व्हीएस न्युज - अभिनेता आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्या पौड रस्त्यावरील कार्यालयाची तोडफोड करून त्यांना धक्काबुक्की करण्यात आल्याचा प्रकार रविवारी दुपारी घडला. काही दिवसांत प्रदर्शित होत असलेल्या मराठी चित्रपटावरून हे कार्यालय फोडण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, प्रवीण तरडे यांनी फेसबुकवर लाईव्ह करत हा प्रकार किरकोळ असून, तोडफोड करणारी मुले माझ्याच तालुक्यातील आहेत. गैरसमजातून त्यांनी हे केले असून, चित्रपट पाहिल्यानंतर त्यांचा गैरसमज दूर होईल, असे म्हटले आहे.
याप्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. काही दिवसांमध्ये नवीन मराठी चित्रपट येत आहे. यातील काही संवाद आणि घटना पुण्यातील कुख्यात गुंड संदीप मोहोळवर आधारित असल्याबाबतची तक्रार पुणे पोलिसांकडे मोहोळ याच्या नातेवाइकांनी केली आहे.
दरम्यान, रविवारी दुपारी मोहोळ याच्या बहीण व नातेवाइकांनी दिग्दर्शक प्रवीण तरडे यांना फोन करून चित्रपटावर आक्षेप असल्याचे सांगितले होते. त्यानंतर तरडे यांनी त्यांना चित्रपट पाहा त्यानंतर आक्षेपावर बोलू, असे म्हणत त्यांना पौड रोडवरील कार्यालयात बोलावले होते. त्यावेळेस काहीजण त्याठिकाणी गेले होते. चित्रपट पाहिल्यानंतर तरडे आणि त्यांच्यात वादावादी झाली. त्यानंतर धक्काबुक्की व किरकोळ तोडफोडीचा प्रकार घडला असल्याची माहिती कोथरूड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अप्पासाहेब शेवाळे यांनी दिली.
दरम्यान, चित्रपटातील गाण्यांमध्ये गुन्हेगारांच्या समावेशामुळे हा चित्रपट वादाच्या भोवर्यात आहे. तसेच यातील संवाद आणि घटनांमुळे मानहानी होत असल्याची तक्राराही मोहोळ याच्या बहिणीने केली आहे. त्याबाबत चौकशी सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, गुन्हे शाखेकडूनही गोपनीय माहितीच्या आधारे टोळ्यांची झाडाझडती सुरू केली आहे. ही झाडाझडती काही सराईत पुन्हा सक्रिय झाल्याने केली जात असून, त्याला या चित्रपटाची पार्श्वभूमी असल्याचे सांगितले जाते.
व्हीएस न्युज - पिंपरी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) कार्यक्षेत्रामध्ये अकरा हजार आठशे सत्तर रिक्षांची नोंदणी झाली आहे. प्रत्यक्षात मात्र तीस ते पस्तीस हजार रिक्षा शहरात अनधिकृतपणे प्रवासी वाहतूक करतात. नोंदणी नसलेल्या रिक्षांवर वाहतूक पोलीस आणि आरटीओकडूनही कारवाई केली जात नाही. अनधिकृत आणि धोकादायक स्थितीत रिक्षांमधून प्रवासी वाहतूक होत असली तरी प्रशासनाकडून लक्ष दिले जात नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.
राज्यात जुलै २०१७ पासून मागेल त्याला रिक्षा परवाना देण्याच्या मुक्त धोरणाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली. प्रत्यक्ष अंमलबजावणीला सुरुवात झाल्यापासून पिंपरीत तीन हजार २१६ रिक्षा चालकांना परवाना देण्यात आला आहे, तर ६ हजार ४७० नवीन रिक्षांची नोंदणी पिंपरी आरटीओ कार्यालयाकडे झाली आहे.
