचारी, कापड बाजारातील गुमास्ता, कंत्राटी कामगार, फेरीवाले, टॅक्सी-ऑटोरिक्षा चालक-मालक, रोजंदारीत, किरकोळ विक्रेते, छोटे दुकानदार, श्रमजीवी-कष्टकरी, गोर-गरीब आणि सर्वसामान्य नागरीकांना न्याय-हक्क मिळवुन देण्यासाठी आयुष्यभर अहोरात्र झटलेले, प्रामुख्याने बृहन्मुंबई महानगरपालिका कामगार, कर्मचारी, अधिकारी, परिचारिका-परिसेविका-तंत्रज्ञ, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी आणि अभियंत्यांची दैदिप्यमान ऐतिहासिक संघर्ष लढ्याचे भिष्म पितामह विख्यात कामगार नेते दिवंगत शरद राव यांचे चिरंतन स्मारक म्युनिसीपल मजदूर युनियन आणि म्युनिसीपल इंजिनिअर्स असोसिएशनचे नेते ॲड. सुखदेव काशिद आणि नवनाथ घाडगे यांच्या संकल्पनेतून साकार होत आहे. या कार्यक्रमास कामगारांनी व नागरीकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन महाराष्ट्र राज्य महानगरपालिका-नगरपालिका, कामगार कर्मचारी संघटना फेडरेशनच्या वतीने करण्यात आले आहे.
व्हीएस न्युज – कोयत्याने वार करून तरुणाचा निर्घृण खून केल्याची घटना आज (रविवारी) पहाटे ताजे गावात घडली. याप्रकरणी कामशेत पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. हा खून पूर्ववैमनस्यातून झाला असल्याची चर्चा मावळ परिसरात सुरु आहे.
किरण बाळू कोरडे (वय 25, रा. सज्जनवाडी, ताजे, मावळ), असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. सोमनाथ बाळू कोरडे (वय 22, रा. ताजे मावळ) यांनी कामशेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार नितीन ज्ञानेश्वर केदारी, बाळू शंकर केदारी, नितीन अर्जुन केदारी, बबन विठ्ठल केदारी, उमेश चंद्रकांत केदारी (सर्व रा. ताजे, मावळ) व काळू बाळू पिंपळे (रा. पिंपळोली, मावळ) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत किरण पिंपरी येथील एका कॉफी शॉपमध्ये काम करतो. शनिवारी (दि. 1) रात्री उशिरा काम संपवून पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास तो सज्जनवाडी येथील आपल्या घरी जात होता. किरण ताजे गावातील काशिनाथ केदारी यांच्या घरासमोर सर्व आरोपी थांबले होते. आरोपींनी किरणला थांबवून त्याच्या डोक्यात, चेह-यावर आणि हातावर कोयत्याने वार केले. हा संपूर्ण प्रकार किरण याचा चुलत भाऊ अमोल कोरडे याने पाहिला. त्याने तात्काळ किरण याचा भाऊ सोमनाथ याला फोनवरून कळविले. सोमनाथ तात्काळ घटनास्थळी आला. त्यावेळी किरण रक्ताच्या थारोळ्यात गंभीर जखमी अवस्थेत पडला होता. सोमनाथ याने किरण याला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
कामशेत पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. तर अन्य तीन आरोपी अद्याप फरार आहेत. कामशेत पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नीलकंठ जगताप तपास करीत आहेत.
व्हीएस न्युज - पिंपरी-चिंचवड शहरात पुणे महामेट्रोचे काम वेगात सुरू असून कासारवाडी येथे मेट्रोच्या पिलरचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केला आहे. तसेच शहरातील आतापर्यंत झालेल्या मेट्रोच्या कामाचे स्ट्रक्चरल ऑडिट मान्यता प्रात्त सरकारी संस्थेकडून करावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. त्यात साने यांनी म्हटले आहे की, शहरात पुणे-मुंबई महामार्गावर बीआरटी मार्ग उखडून पिंपरीपर्यंत मेट्रोचे काम सुरू आहे. त्यासाठी महामहामार्गावर ठिक-ठिकाणी खोदाई करण्यात आल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. तर दुसरीकडे मेट्रोचे सुरू असलेले कामही अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू असून संबंधित ठेकेदार नागरिकांच्या जीवाशी खेळत असल्याची बाब माहिती अधिकार कार्यकर्ते निलेश निकम यांनी निदर्शनास आणून दिली आहे. कासारवाडी येथील पिलरमध्ये सिमेंट अर्धवटपणे भरल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे भविष्यात याचा मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता असून एखादी दुर्घटना घडल्यास भाजपचे स्थानिक पदाधिकारी जबाबदार, असेही साने यांनी म्हटले आहे.