परवाना मुक्त धोरणाच्या आधी पिंपरी-चिंचवडमध्ये रिक्षा चालविण्याचे परवाने अतिशय मर्यादित होते. परंतु त्यावेळीही रिक्षांची संख्या भरमसाठ होती. नवीन आणि जुन्या रिक्षांची नोंदणी केवळ ११ हजार ८७० आहे. परंतु प्रत्यक्षात ३० ते ३५ हजार रिक्षा रोज प्रवासी वाहतूक करतात. बेकायदा आणि आरटीओकडे नोंदणी नसलेल्या रिक्षा प्रवासी वाहतूक करत आहेत आणि रिक्षा चालविणारे चालकही अल्पवयीन आणि परराज्यातील असल्याचे चित्र सध्या शहरामध्ये दिसून येत आहे.
पिंपरी आरटीओ कार्यालयामध्ये सध्या दहा ऐवजी वीस रिक्षा परवान्याचा दैनंदिन कोटा ठरविण्यात आला आहे. त्यानुसार रोज वीस रिक्षांचे परवान्याचे वितरण करण्यात येते. त्यामुळे भविष्यात परवानाधारक रिक्षांची नोंदणी वाढणार आहे. परंतु सध्या सुरू असलेल्या बेकायदेशीर रिक्षा प्रवासी वाहतुकीकडे आरटीओ आणि वाहतूक पोलिसांची कारवाई होत नसल्याने राजरोसपणे रस्त्यावर बेकायदा रिक्षा प्रवासी वाहतूक करत आहेत. आरटीओ आणि वाहतूक पोलीस दोघेही मनुष्यबळाचे कारण देऊन हात झटकत आहेत.
भंगार झालेल्या रिक्षा तोडल्यानंतरच नवीन रिक्षांना परवाना दिला जातो. त्यामुळे परवान्याशिवाय जास्त रिक्षा प्रवासी वाहतूक करत असतील तर त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. इतर जिल्ह्य़ातून आलेल्या रिक्षांवर वाहतूक पोलीस आणि आम्ही संयुक्तपणे कारवाई करत आहोत. अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या शंभर रिक्षा जप्त करण्यात आल्या आहेत. ही कारवाई यापुढेही सुरूच ठेवण्यात येणार आहे.
– आनंद पाटील, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी
पिंपरी-चिंचवड शहरातील ३० ते ३५ हजार रिक्षांची नोंदणी आरटीओ कार्यालयाकडे नाही. अशा रिक्षांवर कारवाई करावी अशी मागणी वेळोवेळी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे प्रामाणिक रिक्षा चालकांवर अन्याय होत आहे.
– श्रीधर काळे, अध्यक्ष, क्रांती रिक्षा संघटना, पिंपरी-चिंचवड
व्हीएस न्युज - नगरसेवकपदाचा पदाचा गैरवापर करून बेहिशेबी मालमत्ता जमविल्याच्या आरोपावरून सुभाष जगताप, उषा जगताप यांच्याविरुद्ध दाखल झालेल्या गुन्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोषारोपपत्र शुक्रवारी दाखल केले. यावेळी पोलिसांनी जगताप दांपत्याला अटक केली. शुक्रवारी दुपारी (ता. 16)त्यांची जामीनावर सुटका झाली. त्यांनी एक कोटी 33 लाख 39 हजार 592 रुपयांची बेहिशोबी मालमत्ता जमविली, असे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.
नगरसेवक पदाचा गैरवापर करून बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याच्या आरोपावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक सुभाष जगताप, त्यांची पत्नी व तत्कालीन नगरसेविका उषा यांच्याविरुद्ध 4 मार्च 2015 रोजी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचे दोषारोपत्र उपअधीक्षक कांचन जाधव यांनी शुक्रवारी विशेष न्यायाधीश किशोर वढणे यांच्या न्यायालयात दाखल केले. यावेळी सुभाष आणि उषा यांना अटक करण्यात न्यायालयात हजर करण्यात आले. जगताप हे 1995 पासून 2016 पर्यंत नगरसेवक होते. सध्या ते स्वीकृत नगरसेवक आहेत. त्यांच्या उत्पन्नाच्या स्त्रोतापेक्षा त्यांच्याकडे एक कोटी 33 लाख 39 हजार 592 रुपयांची अधिक मालमत्ता आढळून आली आहे. तिचा हिशेब त्यांना सादर करता आलेला नाही, असे पोलिसांनी न्यायालयात म्हटले आहे.
जगताप दांपत्याने जामीनासाठी ऍड. एन. डी. पवार यांच्यामार्फत अर्ज दाखल केल्यावर न्यायालयाने तो मंजूर केला. याबाबत सुभाष जगताप म्हणाले, ""माझ्या सर्व संपत्तीची माहिती प्राप्तीकर विभागाला सादर केलेली आहे. त्याचा करही भरलेला आहे. जुन्या मिळकतींची बाजारमूल्याने वाढ गृहित धरून पोलिसांनी तपासात अपसंपदेचा ठपका माझ्यावर ठेवला आहे. तो चुकीचा आहे. त्याबाबत न्यायालयात मी माझे म्हणणे सादर करणार आहे. पोलिस तपासात झालेल्या चुका झाकण्यासाठी माझ्यावर हे कुंभाड रचण्यात आले आहे.''
व्हीएस न्युज - बेघर गरीबांना महाराष्ट्र सरकार जमिनीचा पट्टा देणार अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. फक्त जमिनीचा पट्टाच नाही तर त्यावर घर बांधण्यासाठी पैसेही देणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. राज्यातील एक कोटी व्यक्तींपेक्षा जास्त लोकांना मुद्रा योजनेच्या माध्यमातून कर्ज मिळेल असेही त्यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्रातील 90 टक्के लोकांना आरोग्यावर कोणताही खर्च करण्याची गरज नाही. केंद्र आणि राज्य सरकार तो भार उचलणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. पंतप्रधानांनी सुरु केलेल्या आरोग्य योजनेत देशातील पन्नास कोटी लोक कव्हर होत आहेत. त्याला राज्य सरकारने महात्मा फुले आरोग्य योजनेची जोड दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी त्यांनी काँग्रेसवरही टीका केली. गरीबी हटावचा नारा देत अनेक निवडणुका काँग्रेसने जिंकल्या. मात्र गरीब व्यक्ती गरीबच राहिला. निवडणुका आल्या की काँग्रेसला गरीबांची आठवण येते अशी टीकाही मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भाषणात केली. पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.
काँग्रेसने देशावर घराणेशाही लादल्याचाही आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांन केला. महापालिका ते केंद्रापर्यंत तुम्ही सत्ता भोगली तरी देखील प्रश्न राहीले आहेत. आता आमची सत्ता आली तर काही जण आम्हाला विचारतात की योजनांचे किंवा प्रकल्पाचे काय झाले? हा प्रश्न विरोधकांनी आम्हाला विचारू नये तो लोकांना विचारावा लोकच त्याचे योग्य उत्तर तुम्हाला देतील असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
पुणे शहराचे खासदार अनिल शिरोळे यांच्या कार्य अहवालाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी पालकमंत्री गिरीश बापट,समाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे, राज्यसभा खासदार संजय काकडे, आमदार आणि नगरसेवक उपस्थित होते.
व्हीएस न्युज - पुण्यात 1 जानेवारीपासून हेल्मेटसक्ती करण्यात येणार आहे. पोलीस आयुक्तांनी हेल्मेटसक्तीचा निर्णय घेतला आहे. पोलीस आयुक्तांनी नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे.
शहरातील वाढत्या अपघातांमुळे पोलीस आयुक्तांनी न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. महत्त्वाचं म्हणजे याआधीही अनेकदा पुण्यात हेल्मेटसक्ती करण्यात आली होती. मात्र नागरिकांच्या विरोधामुळे त्याची अंमलबजावणी होऊ शकली नव्हती. मात्र पोलीस आयुक्तांनी नव्याने हा निर्णय घेतला आहे. यामुळे पुण्यात पुन्हा एकदा नागरिक रस्त्यावर उतरण्याची शक्यता आहे.
याआधीही पुण्यात हेल्मेटसक्ती कऱण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र प्रशासनाला नागरिकांच्या संतापाला सामोरं जावं लागलं होतं. ठिकठिकाणी सर्वसामान्य नागरिकांनी रस्त्यांवर उतरुन निर्णयाचा निषेध केला होता. विशेष म्हणजे काही राजकीय पक्षांनीही त्यांना पाठिंबा दिला होता. हेल्मेटमुळे मानदुखी जडते, आजूबाजूचे दिसण्यात अचडण येते असा आक्षेप घेत आधी सार्वजनिक वाहतूक सुधारा, वाहतूक नियोजन तसंच रस्त्यांची स्थिती सुधारा अशा मागण्या करण्यात आल्या होत्या.