भाजपचे पदाधिकारी फक्त स्वतःला किती कामाचे ठेके मिळतील याकडेच लक्ष देत असून कामाच्या दर्जाकडे त्यांचे अजिबात लक्ष नाही. त्यामुळे शहरातील आतापर्यत झालेल्या मेट्रोच्या कामाचे स्ट्रक्चरल ऑडीट मान्यता प्रात्त सरकारी संस्थेकडून करुन घेण्यात यावे. यामध्ये ठेकेदार दोषी आढळला तर त्वरीत त्याचे काम थाबंवून त्याच्यावर कडक कारवाई करण्यात यावी. अन्यथा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने तीव्र आदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.
व्हीएस न्युज - वाहतूक कोंडीमुळे राज्यातील सर्वात मोठ्या आयटी पार्कपैकी एक असलेल्या हिंजवडी आयटी पार्कमधून कंपन्या काढता पाय घेण्याच्या मार्गावर आहेत.हिंजवडी आयटी पार्ककडे जाणाऱ्या रस्त्यावरील वाहतूक कोंडी आणि पायाभूत सुविधांचा बोजवारा उडाल्यामुळे आर्थिक क्षेत्रात काम करणाऱ्या सहा बहुराष्ट्रीय कंपन्या आणि 50 लहान कंपन्यांनी हिंजवडी आयटी पार्कमधून स्थलांतर केल्याचं समोर आलं आहे.
एकीकडे राज्यात गुंतवणूक आणण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहे, तर दुसरीकडे पायाभूत सुविधांमुळे कंपन्या स्थलांतर करत आहेत. वाहतूक कोंडीमुळे कंपन्यांना कोट्यवधींचा तोटा सहन करावा लागत असल्याचं बोललं जात आहे.
पुण्यातून जाऊन हिंजवडीत काम करायचं म्हणजे आठ तासांच्या शिफ्टचा निम्मा वेळ म्हणजे साडे तीन ते चार तास फक्त प्रवासात जातात. त्यामुळे कंपनीतील अधिकाऱ्यांना याचा त्रास सहन करावा लागतो. शिवाय कंपन्यांचे सेमिनार किंवा इतर कार्यक्रमही हिंजवडीत घेता येत नाहीत. या कंपन्या आपले कार्यक्रम इतर शहरांमध्ये आयोजित करतात. कारण, वाहतूक कोंडीमुळे हिंजवडीत वरिष्ठ अधिकाऱ्यांना येणं शक्य होत नाही.
गेल्या दोन वर्षांत हिंजवडी आयटी पार्कमधील दोन महत्त्वाच्या कंपन्या अनुक्रमे बालेवाडी आणि खराडी येथे स्थलांतरित झाल्या होत्या. त्यातच आता आर्थिक क्षेत्रात काम करणाऱ्या पाच ते सहा बहुराष्ट्रीय कंपन्यांनी हिंजवडी पार्कमधून काढता पाय घेतला आहे. तर पन्नासच्या आसपास लहान कंपन्या वाकड, बाणेर, बालेवाडी, तीर्थ आयटी टेक्नो स्पेस आणि पुण्यालगतच्या अन्य भागात स्थलांतरित झाल्या आहेत.
बहुराष्ट्रीय कंपन्यांनी हिंजवडी पार्कमधील त्यांचे ऑफ शोअर डेव्हलपमेंट सेंटर (ओएसडीसी) बंद केले आहे.
वाहतूक कोंडीमुळे कर्मचाऱ्यांना कंपनीत येण्यास उशिर होतो. कर्मचाऱ्यांसाठी असणाऱ्या वाहनांच्या इंधनावरही मोठा खर्च होत आहे. छोट्या कंपन्यांना त्याचा फटका बसत आहे. वाहतूक कोंडीमुळे कंपन्यांचं स्थलांतर हा रोजगाराच्या दृष्टीने चिंतेचा विषय आहे.