व्हीएस न्युज - अमली पदार्थविरोधी पथकाने वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना संशयितरीत्या आढळलेल्या टेम्पोचा पाठलाग केला. या वेळी तब्बल १३ लाख ४८ हजार ४०० रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. पथकाने ही कारवाई गुरुवारी दुपारी केली. याप्रकरणी विक्रम पेशोराम भक्तीयारपुरी (वय २९, रा. वैभवनगर, पिंपरी) या चालकाला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडील गुटखा व एमएच १२, एमव्ही १४६३ या क्रमांकाचा टेम्पो हस्तगत केला आहे.
याबाबतची माहिती अशी, अमली पदार्थविरोधी पथक, गुन्हे शाखा पथकाकडून वाकड हद्दीत गुटखा विक्री व अमली पदार्थ तस्करी करणाऱ्यांना जरब बसावी. यासाठी पोलीस निरीक्षक श्रीराम पौळ यांच्या मार्गदर्शनाखाली पथक वाकड हद्दीत गस्त घालत होते. त्या वेळी एक टेम्पो संशयितरित्या आढळून आला. त्याचा शिताफीने पाठलाग करून झडती घेतली असता त्यात गुटखा आढळला. टेम्पोत गुटखा आढळल्याने अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी व निरीक्षकांना बोलावून घेत गुन्हा दाखल करण्यात आला. टेम्पोत तब्बल १३ लाख ४८ हजार ४०० रुपये किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला.
उपनिरीक्षक वसंत मुळे, हवालदार प्रदीप शेलार, राजन महाडिक, रमेश भिसे, प्रसाद जंगीलवाड, बि. के. दौंडकर, बाळासाहेब सूर्यवंशी, टी. डी. घुगे, आर. डी़ बांबळे, ए. डी. गारगोटे, प्रदीप गुट्टे यांनी कारवाई केली.
व्हीएस न्युज - वेगवेगळ्या पद्धतीने दुबईहून लपवून आणलेले सोन सीमा शुक्ल विभागाच्या पथकाने पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज पकडले. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून ११ लाख ७ हजार रुपये किंमतीचे ३४९.९३ ग्रॅम सोने जप्त केले आहे. शेख तारीक महमुद असे प्रवाशाचे नाव आहे.
पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर गुरुवारी पहाटेच्या सुमारास दुबईहून स्पाईसजेटचे एसजी 52 विमान उतरले. त्यावेळी या विमानातून आलेला प्रवाशी शेख तारीक महमुद याची तपासणी केल्यावर सीमा शुल्क विभागाच्या पथकाला त्याच्याजवळ सोने असल्याचे आढळून आले. त्यानंतर त्याची झडती घेतल्यावर दोन सोन्याचे बिस्कीट चार भागात तुकडे करून जीन्स पॅन्टला कमरेला लावून आणलेले तर दोन सोन्याचे सिक्के हुबेहुब चलनी सिक्क्यांप्रमाणे बनवलेले त्याच्या पाकीटात आढळून आले. तर र्होडीयम प्लेटींग केलेली एक सोन्याचीच किचेन रिंग असे एकूण 11 लाख 07 हजार 878 रुपये किंमतीचे 349.93 ग्रॅम सोने त्याच्याजवळ आढळून आले. सीमा शुल्क विभागाने त्याच्याकडून सोने जप्त केले असून पुढील तपास सुरु आहे. अशी माहिती सीमा शुल्क विभागाचे उपायुक्त हर्षल मेटे यांनी दिली.
व्हीएस न्युज - व्हॉट्सअॅपवर व्हायरल झालेल्या पिंपरी-चिंचवड मधील आणखी एका अपहृताची सुखरुप सुटका करण्यात पोलिसांना यश आले आहे. व्हॉट्सअॅपचा अतिसंवेदनशील गुन्ह्यामधील व्हायरलपणा दुसऱ्यांदा पोलिसांच्या बाजूचा ठरला आहे.
माही अवध जैन (वय 12) असे सुखरूप सुटका झालेल्या मुलीचे नाव आहे. तर पोलिसांनी नितीन सत्यवान गजरमल (वय २५, देवगाव, ता. परंडा, जी. उसमनाबाद, सध्या रा. नेरे) आणि जितेंद्र पप्पूराम बंजारा (वय २१, रा. थेरगाव, वाकड) या दोघांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माही चिंचवडमधील क्विन्स टाऊन सोसायटीमध्ये राहते. त्यांचा परिवार मूळ जयपूर मधील आहे. ते आधी निगडी येथे राहायचे. मागील तीन वर्षांपूर्वी जैन परिवार चिंचवड मधील क्विन्स टाऊन सोसायटीत राहायला आले. तिचे वडील आयटी क्षेत्रात तर आई बँकेत काम करतात.
माही नेहमीप्रमाणे दुपारी चार वाजता शाळेतून घरी आली. शाळेच्या स्कूलबस मधून सोसायटीच्या गेटवर उतरली. त्यानंतर पेन आणण्यासाठी ती सोसायटी जवळ असलेल्या माय मार्ट या दुकानात गेली. तिथे कार मध्ये दबा धरून बसलेल्या आरोपींनी तिला जबरदस्तीने कारमध्ये बसवले. माहीने आरडाओरडा केला. हा आरडा ओरडा पाहून दुकानदार बाहेर आला. तोपर्यंत कार सुसाट गेली. दुकानदाराने मोपेड दुचाकीवरून कारचा पाठलाग केला परंतु थोडे अंतर गेल्यानंतर कार गायब झाली.
दुकानदाराने याबाबत माहीच्या घरी कळवले. घरचे बाहेर आले. त्यांनी पोलिसांना कळवले. आणि संपूर्ण पोलीस प्रशासन माहीच्या शोधासाठी अलर्ट झाले. मात्र, त्यापुर्वीच तिच्या अपहरणाची मॅसेज व्हॉट्सअॅपवर निम्म्या शहरात व्हायरल झालेला होता. अखेरकार पोलिसांना आव्हान करण्याची वेळ आली. अशा संवेदनशील गुन्ह्यामध्ये योग्य खबरदारी घेतली गेली नाही तर अपहृताच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.
यानंतर स्थानिक पोलीस, गुन्हे शाखेचे पथके, इतर पोलीस ठाण्याची पथके तपासासाठी रवाना झाली. ठीक-ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली, सीसीटीव्ही फुटेज पाहण्यात आले, शहरातील लॉज तपासले गेले. याच सोबत वेगवेगळ्या पद्धतीने तपास सुरू असताना पोलिसांना एक धागा सापडला. अपहरणकर्त्यांनी मुलीच्या पालकांना आठ वाजता बोलावले आणि पैशांची (खंडणी) मागणी केली. गुन्हे शाखेच्या पथकाने माहिती घेऊन अतिशय हुशारीने त्या मुलीला ज्या ठिकाणी ठेवले होते ते ठिकाण शोधून काढले. संशयित आरोपीने तो राहत असलेल्या घरात तिला ठेवले होते. गुन्हे शाखेच्या पथकाने पहाटे दीडच्या सुमारास नेरे गावातुन त्या मुलीची सुखरूप सुटका केली आणि दोघांना अटक केली. मुलीला तिच्या पालकांच्या स्वाधीन केले आहे. यातील एक आरोपी सिनेमा गृहात काम करतो तर दुसरा डिलिव्हरी बॉयचे काम करतो. अधिकची माहिती पोलीस घेत आहेत.