व्हीएस न्युज - लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळमध्ये घोटाळ्याप्रकरणी आमदार रमेश कदम याच्या पत्नीसह एकाला गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) पथकाने अटक केली आहे. दुसऱ्या व्यक्तिचा आर्थिक घोटाळ्यात सहभाग आहे. तर पत्नीकडुन बॅंकेच्या संयुक्त खात्याचा वापर केला जात होता. या दोघाच्या अटकेमुळे या घोटाळ्याला आणखी नवे वळण मिळण्याची शक्यता आहे.
रामेश्वर पांडुरंग गाडेकर (वय ३०) व प्रतिभा रमेश कदम (वय ४०, रा. बोरीवली,मुंबई) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. गाडेकर याने सीबीआयपुढे दोन दिवसांपूर्वी आत्मसमर्पण केले, त्यानंतर त्यास अटक करण्यात आली. तर प्रतिभा कदम यांना त्यांच्या राहत्या घरातुन अटक करण्यात आली असल्याची माहिती सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी दिली.
चार वर्षापूर्वी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्षपद रमेश कदम सांभाळत होते. त्यावेळी त्यांनी संगनमत करून तब्बल ३८५ कोटी रूपयांहून अधिक रूपयांच्या आर्थिक घोटाळा केला होता. या प्रकरणचा तपास सीबीआयकडे गेल्यानंतर सीबीआयने याप्रकरणी कदम याच्यासह १२ जणांना अटक केली होती. दरम्यान कदम हा सध्या ठाणे येथे न्यायालयीान कोठडीमध्ये आहे.
सीबीआयने अटक केलेल्या गाडेकर व कमलाकर ताकवले या दोघांनी सेठी ब्रदर्सचा साखर कारखाना विकत घेण्यासाठी ५ कोटी रूपयांचा आर्थिक व्यवहार केला होता. हे पाच कोटी रुपये कदम याने केलेल्या आर्थिक घोटाळ्यातील होते. तर कदम याचे बॅॆक अकाउंट प्रतिभा कदम यांच्या नावावर संयुक्तपणे होते. त्याचा वापर त्यांच्याकडुन केला जात होता. सीआयडीच्या पथकाकडुन अनेक दिवसांपासुन कदम व गाडेकर यांच्यावर नजर ठेवण्यात आली होती.
व्हीएस न्युज - सोमवारी साजरा होणारा दहीहंडी उत्सव सर्व मंडळांनी शांततेत साजरा करावा असे आवाहन अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांनी केले ऑटो क्लस्टर येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडी उत्सव साजरा करणाऱ्या मंडळांच्या अध्यक्ष व पदाधिकारी यांची बैठक शनिवारी घेण्यात आली यावेळी शहरातील 51 मंडळांचे अध्यक्ष, पिंपरी, चिंचवड, निगडी,भोसरी, भोसरी एमआयडीसी,दिघी, वाकड, चाकण, देहूरोड, तळेगाव, तळेगाव एमआयडीसी, हिंजेवडी, सांगवी, आळंदी पोलीस ठाण्याचे अधिकारी उपस्थित होते
रानडे यांनी सांगितले की मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांचे सर्वांनी काटेकोरपणे पालन करावे जनतेला नाहक त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी तसेच दहीहंडी उत्सवात वेळेचे बंधन, डी जे चा वापर न्यायालयाच्या आदेशानुसारच करावा असेही आवाहन रानडे यांनी केले
व्हीएस न्युज - पुण्यामध्ये दहीहंडीचा बॅनर लावण्यावरून झालेल्या वादात पाच जणांनी तलवारीने वार करत एका २४ वर्षीय दुकानदाराची हत्या केली आहे. अक्षय अशोक घडसी असे मृत तरुणाचे नाव आहे. सिंहगड रोडवरील माणिकबाग येथे शनिवारी पहाटे अक्षयची पाच जणांनी तलवारीने वार करत हत्या केली. अक्षयच्या वडिलांनी सिंहगड पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी निलेश चौधरी, सागर दारवटकर व त्यांच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अक्षय आणि पाचही आरोपी हे एकाच भागात राहतात. त्यांच्यात दहीहंडीचा बॅनर लावण्यावरुन वाद झाला होता.