वर्षभरापुर्वीच अशीच एक घटना घडली होती
२३ सप्टेंबर २०१७ला निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पुर्णानगर भागातून लघुउद्योजकाचा ९ वर्षांचा मुलगा ओम संदीप खरात याचे ६० लाख रुपयांसाठी अपहरण करण्यात आले होते. अखेरकार हा मुलगा व्हॉट्सअॅपवरील व्हायरल पोस्टमुळे अपहरणकर्त्यांनी बीड जिल्ह्यातील गेवराईपर्यंत घेऊन जाऊन पुन्हा निगडीत आणून सोडल्यानंतर पोलिसांनी अपहरणकर्त्या अक्षय काशिनाथ जामदारे (वय २१, रा. हरगुडेवस्ती, गणेशनगर, तळवडे, पुणे) व रोशन नंदकुमार शिंदे (वय २०, रा. सप्तश्रृंगी सोसायटी, गणेशनगर, तळवडे, पुणे) यांना अटक केली होती.
व्हीएस न्युज - कॉम्प्युटरवर गेम खेळण्यासाठी तीन विद्यार्थ्यांनी शाळेतील कॉम्प्युटर चोरल्याची घटना पिंपरी- चिंचवडमध्ये घडली आहे. बुधवारी दिघी टोल नाका येथून पोलिसांनी या विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले असून त्यांनी शाळेतून दोन कॉम्प्युटर चोरले होते.
पिंपरी-चिंचवडच्या यशवंत चव्हाण विद्यालयात तीन आठवड्यांपूर्वी कॉम्प्युटर चोरीची घटना घडली होती. शाळेतील दोन माजी विद्यार्थी आणि सध्या इयत्ता ९ वी वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्याने लॅब मधून दोन कॉम्प्युटर चोरले. या प्रकरणी पोलिसांनी तपासाला सुरुवात केली असता शाळेतील विद्यार्थ्याने कॉम्प्युटर चोरल्याचे उघड झाले. पोलिसांनी दिघी टोल नाका परिसरातून या मुलांना ताब्यात घेतले आहे. या तिघांना कॉम्प्युटर गेमचे वेड होते आणि यातूनच ही चोरी केल्याची कबुली त्यांनी दिली. रात्री उशिरा कुलुप तोडून या तिघांनी शाळेच्या लॅबमध्ये प्रवेश केला होता.
चोरी केल्यानंतर यातील एक कॉम्प्युटर शाळेतील माजी विद्यार्थ्याच्या घरी होता. तर दुसरा कॉम्प्युटर नववीत शिकणाऱ्या मुलाच्या घरात होता. दोन हजारात कॉम्प्युटर खरेदी केल्याचे त्यांनी कुटुंबीयांना सांगितले होते. पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक लावंड, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिवाजी भुजबळ यांच्या टीमने केली.
व्हीएस न्युज - पुण्यातील शिवाजीनगर येथील एसएसपीएमएस या शाळेतील एका विद्यार्थ्यायाने चित्र काढली नाहीत म्हणून शिक्षकाने त्या विद्यार्थ्याला मारहाण केली. त्या शिक्षकाने केलेल्या मारहाणीमुळे विद्यार्थ्याच्या शरीराचा अर्धा भाग निकामी झाला आहे. हा अर्धांगवायूचा झटका आहे. या प्रकरणाची शाळा प्रशासनाकडे पालकांनी तक्रार केल्यावर तात्काळ शिक्षकाला निलंबित करण्यात आले आहे. चित्रकलेचे शिक्षक संदीप गाडे यास निलंबित करण्यात आले आहे. शिक्षकाच्या मारहाणीत प्रसन्न पाटील याला दुखापत झाली.
एसएसपीएमएस या शाळेतील चित्रकलेचे शिक्षक संदीप गाडे यांनी विद्यार्थ्यांना दोन चित्रे काढून आणण्यास सांगितली होती. मात्र प्रसन्न पाटील या सहावीतील विद्यार्थ्यांने चित्रे काढली नव्हती. त्यामुळे चित्रकलेचे शिक्षक संदीप गाडे यानी प्रसन्नला बेंचवर हात ठेवण्यास सांगितले आणि त्याच्या चेहऱ्यावर, पोटावर मारहाण केली. या मारहाणीमुळे प्रसन्नचा चेहरा वाकडा देखील झाला.