अक्षय घडसी हा किराणा दुकान चालवायचा. त्याचे धायरीत दुकान आहे. काल संध्याकाळी साडेसहाच्या दरम्यान बाहेर गेलेला अक्षय घरी परतला नाही. यानंतर मध्यरात्री अडीचच्या सुमारास पोलीस नियंत्रण कक्षाला एक तरुणाचा पेट्रोल पंपाजवळ खून झाल्याची माहिती मिळाली. यानंतर पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटली. पोलिसांनी अक्षयच्या घऱच्यांना ही माहिती.
दहीहंदीचा बॅनर लावण्याच्या वादातून पाच जणांनी मध्यरात्री अक्षयवर तलवारीने वार करुन त्याची निर्घृण हत्या केल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलं आहे. आता सिंहगड पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. पाचही आरोपी सध्या फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,सिंहगड रोडवरील माणिकबाग येथील नॅशनल पार्क सोसायटीमध्ये अक्षय गडशी राहण्यास होता.तर त्याचे निलेश चौधरी आणि अन्य चार मित्राशी दहीहंडी चा फ्लेक्स कोणत्या चौकात आणि त्यावर कोणाचे फोटो असावे.यावरून काही दिवसांपूर्वी वाद झाला होता.तो राग मनात धरून निलेश चौधरी आणि त्याच्या बरोबर असणाऱ्या चार मित्रांनी शनिवारी रात्रीच्या सुमारास माणिकबाग परिसरात अक्षयवर तलवारी ने सपासप वार करून हत्या केल्याची घटना घडली आहे.या प्रकरणी संबंधितवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलीसांनी सांगितले.
व्हीएस न्युज - गुंड बापू नायर याच्या टोळीला मदत केल्याप्रकरणी मोक्का अंतर्गत कारवाई केलेल्या महिला वकील वर्षा फडके यांना उच्च न्यायालयाने जामीन मंजुर केला आहे. पुराव्यामध्ये ढवळाढवळ न करण्याच्या अटीवर 1 लाख रुपयांचा जामीन न्यायमूर्ती साधना जाधव यांनी मंजुर केला आहे.
एका प्रकरणात नायर याची आई, पत्नी पोलिसांच्या ताब्यात असताना त्यांच्या अटकेची परवानगी लष्कर न्यायालयाने दिली होती. त्यावेळी अटकेला उच्च न्यायालयाने स्थगिती दिलेली आहे, असे खोटे शपथपत्र दाखल करुन त्या दोघींना स्वत:चे ताब्यात घेतले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी दोघींना न्यायालयात हजर न करता पळून जाण्यास मदत केल्याप्रकरणात ऍड. वर्षा यांना अटक करण्यात आली आहे. त्यानंतर त्यांना मोक्का लावण्यात आला होता. या प्रकरणात बचाव पक्षातर्फे ऍड. रोहन नहार, ऍड. मंगेश देशमुख आणि ऍड. अशोक मुंदरगी यांनी यांनी उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. ऍड. फडके यांच्यावर यापूर्वी एकही गुन्हा दाखल नाही, त्यांना जामीन मंजुर करावा, अशी मागणी केली होती. ती न्यायालयाने मंजुर केली.
व्हीएस न्युज - कामगारांच्या हितासाठी नागरिकांना त्रास न होता वेळप्रसंगी आंदोलने, संप करून व्यवस्थापनाला व सरकारला भूमिका बदलविण्यास भाग पाडणारे कामगार नेते अशी शरद राव यांची ओळख होती. कामगारांच्या भल्यासाठी संघर्ष कधी करायचा आणि कधी थांबवायचा हे राव यांनी देशभरातील कामगार संघटनांना शिकविले. त्यांच्या विधायक दृष्टीकोनामुळेच तळेगावमध्ये कामगार व त्यांच्या मुलामुलींसाठी डॉ. राम मनोहर लोहिया विद्यापीठासारखी प्रशिक्षण संस्था उभी राहिली, हे अभिमानास्पद आहे, असे गौरवोद्गार केंद्रीय माजी मंत्री खासदार शरद पवार यांनी तळेगाव येथे काढले.