एवढा प्रकार घडून देखील शाळा प्रशासनाने माहिती प्रसन्नच्या घरी कळवली नाही. प्रसन्नला दिवाळीच्या सुट्टीसाठी घरी घेऊन गेल्यावर पालकांना सविस्तर प्रकार समजला. त्यानंतर त्याला तात्काळ एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणाचा जाब विचारण्यासाठी आज प्रसन्नच्या पालकांनी मुख्याध्यापिका स्मिता पाटील यांच्याकडे तक्रार केली. त्यानंतर संदीप गाडे याला तात्काळ निलंबित केले असून या प्रकरणाचे चौकशीचे आदेश देण्यात आले आहे.
व्हीएस न्युज - दोन सराईत वाहन चोरट्यांना गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने शिताफीने अटक केली. त्यांच्याकडून वाहन चोरीचे पाच गुन्हे उघडकीस आले असून ४ लाख रुपये किंमतीच्या ८ दुचाकी हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.
आकाश राजाभाऊ शिंदे (वय-१९), अक्षय अनिल लोमटे (वय-१९, दोघे रा. खराबवाडी, चाकण) अशी अटक आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सराईत वाहनचोर आकाश शिंदे हा चाकण बाजारपेठ येथे येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस नाईक सचिन उगले यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून सचिनला ताब्यात घेतले. अधिक चौकशी केली असता त्याच्याजवळ असणारी दुचाकी चोरीची असल्याचे समोर आले. त्याला अटक करून तपास केला असता त्याने साथीदार अक्षयच्या मदतीने वाहनचोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली.
अक्षयला ताब्यात घेतले असता दोघांकडून चाकण पोलीस ठाण्यातील तीन, निगडी आणि तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक असे एकूण पाच गुन्हे उघडकीस आले. त्यांच्याकडून ४ लाख रुपये किमतीच्या ८ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या असून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, सहायक पोलीस आयुक्त सतिश पाटील यांच्या मर्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे, सहायक पोलीस निरीक्षक गणेश पाटील, पोलीस हवालदार राजू केदारी, प्रमोद लांडे, पोलीस नाईक सचिन उगले, आशिष बोटके, पोलीस शिपाई गणेश सावंत, प्रवीण पाटील, विशाल भोईर यांच्या पथकाने ही कारवाई केली.
व्हीएस न्युज - हिंजवडी मधील एका २४ वर्षीय संगणक अभियंता तरुणीला एकतर्फी प्रेमप्रकरणातून गोळ्या घालण्याची धमकी तरुणाने दिली आहे. आरोपी तरुण देखील संगणक अभियंता असून ते एकाच कंपनीत काम करत होते. याप्रकरणी तरुणीने वाकड पोलिसात तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलीस पुढील तपास करत आहेत.
जितेंद्र सोलंकी (सध्या रा. शोनेष्ट टॉवर सोसायटी, वाकड, मूळ रा.जोधपूर राजस्थान) असे संगणक अभियंता आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर धमकावणे आणि विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी जितेंद्र सोलंकी हा २४ वर्षीय संगणक अभियंता तरुणीवर एकतर्फी प्रेम करत होता. ते दोघेही हिंजवडी मधील कॉग्निझन्ट या कंपनीत कामाला होते. त्यामुळे त्यांची एका प्रोजेक्टसाठी निवड करण्यात आली. त्या दरम्यान त्यांची मैत्री झाली. मात्र त्यापुढे जाण्यास तरुणीचा विरोध होता. परंतु जितेंद्र हा तरुणीला वारंवार त्रास देत होता.
तरुणीने यासंबंधी कंपनी प्रशासनाकडे तक्रार केली. त्यानंतर देखील जितेंद्र हा तरुणीला त्रास देत होता. त्याने तरुणीला प्रेम असल्याचे सांगितले. परंतु संबंधित तरुणीने त्याला नकार दिला. याचा राग जितेंद्रला अनावर झाला आणि फोनवरून गोळ्या घालण्याची धमकी दिली. त्यानंतर स्वतःच जितेंद्रने कंपनी सोडली. परंतु, तरुणीला फोन आणि व्हाट्सऍपवर धमक्याचे मेसेज येत असल्याने तरुणीने वाकड पोलिसात तक्रार दिली आहे. याप्रकरणी वाकड पोलीस अधिक तपास करत असून आरोपीचा शोध घेत आहेत.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002