शनिवारी दि. 1 सप्टेंबर रोजी दिवंगत कामगार नेते शरद राव यांच्या व्दितीय पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण खा. शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. मुंबई म्युनिसिपल मजदूर युनियन आणि म्युनिसिपल इंजिनिअर्स असोसिएशन यांच्या वतीने तळेगाव दाभाडे येथे डॉ. राम मनोहर लोहिया समाजवादी विद्यापीठात आयोजित केलेल्या या कार्यक्रमात स्वागताध्यक्ष मुंबई म्युनिसीपल इंजिनिअर्स असोसिएशनचे कार्याध्यक्ष नवनाथ घाडगे, हिंद मजदूर सभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष ॲड. महाबळ शेट्टी, माजी खासदार विदुरा (नाना) नवले, आमदार संजय भेगडे, माजी आमदार कृष्णराव भेगडे, मदन बाफना, तळेगाव नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, मुंबई म्युनिसीपल मजदूर युनियनचे सचिव गोविंद कामतेकर, फेडरेशनचे कार्याध्यक्ष शशिकांत (बबन) झिंजुर्डे, नूर अहमद (कलकत्ता), देवेंद्र गौतम (राजस्थान), शंकर साळवी, सुरेश ठाकूर, साईनाथ राजाध्यक्ष, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, मूर्तीकार संदीप मुंढे, निमंत्रक ॲड. सुखदेव काशीद, रमेश मालवीय, वामन कविस्कर, अशोक जाधव, पिंपरी-चिंचवड कर्मचारी महासंघाचे मनोज माछरे, आबा गोरे, संजय कुटे, नितीन समगिर, अंबर चिंचवडे आदींसह राज्यभरातील महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषदांचे कामगार प्रतिनिधी बहुसंख्येने उपस्थित होते.
शरद राव यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करताना खासदार पवार यांनी सांगितले की, 1967 साली मी विधानसभेत पहिल्यांदा निवडून आलो. त्यावेळी कामगार क्षेत्रात जॉर्ज फर्नांडीस यांचे मुंबईमध्ये वर्चस्व होते. खासदारकीच्या निवडणुकीत स. का. पाटील यांचा पराभव शरद राव आणि जॉर्ज फर्नांडीस यांच्या जोडीने केला. हिंदुस्थान लिव्हरमधील कामगार लढ्यापासून जॉर्ज फर्नांडीस यांना खासदार करण्यापर्यंतच्या कार्यकालात शरद राव यांचे नाव पुढे आले. मुंबई देशाची औद्योगिक व आर्थिक राजधानी आहे. तेथे घडणा-या घटनांची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली जाते. बाबरी मस्जिद पडल्यानंतर मुंबई ठप्प झाली होती. पंतप्रधानांनी मला मुंबईत पाठविले, त्यावेळी सरकारी अधिकारी व मुंबई मनपाचे कामगार नेते म्हणून शरद राव यांच्या बरोबर बैठक मी घेतली. मुंबईतील लोकल, बेस्ट आणि आरेची दूध गाडी सुरु झाली तर मुंबई पूर्ववत सुरु होईल, असे मी मत मांडल्यानंतर शरद राव यांनी पुढाकार घेऊन मुंबईतील लोकल व बेस्ट बससेवा पुन्हा सुरु करण्यास पुढाकार घेतला. मुंबईसह 18 राज्यातील, 18 लाखांहून जास्त कामगारांचे, विविध कामगार संघटनांचे नेतृत्व शरद राव यांनी केले. यापूर्वी मी तळेगावात त्यांच्या बरोबर आलो होतो, आता त्यांच्याशिवाय आलो आहे. शरद राव यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सोहळा आहे. मनपा कामगारांना 15 टक्के बोनस देण्याबाबत त्यांची आग्रही भूमिका होती. म्हणूनच मी मनपा कर्मचा-यांना बोनस देऊ शकलो. यापूर्वी महानगरपालिकांचे निर्णय आयुक्त व कामगार प्रतिनिधी यांच्या चर्चेव्दारे सुटत होते. आता महापालिका, नगरपालिकांचे छोटे-मोठे निर्णय मंत्रालयातून घेतले जातात, हे चांगल्या सरकारचे लक्षण नाही. मुंबई म्यूनिसिपल मजदूर युनियनचा गेल्या दोन वर्षांपासून वेतन करार प्रलंबित आहे, याबाबत आपण लवकरच कामगार प्रतिनिधींना बरोबर घेऊन सरकारशी चर्चा करू, असे आश्वासन खा. पवार यांनी दिले. तसेच जॉर्ज फर्नांडीस, बाळासाहेब दंडवते यांच्यानंतर कामगारांचे हित पाहणारा नेता म्हणून शरद राव यांचे नाव भारतीय कामगार इतिहासात नोंदविले जाईल. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी सहा वर्षे आजारपणाशी लढत होते, तसेच अंथरूणाला खिळून असणारे कामगार नेते जॉर्ज फर्नांडीस, जसवंत सिंग यांच्या आजारपणाविषयी मला अस्वस्थता वाटते, असेही खा. पवार म्हणाले.
स्वागताध्यक्ष नवनाथ घाडगे यांनी सांगितले की, एका गरीब कामगाराच्या घरात शरद राव यांचा जन्म झाला होता. त्यामुळे कामगारांच्या वेदनांची जाणीव मनात ठेवुनच त्यांनी कामगार संघटनेचे काम पंचेचाळीस वर्षांहून अधिक काळ केले. कामगारांसाठी लढणारा शरद राव नावाचा हा युगपुरुष कामगार चळवळीच्या मुशीत तावून सुलाखून निघालेले एक रत्न होते. जेंव्हा जेंव्हा कामगार आंदोलनात संभ्रम निर्माण होत असे, तेंव्हा शरद राव हे कामगार चळवळीला नवनिर्माणाच्या मार्गावर घेऊन जायचे. मुंबईसह देशातील एक अभ्यासू कामगार नेते म्हणुन त्यांची लोकप्रियता होती.
ॲड. महाबळ शेट्टी यांनी सांगितले की, शरद राव यांचे दिनांक 1 सप्टेंबर, 2016 रोजी निधन झाले. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून, विशिष्ट ध्येयाने प्रेरित होऊन, महापालिकेतील कामगार, कर्मचारी, अधिकारी, अभियंते, मुंबईसह महाराष्ट्रातील विविध कारखाने - उद्योग - व्यवसायातील कामगार-कर्मचारी, कापड बाजारातील गुमास्ता, कंत्राटी कामगार, फेरीवाले, टॅक्सी-ऑटोरिक्षा चालक-मालक, रोजंदारीत, किरकोळ विक्रेते, छोटे दुकानदार, श्रमजीवी-कष्टकरी, गोर-गरीब आणि सर्वसामान्य नागरीकांना न्याय-हक्क मिळवुन देण्यासाठी आयुष्यभर अहोरात्र झटलेले, प्रामुख्याने बृहन्मुंबई महानगरपालिका कामगार, कर्मचारी, अधिकारी, परिचारिका - परिसेविका-तंत्रज्ञ, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी आणि अभियंत्यांची दैदिप्यमान ऐतिहासिक संघर्ष लढ्याचे भिष्म पितामह विख्यात कामगार नेते दिवंगत शरद राव यांचे चिरंतन स्मारक म्युनिसीपल मजदूर युनियन आणि म्युनिसीपल इंजिनिअर्स असोसिएशनचे नेते ॲड. सुखदेव काशिद आणि नवनाथ घाडगे यांच्या संकल्पनेतून साकार होत आहे. राव यांचे हे स्मारक कामगारांना नेहमीच प्रेरणादायी ठरेल, असेही शेट्टी म्हणाले.
जलतरणपटू शाम शिंदे, मूर्तीकार संदीप मुंढे, महानगरपालिका फेडरेशनचे कार्याध्यक्ष बबन झिंजुर्डे, नाना ओरपे, तळेगाव नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांचा खा. पवार यांच्या हस्ते यावेळी सत्कार करण्यात आला. ॲड. महाबळ शेट्टी, सुखदेव काशीद, चित्रा जगनाडे, नूर अहमद, शंकर शेट्टी आदींनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन ज्योती आंबेकर यांनी केले. अशोक जाधव यांनी आभार मानले.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002